कोणतही शिवकाव्य येथे शोधा

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग ९१

 *** भाग ६ ***


मजल दरमजल मागे पडली. झाडीत अर्धवट दडलेले जव्हार नजरटप्प्यात आले. हौद्यात पाठीशी बसलेले मोरोपंत संभाजीराजांच्या कानाशी झुकले. जव्हारच्या विक्रमशहाच्या झाडीतून उठलेल्या वाड्याच्या कळसाकडे तर्जनी रोखत अदबीने पुटपुटले, "जव्हार-कोळीराजा विक्रमशहाची राजधानी !”


ते ऐकताच संभाजीराजे हौद्यातील बैठकीवरून ताडकन् उठले. वाड्याच्या कळसाचा त्यांनी रोख घेतला. त्यांच्या छातीत धड़का घेत काहीतरी सरसरले. राजांची भुवई घेत होती तसा त्यांच्या उजव्या भुवईने कमानी बाक घेतला. क्षणात कमरेचे हत्यार उपसून त्यांनी त्याचे टोक जव्हारवर रोखत रणघोष दिला- "हर हर महादेव!' त्या रणघोषाला आघाडी - पिछाडीकडून किलकाऱ्यांचे हजारो कोंब फुटले - “हर! हर! महादेव!

खड्या ठाकलेल्या मोरोपंतांनी घोडदळाच्या अधिकाऱ्यांची नावे भराभर गर्जत आज्ञा फेकल्या- " वस्तीस चौतर्फेनं घोडाइतांचा घेर टाका, शाजणे, ढोलांचा कालवा उठवा. दोनांस एक असा घोडा आणि पाऊलोकांचा मेळ पाडा. बोला हर 5 हर महादेव! " सुरतेपासून अवघ्या पंचवीस कोसांवर असलेल्या जव्हारला संभाजीराजांच्या झडप्या घोडदळाने क्षणात येरगाटले.


वाटेत दस्त केलेले काळेकभिन्न लंगोटीबाज कोळी मराठ्यांनी धाक देऊन घोड्यांवर चढविले. त्यांना तोंडाशी ठेवून मराठ्यांची एक घोडेतुकडी जव्हारात दौडत घुसली. पुढचे कोळी, कोळीभाषेत ओरडत दौडू लागले - "मराठे आले! खुद्द शिवाजीचा फर्जद संभूराजे दाबजोर फौज घेऊन चालून येतो आहे! पळा!' " साऱ्या जव्हारभर आवयांचे रान उठले. आत घुसलेली दौडती घोडेतुकडी आपले काम करून दुसऱ्या बाजूने बाहेर पडली.


भरतीचा दर्याच चालून येतो आहे की काय हे भांबावल्या कोळ्यांना कळेना! हाहाकार उडाला. त्याचा फायदा उठवीत, भाले आणि ढाला तेगी पेलून 'जय भवानी' गर्जत पाच हजारी मावळी पायदळ चवाटांनी जव्हारात घुसले. हत्यारे भिडली. कोळ्यांचा हाय खाल्लेला राजा विक्रमशह, निवडक कोळी संगती घेऊन आपल्या वाड्यातून बाहेर पडला. आपली प्रजा मराठ्यांच्या टापांखाली मरणाला सोडून तो दौड् लागला नासिकच्या रोखाने! मोगलांच्या पंखाखाली गुलशनाबादेत आसरा घ्यायला ! राजा पळाला! जव्हार बेवारस झाले. मनचाहा लुटीला तोंड फुटले. सोने, चांदी, मोती; अफाट संपत्ती लुटीला लागली.


गळ्यातील चंदेरी घाट घुमवीत संभाजीराजांचा हत्ती जव्हारात घुसला. त्यांना बघून चेतावलेले मावळे लुटीचे डाग चटक्या पावलांनी उचलून नगराबाहेर काढू लागले. एक फेर टाकून संभाजीराजे जव्हारच्या मावळतीला झाले. डेरे, शामियानाच्या तणावा ताणल्या गेल्या. तळ सज्ज झाला.


मांडलेल्या चौथऱ्यासारख्या बैठकीवर संभाजीराजे बसले. याच खंबायती मुलुखफाट्यात एकदा नव्हे दोनदा राजांनी सुरत लुटली होती. तेथून केवळ पंचवीस कोसांवरचे ते आभाळ आज जव्हार लुटलेले बघत होते; शिवाजीराजांच्या पुत्राकडून ! सोने, रूपे, चांदी, मोती यांची रास प्रतवारीने संभाजीराजांच्या समोर मांडण्यात आली. सतरा लक्ष रुपयांच्या वस्तभावाची रास पडली.


लुटीला निकराचा विरोध करणारे, काढण्यांनी मुसक्या आवळलेले धिप्पाड कोळी कैदी संभाजीराजांच्यासमोर पेश करण्यात आले. बंदिस्त असले तरी मोठ्या गुर्मीत ते मिळेल ती सजा भोगायला मन बांधून तयार होते.


फत्ते - खुशीच्या, राजांना लिहिलेल्या मोरोपंतांनी पुढे केलेल्या पत्रावर संभाजीराजांनी दस्तुराचे शिक्के केले. पत्रथैली खबरगिराच्या सुपूर्द करण्यात आली.


"युवराजांनी दस्त झाल्या कैद्यांच्या सजेचा करिणा द्यावा. " कैद्यांच्या रोखाने हात करीत मोरोपंत अदबीने म्हणाले.


संभाजीराजांनी कैद्यांच्यावरून एकदा नजर फिरविली. काही झाले तरी ते आपल्या मुलुखाच्या आबादानीसाठी प्राणबाजीने झुंजले होते. संभाजीराजांचा हात छातीवरच्या कवड्यांना भिडला. कपाळीच्या शिवगंधाचे पट्टे आक्रसले. शांत, धीरगंभीरपणे ते म्हणाले, “पंत, यांतील जे आपल्या फौजेकडे चाकरीस राजी असतील तयांस रुजू करून घ्या. जे नसतील त्यांच्या काढण्या उतरून त्यांस इतमामाने परते पाठवून द्या." "जी. जशी आज्ञा." मोरोपंत आश्चर्याने कमरेत झुकले. युवराजांची आज्ञा इतकी पोक्त पडेल याचा त्यांना कयास नव्हता.


जव्हारचा तळ हलला. मिळाली लूट पहायात रायगडच्या वाटेला लावण्यात आली. युवराजांची फौज रामनगरवर मोहरा धरून पुढे सरकू लागली. रामनगर दोन मजलांवर ठेवून मराठी सेनेचा तळ पडला. रामनगर तर सुरतेच्या दक्षिणेला अवघ्या पंधरा कोसांवर !


मसलत देण्यासाठी मोरोपंत युवराजांच्या डेऱ्यात आले. आत रायाजी, अंतोजी ही युवराजांची खास माणसे होती.

'युवराज, रामनगरवर चाल धरली तर सुरतेची मोगली ठाणी त्यांना कुमक करणार." मुजरा देत पंत म्हणाले.


'त्यासाठीच सुरत आपल्या धाकात राहील असे केले पाहिजे.” संभाजीराजे त्याच विचाराला धरून बोलले. " तो धाक बसण्यासाठी रामनगरवर जाण्यापूर्वी एकदा घोडदळ सुरतेच्या भवत्यानं दौडवून आणावं असं आम्हास वाटतं.” मोरोपंतांनी मसलत पेश केली.


खंडोजी जगताप आणि रूपाजी भोसले यांना ती मनोमन पटली. ती ऐकून संभाजीराजे विचारात गेले. पावसाळ्याचा नेम सांगण्यासारखा नसताना कुठल्याही कारणासाठी फौजेच्या दोन फळ्या पडणे कार्य लावणारे नव्हते..


आम्हाला वाटतं, सुरतेच्या सुभेदारास थेट खलिता धाडावा. त्याच्याकडेच खंडणीची मागणी करावी. जातीनिशी आबासाहेब या तळावर आहेत असा भास त्याला 'द्यावा. सुरतेत खबरगिर पेरून त्यांच्याकरवी अशीच भूमका उठवावी. सुरतकर आपल्या रक्षणासाठी जागीच अडकून पडतील." पंतांच्यासह सारेच युवराजांकडे बघतच राहिले. ही चाल बिनतोड होती. साऱ्यांनाच ती पटली.


"चार लक्ष रुपये खंडणीदाखल भरणा करा, नाहीतर शिवाजीराजे सैन्यासह सुरतेवर चालून येतील" असा जरबेचा खलिता पंतांनी सुरतेच्या सुभेदाराला धाडला. त्या थैलीस्वाराबरोबरच चलाख खबरें सुरतेत घुसले. सुरतेत हाहाकार उडाला !


ही वेळच रामनगरवर चालून जाण्याची होती. पण नासिक-बागलाणकडून विक्रमशहा आणि दिलेरखान आपल्या फौजेची प्रचंड जमवाजमव करीत असल्याच्या खबरा आल्या आणि त्यातच पावसाला सूर लागला.


रामनगरजवळ आलेल्या संभाजीराजांच्या फौजेने सुरक्षित जागेपर्यंत माघार घेतली. गुजराथी पावसात मावळी डेऱ्यांच्या कनाती भिजू लागल्या.


पावसाने पंधरवडा खेळविला. तापल्या घोड्यांची पाठवाने पाणधारांनी निवांत झाली. मोरोपंतांनी आणखी दोन पत्रे सुरतेच्या सुभेदाराला धाडून आपण खंबायतातच ठाण धरून आहोत याची जाण दिली!


पावसाने भांगा देताच मराठी फौजेने पुन्हा रामनगरचा मोहरा धरला. “मराठे आलेत!" हे ऐकून धास्त घेतलेला रामनगरचा सोमशहा केव्हाच पळाला होता ! कबिल्यासह तो सुरतभागात गणदेवीजवळ चिखली येथे ठाण धरून होता. राजा नसलेल्या जव्हारची जी झाली तीच गत रामनगरची झाली. पावसाने झोडपून काढलेले रामनगर संभाजीराजांच्या धारकऱ्यांनी लुटून काढले ! तिकडे सुरतेत शिवाजीच्या सेनेचा थोपा करण्याचे निमित्त धरून औरंगजेबाचा अक्लमंद सुभेदार आपल्याच रयतेकडून पैसे उकळण्याची अजब तेगबाजी नेकीने पार पाडीत होता !

रामनगरच्या लुटीच्या गोणी मोहोरबंद करण्यात आल्या. पडल्या तळावर संभाजीराजांनी जखमदरबार भरविला. दोन्ही चालींत मर्दानगी केलेल्या असामींना तोडे, कडी, मोहरा, वस्त्रे बहाल करण्यात आली. देखण्या संभाजीराजांना प्रत्यक्ष तळावर बघून मावळे धारकरी अभिमानाने भरून येत होते. पेटत्या आगट्यांभोवती फेर टाकून शेक घेताना त्यांची युवराजांबद्दल भरल्या जबानीने बातचीत होत होती.


रूपाजी, रायाजी, अंतोजी आणि धाडसी शिकारखेळे बरोबर घेऊन संभाजीराजे रामनगरच्या रानात एकदा दिवसा शिकारलाही उतरले. हाका घालून उठविलेल्या कळपातील काळी जनावरे त्यांनी हत्तीवरच्या हौद्यातून बंदुकीचे बार टाकून लोळविली. पडली रानसावजे काठ्यांना टांगून तळावर आणण्यात आली. गळाठलेल्या धारकऱ्यांना झणझणीत सागुतीचा तवाना भोग मिळाला!


सुरतेला झुलवीत ठेवून मराठी फौजेचा तळ रामनगर सोडून उठला. पश्चिम घाट चढून नासिक-त्र्यंबकच्या तोंडावर आला.


नासिकजवळ संभाजीराजांच्या विजयी फौजेच्या दोन फळ्या झाल्या. एक त्र्यंबकच्या रोखाने घुसली. दुसरी नासिकवर चालून गेली.


जव्हारचा विक्रमशहा आणि दिलेर यांचे जोडसैन्य ठाण्याच्या उत्तर प्रांतात असलेल्या मराठी फौजेवर चालून गेले होते. तिथे भयानक रणधुमाळी पेटली होती. अनेक मावळे कामी आले होते. पण मराठ्यांनी धारराव कोळी आणि विक्रमशहाचा मुलगा यांना दस्त करून त्यांना गर्दनमारीची सजा ठोकली होती.


नासिक ( उर्फ गुलशनाबाद) हे ताकदवर मोगली ठाणे जाधवराव या मोगली चाकरीत असलेल्या राजांच्या मामेभावाच्या ताब्यात होते! संभाजीराजांचे ते मामेकाका. मराठी फौजांनी गोदावरीला साक्षी ठेवून त्र्यंबक, नासिक ही दोन्ही ठाणी मारली. काढण्या चढवून मुसक्या बांधलेले जाधवराव रूपाजी भोसल्यांनी नासिकच्या तळावर युवराजांच्या सामने पेश केले.


जोडल्या डोळ्यांनी संभाजीराजांनी मामेकाका जाधवराव सिंदखेडकर यांना निरखले. मासाहेबांचे हे मोगली पेहराव केलेले भाचे बघताना त्यांच्या छातीत कालवाकालव झाली. जिजाऊंच्या आठवणीने त्यांचा हात नमस्कारासाठी छातीकडे गेला. जाधवराव त्यामुळे गैरसमजात आले. त्यांना वाटले युवराजांच्या मनी रक्ताचे नाते जागे झाले ! आणि त्यांनी आम्हालाच नमस्कार केला.


"रूपाजी, काकासाहेबांच्या काढण्या उत्मा.” संभाजीराजे थंडपणे म्हणाले. रूपाजी चमकला. क्षणभर घोटाळला.


" रूपा! जी." बैठकीवरून आसूड फुटल्यागत जरब आली. घाईघाईने रूपाजीने जाधवरावांच्या काढण्या फटाफट उतरल्या.

उजव्या तर्फेला असलेल्या मोरोपंतांकडे वळून संभाजीराजे म्हणाले, “पंत, काकासाहेबांना समज द्या. आम्ही युवराज आहोत. त्यांनी रिवाजी मुजरा दिलेला नाही ! तो नीट देता यावा म्हणूनच त्यांच्या काढण्या उतरल्या आहेत.


“जी.” मोरोपंत झुकले. दमदार पावलांनी ते जाधवरावांजवळ आले. त्यांनी समज दिली " राव, तुम्ही कैदी आहात. युवराजांना रिवाजी मुजरा द्या. "जाधवराव चमकले. मान ताठ ठेवीत संभाजीराजांना पेटते डोळे देत ते म्हणाले, 'कैद झाला म्हणून वाघ गवत खात नाही ! पोर फर्जदांना मुजरा द्यायचा जाधवांचा वसा नाही !"


"कोण वाघ ?” फुलल्या डोळ्यांचे संभाजीराजे बैठकीवरून ताडकन उठले. तो चित्कार ऐकून रूपाजी, पंत, रायाजी ही भोवतीची मंडळी अंगभर चरकली.

'बेडर चालीने संभाजीराजे जाधवरावांच्या समोर आले. भाल्याचे पाते चालवावे तशी नजर मामेकाकांच्या डोळ्यांत चालवीत, फुलल्या नाकपुड्यांनी आसुडासारखे वाटावे असे शब्द त्यांनी त्यांच्या कानांवर ओढले - "वाघ गवत खात नाही पण तो वसा - पाळीव मांजरांनी बोलू नये ! दर्शनाबरोबर आम्ही पाय धरावे असा तुमचा वकूब. पण- पण तुम्हांस काका म्हणण्याची आम्हास शरम वाटते! आऊसाहेबांचे भाचे तुम्ही ! म्हणूनच मुजरा रुजू घातला पाहिजे ! आम्हास नव्हे त्यांना! आम्हाला बघून त्यांची याद आली नाही तुम्हाला ! तुम्हास बघून आम्हास मात्र ती आली! गुमाने मुजरा रुजू घाला त्या बैठकीला ! ती आऊसाहेबांची आहे! नाहीतर...!" 'नाहीतर काय ? " भुवई चढवीत जाधवराव गुर्मन बोलले.

" काय ? जाधवांचा वसा बोलणारी तुमची जीभ हासडून या क्षणी तुमच्या हातात देण्याची आज्ञा देऊ आम्ही! पंत,” संभाजीराजांची छाती लपापू लागली. "राव , मुजरा घाला. बैठकीला आणि युवराजांना " संभाजीराजांचे घुसखोर मन ऐकून सुन्न झालेले मोरोपंत जाधवरावांचा खांदा हलवीत म्हणाले.


एक क्षण गेला आणि तसलीम कुर्निस करून मार खाल्लेल्या उभ्या हयातीच्या - आठवणीने जाधवरावांचा ऊर गलबलला. डोळ्यांच्या कडा दाटल्या. श्वास चढीला पडला. पुढे होत जाधवरावांनी झटकन युवराजांच्या मोजड्यांना सरळ हात भिडविले. धरल्या आवाजाने मान डोलवीत ते म्हणाले, "आत्याबाईंचे पाय धरण्याची आमची लायकी नाही ! खरे तर तुमचे सुद्धा!