मथुरा ! ये हमारी सबसे किमती अमानत आज तुम्हारे हाथमें है! मुल्कमें जाकर हम हमारे सरदार- हशम भेजेंगे दस्तुरी खत देकर तब तक कुँवर तुम्हारे भाईके पास रहेंगे। अभीसे ये हमारे नहीं तुम्हारे बेटे हैं।” राजे शांतपणे बोलले.
कृष्णाजी त्रिमलांना छातीवर मणभर वजनाचा पत्थर ठेवल्यागत वाटले. " बोलो.” राजांचे सलगी देणे सुरू झाले.
"हम गरीब ब्राह्मण. ये राजपुत्र. कुछ न होनवार बना तो हम कैसे मुँह दिखायेंगे आपको स्वामी ?" कृष्णाजी मनचे बोलले.
"कृष्णाजीपंत, न होनहार अब भी हो सकता है! हम इसका नामोश तुमपर कभी नहीं डालेंगे।" राजांनी कृष्णाजीपंतांना धीर दिला. कृष्णाजी मसलतीत सामील झाले ! त्यांनी केसोपंतांना तयार केले.
"तुम्ही केसोपंतांबरोबर परतीची चाल घरा. ते सांगतील तसे वागा. कुणी बरोबर घेतल्याखेरीज बाहेर फटका करू नका.” राजे सावधगिरीच्या साऱ्या सूचना जडावल्या शब्दांनी संभाजीराजांना देऊ लागले. त्यांच्या ओठांतून निसटणारे बोल नू बोल संभाजीराजांनी कानांच्या परड्या करून त्यात भंडाऱ्यासारखे साठवून घेतले! "केसोपंत, तुम्हारे घरमें कौन कौन हैं?” राजांनी त्रिमलांच्या घरचा अंदाज घेत विचारले.
"माँ है, भाई-बहने हैं। त्रिमल उत्तरले.
"तो आजसे ये तुम्हारे भांजे ! ध्यान रखना." राजे धीराने बोलत होते. संभाजीराजांच्या मनाचे सोनपान वाऱ्याच्या सपक्याबरोबर भेलकांडत कुठेतरी दूर जाऊ बघत होते. मोठ्या मुश्किलीने ते पकडून संभाजीराजे त्याला घट्ट धरून ठेवू बघत होते. दिंडीची पालखी बाहेर पडताना झांजा, मृदंग, टाळ, तास यांचा न कळणारा कल्लोळ उठावा तसा त्यांच्या मनात कल्लोळ उठला होता. अनेक चेहरे डोळ्यांसमोर तरळून धावत होते.
आणि तो क्षण आला. निरोपांचा! शिबडातील लोटक्यात दही होताना चहू अंगांनी विरजण साकवटत येते तसे राजांचे मन दाटून आले! आता धीरपुरुषाला आपल्या घशाच्या घाटीच्या रंजुकीत खिळा ठोकल्यागत वाटू लागले! शब्दांनी नकळतच चिलखते चढविली ! भावनांचे बुरुज काळजावर खडे झाले !
राजांनी आपल्या काळजाच्या भोसलाई तुकड्याचे खांदे थरथरत्या हातांनी थोपटले. भवानीच्या दोन डोळ्यांसारखे ते पितापुत्र दिसत होते! दोन वाटणारे पण जे काही बघा - भोगायचे असेल ते एकवटून भोगणारे! एकजोड झालेले !
राजांनी झोळीत हात घालून एक सोन्याची छोटेखानी शिवपिंडी बाहेर काढली. त्यांचे स्फटिक शिवलिंग हिरोजीबरोबर मागे राहिले होते म्हणून त्यांनी पूजेसाठी ही खरीदली होती. शिवपिंडी संभाजीराजांच्या ओंजळीत देत राजे म्हणाले, "आता सूर्याचा आणि दिवट्याचा मुजरा हिला करत चला. कमी बोला. हिच्यावर भरोसा ठेवा.
ओंजळीत बैरागी शिवाची', बैरागी आबासाहेबांनी दिलेली, सोनपिंडी घेऊन संभाजीराजे त्यांच्याकडे बघू लागले. तटबंदीच्या घडीव दगडावर धुक्याचे क्षणात पाणथेंब तरारून उठावेत तसे त्यांचे डोळे भरून आले. बाहुल्यांच्या पाखरांचे पंख चिंब झाले. उठलेले मोती गालांवरून ओघळत छाटीवर कोसळले.
ओंजळीतील शिवपिंडी छातीला बिलगती धरून संभाजीराजांनी पुढे होत गुडघे भुईला टेकले. आपले बैरागी कपाळ त्या चक्रवर्ती संन्याशाच्या पायांवर टेकविले !
त्या स्पर्शाबरोबर राजांच्या उभ्या अंगी काटा उठवणारी एक सरसरती रक्तलाट सरकली. त्या लाटेने त्यांच्या डोळ्यांत भोसलाई मोती आणून सोडले! संन्याशाने आपल्या केसलांब पापण्या मिटून घेतल्या. संभाजीराजांच्या डोकीवरच्या साफ्यावर राजांचे आशीर्वाद पडले. अश्रूंच्या रूपाने !
" शंभूबाळ 5 उठा." लगबगीने राजांनी त्यांना वर उठवून घेतले.
"महाराजसाहेब 5, आमचा. मासाहेबांना, थोरल्या धाकट्या आऊसाहेबांना, "धाराऊला सान्यांना मुजरा सांगा ! ते ऐकताना राजे गलबलले. कडकडाट करीत कुठल्यातरी देवळाच्या कळसावर कोसळताना विजेच्या लोळाने शेजारी असलेल्या डेरेदार वटवृक्षाला थरारून सोडावे तसे त्यांना एका विचाराने थरारून टाकले “ आप्तगणांकडून नाडला जाण्याचा योग दिसतो या कुंडलीत !!" राजांचा हात चटकन छातीवर गेला. पण आता तिथे कवड्यांची माळ नव्हती !
चारी पायांना दातेरी आकडेचाप लावलेल्या हत्तीसारखे राजे बेचैन हैराण झाले. "आणि आणि हे सलामत परत आले नाहीत तर तर मासाहेब आमचं तोंडही - बघणार नाहीत कधी! सती जायला निघताना घातली तशी त्या वेळी त्यांची समजूत काही नाही घालता येणार!" राजांच्या पोटात खड्डा पसरला. आतड्याच्या सणकेसरशी राजांनी समोरच्या शंभूराजांना पोटाशी घट्ट बिलगते घेतले. भिडली ! परिस्थितीच्या वारेझोताने ती मावळी जरीपटक्याची दोन्ही टोके एकमेकांना भिडली! त्या मिठीत राजांचे ' 'राजेपण' आणि संभाजीराजांचे 'बाळराजेपण' गुदमरून गेले.
निर्धाराने राजांनी शंभूराजांना सोडले. आपला सर्वांत किंमती हिरा जपण्यासाठी केसोपंतांच्या हाती काही हिरे, माणके ठेवली. शंभूराजांच्या मस्तकी हात ठेवून राजे अवसान घेत म्हणाले, "औक्षवंत व्हा! " "आम्ही पत्रे देऊन खबरगीर धाडू. ती पावताच टाकोटाक हुषारीने निघा. हे त्रिमलकाका सांगतील तसेच वागा. जपून असा. जय भवानी !” राजांचे डोळे शांत होते. " जय भवानी !” राजांच्या धीरबोलांना संभाजीराजांनी तशाच धीराचे अंकुर फोडले! " जय भवानी !!'