“थोरल्या सूनबाईंना जडू नये ती व्याधी जडली. बाळराजांचा पदर त्यांना लागला. शंभूबाळांना दुधास लावणे हा पेच आहे.” जिजाबाई शांत शांत बोलल्या. राणीवसा खाली मान घालून त्याहून शांत उभा होता !
" धाकल्या सूनबाई, बोला काही मसलत सुचवा.” जिजाबाईंनी सोयराबाईंच्या चंद्रकळी शालूवर आपली नजर जोडीत त्यांना विचारलं.
"आम्ही काय मसलत बोलावी ? आऊसाहेब करतील ते कोण करणार ? सोयराबाईंनी पदर नीट केला. त्यांच्या शालूवरचे जरीबुट्टे लडकन् उजळले ! " ते तर आम्ही करूच. तुम्हास काही सुचलं तर ऐकावं हा आमचा मनशा.' जिजाबाईंचा शांतपणा तसाच होता. "
फक्त पुतळाबाईंनी एकदा नजर उचलली. त्यांना काहीतरी बोलायचे असावे पण समोरच्या काजळी दाटल्या ज्योतीवर नजर पडताच त्या थांबल्या. आपली नजर त्यांनी पायगती टाकली. असहायपणे ! काही क्षण तसेच गेले. सुन्न शांततेत. " या साऱ्याजणी!” जिजाबाईंनी साऱ्यांना जाण्याची इशारत केली.
" पुतळाबाई, तुमच्या स्वारीला आम्ही याद केल्याची वर्दी द्या! आणि थोरल्या सूनबाईंकडे एक जाड पोताचं कांबळं पाठवून द्या." पाठमोऱ्या पुतळाबाईंना जिजाबाई बोलल्या.
" जी.” पुतळाबाई कसल्यातरी विचारभिंगरीतून भानावर येत म्हणाल्या आणि त्याही इतर राणीवशामागोमाग महालाबाहेर पडल्या. बैठकीवरून उठून शांत पावली चालत जिजाबाईंनी चिराखदानांच्या तेलात डुबलेली पितळी सरशी उचलली. तिने ज्योतींवरच्या काजळ्या झटकल्या. वाती सरशा केल्या! तवान्या ज्योतींनी महालाचा अंतरंग उजळून टाकला.
वर्दी पावलेले राजे जिजाबाईंच्या महालात आले..
" या राजे, बाळराजांसाठी काही योजूनच आम्ही तुम्हाला याद फर्मावलं. " जिजाबाई समोर उभ्या असलेल्या राजांना धीराने बोलल्या. "
" आज्ञा आऊसाहेब.'
" आम्हाला वाटतं बाळराजांसाठी एखादी 'दूधआई' जोडावी.' " " जी !” राजांनी चमकून वर पाहिले. ती नजर दुखरी होती. " घोटाळलात? त्याविना दुसरा मार्ग नाही.” जिजाबाई समजावणीच्या बोलात बोलल्या.
“मासाहेब करतील ते सारं समजूनच. पण. 'राजांना काहीतरी बोलायचे होते. ... “ उद्याच आम्ही कापूरहोळास गाड्यांच्या धाराऊला बलावू धाडणार आहोत. हे ठरलं.
"जी." म्हणून राजे मुजरा करीत तसेच पाच कदम मांगे हटले. ते महालाबाहेर पडत असताना मागून अतिशय ओथंबलेली साद आली. तिने राजांना उंबरठ्यातच जखडून टाकले.
" राजे ऽ! तुमचं बोलणं तसंच मनी ठेवून चाललात! आम्ही ते जाणतो. शांतपणे ऐका. तुमच्या राणीवशाचा आम्ही बरीक कानोसा घेतला. तुमच्या एकाही राणीसाहेबांचा पदर बाळराजांना जवळ घेण्याएवढा मोठ्ठा नाही झाला! पण राजे, असले पेच उरात लपविता लपत नाहीत! आम्ही तुमच्या आऊसाहेब आहोत ! ' राजांना मागे वळून बघवत नव्हते. जडावल्या पावलांनी त्यांनी समोरचा उंबरठा ओलांडला !
अवध्या गुंजणमावळ खोऱ्यावर कुसळी गवताची कुरणे उठली होती. रानवाऱ्याबरोबर ती आपल्या लुसलुशा अंगावर लाटा उठवीत होती. त्या लाटा सरकत सरकत सभोवतीच्या खड्या चढणीच्या कड्यांच्या पायथ्याशी जाऊन मुरत होत्या.
आभाळात तरंगणाऱ्या एका घारीने कोंबड्यांच्या पिलांचा सासूद घेऊन खाली झेपावताना एक कर्कश शीळ भरली. कोंबडीने पंख फुलवून 'काक ककॉक क्लाक' करीत पिलांना झुडपात आसरा घ्यायची इशारत दिली. पारीची शीळ गुंजणमावळाभोवतीच्या कड्यांना थडकून परतली आणि गुंजवणीच्या खळखळाटात बुडून गेली!
झुंझारराव मरळांनी टाच दिलेला घोडा गुंजवणीच्या पाण्यावर एक फव्वारती पांढरी रेघ रेखून पार झाला. आऊसाहेबांचा सांगावा घेऊन झुंझारबा मरळ कापूरहोळाच्या गावठाणाकडे घोडा फेकू लागले. त्यांच्या पगडीखालून निसटलेले घामाचे ओघळ कानशिलावरच्या पांढऱ्या कल्ल्यांवर उतरले होते.
नसरापूर मागे पडले आणि एका मजलेतच झुंझारबांनी कापूरहोळाची वेस ओलांडली. गाड्यांच्या दगडी चिरेबंदी वाड्यासमोर पायउतार होऊन त्यांनी घोड्याच्या पाठीवर एक थाप दिली. पिंपरणीच्या झाडाला घोडे ठाण केले. कपाळावरचा घाम बोटांच्या पन्हाळीने भुईवर निचरून टाकला आणि वाड्याच्या भल्या मोठ्या दरवाज्यात उभे राहूनच त्यांनी मावळी लगावात साद घातली- “धाराक्का हो ss"
चौकसदरेजवळ बांधलेली करडे त्या सादीने खूर खटखटवीत धडपडून उठली. कोंबडी घुसपटली. त्या गलक्याने आत काटवटीत पीठ मळून भाकत्या थापणान्या धाराऊला बाहेर कुणीतरी आल्याची वर्दी दिली गाडग्यातल्या पाण्यात गोंदलेले हात बुचकळून लुगड्याच्या पदरावर त्याचे पाणी निपटीत धाराऊ वाड्याच्या दरवाज्यात आली. तिचा बांधा कुणबाऊ कसदार होता. कपाळी आडव्या कुंकवाची बोटे होती. उमर मध्यम असून तशी वाटत नव्हती. तबियत निखाऱ्यावर फुलल्या भाकरीगत डौलदार होती !मळवटावरच्या कातड्यावरचे आडवे कुंकू वर चढवीत तिने विचारले, "साद घातली जनू ! कोन झुंझारबा ? नि भाईरच बरं हुवं ? येवा की आत. " "हांऽ. टेकाय योळ न्हाई. राजगडावरनं आऊसायबांचं बलावू पिऊन आलू.' झुंझारवा धाराऊला बोलले.
" सम्द्यांचं क्काय क्काम हाय ? बलावू तुला हाये." "मला ? नसंल जी. माजी पोरं हाईत राजाच्या लस्करात. त्येस्नी असंल.'" पर सम्दी शिवारात ग्येल्यात नी ! "
'का कान फुटलं का क्काय माजं ? खुद आऊसायबांनीच सांगिटलं की धाराऊला म्होरं घालूनच घिऊन ये म्हून." झुंझारबांनी वाड्याच्या दगडी उंबऱ्यावर पाय आपटून पायताणावरची धूळ झटकली.
"आत्ता वं" म्हणत धाराऊ बिगी बिगी आत गेली. परसातून तिनं कुणाच्या तरी पोराला शिवाराकडे पिटाळलं. मिळतील ती लुगडी, चोळ्या तिनं एका फडक्यात ठेवून त्यांचे बोचके आवळले.
रायाजी आणि अंतोजी हे धाराऊचे भरल्या माटाचे दोन तरणे मुलगे शिवारातून आले. त्यांच्या आयेने त्यांना सारा करीणा सांगितला. आपल्या अस्तुत्यांवर वाडा सोपवून ते दोघेही " का बरं बलावू आलं असंल ?" असा मनाशी विचार करीत पाठीवर ढाला बांधून तयार झाले. गूळपाणी घेऊन हुशार झालेल्या झुंझारबांनी ठाण केलेले घोडे सोडले. त्यांच्यामागून पायांतली चपली कुरकूर वाजवीत, काखेतून घसरणारे बोचके गोंदल्या हातांनी सावरीत धाराऊ चालू लागली. रायाजी आणि अंतोजी तिच्या दुतर्फा चालले. गाड्यांची धाराऊ राजगडाकडे निघाली.
पिकल्या भातखाचरांच्या बांधावर उतरलेले करडे कवडे डौलात माना फिरवत होते. त्यांनी टिपलेल्या भाताच्या गोठ्यांनी त्यांचे गांजे फुगले होते. कापूरहोळाच्या शिवेजवळची महादेवाच्या देवळाची घुमटी आली. तसे चालता चालताच थांबून, पायातील चपल्या खिनभर उतरून त्या घुमटीला हात जोडून धाराऊ आपल्याशीच बोलल्यासारखी पुटपुटली - "शंभू रं म्हादेवा ऽ!'