कोणतही शिवकाव्य येथे शोधा

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग १०१

 "बोला हर हर हर महादेव!" भोवतीच्या मावळ नरड्यांच्या घाटी फुटल्या. राजमंडळाने सिंहासनाला मानाचा हस्तस्पर्श दिला.


हंबीरराव, आनंदराव, मोरोपंत, आण्णाजी, रामचंद्रपंत, येसाजी सारे पुढे झाले. " जय भवानी" गर्जत त्यांनी शूचिर्भूत झालेले सुवर्णसिंहासन फुलांच्या माळांनी सजलेल्या रथासारख्या गाड्यावर चढविले. त्या गाड्याला सजलेले पाच पांढरेशुभ्र घोडे जोडण्यात आले होते. राजांनी झुकून गणेशाची सुवर्णमूर्ती उचलली आणि छातीजवळ कवड्यांच्या माळेवर धरली. संभाजीराजांनी कोदंड उचलला.


रणहलग्यांच्या रोमांचक काठ्या तडतडल्या. लेझीम तोड्यांनी लय पकडली छळळू खण खण छळळू.” उखळी, बंदुकांचे बार दणाणले. शिस्त धरलेल्या हुजराती फौजेच्या धारकऱ्यांच्या हातांतील पाती उन्हात झगमगू लागली. गुलालाच्या मुठी उधळल्या. फुलांच्या ओंजळी उसळल्या. शिंगे ललकारली.


चालले. मानाचे सिंहासन मराठ्यांच्या मसनदीकडे मरातबाने चालले. रत्नशाळेकडून दरबारीचौकाकडे चालले. जिजाऊंनी मनी जागविलेले तुळजाई स्वप्न जिवंत होऊन चालू लागले! जंगमैदानावर घाईगर्दी करून धारातीर्थी देह ठेवताना "राजास्नी आमचा जुहार दंडवत सांगा' म्हणणाऱ्या कैक आकाशवीरांचे सार्थक चालले! समर्थांचे आनंदवनभुवन चालले! असंख्य मायमाउलींचे कुंकूबळ चालले! हिंदूच्या शतकानुशतके गाडल्या गेलेल्या आशांचे ऐरावती बळ चालले! 'श्री' चे कल्याणकारी राज्य चालले!


सिंहासनाच्या गाड्याची पिछाडी धरून गणेशमूर्ती हाती घेतलेले राजे, पंचारती घेतलेल्या सोयराबाई, समर्थांचा कोदंड घेतलेले संभाजीराजे आणि त्यांचे बोट हातात धरलेले रामराजे असे सारे त्या सिंहासनाशी रक्ताने बांधील असलेले राजमंडळ चालले. वाजत-गाजत नगारखान्याच्या दरवाज्याने रथगाडा दरबारचौकात आला. सिंहासनाच्या चौथऱ्याची सारी मखरे सुवर्णात घडली होती. अष्टखांब, मेघडंबरी, मस्त्यमोर्चेल, न्यायतुला असा देखणा साज झळकत होता. त्या चौथऱ्याची मधली जागा या खाशा सिंहासनासाठी मोकळी राखण्यात आली होती. राजांनी गणेशमूर्ती संभाजीराजांच्या हाती दिली. • रथगाडा चौथऱ्याजवळ आला. गागाभट्ट राजमंडळासह चौथऱ्यावर चढले. हत्तीच्या


पायाखालच्या शुभ मृत्तिकेने भरलेले तबक घेऊन प्रभाकरभट्ट चौथरा चढले. सुवर्णी खिळा ठेवलेले तबक घेऊन रामजी दत्तो चौथरा चढले. चौथऱ्यावर शिडी चढविण्यात आली. रामजींच्या हातातील तबकातून गागाभट्टांनी सुवर्णी खिळा उचलला. मंत्रोच्चार करीत त्यांनी तो निरखला आणि राजांच्या हाती दिला.


राजे खिळा घेऊन शिडीजवळ आले. हंबीरराव, येसाजी, आनंदराव यांनी शिडी तोलून धरली. कोढता आणि खिळा घेतलेले राजे शिडीच्या पायऱ्या मागे टाकीत मेघडंबरीच्या थेट छताला भिडले. साऱ्या माना' वर उचलल्या गेल्या! 

हातीचा सुवर्णी खिळा राजांनी मेघडंबरीच्या छताला राखलेल्या छिद्रात ठोकला. 'सुवर्णमेख' बसली. राजे खाली आले. शिडी हटली. सिंहासनाखाली 'हस्तिमृत्तिका' प्रदान करण्याचा विधी सुरू झाला. मंत्राचा घोष उठू लागला. गागाभट्टांनी प्रभाकरभट्टांच्या हातातील हत्तीच्या पायाखालच्या मृत्तिकेने भरलेले तबक आपल्या हाती घेतले. मुठीने त्यातील माती राजांच्या ओंजळीत सोडली.


चौथऱ्यावर मोकळ्या राखलेल्या, सिंहासनाखाली येणाऱ्या चौकात ती शिवरून टाकण्याची इशारत केली. राजांनी मृत्तिकेची ओंजळ चौकात शिवरली. सोयराबाई पुढे झाल्या. त्यांच्या हाती गागाभट्टांनी हस्तिमृत्तिका दिली. त्यांनी आपली सवाष्ण ओंजळ चौकात सोडली. संभाजीराजांनी गणेशमूर्ती व कोदंड प्रभाकरभट्टांच्या हाती दिला. पुढे होत आचार्यांनी दिलेली मृत्तिका चौकात सोडून ते मागे झाले.


• गागाभट्ट तबक ठेवण्यासाठी म्हणून वळू लागले. एवढ्यात आपल्या शेजारी असलेल्या रामराजांची ओंजळ आपल्या हातांनी जोडून सोयराबाईंनी ती आचार्यांच्या समोर धरली ! आचार्य क्षणभर घोटाळले. मग त्यांनी मृत्तिका रामराजांच्या ओंजळीत ठेवली. त्यांचे हात तसेच चौकाकडे नेत सोयराबाई म्हणाल्या "हां. सोडा ओंजळ चौकात !” हत्तीच्या पायांखाली रगडलेली माती पडू लागली - सिंहासन चौथऱ्याच्या बैठक - चौकात !

अभिषेकपूर्व विधींना सुरुवात करण्यापूर्वी सोयराबाई आणि संभाजीराजांना घेऊन राजे जिजाऊंच्या महाली आले. फलाहार आणि दुग्धपान असे व्रत पाळल्यामुळे त्या तिघांच्याही डोळ्यांत तेज उतरले होते. आपल्या महाली मध्यभागी गिद्यलोडांची बैठक टाकून जिजाऊसाहेब बसल्या होत्या. गेले पंधरा दिवस त्या तकवा नव्हता तरी आल्या गेल्या माणसाची आस्थेनं विचारपूस करीत अशाच बसल्या होत्या. राजे-संभाजीराजांना बघून त्या बैठकीवरून उठण्याच्या खटपटीला पडल्या. ते बघून पुढे झेपावलेल्या संभाजीराजांनी त्यांना बळेच बसते केले.


राजे युवराज जोडीने त्यांना नमस्कार करण्यासाठी वाकले. बसल्या बैठकीवरून जिजाऊंनी त्या दोघांचे मुखडे छातीशी बिलगते घेतले. त्यांचे


शब्द थकले होते. सुरकुतले होते. म्हातारे झाले होते. ते घशातच अडकले. " हे बघायला आमची स्वारी आज असायला पाहिजे होती ! "


शहाजीराजांच्या नुसत्या आठवणीबरोबर जिजाऊंचे डोळे भरून आले. सुरकुत्यांच्या पाटांतून आत्म्याचे पाणी वाहू लागले. एवढे दृष्ट लागण्यासारखे विधी गडावर होताहेत पण पण त्यांतील एकही आम्हास बघता येत नाही. येणार नाही! कपाळ उजाडल्यामुळे ! पोटी तहानेचा जाळ असता समुद्रात पाण्याने वेढलेले असूनही - पिण्यासाठी एक थेंबही हाताशी येऊ नये तशीच ही गत आहे! आम्ही साऱ्यात आहोत आणि कशातही नाही! 'जगदंब, जगदंब!' आपल्या भरून येणाऱ्या मनावर जिजाऊंनी शीपत्र ठेवले. आणि म्हटले, "औक्षवंत व्हा !

जिजाऊंनी राजे-संभाजीराजांना शिगभरल्या जबाबीने आशीर्वाद दिला. " सौभाग्यवंत व्हा!” थरथरत्या हाताने सोयराबाईंना आशीर्वाद दिला. "मासाहेब, आता माणसांचा राबता तोडा. आराम घ्या." राजे काळीजपिळाने म्हणाले.


" राबता तुटणार कसा? आम्ही राजमाता होणार आहोत, आता तर राबता वाढीला पडेल. आम्हीहून लोकांचा राबता कधीच तोडणार नाही राजे!" निग्रही जिजाऊ आग्रहाने म्हणाल्या.


“येतो आम्ही.” संभाजीराजे आणि सोयराबाई यांच्यासह राजे त्या 'थोरल्या मायेच्या' महालाबाहेर पडले.


जगदीश्वरावर दुग्धाभिषेक करून ते तिघेही दरबारचौकातील प्रशस्त महावेदीवर आले. प्रमुख विधींना सुरुवात झाली. गागाभट्ट, बाळंभट्ट, अनंतभट्ट आणि तीर्थोतीर्थीचे विख्यात शास्त्रवेत्ते त्यांना विधिकर्मे सांगू लागले.


स्वस्तिवाचन, ऋत्विजपूजन, वसोद्धारपूजन, मातृकापूजन, दुर्गपूजन, नांदीश्राद्ध, नारायणपूजन, आज्यहोम एकेका विधीची तपशिलांनिशी सांगता होऊ लागली. -


राजे, युवराज आणि सोयराबाई यांच्या राजहस्तांनी निरनिराळ्या होमकुंडांत बेल, वट, औदुंबर, पिंपळ, आम्र यांच्या समिधा पडू लागल्या. दूध, तूप, दही, मध यांचे हवन होऊ लागले. या विर्धीतील सर्वांत मौजेचा विधी आला राजांच्या मौंजीबंधनाचा ! त्यासाठी राजे चंदनी पाटावर बैतेदार न्हाव्यासमोर बसले डुईवर संजाब कोरून घेण्यासाठी !


बलदंड राजे 'बटु' झाले. राणीवसा, कन्यावसा असताना, फर्जंद सूनबाई असताना राजांचे सविध मौजीबंधन झाले ! छातीवर यज्ञोपवीत चढले. अवघ्या मुलखाला नवा 'जन्म देणारे राजे 'द्विज' झाले !


मौंजीबंधनाने रद्दबातल झालेले राजांचे पूर्वोल विवाह शात्रसंमत करून घेण्यासाठी त्यांचे पुन्हा सोयराबाई, सकवारबाई, पुतळाबाई आदो राण्यांशी समंत्रक विवाह झाले. राजांनी गागाभट्टांना मनची एक इच्छा बोलून दाखविली " आम्ही सूर्यवंशी करिता आम्हास सवितृ मंत्राचे! पुरश्चरण द्यावे.


गागाभट्टांना ती पटली. सवितृहोमासाठी यज्ञकुंड सज्ज करण्यात आला. हा होम स्त्रियांना लाभत नसल्याने या विधीतून सोयराबाईंना वगळण्यात आले.


उगवतीला पुढा करून राजे आणि संभाजीराजे यज्ञकुंडाजवळ बसले त्यांच्या भोसलाई हातांनी त्यांचे आदिदैवत सूर्यनारायणाच्या नावे कुंडात चंपक, चंदन, बिल्वकाष्ठांच्या समिधा पडू लागल्या. हवन उरकून ते दोघेही सूर्यवंशी पितापुत्र उभे ठाकले. गंगा, सिंधु, जमुना आदी सप्त नद्या जल त्यांच्या ओंजळीतून अर्घ्य म्हणून मावळी सूर्याला अर्पण होऊ लागले.

मिटल्या डोळ्यांनी सवितृ मंत्राचा उद्घोष ते गायत्री छंदात करू लागले - "ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ! ” 'भूलोकाला आणि स्वर्लोकाला उजळणारे ते सूर्यांचे दिव्य तेज आम्ही सदैव चिंतितो. ते दिव्य तेज आमची बुद्धी उजळून टाको.'