कोणतही शिवकाव्य येथे शोधा

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग ९०

जगदीश्वराचे दर्शन घेऊन जोत्याजी केसरकरासह खासेमहालात परतलेल्या संभाजीराजांना खिदमतगाराने आत येऊन वर्दी दिली, "मुतालिक महादेव यमाजी भेटींची आज्ञा मागतात. "


"पेश येऊ द्या." युवराजांनी त्याला इजाजत दिली.


प्रौढ वयाचे महादेव यमाजी उपरणे सावरीत महालात आले. पगडी झुकवीत त्यांनी मुजरा रुजू घातला. नजर युवराजांच्या पायांवर ठेवून ते म्हणाले, “थोरल्या स्वामींनी युवराजांना आपल्या सदरेशी याद फर्मावलं आहे.'


महादेव यमाजींना पुढे ठेवून जोत्याजींसह संभाजीराजे तसेच महालाबाहेर पडले. राजांच्या वाड्याची सदर आली. तिच्या दोन्ही तर्कांना मोरोपंत, आण्णाजी, दत्ताजी त्रिमल, बाळाजी हात बांधून अदब धरून उभे होते. राजांच्या पाठीशी विश्वासू हुजऱ्या खंडोजी दाभाडे कमरेच्या हत्यारांवर मूठ देऊन खडा होता. युवराजांना बघताच त्या साऱ्यांचे मुजरे झाले.


" “या.” संभाजीराजांना बघून राजे म्हणाले.


राजे बसलेल्या बैठकीच्या समोर येत युवराजांनी त्रिवार अदब मुजरा रुजू घातला. "या." यांची ओळख करून घ्या.” राजांनी समोर उभ्या असलेल्या भगव्या कफनीधारी, तेजस्वी गोसाव्याकडे हाताचा इशारा दिला.


राजांच्या बैठकीच्या खालगत पायरीवजा बिछायतीवर संभाजीराजे बसले.


"हे समर्थांचे शिष्य. दिवाकर गोसावी.” राजांनी संन्याशाची ओळख दिली. दंड, मनगटात रुद्राक्षांची टपटपीत कडी आवळलेले, दाढीधारी, सतेज दिवाकर गोसावी हातातील दंड तसाच धरून नमस्कारासाठी किंचित झुकले.


" आणि हे आमचे फर्जद युवराज संभाजीराजे.” राजांनी युवराजांच्या खांद्यावर हाताची बोटे ठेवीत दिवाकर गोसाव्यांना त्यांचा परिचय दिला.


'रघुकृपा!" दिवाकर पुटपुटले. संभाजीराजांनी उठून त्यांना नमस्कार दिला.


"बोला दिवाकरपंत, काय धरून येणं झालं ? " राजांनी गोसाव्यांच्या कपाळीचे भस्मपट्टे निरखले.


"गुरुदेवांचा मुक्काम कोडोली पारसगावात आहे. आपल्या भेटीची ते इच्छा करतात.- आपल्यासाठी त्यांनी पत्र दिले आहे." दिवाकरांचा आवाज हनुमानाच्या मंदिरातील घाटेसारखा होता. त्यांनी खांद्याची झोळी पोटाशी घेत तिच्यातून पत्राची वळी बाहेर काढली. पुढे येत वाकून ती राजांच्या हाती दिली.


हाती घेतलेली वळी मिटल्या डोळ्यांनी राजांनी आपल्या कपाळीच्या शिवगंधाला भिडविली. ती वाचण्यास तशीच बाळाजींच्या हाती द्यावी म्हणून एकदा बाळाजींच्याकडे नजर टाकली. आणि त्यांना काय वाटलं कुणास ठाऊक, ती मागे हटलेल्या दिवाकरांच्याच रोखाने पुन्हा धरीत राजे म्हणाले, “समर्थांचे बोल समर्थशिष्यांच्या तोंडून ऐकावे असं आम्हास वाटतं."


"जशी राम इच्छा!" म्हणत दिवाकर पुन्हा पुढे झाले. झुकून त्यांनी राजांच्या हातून पत्राची वळी आपल्या हाती घेतली. त्या पत्रात काय आहे ते खुद दिवाकर गोसाव्यांनाही माहीत नव्हते.


चौदा वर्षांपूर्वी एकदा राजगडावर दुसऱ्या एका समर्थ शिष्याची- भास्कर गोसाव्यांची राजांशी भेट झाली होती. त्या भेटीत राजांनी त्यांना विचारले होते की, - 'तुमचे गुरू कोण ? कुठले ? कोठे राहतात ?” भास्कर गोसाव्यांनी त्यांच्या गुरूंचा महिमा त्या वेळी सांगितला होता, पण त्याउपर राजकारणाच्या घाईगर्दीत राजांना समर्थांचा परामर्श घेणे जमले नव्हते. आज समर्थांनी आपणहून त्यांना पत्र धाडले होते.. निर्हेतुक. राजांचे चढत्या शिगेचे पराक्रम ऐकून जे वाटले ते रसाळ रामबोलीत समर्थांनी पत्रात उतरविले होते.


जय जय रघुवीर समर्थ " पत्र वाचण्यापूर्वी दिवाकरांनी नामस्मरण केले. तासावर ठणठणीत टोल उठावेत तसे दिवाकर गोसाव्यांच्या तोंडून समर्थांचे सूर्यबोल सर्वांच्या कानी पडू लागले:


" निश्चयाचा महामेरू। बहुतजनांस आधारू अखंड स्थितीचा निर्धारू ! श्रीमंत योगी ॥


परोपकाराचिया राशी उदंड पड़ती जयाशी तयाचे गुणमहत्त्वाशी । तुळणा कैशी ? नरपति हयपति। गजपति, गडपति पुरंधर आणि शक्ति पृष्ठभागी ॥ येशवंत, कीर्तिवंत सामर्थ्यवंत, वरदवंत पुण्यवंत आणि जयवंत। जाणता राजा ॥ आचारशील, विचारशील। दानशील, धर्मशील सर्वज्ञपणे सुशील। सर्वांठायी ॥ धीर, उदार, सुंदर। शूर क्रियेसी तत्पर सावधपणेसी नृपवर तुच्छ केले ॥ तीर्थक्षेत्रे ती मोडिली । ब्राह्मणस्थाने बिघडली सकळ पृथ्वी आंदोळली। धर्म गेला ॥


 देवधर्म, गोब्राह्मण करावयासी रक्षण हृदयस्थ झाला नारायण । प्रेरणा केली ॥ 

उदंड पंडित, पुराणिक । कवीश्वर, याज्ञिक, वैदिक


धूर्त, तार्किक, सभानायक । तुमचे ठायी ॥ या भूमंडळाचे ठायी। धर्म रक्षी ऐसा नाही।


महाराष्ट्र धर्म राहिला काही । तुम्हा करिता ॥


गावोगाव भ्रमंती करताना डोळांदेखत लोकांचे नरकहाल बघणारे दिवाकर गोसावी भरून आले. त्यांच्या डोळ्यांतून झालेली आसवे दाढीवर उतरली. वाचन खुंटले.


सारे कानांचे ओठ करून ते अमृतबोल प्राशीत होते. नाकाचा गड्डा चिमटीत धरून मिटल्या डोळ्यांनी राजे विचारात गेले होते- "कसे दिसत असतील समर्थ ? हृदयस्थ झाला नारायण ! श्रीमंत योगी! योग ? केवढा दूरचा पल्ला ! खर्ची पडलेला आमचा हर मोहरा योगी झाला! आम्ही त्यांच्या योगीपणाचा भार खांद्यावर घेऊन वाहतो आहोत! आम्ही भारवाहक ! महाराष्ट्र धर्म ! पृथ्वी आंदोळली!" जिथं तारे संपतात तिथं जाऊन राजे पोचले होते! खोल खोल. दूर-दूर.


दिवाकरांच्या बोलाबोलांनी आजवर सापडत नव्हते ते सारे मनात अडखळलेले महाराजसाहेब संभाजीराजांना मूर्तिमंत गवसत होते 'निश्चयाचा महामेरू !' महामेरू ! केशवपंडितांनी रामायणाच्या पठणात सांगितलेला सर्वांत उंच पर्वत! या रायगडाहून दशगुणी उंच! तेवढा निश्चय! आम्याच्या दरबारात 'कभी नहीं' म्हणताना पेटून उठलेला! आम्ही प्रत्यक्ष पाहिलेला! निश्चयाचा महामेरू !


बहुतजनांस आधारू! 'आमच्या मावळ्यास हातजोड देऊन बसल्यास उठता, उठल्यास चालता आणि चालत्यास दौडता केला पाहिजे' म्हणणारा! आधारू ! म्हाताऱ्या हैबतबाच्या खांद्यावर हात ठेवीत - बाबा जे मनी आले ते आम्हास बोलले पाहिजे' म्हणणारा आधारू !


धीर, उदार, सुंदर! होय अतिसुंदर! एका रात्री आई जगदंबा स्वप्नात आली तेव्हा " जाऊ नको, थांब" म्हणत विस्कटल्या केसांनी, घामेजल्या, थरथरत्या चेहऱ्याने, फुलल्या डोळ्यांनी आम्हाला बघताना दिसलेला तो सुंदर चेहरा! " ल्येकरा घात झाला!" म्हणत आम्याच्या डेऱ्यात आम्हाला मिठीत घेताना दिसलेली ती सुंदर मुद्रा ! कीर्तिवंत, यशवंत, सामर्थ्यवंत, पुण्यवंत, वरदवंत, जयवंत पाचाडच्या सदरेवरची घाट घणघणावी तसे ते रामबोल संभाजीराजांच्या कानामनात घुमू लागले. आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील, सुशील- सावचित्त झालेले दिवाकर पुढे आणखी काही वाचणार तोच संभाजीराजे म्हणाले, 'थांबावं! गोसावी, तो महाराष्ट्र धर्माचा काव्यबोल आणखी एकवार ऐकवा." संभाजीराजांच्यातील कवी आणि राजपुत्र दोन्हीही तवाने झाले होते.

" या भूमंडळाचे ठायी। धर्म रक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हांकरिता।' 

दिवाकर वाचू लागले. राजांचे मिटले डोळे तसेच होते. संभाजीराजांचे टवकार कान अधिक टवकार झाले.


" आणखी काही धर्म चालती। श्रीमंत होऊन कित्येक असती धन्य धन्य तुमची कीर्ति । विस्तारली ॥ तुमचे देशी वास्तव्य केले। परंतु वर्तमान नाही घेतले ऋणानुबंधे विस्मरण जाहले बा काय नेणू ?


उदंड राजकारण तटले। तेथ चित्त विभागले- प्रसंग नसता लिहिले । क्षमा केली पाहिजे।।'


शेवटची ओवी कानी पडताच राजांनी खाडकन डोळे उघडले! क्षणभर त्यांना दिवाकराऐवजी समर्थच समोर आहेत की काय असा भास झाला !


संभाजीराजांचे डोळे मात्र आपोआप मिटले गेले होते. आपल्या आबासाहेबांची असंख्य गोमटी रूपे ते ऐकल्या शब्दांशी ताडून बघण्यात गढले होते.


बागलाण मारून परतलेली मोरोपंतांची फौज महाडात ठाण धरून होती. राजांनी पेशवे मोरोपंतांना रायगडी पाचारण केले. पावसाळा तोंडाशी आला की मराठी घोडी पागेत लीद टाकीत चंदी चघळतात हा सायाच शेजारी गनिमांचा अनुभव होता:


राजांना या गाफिलीचा पुरता लाभ उठवायचा होता.


मोरोपंतांची फत्तेबाज फौज, खासा युवराज संभाजीराजांच्या दिमतीला जोडून घोडी जव्हार- रामनगर या गुजरात सीमेवरच्या कोळी राज्यांवर उतरविण्याचा चुनेगच्च मनसुबा राजांनी बांधला !


संभाजीराजांची ही पहिली मोहीम ! पावसाळा तोंडावर धरून ! भोसल्यांचे 'राजेपण असेच उन्हा पावसात सुलाखून निघावे लागते.


सदरी दाखल झालेल्या मोरोपंतांना राजांनी बेत खुला केला, “पंत, युवराजांच्या पाठीशी राहून तुमच्या फौजेनिशी जव्हार-राननगर मारून चालविणे. खासा आम्ही मोहिमेत आहोत हा भाव युवराजांशी ठेवणे. नदी नाले आड येतील ते पार करावया नौका, हत्ती, पोहणीस कसबी कोळी, भोई दिमतीस घेणे. पाऊस जोर धरतो तरी हिमतीने मोहीम चालती ठेवणे. युवराजांची ही पहिली हत्यारी चाल, फत्तेमुबारकीने कार्यों लावणे.' "


युवराज संभाजीराजे आणि मोरोपंत यांना राजांनी मानवस्त्रे बहाल केली. मोहिमेचा मोहरा जोडून दिला.


रायगडच्या देवमहालातील, अंगावर धावून आल्यागत दिसणाऱ्या आवेशी जगदंबेच्या मूर्तीवर संभाजीराजांनी बेलभरली ओंजळ उधळली. भंडाऱ्याची मूठ चरणांवर सोडली. डोळे जोडून आईच्या पेटल्या डोळ्यांतील आग क्षणभर निरखली. आपसुखच संभाजीराजांचे गुडघे फरसबंदीवर टेकले. आपले टोपधारी मस्तक त्यांनी आदिशक्तीच्या समोर फरसबंदीला भिडविले.


त्यांच्या मिटल्या डोळ्यांना न कळणारे दृश्य दिसले- आईच्या आठी हातांचा मिळून एकच थोर हात झाला आहे! प्रतापगडी नाचविला त्याहून थोर- राव तान्हाजी पडले त्या रात्री कोंढाण्याच्या कड्यावर उसळला त्याहून केवढातरी थोर पोत खुद्द आईच त्या हाताने आमच्या हाती देते आहे! तो पेलता घेण्यासाठी आमचे हात लहाने वाटताहेत! त्याच्या दिपवत्या उजेडात आमचे आम्हीच दिसेनासे झालो आहोत !


" उदं उदं." कळवळती भाक घालण्यासाठी त्यांचे ओठ पुटपुटले. उठविले मस्तक त्यांनी पाठीशी उभ्या असलेल्या राजांच्या पायांवर ठेवले. "उठा, येशवंत असा. पडल्या मुक्कामावरून खबरगीर घाडा. पंतांच्या मसलतीने चला.” राजांनी त्यांचे खांदे हात पकडीत घट्ट धरले. आज संभाजीराजे मोहिमशीर होण्यासाठी गड उतरणार होते. राजे जातीने महाडपर्यंत त्यांची सोबत करणार होते. युवराजांनी आऊवशाकडे जाऊन आशीर्वाद घेतले. धाराऊच्या पुढे राहून तबक फिरविणाऱ्या येसूबाईच्या तबकातील ज्योतीकडे बघून "निघतो आम्ही." म्हणत निरोप घेतला.


ते शब्द ऐकताना येसूबाईंना वाटले मान उठवावी आणि मिळाला तर टोपाखालचा - शिवगंधाचा जोडपट्टा निसटत्या नजरेने बघून घ्यावा! पण ते घडले नाही..


त्यांच्या पाठीशी असलेल्या धाराऊने मनोमन कापूरव्होळाच्या 'म्हादेवाला साकडे घातले-"संबू म्हादेवा, ल्येकरू पयल्या डाव गर्दीत उतारतंय. येसूसरी कर त्येला !! संभाजीराजांनी धाराऊची पायधूळ मस्तकी घेतली. बालेकिल्ल्याच्या सदरी जोत्यावर सिद्ध असलेल्या मोरोपंत, रूपाजी भोसले, खंडोजी जगताप यांच्याशी राजे, रायाजी, अंतोजी, जोत्याजी यांच्या सोबतीने संभाजीराजांचा मेळ पडला.


- साऱ्यांनी बेलफुले वाहून गडदेव जगदीश्वराचे दर्शन घेतले. मंडळी गडउताराला लागली. मनोरे, गंगासागर तलाव मागे पडला. गडमुखासारखा असलेला महादरवाजा समोर आला. खांद्याच्या इतमामासाठी त्यावरची नौबत दुडदुडू लागली. लहाना दरवाजा आणि बगीचा मागे टाकीत सारे पाचाडच्या वाड्यात आले. सदरेवरची घंटा आणि आत जिजाऊसाहेब असल्याने तो वाडा मंदिरासारखाच झाला होता.


राजे, मोरोपंत सदरेवर थांबले. अंतोजी, रायाजीसह संभाजीराजे वाड्याच्या खासेमहालात गेले. तिथे जिजाऊ, पुतळाबाई त्यांची वाट बघत होत्या. युवराजांनी त्यांचे पाय शिवून धूळ घेतली. त्यांना घेऊन जिजाऊ, पुतळाबाई वाड्याच्या देवमहालात आल्या. देवीचे दर्शन झाले. विचारात गेलेल्या जिजाऊ म्हणाल्या, " तुमच्या एवढ्याच उमरीचे असताना तुमचे महाराजसाहेब तोरण्याला भिडले होते. यश घेऊन आले होते. आम्हास भरोसा आहे तुम्ही तसेच कराल !


पाचाडात थाळे झाले. राजे-संभाजीराजे वाड्याबाहेर जायला निघाले. सदरेवर येताच कुणीतरी खेचल्यासारखे संभाजीराजे तुळईला टांगलेल्या घंटेखाली आले. समोर दिसणाऱ्या कृष्णकमळासारख्या रायगडाच्या मावळतीला माचीला त्यांचे डोळे भिडले. तेथून दुरून का होईना आऊसाहेबांचे दर्शन घडत होते. आता परतेपर्यंत काही ते घडणार नव्हते. पाठीशी उभ्या असलेल्या जिजाऊंची मूरत त्यांनी गर्रकन समोर होऊन डोळ्यांत भरून घेतली.


“येतो आम्ही." त्यांनी जिजाऊंचा निरोप घेतला.


सारे पाचाडच्या वाड्याबाहेर पडले. बाहेर जिन कसून दौडीची घोडी मोतद्दारांनी धरली होती. त्यावर मांडा जमल्या. राजे-संभाजीराजे महाडच्या रोखाने दौडू लागले. आभाळात भुर्के ढग लटकून होते. गर्मीने अंगी घामाच्या धारा धरू लागल्या.


महाड हे लष्करी पागेचे ठाणे आले. पंतांच्या माणसांनी बांधलेली दहा हजार कडव्या स्वारांची फौज कूचासाठी सज्ज होती. तिच्या आघाडीला हौदा घातलेला जंगी हत्ती तयार होता.


उन्हे कलती घेईपर्यंत राजांनी महाडात बांधविलेल्या वाड्यात विसावा झाला.


दिवस प्रहरभर ठेवून फौजेतील चौघडे झडू लागले.. पाच हजार मांड घेतल्या घोडाईतांचे पथक मोरोपंतांनी हत्तीच्या पुढे काढले. आता हत्ती घोडदळ आणि पायदळ यांच्या मध्ये आला. संभाजीराजांना घेऊन राजे महाडच्या वाड्याबाहेर पडले. मध्यभागीच्या हौदावान हत्तीजवळ आले. माहुताने अंकुशमार देऊन स्वारीचे ते थोर जनावर बसते केले.


राजांच्या सामने गुडघे टेकून आपले मस्तक त्यांच्या पायांवर ठेवताना संभाजीराजांना फरक कळला. शाही फर्मानाच्या धूळमाखल्या उंटासमोर गुडघे टेकण्यातील आणि सजल्या सेनेत महाराजसाहेबांसमोर गुडघे टेकण्यातील !


त्यांना उठवून छातीशी घेत राजे म्हणाले, " सांभाळून असा. कधीतरी होळी सणाला तुम्ही विचारलं होतंत 'आबासाहेब, तुम्ही काढाल जळत्या हुडव्यातील नारळ - बाहेर ?" आज आम्हीच विचारतो आहोत तुम्ही तो काढाल काय ?" “जी. कोशिस करू.” संभाजीराजांच्या तोंडून सहज जाब सुटला.


" या; जय भवानी !” राजांचे डोळे लखलखले.


'जय भवानी.” संभाजीराजांनी त्या लखलखीला साद दिला. हत्तीला शिडी लागली. ती पार करीत संभाजीराजे हौद्यात चढले. पाठोपाठ सेनेवर नजर ठेवण्यासाठी मोरोपंत चढले. रूपाजी भोसले, रायाजी, अंतोजी गाडे, खंडोजी जगताप, मोरेश्वर नागनाथ यांनी हत्तीला आपल्या घोड्यांचे कडे टाकले. निशाणबारदारांनी निशाणी काठ्या वर घेतल्या. शिंगाड्यांनी शिंगांच्या ललकाच्या घुमविल्या. चौघडे दुडदुडले. घोडदळाने कदमबाज चाल धरली. चालला! शिवाचा वरदहस्त घेऊन शंभो चालला! त्याच्या पिछाडी आघाडीने दहा हजार जानकुर्बान मावळा चालला.


युवराजांची चालती फौज नजरेआड होईपर्यंत राजे आपल्या माणसांनिशी ती बघत राहिले. कुणाच्या तोंडून ऐकलेले, केव्हा ऐकलेले ते राजांना नीट आठवेना पण तेवढे त्यांना आठवले - " हे गडकोटावर राहतील, प्रलय-तांडव माजवतील !!'