खान कसाही चालून आला तरी त्याचा तळ वाईलाच ठाण होणार हे राजांनी हेरले. आता सईबाईंना प्रतापगडावर ठेवणे धोक्याचे होते. राजांनी जिजाबाईंना निरोप धाडला. सारा कबिला प्रतापगडावरून राजगडाच्या पायथ्याशी शिवापट्टणला हलविण्याचा मनसुबा कळविला.
सरत्या मृगाच्या सरी अंगावर घेतच भोयांनी जिजाबाई, सईबाई यांचे मेणे प्रतापगडावरून खाली उतरवले. एका मेण्यात दोन वर्षांचे शंभूबाळ आणि धाराऊ बसली होती. आता शंभूबाळ चांगले बोलते झाले होते. आपल्या चौकस सवालांनी ते धाराऊला हँसण करीत आले होते. "कपाळावरचं शिवगंध आडवंच का ? धारकरी आपल्या डाव्या बाजूलाच तलवार का बांधतो ? भाल्याच्या एका टोकालाच पाते का ? घोड्याच्या टापांनाच नाल का ठोकायचे ? " बिचाऱ्या धाराऊला त्यांच्या एकाही सवालाचा जाब देणे सुधरत नव्हते. तिच्या मुलांपैकी एकानेही तिला असे कधी एवढे हैराण केले नवहते मेण्याचे आडपडदे हटवून शंभूबाळ जावळी खोऱ्यातले डोंगरशिखरांवरून कोसळणारे पांढरेघोट पाणलोट पाहण्यात गर्क झाले होते. त्या कोसळत्या पाणलोटांची त्यांना गंमत वाटत होती. त्या पाणलोटांना कोणी रोखू धजत नव्हते! त्यांचे अंतरंग सफेद होते. त्यांची गर्जना खोरी घुमवून टाकणारी होती! झेप घेणे हाच त्यांचा गुण होता! शिवापट्टण हाकेच्या टप्प्यात आले. वेशीबाहेर महादेवाच्या देवळात मेणे ठाण झाले. राजांना शिवापट्टणच्या महालात वर्दी पोच झाली. पावसाची तुरळक सर निचरताच शिवाजीराजे घोड्यावर मांड घेऊन फिरंगोजी नरसाळा, नेताजी पालकर, संभाजी कावजी यांच्यासह जिजाबाईंना सामोरे जाण्यासाठी शिवालयात आले. जिजाबाईंचे पाय शिवून राजांनी देवदर्शन घेतले. जिजाऊ नेहमीसारख्या हसत राजांशी बोलल्या नाहीत. त्यांनी फक्त सईबाईच्या मेण्याकडे हाताच्या बोटांनी इशारत केली. जडावल्या पायांनी मेण्याजवळ जात राजांनी पडदा दूर सारला. आतल्या मऊ बिछायतीवर त्यांच्या कैक आठवणींचा फक्त एक तगत्या जीवाचा सावळा सांगाडा होता! मिटल्या डोळ्यांच्या झिजल्या सईबाईंना पाहताना राजांचे निमुळते सूर्यपट डोळे चिजून पाणगार झाले. लालमहालात घरभरणीचे माप लवंडून आलेल्या पोरवयाच्या अजाण सईबाईची मूर्ती त्यांच्या डोळ्यांसमोर खडी झाली. केवढी सालं गुदरली ! किती वळणं मागं पडली! सई देवघरातील समईसारखी सतत तेवत राहिली! आमची सावली पाहताना आपली याद सतत आम्हाला देत राहिली! मासाहेब कधी आम्हाला उपरोधानं बोलल्या तर ते ह्या आपल्या लेकीची कड घेऊन! प्रेमळ पत्नी, संयमी सून, राजस राणी, ममताळू माता, सोशिक स्त्री केवढ्या नात्यांत सई वावरली ! उरातून आलेला धागा धरून कोळीण चालते तशी आमच्याशी जखडल्या नात्याचा धागा धरून चालत आली! आमच्या डोळ्यांनी पाहिलेले 'सई' हे सर्वात सुंदर स्वप्न ! सुंदर स्वप्न कधी झिजत नसतं मग असं का झालं ? का झालं ?
असंख्य विचारांनी राजांचे मन भरून आले. तरळत्या डोळ्यांसमोरचा मेणा अंधुक व्हायला लागला. क्षणात ते मेण्यापासून मागे हटले. त्यांनी भोयांना इशारत केली. भोयांनी सईबाईचा मेणा उचलला आणि ते दुडक्या चालीने शिवापट्टणाच्या महालाकडे चालू लागले.
धाराऊ शंभूबाळांसह जिजाबाईच्या शेजारी उभी होती. त्यांच्याजवळ जात राजांनी शंभूबाळांना उचलून घेतले. शेजारीच उभ्या असलेल्या राणू आणि अंबा ह्या लहान मुली 'आबा' म्हणत राजांना बिलगल्या. " आता सारा भार श्रीसांबावर राजे. सगळे उपाय हरले.” जिजाबाई न राहवून " राजांना बोलल्या.'भार तर सारा श्रीसांबावरच आहे आऊसाहेब. पण उपाय हरून चालणार नाही. आदिलशाहीचा अफजल बीस हजारांची फौज घेऊन आम्हाला 'जिंदा या मुर्दा दरबार पेश करण्याची शपथ खाऊन इकडे कूच झाला आहे..." राजांचा आवाज घोगरला.
" अफजल वीस हजारांची फौज ' म्हणत जिजाबाई क्षणभर गप्पच झाल्या. "पाऊस येतो तेव्हा केवढे पाणी पडते प्रतापगडावर आबा !" शंभूबाळांनी हात पसरून मध्येच खबर दिली !
" होय बाळराजे, पण ते सारे पाणी दर्या आपल्यात सामील करून घेतो!” राजांनी हसत उत्तर दिले.
" कुठे असतो तो दर्या ? "
" तो फार दूरच्या टप्प्यावर असतो. तुम्ही प्रतापगडावरून इथे आलात त्याहून खूप दूर 'राजांच्या मनात आता फक्त प्रतापगड' घोळू लागला !
तुळजापूरला राजांच्या कुलस्वामिनी जगदंबेच्या मंदिर आवारात अभद्र घडवून, पंढरीच्या महाठी मुलखाच्या लोकदैवताला इजा देऊन अफजलखान शिरवळला डेरेदाखल झाला. वाटेत मलवडीला बजाजी निंबाळकरांना त्याने दस्त केले, आणि "तू शिवाजीचा फितवेखोर आहेस, नमकहराम आहेस' असा त्यांच्यावर आरोप करून तोफेच्या भांड्याला जखडबंद करून त्यांची आपल्या तळात धिंड काढली. राजांनी खानाच्या गोटातील नाईकजी पांढरे यांची मध्यस्थी घालून साठ हजार होनांवर बजाजींची मुक्तता केली. खानाच्या हातचा आपल्या नातेसंबंधाचा कोलदांडा राजांनी
मोकळा करून घेतला.
शिवाजी संतापून बारा मावळाच्या बसकणीतून सिधा चालून यावा यासाठी खानाने हे सारे डाव येतायेता टाकून पाहिले. पण ते नतिजा पावले नाहीत. राजांना एकाकी पाडण्यासाठी त्यांच्या गोटातील असामी फोडण्याचा धूर्त खोडा खानाने शेवटी आखला. कुणाला जरब देऊन, कुणाला लालूच लावून, कुणाला गोड बोलून त्याने आपल्या फौजी पंखाखाली घेण्यास सुरुवात केली.
गुंजणमावळचा देशमुख विठोजी सिलीमकर, उत्रोलीचे देशमुख खंडोजी आणि केदारजी खोपडे, म्हसवडचे माने, मसूरचे जगदाळे, मलवडीचे पांढरे, तान्हाजी कोकरे, रविराव ढोणे, धुलोजी शेडगे, काटे, धायगुडे, कैक मावळी पगड्या खानाच्या पायांखाली पायघड्या होऊन पडल्या. वाढत्या बळाने खान शिरवळाहून कूच झाला आणि वाईला येऊन ठाण झाला.
वाईच्या काशीराव या आदिलशाही दियानतरावाने खानाचे वेशीबाहेर येऊन स्वागत केले. कृष्णेच्या डोहात कालिया शिरला !
काशीरावाने संगमेश्वराच्या गोमाजी हेळवाककराला खानासमोर पेश केला. गोमाजी संगमेश्वरांच्या देशकुलकर्ण्याचा दिवाण होत.. कुळकर्ण्याच्या वंशाला फक्त एकटी म्हातारी बाकी राहिली होती. तिचे वतन खानाच्या पाक हाताने आपल्या घशात टाकावे या पवित्र धार्मिक बेताने गोमाजी वाईयात्रेला आला होता !
खानाने त्याची अर्जी एक अट घालून मंजूर केली. गोमाजी हेळवाककराने खानाच्या परतीच्या वाटवर लागणाऱ्या नद्यांत तीनशे नावा पेरून ठेवायच्या. खानाने त्याबद्दल गोमाजीला संगमेश्वराचे देशकुळकर्णीपण द्यायचे!
'खानाची येण्याची सोय देशमुख, सरदारांनी केलीच होती. जाण्याच्या सोयीचा विडा गोमाजीने उचलला ! आता कम्बक्त काफर 'सेवा' बचावणे शक्य नव्हते. पण गोमाजीला आणि खुद्द खानालाही पत्ता नव्हता की खानाच्या 'परतीची वाट वेगळीच होती !
आता राजांच्या बाजूने दोनच कदीम, पुराणे आणि बळजोर सरदार उभे होते एक जावळी खोऱ्याचा बेलाग कड्यांचा मोर्चेबंद मुलूख आणि दुसरा बारा मावळातील कुणालाही दस्त न होणारा पावसाळा !
खानाचा पाणलोट थोपविण्यासाठी पडत्या पावसात राजांना राजगड सोडणेच भाग होते. किल्लेश्वरीचे आणि भवानीचे दर्शन घेऊन राजे राजगडाची पद्मावती माची उतरू लागले. गडाच्या बंदिस्तीसाठी फिरंगोजी नरसाळा, गोमाजी पाणसंबळ, सिदोजी थोपटे ही मंडळी मागे राहणार होती. राजांच्या संगती आपल्या वतनावर पाणी सोडून आलेले कान्होजी जेधे, नातेबंधातले बाबाजी भोसले, बाळाजी सिलीमकर, नेताजीराव पालकर, येसाजी, मोरोपंत, तान्हाजी, संभाजी कावजी, सुभानजी इंगळे वगैरे मंडळी असणार होती.