कोणतही शिवकाव्य येथे शोधा

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग ९८

 मावळ्यांची होऊ घातलेली राजधानी म्हणून रायगड सजावटीला निघाला. दरबारी चौक, बालेकिल्ल्याचे खासेमहाल आईनेबंदीसाठी हिरोजी इंदलकर, आबाजी, अर्जेजी-गिर्जोजी यादव यांनी हाती घेतले. शिलावट छिन्न्या घुमवू लागले. ठोका ठोका ताल धरू लागला - " राजा शिवछत्रपति !” सुतार, सोनार, लोहार, कहार, मांग, महार झाडून सारे आघाडीने कामावर पडले.

जवाहिरे, सराफ, अत्तार सौद्यासाठी उमेदीने रायगड चढू लागले. पागेची घोडी नालबंदीसाठी बाहेर पडली. प्रांत परगण्यांतून कबाडीच्या बैलांनी फेसाटत वाहून आणलेली धान्याची आणि मिठाची पोती अंबारखान्यात आबादान होऊ लागली.


गडावरच्या मंदिरातील मूर्ति मूर्तीवर वज्रलेप चढू लागले. लाल फासबंदांच्या थैल्या कमरशेल्यात खुपसून थैलीस्वार गड उतरू लागले. बहिर्जी, कर्माजी, विश्वास यांची खबरगीर पथकं खांद्यावरची रामोशी कांबळी सावरत मुलूखभरच्या खबरा उचलू लागली. आठरा कारखाने गजबजून उठले. चांदीची कडी भरलेले मदनि हात आणि कोपरभर चुडा भरलेले जनानी हात, स्वतःला हरवून एक नामी मनसुबा उभा करण्यासाठी झटू लागले.


ओतकामात तरबेज असलेल्या रामजी दत्तोने राजांच्या हस्ते श्रीफळ वाढवून 'सिंहासन घडाईच्या कामाला हात घातला. रामजीला माहीत होते. तो एका 'मावळी रामचंद्राचे' राजआसन घडविणार आहे! बत्तीस मण भराचे! झळझळत्या बावनकशी संभाजीराजे हत्तीटाक्याजवळ उभे होते. फार वर्षांपूर्वी बच्चा असताना दोरखंडांनी चोरदरवाज्याच्या बाजूने रायगडावर चढविलेला 'त्रिशूल' हा हत्ती आता भरात आला होता. टाक्यात पाण्याला पडलेला 'त्रिशूल' बाहेर घेण्याच्या खटपटीत माहूत पुरता दमगीर झाला ! 'त्रिशूल' हट्टावर आला होता. टाक्याबाहेर पडायला राजी नव्हता. संभाजीराजे माहुताची घालमेल बघत हत्तीच्या विचारात गेले होते. शेजारी महादेव यमाजी आणि यादव नामाजी उभे होते.


सांजेचा नौबतडंका झडायला सुरुवात झाली न झाली तोच कुणीतरी रोखल्यासारखा डंका गपकन थांबला.


संभाजीराजांच्या कपाळी आठी जमली. दिठी समोर गेली. विझल्या वणव्याचा काळपट डाग अंगावर घेतलेला लिंगाणा त्यांना दिसला.


बालेकिल्ल्याच्या रोखाने चाललेल्या संभाजीराजांच्या कानी माहुताचे वैतागी शब्द पडले - “ त्रिशूल, आरं हाटमोरेपन सोड! क्काय टाक्यातच रुतून बसनार हाईस का काय ? "


महादेव यमाजी आणि यादव यांना पाठीशी घेत संभाजीराजे तरातर चालत पालखी दरवाज्याने बालेकिल्ल्यात आले. राजांच्या खासेवाड्याच्या सदरी पायऱ्या चढतानाच त्यांना जाणवले 'काही तरी घडलंय.'


बैठकीसमोर खालच्या मानेने उभ्या असलेल्या राजांच्या सामने कर्माजी हा धूळमाखल्या कपड्याच्या आनंदरावाच्या फौजेचा खबरगीर उभा होता. बाजूला आण्णाजी, बाळाजी, मोरोपंत, येसाजी खडे होते. साऱ्यांच्या माना पडल्या होत्या. मुजरा देऊ बघणाऱ्या संभाजीराजांना बघताच हातपंजा उठवून ते म्हणाले, " शंभूराजे, तो मुजरा तुमच्या गेल्या मुतालिकांना करा! 

ओढल्या पायांनी राजे युवराजांच्या जवळ आले. त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, "संभाजीराजे, प्रतापरावांनी पंख जाळून घेतले! पठाण बहलोलच्या दहा- हजारी फौजेच्या वणव्यात! तुमचे मुतालिक गेले! आमचे सरलष्कर गेले! आमच्यावर रूसून ! हटमोरेपणानं ! स्वतः संगती आमचे लढाऊ सहा बांके घेऊन!'


संभाजीराजांना आठवले, बहलोलला सलामत सोडल्याबद्दल राजांनी राजसंतापाने प्रतापरावांना पत्र लिहिले होते- "पठाणाशी सला कार्य निमित्त केला ? गनिमास मारून गर्देस मिळवावे. नातर आम्हास तोंड दावो नये ! "


सुटला बहलोल बेइमानपणे मराठी मुलखाला ताराज करीत सुटला होता. पुरे एक वर्ष प्रतापराव त्याच्या पाठलागावर होते. चुकीचा सल सुधारून काढण्याची संधी बघत होते. बहलोल बंदिस्त होता.


राजे 'तख्ती बसणार ही खबर प्रतापरावांना लागली. आता रायगडी परतावे लागणार. पण बहलोल जिंदा ठेवून राजांना तोंड कैसे दावावे ?


नेसरीजवळ कुप्याच्या खिंडीवर बहलोलचा दहा हजारी पठाणी तळ पडलाय, ही खबर प्रतापरावांना लागली. फौजेनिशी चालून जाऊन फत्ते होणार नव्हती. म्हणून प्रतापरावांनी आपल्या डेऱ्यात शेलके धारकरी याद केले. कुणाला ध्यानीमनी नसता प्रतापरावांनी त्यांना साकडे घातले" आम्ही पठाणावर चालून जाणार! एकले ! राजांस्नी आमचा दंडवत सांगा ! "


सहा धारकऱ्यांनी कमरेची हत्यारे उपसत त्यांचा शब्द हट्टाने झेलला “सरलष्कर, जितं तुमी तिथं आमी!" आणि महाशिवरात्रीच्या दिवशी घोड्यांवर मांड घेतलेले प्रतापराव नंगी तलवार हाती नाचवीत "हर हर हर महादेव" गर्जत बेभान उधळले. सहा घोडाईत पाठीशी घेऊन!


ते वेडे सात पक्षी दहा हजारी फौजेवर झडप घालण्यासाठी गेले ते परतलेच नाहीत ! सात कडकडत्या विजा पठाणी फौजेच्या दर्यात कोसळल्या नि विझल्या. कर्माजीने सांगितलेला वृत्तान्त राजांच्या तोंडून ऐकताना संभाजीराजांच्या डोळ्यांसमोर प्रतापरावांची मर्दानी मुद्रा उभी ठाकली.


उधळत्या घोड्यावर मांड घेतलेले, हत्यार नाचवीत चवताळलेले प्रतापराव लिंगाण्याच्या पेटत्या वणव्यात घुसल्याचा भास संभाजीराजांना झाला!.


घुसते प्रतापराव म्हणत होते- “अमनधपक्यानं पेटल्याली ही आगट लई वंगाळ धाकलं धनी! रानपाखरं त्येनं येलबाडून जात्यात! घालून घेत पंख जाळून घेत्यात !' कारण नसताना माहुताचे ऐकलेले शब्द संभाजीराजांच्या मनात फिरले-


"त्रिशू ऽल, आरं हाटमोरेपन सोड !! टाक्यातच रुतून बसनार हाईस का काय ? ".. सजला रायगड प्रतापरावांच्या सुतकात आला. दाटल्या मनाने राजांनी प्रतापरावांचे मर्तिकविधी केले. सरलष्करपदाची मोकळी जागा मानवस्त्रासह हंसाजी मोहित्यांना दिली.

ती देताना 'हंबीरराव' ही खिताबत त्यांना बहाल केली.


हंसाजी सोयराबाईंचे बंधू. त्यामुळे त्यांची ही नामजादी सोयराबाईंना खोलवर सुखवून गेली. अडीनडीला रक्ताची माणसे कामी पडतात. सत्ता हाती असलेल्या रक्तसंबंधाच्या माणसाचा तर मनाला उगाच मोठा आधार वाटत असतो.


सगळे प्राचीन ग्रंथ राबत्याला घेऊन गागाभट्टांनी तपशिलासह 'राज्याभिषेक प्रयोग' हा विधींचा ग्रंथ तयार केला.


पाचाडहून, काशीबाईच्या दुखण्याने उचल खाल्ल्याची वर्दी गडावर आली.


राजे, संभाजीराजे, जिजाऊ, राणीवसा, येसूबाई, धाराऊ संगळा राजगोतावळा . पाचाडात उतरला. अभिषेक होऊ घातलेल्या राजे-संभाजीराजांच्याकडे भरल्या नजरेने बघत, बोलायचे ते खूप ओठाआड तसेच ठेवून मूकपणे काशीबाई निघून गेल्या. पाचाडच्या दरुणीमहालात आक्रोश उठला.


काशीबाईंचा निष्प्राण हात हाती घेऊन त्यांच्या कपाळीचा भरला आडवा मळवट बघताना राजांचे डोळे दाटून आले. एक मुका मनसुबा थंड झाला होता. होणाऱ्या राज्याभिषेकावर आभाळाच्या सांदीतून काही अशिव झिरपेल की काय या कातरभयाने ते थोपवायला घाईगर्दी करून काशीबाई निघून गेल्या !


पाचाडच्या माळावर पेटलेल्या चंदनी चितेकडे उदास नजरेने संभाजीराजे बघत होते. चितेच्या चटचट्या आवाजाबरोबर त्यांच्या शब्दाचे पक्षी पंख फडफडवीत राहिले-

" सरता संचिताचें शेष नाहीं क्षणाचा अवकाश ।


भरता न भरता निमिष जाणे लागे। मृत्यु न म्हणे मुद्राधारीं न म्हणे परनारीं। राजकन्या ॥


प्रतापरावांच्या होमानंतर एकच महिन्यात काशीबाईंची चिता पेटली. युवराज म्हणून राजटोप मस्तकी चढण्यापूर्वीच ज्येष्ठ पुत्र म्हणून संभाजीराजांचे जावळ मुंडन विधीने उतरले गेले ! रायगड पुन्हा सुतकात आला !


काशीबाईंचे मर्तिकविधी पार पडले. संभाजीराजांच्यासह राजे प्रतापगडी जायला निघाले. कुळदेवता भवानीआईचे आशीर्वाद घेऊन, रामजी दत्तोने बांधलेले सव्वामणी सुवर्णछत्र तिच्या मस्तकी चढवायला शिवथर घळीत उतरून समर्थांची पायधूळ घ्यायला.


दोघा पितापुत्रांनी जिजाऊंचा निरोप घेऊन निवडक शिबंदीनिशी रायगड सोडला. फुलमाळांनी सजल्या पालखीत वस्त्राच्छादित सुवर्णछत्र ठेवण्यात आले होते. 'जय भवानी !' नांदी देत भोयांनी पालखीला खांदे दिले. जगावर छत्र धरणाऱ्या तुळजाभवानीवर छत्र चढविण्यासाठी तिचे भुत्ये चालले होते !

उन्हाळी मजला मागे पडल्या. घाट चढून छत्रतांडा जावळी खोऱ्यात घुसला. जनीच्या टेंब्यावरची अफजल-कबर मागे टाकीत छत्रशिबंदी प्रतापगडावर आली. सोनमोहरा उधळून किल्लेदाराने राजे युवराजांची आगवानी केली. भरल्या मळवटाने सुवासिनींनी निरांजने फिरविली.


छत्रस्थापनाचा मुहूर्त दुसऱ्या दिवशी होता. थाळे घेऊन दुपार टळतीला टाकून संभाजीराजांच्यासह राजे गडाच्या पाहणीला बाहेर पडले.


गडाच्या मोक्याच्या जागा बघून स्वाऱ्या 'अब्दुल-बुरुजावर आल्या. दूरवर हंड्याएवढ्या दिसणाऱ्या अफजलच्या कबरीकडे बघत राजे गंभीर झाले. "महाराजसाहेब, आपणास जिवे घेण्याचा विडा उचलून आलेल्या खानाचे दफन आपण इतमामाने केले. त्याची कबर बांधविली. ही कोण विचाराने ? " अफजलच्या कबरीकडे बघत संभाजीराजांनी विचारले. राजांचा घरला विचार त्याने तुटला.


संभाजीराजांच्या भरगच्च कपाळीच्या गंधपट्ट्यावर, गालाकडे फिरलेल्या मिश्यांच्या काळभोर रेषांकडे बघत राजे म्हणाले, " आमचा झगडा करणीशी असतो, कर्त्याशी नाही. मरणाबरोबर गनिमी संपली असे आम्ही मानतो.'


" पण गनिम तसे मानीत नाहीत! आपल्या गुजरकाकांचा पडला देह मिळाला नाही. त्यांचे दहन झाले नाही! कामी आलेल्या आपल्या माणसांची घडें छावणीच्या कुत्र्यांसमोर टाकली जातात. टाकली जातील! हे कसे?".


तो विचार बिनतोड होता. राजे त्याने क्षणभर सुन्न झाल्यागत झाले. मग शांतपणे म्हणाले, " मोगलाईत आणि आमच्या 'श्रीं' च्या राज्यात फरक आहे तो इथंच. आम्ही पाडली मंदिरं पुन्हा उठविली- उठवू. पण कुणाची धर्मस्थानं धूळदोस्त करावी तो विचार आमच्या मनात शिवत नाही. तुम्हास आता जसं वाटतं तसं एकेकाळी आम्हांसही वाटत होतं. पण मासाहेबांनी आमचा भ्रम दूर केला. विचार उदात्त केले.' " जिजाऊंच्या आठवणीने दोघेही जबानबंद, निसूर झाले. भवानीच्या मंदिराच्या रोखाने सांजआरतीची तडतडणारी संबळ ऐकू येऊ लागली..


क्षणभर युवराजांना आपण रायगडाच्या मावळमाचीवरच उभे असल्यासारखे वाटले. हात छातीशी भिडले. भवानीच्या मंदिराकडे जाण्यासाठी ते राजांबरोबर अब्दुल- बुरुजाच्या पायऱ्या उतरू लागले.

ओघळत्या उपरण्याचे शेव मुठीत धरून आण्णाजी दत्तांनी रायगडाच्या सातमहालातील सोयराबाईंच्या महालाचा दगडी उंबरठा ओलांडला.


राणीसाहेबांना बघताच त्यांनी अदबीने झुकून मुजरा दिला. "या सुरनीस, अभिषेकविधीचा तपशील सिद्ध झाला असे आम्ही ऐकतो. " सोयराबाईंनी मुद्द्याला हात घातला.

रायगडावर राजे, युवराज नव्हते म्हणून मनातील एका पेचाची उकल करण्यासाठी आण्णाजींना सोयराबाईंनी चंद्राकडून महाली याद केले होते.


“जी. सर्व तपशील सिद्ध झालेत.” आण्णाजींनी मान खाली ठेवून प्रश्नाचा जाब दिला. एवढ्यात महालाच्या अंत:पुरातून चंद्रा कुणबिणीच्या हाती हात दिलेले रामराजे बैठकी दालनात आले. त्यांना बघताच आण्णाजींनी त्यांना मुजरा दिला.


रामराजांना जवळ घेत सोयराबाईंनी त्यांच्या गळ्यातील ठीक असलेला मोतीकंठा उगाच पुन्हा ठीक केला. तसे करताना आण्णाजींना नेमक्या मुद्द्यावर कसे आणावे याचा विचार मनाशी बांधून घेतला. "मग त्या तपशिलात आमच्या बाळराजांच्यासाठी कसले विधी आहेत?" सोयराबाईंची जरबी नजर आण्णाजींच्या थोराड पगडीभवती फिरली आणि त्यांच्या कपाळीच्या गंघटिळ्यावर बसली.


आण्णाजींना द्यायला उत्तर नव्हते म्हणून ते खालमानेने गप्पच उभे राहिले. " का ? सुरनीस, यांच्यासाठी कोणतेच विधी नाहीत ? तुम्ही गप्प का ?"


सोयराबाईंचा आवाज बांधील झाला. “जी. आचार्यांनी सिद्ध केलेल्या अभिषेकप्रयोगात बाळराजांचा स्वतंत्र उल्लेख नाही!" आण्णाजी तोलून बोलले.


"मतलब ? हे स्वारींचे कुणीच नाहीत ? मग यांना मुजरे तरी कशाला ?? " गैरसमज होतोय राणीसाहेब. यात आमची काहीच कसूर नाही. खुद्द स्वामींनीच "आचार्यांना अभिषेकविधी ठरविण्याचे सर्व अधिकार दिले आहेत. "


"तेच आम्ही म्हणतो. आचार्यांना गडाची ओळख दोन दिवसांची. त्यांच्या कामात काही वाण राहिली तर ते बोलणार कोण ? तुम्ही ती सुधारून घ्यायला नको काय ? " आण्णाजींना फिरवून फिरवून सोयराबाईंनी नेमक्या तिवड्यावर आणले. "जी. आम्ही हे बोलू. पण आचार्य ते मान्य करतीलच असा विश्वास कसा द्यावा ? "


तुम्ही बोला तर खरे. "


“जी.” आण्णाजींची पगडी मंद डुलली. सोयराबाईंना आणि रामराजांना मुजरा दे ते पिछाडीच्या कदमांनी महालाबाहेर पडले.


काही वेळाने सोयराबाईंची दासी चंद्रा, मंत्रिवाडीतील आण्णाजींच्या घरी जाऊन हळदीकुंकवाचे आमंत्रण देऊन आली.


सायंकाळी महाली आलेल्या आण्णाजींच्या कबिल्याची सोयराबाईंनी खण- शालूवर मोतीबंद नथ ठेवून ओटी भरली! आणि ती भरत असताना त्या हसून म्हणाल्या, " आपल्या माणसांचा असा राबता असला म्हणजे मनास बरं वाटतं!

सरंजाम-शिबंदी पाठीशी घेत राजे-संभाजीराजांसह शिवथरघळीच्या वाटेला लागले. ओढे, पाणंदी पार करताना जातवान घोड्यावर बैठक घेतलेल्या संभाजीराजांच्या मनी एकच एक विचार पुन: पुन्हा फेर टाकू लागला- " कसे कसे दिसत असतील स्वामी - समर्थ ? सूर्यभक्त रामसेवक संन्यासी. संन्यासी असून ठिणग्यांसारख्या शब्दांचा प्रपंच ओठांत नांदवणारे! केवढ्या मानतात मासाहेब त्यांना ! " " लतावेलींनी मेट धरलेली शिवथरची घळ जवळ आली. उभे रानच कुदणीला पडलेय असे वाटावे तसा शंखांचा घुमरा आवाज ऐकू येऊ लागला. राजांची आगेवर्दी गेल्याने साक्षात समर्थ, शिष्यांचा तांडा पाठीशी घेऊन स्वागतासाठी येत होते.