हुताशनी पौर्णिमेची रात्र राजगडावर वाळ्याएवढा अंगफुलता चंद्र घेऊन उभी राहिली. होळीच्या मानकऱ्यांनी कानंदखोरीत फिरून ऐनाचे चखोट उंच झाड तोडून ते गडावर आणले. त्याची होळी आंब्याच्या डहाळ्यांनी सजवून ती होळीचीकात उभी केली. घरट्या घरट्यांत पोवर ताव मारलेले मावळे पगड्यांवर चांदणे घेत होळीचौकात जमाव करू लागले. पुनवेच्या फुलल्या चांदण्यात हलम्यांची कातडी तडतडत फुलू लागली.
चौकात जळाऊ लाकडांचा भला थोरला हुड़वा रचला होता. खासे राजे चौकात येऊन त्या हुडव्याला बन्नता चूड लावून होळी पेटती करणार होते. राजे खासा पेहराव करून फर्जद शंभूतह जिजाऊंच्या महालात आले. जिजाऊंची पायधूळ घेऊन राजे बालेकिल्ल्यावरच्या होळीचौकाकडे चालले. त्यांच्या तर्फेने बाळाजी आणि चिमणाजी नन्हेकर, मोरोपंत, नेताजी, फिरंगोजी, येसाजी, केदारजी जेधे, सिदोजी थोपटे अशी मंडळी चालली. शंभूबाळांचा हात राजांनी आपल्या डाव्या हातात घरला होता. तांबूलविड्याच्या पानावर पाठभर चुन्याची शिकल चढावी तसे गडमाथ्यावर दाट चांदणे पसरले होते! त्या चंदेरी पायपडीवरून सोन्याच्या दोन घडीव मूर्ती चालाव्यात तसे राजे आणि शंभू चालले होते.
सरंजामासह राजे होळीचौकात आले. हल्ल्यांची थरकती तडतड खामोश झाली. मावळ्यांचा चंदेरी गलका थांबला. राजांनी हातात पेटता चूड घेऊन क्षणभर नजर ओडली. त्या नजरेने तो पेटता चूड अधिकच धगधगला!' जय जगदंब !' म्हणत हातचा चूड राजांनी होळीच्या रचलेल्या लाकडी हुडव्याला भिडवला.
मावळ्यांनी "हर हर महादेव! " च्या किलकाऱ्यांची होळीच होळी उभी केली ! हुडवा पेटता झाला. तोंडाच्या हलग्यावर पालथ्या मनगटांच्या टिपया पडून चढ्या आवाजीत घुमल्या!!
खाशांसाठी उभारलेल्या चौथऱ्याच्या बैठकीवर राजे शंभूसह विसावले. होळीच्या तांबड्या पिवळ्या प्रकाशात, माथ्यावर ढळणाऱ्या चांदण्यांच्या अस्मानी चक्रीमुळे ती दोन रूपे इंद्रपुरीच्या दरबारातील मानकऱ्यांसारखी दिसत होती !
पेटत्या डुडल्यात नारळाची मानकरी फळे फेकली गेली. पुरते जळण्यापूर्वी ते नारळ होळीच्या रसरसत्या निखान्यातून अल्लाद बाहेर काढण्यासाठी धाडसी, जवान मावळ्यांनी होळीभोवती रिंगण घरले !
एकेकटा मावळा थेट धगीजवळ जात बेधडक फुलल्या निखाऱ्यांत हात घालू लागला. नारळ काही हाताशी येत नव्हता. घातल्या हातावरचे राकट केस मात्र राख होऊन धगीत मिसळत होते. होळी कुणाला जवळ घ्यायला तयार नव्हती. लाकडाच्या गाठी पेटता पेटता फाटकन ठणकत मध्येच फुटत होत्या. होळी आणि मावळे इरेसरीला पडले होते. होळी आपल्या उदरातील दान द्यायला तयार नव्हती. मावळे तिच्या निखाऱ्यांच्या आगपेटल्या गोटाला खणती लावून ते बाहेर काढण्यासाठी हट्टाला पेटले होते!
झेपावलेल्या एका सर्जा मावळ्याच्या हाताला निखाऱ्यातला नारळ एकदाचा लागला ! याची पाटी फुलवून " भवानी!" गर्जत त्याने होळीच्या उसळत्या आगज्वाळेएवढी बेभान उंच उसळी घेतली. पाय भुईवर टेकताच हातातला नारळ दाणकनू भुईवर आपटत त्याने त्याच्या ठिकन्याच ठिकन्या उडविल्या. त्याचा तळवा नारळाच्या तापल्या करवंटीने पोळून निघाला होता. पण उरात पेटते काळीज असणारे पोळत्या तळव्याचा हिसाब धरीत नसतात!.
"व्यारे बाधा, भले रे माज्या भादरा!" म्हणत भवतीच्या मावळ्यांनी त्याला उचलून थेट खांद्यावरच घेतले. इतर होळकरांनी चौफेर उधळलेला, चटका देणाऱ्या खोबराखंडांचा प्रसाद झोंबी खेळून हा हा म्हणता मट्टही केला. सिदोजीरावांनी त्या मावळ्याला राजांच्या सामने अभिमानाने पेश केले. बैठकीवरून उठून राजांनी त्याचे खांदे - थोपटले. त्याच्या हातात होळीच्या मानाचे सोनकडे भरले. सोन्याच्या हातांनी सोन्याचे कडे भर चौकात भरून घेताना त्या मावळ्याला जिवाचे सोने झाल्यासारखे वाटले!
हुताशनीचा चंद्र पेटती होळी बघत चढतीला लागला. राजे सुख होण्यासाठी- होळीचौकातून शंभूसह आपल्या महालाकडे परतू लागले. जाम्यावर कंठ्याचा लाल गाँडा रुळणाऱ्या त्यांच्या जिम्मेदार पाठीवर पांढरघोट चांदणे पसरले होते. मात्र राजांच्या मनात विचारांचा हुडवा पेटला होता! ते मनसुबा बांधीत होते.
" गनिमाची होळी पेटवून त्याच्या गोटाच्या आगभरल्या निखाऱ्यातून यशाचा नारळ अल्लाद बाहेर काढायचा असेल तर. तर आता रिंगणात उतरलेच पाहिजे. जळत्या निखाऱ्यात हात घातलाच पाहिजे !!'
त्यांचा हात धरून चालता चालताच शंभूबाळांनी त्यांना विचारले, "आबा, तुम्ही काढाल होळीच्या जळत्या हुडव्यातला नारळ ? " राजे हसले. टोप डोलवीत स्वतःशीच बोलल्यासारखे पुटपुटले, "कोशीश करू!” रामनवमी आली. पहाटस्नान केलेले बाळराजे धाराऊसह जिजाबाईंचे पायदर्शन करून राणीवशातील साऱ्या आऊसाहेबांना मुजरा करायला चालले.
धाराऊबरोबर ते सोयराबाईच्या महाली आले. पुढे होऊन झटकन् वाकून बाळराजांनी सोयराबाईंच्या पायांना उजव्या हाताची बोटे लावून ती पुन्हा आपल्या कपाळाला भिडविली. त्यांना खांदे धरून वर उठवीत सोयराबाई धाराऊकडे बघत म्हणाल्या, "केवढी अदब! खरंच बाळराजांचं नाव रामराजे ठेवायला पाहिजे होतं!
मंचकावर बसून सोयराबाईंच्या हातून केशरदुधाचा पेला घेताना बाळराजांना जाणवून गेला तो सोयराबाईंचा सतेज केतकी वर्ण. ते मनोमन आपल्या मासाहेबांची सईबाईंची मुद्रा उभी करू लागले. पण ती नीटपणे त्यांना काही उभी करता येईना! फक्त एक धूसर सावळेपण नजरेसमोर येत होते. “खरोखर कशा दिसत होत्या आमच्या मासाहेब ?' " असा विचार करीत त्यांनी दुधाचा पेला आपल्या रक्तसतेज ओठांना लावला. त्यांना दूध पिताना पाहून धाराऊच्या मनी येऊन गेले की, 'रामराजं नाव न्हाई त्येच ब्येस हाय ! नाव नसता एवडं वनवास मग असल्याव किती ! "
दूध पिऊन पेला चौरंगावर ठेवत “येतो आम्ही" म्हणत महालाबाहेर पडणाऱ्या पाठमोऱ्या शंभूबाळांना बघताना सोयराबाईंच्या राजमनाला जाणवून गेले की, "आमच्या पदरी नाहीत तुमच्यासारखे बाळराजे, नाहीतर आम्ही नक्कीच त्यांचं नाव रामराजे ठेवलं असतं!”
सोयराबाईंच्या महालातून शंभूराजे धाराऊसह पुतळाबाईंच्या महाली आले. पुतळाबाई देव्हाऱ्यातील राममूर्तीवर फुले चढवून डोळे मिटून हरवल्यागत पाटावर बसल्या होत्या. त्यांचे निवांतपण भंग होऊ नये म्हणून बाळराजे त्यांच्याकडे एकजोड बघत तसेच उभे राहिले. थोड्या वेळाने पुतळाबाईंनी डोळे उघडले. दोन्ही हात जोडून ते कपाळाला भिडविताना त्या काहीतरी पुटपुटल्या. पुढे होत पुतळाबाईंच्या सोनपुतळ पायांना हात लावावेत म्हणून बाळराजे म्हणाले, "आम्ही पायधूळ घेतो आहोत मासाहेब.! "