कोणतही शिवकाव्य येथे शोधा

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग ८३

 आपल्या महाली येताच सोयराबाईंनी येसूबाईंना मंचकावर बैठक घेण्याची इशारत केली आणि आपल्या चंद्रा दासीला खुणावत नजर दिली. चंद्रा आपल्या दालनात गेली आणि एक नक्षीदार लक्कडपेटी घेऊन बाहेर आली. तिने ती पेटी आपल्या बाईसाहेबांच्या हाती दिली.


पेटी घेऊन सोयराबाई येसूबाईच्याजवळ आल्या. त्यांनी पेटीचे झाकण उघडले आणि येसूबाईच्या समोर पेटी धरीत त्या म्हणाल्या, "हे आमचे डाग आहेत तळबिडाहून माहेरकडून आलेले. तुम्हास वाटेल त्यावर हात ठेवा." पेटीत बाजूबंद, मोत्याचे सर पैंजण्या, रजपुती घाटणीच्या बिंद्या, वाक्या, टिका होत्या. सोयराबाईंचे मूळ मोहिते घराणे राजपुतान्यातील. राजपुती रक्ताचे म्हणूनच त्यांचा वर्ण केतकगौर होता. त्यांना दागिन्यांचा चौक होता. पायांवर आळत्याची नक्षी होती.


येसूबाई बावरून त्यांच्याकडे नुसत्या बघत राहिल्या. मग आपसुखच त्यांची नजर धाराऊकडे वळली. 'काय करावे ?' ते विचारण्यासाठी.


सोयराबाईच्या नजरेतून ते सुटले नाही. त्या धाराऊला म्हणाल्या, "धाराबाई, सांगा सूनबाईंना हात ठेवायला. त्या संकोचल्यात.'


" हो त्येच्यावर ठेवा हात सूनबाई. ह्यो आपलाच म्हाल हाय." धाराऊ येसूबाईंना म्हणाली. येसूबाईनी पेटीतील डाग निरखले आणि एका कोयऱ्यांच्या बांधणीच्या टिकेवर हात ठेवला !


ते बघून सोयराबाई हसल्या. त्यात म्हटले तर कौतुकाची आणि शोधले तर कधीही न गवसणारी अशी कसली तरी एक छटा होती.


झटकन ती टिका पेटीतून उचलून सोयराबाईंनी पेटी चंद्राच्या हाती दिली. आणि खुद आपल्या हातांनी ती टिका येसूबाईंच्या गळ्यात घातली. तिची सरकती गुंडी झुकते होत ओढून ती टिका येसूबाईच्या गळ्यात नीट बसती केली. मग सोयराबाई राजांच्याबद्दल, आऊसाहेबांच्याबद्दल, माहेराबद्दल बराच वेळ बोलत राहिल्या. येसूबाई आणि धाराऊ नुसत्या ऐकत राहिल्या. " आम्ही एकट्याच बोलतो आहोत. तुम्ही काहीच बोलत नाही सूनबाई ! ' सोयराबाईंनी मध्येच थांबून घेतल्या विषयाला बगल दिली. येसूबाईंनी मान उठवून • त्यांच्याकडे नुसते पाहिले. पण त्या काहीच बोलल्या नाहीत.


" आम्ही तरी कशा वेड्या ? आमच्या ध्यानीच येत नाही. तुम्ही संकोचता ! तुमची बोली शृंगारपुरी- कोकणी कुणबाऊ! अजून गडाची बोली तुमच्या तोंडी बसली - नाही. म्हणूनच तुम्ही संकोचता !! तसे करू नका, बोलत चला.” जे सांगायचे होते ते सोयराबाईंनी मायफळ गुळात घालून चारावे तसे सांगितले ! 

ते ऐकताना येसूबाईंना स्वतःला कधी जाणवला नव्हता तो दोष जाणवला ! आणि त्यांनी मनोमन क्षणात निर्धारही करून टाकला - "आपणास गडांची फडकरी बोली ध्यान देऊन ऐकली पाहिजे. जिभेवर बसती केली पाहिजे!'


सोयराबाई आता टिकेची गुंडी किती आवळती सरकवतील सांगता यायचे नाही हे हेरलेल्या धाराऊने येसूबाईंचा पालटलेला मुखडाही जाणला. ती म्हणाली, "दोपारचा उपास सोडायचा हाय न्हवं ? निगूया सूनबाई ! "

ते ऐकून येसूबाई उठल्या. “येतो आम्ही.” म्हणत त्यांनी सोयराबाईंना नमस्कार केला. त्यांना पाठमोऱ्या महालाबाहेर पडताना त्यांच्या पाठीवर रुळणाऱ्या टिकेच्या भगव्या गोंड्याकडे बघून सोयराबाई हसल्या. पुन्हा मघासारख्याच ! त्यांना येसूबाईंचे हसू आले. "पेटीत एवढे रजपुती माटाचे मोत्याहिऱ्यांचे डाग असताना सूनबाईंनी हात ठेवला तोही कोकणी टिकेवरच !'

धाराऊला मात्र वाटले की मागे वळून आळत्याच्या नक्षीला सांगावे- “ बोली कंची असती यापरीस मायेचा पीळ कंचा असतो त्येला लई धारण असती रानीसरकार!" पण ती काही बोलली नाही. येसूबाईंच्या पाठीवर रुळणारा गोंडा बघून ती पुटपुटली, " कुंकू-हळद सोडून तरी चढवायचा हुता डाग सूनबाईच्या गळ्यात !!

बालेकिल्ल्याच्या सदरचौकासमोरील पटांगणाच्या रोखाने उठलेले बारांचे एकलग आवाज ऐकून येसूबाई आपल्या महालाच्या खिडकीच्या झरोक्याशी येऊन उभ्या राहिल्या. हलक्या पायांनी धाराऊ त्यांच्या पाठीशी आली. दुपार टळतीला आली होती. दोघींना समोरच्या चौफेरी पटांगणात मधोमध पिंजराने पेंढा भरलेल्या एका रानसावजाची आकृती दिसली. ती लाकडी चौथऱ्यावर खालगर्दनीने धावत्या पवित्र्यात उभी केली होती. सावजाच्या मागच्या खुरांना लांबलचक दौर बांधला होता.


पेंढ्याच्या सावजापासून दूरवर संभाजीराजे दोन्ही पायपंजांवर बैठक घेऊन बसले होते. - त्यांच्या भवत्याने गोमाजीबाबा, जोत्याजी, महमद सैस, अण्णाजी, वाकनीस, दत्ताजी त्रिमल, बाळाजी अशी मंडळी फेर धरून होती.

महमद सैसने बंदुकीच्या दारूची फेकी आणि छरे एका फिरंगी माटाच्या बंदुकीच्या नळीत सोडले. बुरणुसाच्या गोळ्यांचे बोते बोटाने दाबून नळीत खुपसले.


गोमाजींनी पुरुषभर उंचीची ठेचणीची लोखंडी सळी त्या नळीत खुपसून बार ठेचला. बंदुकीच्या लवंगीवर केपाची टाप बसती केली. हत्यार दोन्ही हातांनी तोलबंद करून पाहिले आणि झुकून ते संभाजीराजांच्या हाती दिले..


उजव्या खांद्याला बंदुकीच्या दस्त्याचा बूड बसता ठेवून संभाजीराजांनी दस्त्याला गाल भिडविला. नळीच्या तोंडावर असलेल्या नेमाच्या माशीकडे बघत एक डोळा मिटता करीत बार फेकीचा पवित्रा घेतला. जोत्याजीच्या हातात कमरेचा शेला होता. त्याने सावचित्ताने 'धाकल्या राजांनी ' पवित्रा धरल्याची खातर करून घेतली. हातातील शेला बावट्यासारखा उंच धरून जोत्याजीने तो खाली टाकला.

बावट्याची खूणगत मिळताच पटांगणातील खिदमतगारांनी दोऱ्या धरून चौथरा दौडवायला सुरुवात केली. पेंढा भरलेले सावज दौडू लागले! हातातील बंदुकीची मोहरेबाज नळी सरासर फिरती करीत संभाजीराजांनी बार टाकला. दस्त्याने त्यांचा खांदा झटकला. कानाजवळ धुराची बळी उठली. आणि तिकडे पटांगणात सावजाच्या आरपार शिरलेल्या छऱ्यांबरोबर पिंजराच्या गवतकाड्या उसळल्या. जोत्याजी बावटा टाकू लागला. समोरच्या पटांगणात दौडणाऱ्या पेंढ्याच्या सावजाची चाळण चाळण होऊ लागली. बार टाकून टाकून संभाजीराजांचा खांदा आता ठणकायला लागला. दिवस सांजावत आला होता.

एकसुराने पाली दरवाज्यावर उठलेली नौबत साऱ्यांना ऐकू आली. त्यात शिंगाच्या ललकाऱ्या मिसळल्या होत्या. पवित्रा घेतलेली बैठक मोडून बंदुकीसह संभाजीराजे तसेच वर उठले आणि त्यांनी शेजारच्या बाळाजी चिटणीसांकडे बघितले.


दंडाराजपुरीवर सिद्दी फत्तेखानाच्या जंजिऱ्यावर चालून गेलेले राजे, फौजेसह गड चढत होते. धुळीचे उसळते लोळ मावळत्या लांबट किरणात पसरलेले संभाजीराजांना दिसले. महमद सैसच्या हातात बंदूक देत संभाजीराजे जिजाऊंच्या महालाच्या रोखाने चालले. त्यांना आता सराव पडला होता की गडावर आले की महाराजसाहेब तडक मासाहेबांच्या दर्शनासाठी रुजू होतात.

जिजाऊंच्या महाली संभाजीराजे आणि जिजाऊ राजांची वाट पाहत राहिले. दिवस टळला. गडाचे पलोते, शमादाने पाजळली तरी राजे येत नव्हते! त्यांच्याकडून कसली वर्दीही येत नव्हती. जिजाऊ अस्वस्थ झाल्या. संभाजीराजांना घेऊन त्या राजांच्या महाली आल्या. टोप उतरून ठेवलेले, विखुरल्या केसांचे राजे चिंतागत दिसत होते. त्यांनी जिजाऊंची पायधूळ घेतली. खांद्याला घरीत संभाजीराजांना जवळ घेतले. त्या स्पर्शनि संभाजीराजांचा बार टाकून झटके खाल्लेला खांदा ठणकून उठला. वेदनेची एक सणक खांद्यातून अंगभर सरकली.

" काय झालं राजे? आम्ही तुमची वाट पाहून शेवटी जातीनं आलो.” जिजाऊंनी राजांच्या शिवगंधावर डोळे जोडले.


" हबशावर जंजिऱ्याच्या मोहिमेत शिकस्त घेतली आम्ही. हाती येणारा जंजिरा हुकला. सिद्दी फत्तेखान जलदुर्ग आमच्या हवाली करण्यास राजी झाला होता. पण पण सिद्दी संबूल, कासम आणि खैरतखान या त्याच्या सरदारांनी त्यालाच मुसक्या आवळून आबदारखान्यात टाकला. बनला बेत हुकला." बोलते राजे थांबले.. "मग म्हणून एवढ्यासाठी आमच्या भेटीस येणं टाकलंत ? राजे, हार कुणाला चुकली ? देवादिकांनाही ती चुकली नाही."


चमकून राजांनी मान वर केली. खलिता वाचावा तशी जिजाऊंची नजर वाचली. मासाहेबांच्या कानी आलं तर सारं ? " घोगऱ्या सादात राजे म्हणाले. 'कशाबाबत म्हणता ? " जिजाऊंना राजांची दुखरी झालेली चर्या जाणवली. " देवादिकांच्याबद्दल ? ” राजांचे बोल जडावू लागले. " बोला राजे. काय झाले ?" जिजाऊ संभाजीराजांच्यासह त्यांच्या पाठीशी आल्या.


" आमचे राजेपण व्यर्थ आहे मासाहेब. आपले पुत्र म्हणवून घेण्यास आम्ही शरमिदे आहोत. जंजिऱ्याला घेर टाकून बसलो असता जी खबर ऐकली तिने आमचे सारे स्वप्नच कुठल्यातरी खाऱ्या लाटांच्या समुद्रतळाशी जाणार काय अशी धास्त वाटते आहे. आमची जबान उठत नाही ते सांगावयास.” राजे थांबले. " राजे" जिजाऊंचा हात राजांच्या पाठीवर चढला. त्या नुसत्या स्पशनि राजांना वाटले, तडक वळते व्हावे आणि आपले तोंड मासाहेबांच्या कुशीत ठेवावे. " बोला. काय खबर मिळाली तुम्हास राजपुरीवर ?" जिजाऊ हलक्या शब्दांनी दिंडी उघडून राजांच्या मनाच्या दरवाज्यात घुसल्या.


" मासाहेब 5... मासाहेबऽ उभी उत्तर धूळदोस्त करण्यासाठी औरंगजेबानं हत्यार - उचललं आहे. हिंदूंची पवित्र मंदिरं फोडली जाताहेत. शाही फौजेचा वरवंटा मंदिरांच्या कळसावरून फिरवला जातो आहे. मोगलांनी काशीला विश्वेश्वराचं देऊळ जाया केलं ! त्या जागी मशिदीचे पत्थर उभे केले. देवादिकांना हार येते. पण ती सोसण्यास माणसांना बळ नसते! आम्ही शरमिंदे आहोत आपल्यासमोर उभे राहायला!" राजांचे डोळे भरून आले. जिजाऊंचा हात त्यांच्या पाठीवरून नुसता फिरत राहिला.


जे राजांच्या तोंडून संभाजीराजांनी ऐकले ते ऐकताना त्यांच्या खांद्यातून बारफेकीमुळं उठणारा ठणका बंद झाला! त्याची थोडी जागा सरकली आणि त्यांच्या काळजात ठणका उठला.


आम्याच्या लाल किल्ल्यावरचा तो पैलवानी लाल मातीचा हौदा त्यांना दिसू लागला! कोणीतरी त्यांना विचारीत होतं "हौदा खेलते हो संबूराजे ?'


बाळाजी आवजी चिटणीसांनी जातीने लगबगीने येऊन राजांच्या कानी वर्दी घातली, 'स्वामी, प्रतापराव आणि रावजी आगे खबर नसता मोगलाईतून सेनेसह परतले! गड चढून येताहेत.