कोणतही शिवकाव्य येथे शोधा

मुरारबाजी देशपांडे

मुरारबाजी देशपांडे

मुरारबाजी देशपांडे (जन्मदिनांक अज्ञात - मे १६, इ.स. १६६५) हा मराठा सैन्यातील वीर होता. महाड तालुक्यातील किंजळोली हे मुरारबाजी देशपांडेंचे मूळ गाव. इ.स. १६६५ साली मोगलांनी पुरंदर किल्ल्याला घातलेल्या वेढ्यात त्याने मराठा सैन्याचे नेतृत्व करत कणखर झुंज दिली. मात्र १६ मे १६६५ रोजी मोगलांनी केलेल्या सुलतानढव्याचा प्रतिकार करताना त्यांस वीरमरण आले.

सैनिकी कारकीर्द

जावळीच्या चंद्रराव मोर्‍यांशी झडलेल्या संघर्षात शिवाजीराजे भोसले यांना मोर्‍यांच्या सैन्यातून लढणार्‍या मुरारबाजीच्या युद्धकौशल्याचे विलक्षण कौतुक वाटले. स्वराज्यनिर्मितीच्या लढ्यात अशा शूर मावळ्याचा उपयोग होईल हे जाणून जावळीच्या विजयानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरारबाजीला मराठा सैन्यात दाखल करून घेतले.
स्वराज्यावर औरंगजेबाचे सरदार मिर्झाराजे जयसिंह ह्याच्या रूपात नवीन संकट घोंगावत होते मिर्झाराजांनी ज्याप्रकारे महाराष्ट्रावर आक्रमण केले त्यापुढे मराठी सैन्याचा टिकाव लागणे फारच अवघड होते, या नामुष्कीची चाहूल लागताच शिवाजी महाराजांनी मिर्झाराजासोबत बोलणी सुरू केली पण मिर्झाराजांनी महाराजांना दाद दिली नाही. त्यानंत्यर मोगल सरदार दिलेरखानाने इ.स. १६६५ साली घातलेल्या पुरंदराच्या वेढ्यात मुरारबाजीने गडावरील सैन्यास घेऊन किल्ला झुंजवायची शर्थ केली. या कठीण परिस्थितीमधेदेखील मुरारबाजी देशपांडे (महाडकर) यांनी पुरंदर फार शर्तीने लढवला. अवघ्या सातशे मावळ्यांनिशी दिलेरखानाच्या पाच हजार फौजेच्या तोंडचे पाणी पळवणार्‍या मुरारबाजीचा या लढाईत अंत झाला. स्वराज्यासाठी त्याने आपल्या प्राणांची आहुती दिली.