कोणतही शिवकाव्य येथे शोधा

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग ८१

 राजांच्या सगळ्या अटी मान्य झाल्या. औरंगाबादेहून मुअज्जमचे पत्र आले- " जहागिरीची वस्त्रं आणि फर्मान घेण्यासाठी शंभूराजांना औरंगाबादला पाठवून द्यावे !' " राजांचे बर्हिजी, कर्माजी, विश्वास असे खबरगीर औरंगाबादेच्या रोखाने सुटले. मुअज्जमची माहिती काढायला. हे राजकारण फक्त राजेच खेळू जाणत होते. ते स्वतः असेच चालत आले होते. एक वेढा फोडावा, दुसऱ्यात आपणहून घुसावे! एका गोटातून संभाजीराजांना त्यांनी काढून घेतले होते, दुसऱ्या गोटात ते त्यांना आपणहून पाठवायला तयार झाले होते! या चालीचे यश मुअज्जमचा स्वभाव कसा आहे यावर अवलंबून होते. संभाजीराजांचे धैर्य केवढे आहे यावरही विसंबून होते.


खबरगिरांनी औरंगाबादेहून बातम्यांची कोरीव लेणी जशीच्या तशी उचलून आणली ! " मुअज्जम विलासी आहे. साजशिनगाराची त्यास गोडी आहे. राजांना तो मनोमन 'वचकून आहे. आपल्या बापाशी तो नेक नाही!"


विचार करून राजांनी निर्णय घेतला. संभाजीराजांना औरंगाबादेला धाडण्याचा. त्यांना विश्वास होता शंभूराजे दरबारी रीतीभातीचे सारे ठीक करतील. खुद तेच जाऊन आले की, औरंगजेबाला कायमचा नसला तरी उडता भरोसा येईल ! या खानदेशी राजकारणाचा समय आला ऐन दिवाळीत. राजकारण सणवार, भावभावना काहीच जात नसते, भरत्या थंडीला धरून नरक चतुर्दशीचा दिवस राजगडावर फटफटला.


आज औरंगाबादेच्या रोखाने प्रस्थान ठेवण्याचा मुहूर्त होता. . जिजाऊ, पुतळाबाई, धाराऊ, सोयराबाई सान्या आऊसाहेब यांचा शंभूराजांनी आशीर्वाद घेतला. “येतो आम्ही " म्हणत येसूबाईंचा निरोप घेतला. बालेकिल्ल्याच्या सदरचौकात गडउतारांसाठी प्रतापराव, निराजी रावजी, रावजी सोमनाथ, प्रल्हाद निराजी, आनंदराव अशी निवडीची मंडळी सिद्ध होती.


जिजाऊ आणि राजे संभाजीराजांसह सदरचौकात आले. शंभूराजांनी जिजाऊंच्या पायांवर कपाळ ठेवले. "औक्षवंत व्हा! कार्य सिद्ध होताच परतीला लागा.' " जिजाऊंनी त्यांना आशीर्वाद दिला.


राजांच्या संगतीत, बरोबर यायच्या मंडळीसह संभाजीराजे चालू लागले. संजीवनी माचीच्या रोखाने. माचीवर गडउताराची पालखी तयार होती.


माचीवर उतरणारे भुयार आले. त्यांच्या तोंडावरची धोंड हटली. राजे व शंभूराजे आत उतरले. मागून प्रतापराव, निराजीपंत, रावजी, आनंदराव, प्रल्हादपंत ही मंडळी उतरली. एकामागून एक पायऱ्या मागे पडू लागल्या. चालता चालता राजे कसल्यातरी विचाराने थांबले.


"तुम्हास आठवते वेरूळच्या कैलासलेण्याची गुंफा ?” राजांनी प्रश्न केला.


" जी." दोन्ही आवाजांचा फेरसाद भुयारात घुमला. काय आवडलं तुम्हास त्या शिलागारीत ?”


" कैलास पर्वताखाली दमगीर झालेला रावण! "


... 'भुवया चढवीत राजांनी संभाजीराजांना आश्चयनि निरखले. " का ?" " शिवाचा कैलास त्यास उचलता आलेला नाही! एवढे बल असून." शांतपणे संभाजीराजांनी उत्तर दिले.


संजीवनी माची आली. संभाजीराजांनी राजांच्या भगव्या मोजड्यांवर आपला भंडारामंडित माथा ठेवला, त्यांना उठवून पोटाशी घेत राजे धीट धीमे बोलले- "संभाळून असा. आम्ही नसलो तरी प्रतापराव आहेत. त्यांच्या सल्ल्याने वागा. यशवंत व्हा. आम्ही तुमची वाट बघतो आहोत!'


शंभूराजे सजल्या पालखीत बसले. फुलार राजगोंडा त्यांनी मुठीत पकडला. रणशिंगाच्या कातऱ्या ललकाऱ्या उठल्या. अब्दागिरे, चोपदार, निशाणबारदार चालू लागले. आग्रा झाला आता औरंगाबादेला ! -


मजल दरमजलीने सेनेसह संभाजीराजे औरंगाबादला पोहोचले. शाहजाद्याच्या वतीने दिल्ली दरबारचा मातब्बर सरदार जसवंतसिंग याने सामोरे येत त्यांची आगवानी केली. जसवंतसिंगाच्या साक्षीने संभाजीराजांनी मनसबदारीची वस्त्रे स्वीकारली. त्याला फेरनजराणा बहाल केला.


औरंगाबादेतील शाही महाली प्रतापराव, निराजीपंत, रावजी यांच्या सोबतीत जाऊन संभाजीराजांनी शहजादा शहाआलम याची भेट घेतली. तांबूस, गौरवर्णाचा शहाआलम शंभूराजांना बघून खुषदिल झाला. ओठातल्या ओठांत पुटपुटला - “इन्शाल्लाऽ ! कैसी शेरे सुरत है !” त्याने एक झूलबाज हत्ती आणि रत्नजडावाची तलवार संभाजीराजांना दरबारी इतमामाने नजर केली. संभाजीराजांनी त्याला फेरनजराणे दिले. महालीच्या अलिशान बैठकीवर शहाआलमने संभाजीराजांना आपल्या शेजारी बसवून घेतले. खुद्द जसवंतसिंगाला असा मान कधी मिळाला नव्हता! तो हात बांधून समोर उभा होता.


शहजाद्याने संभाजीराजांच्या प्रवासाची आदराने चौकशी केली. राजांच्या तबियतीची पूछताछ केली. निरोपाची वेळ आली. महालीच्या दरबारी आत्तरियाने पुढे येत अत्तरदाणीतील काबुली अत्तराचे फाये झुकून शहजाद्याच्या आणि संभाजीराजांच्या मनगटावर अदबीने फिरविले. एक खिदमतगार सोनेरी नक्षीदार तबकात टपोऱ्या गुलाबाचे रसरशीत गेंद घेऊन बैठकीसमोर पेश आला.


तबकातील एक फुलता गुलाबगेंद हाती घेऊन शहजाद्याने तो क्षणभर निरखला. संभाजीराजांच्या हातात तो देताना शहजादा शहाआलमच्या तोंडून नकळत लब्ज सुटले- “लीजिए, गुलाब भी खूबसूरत होता है छोटे राजासाब!'


प्रतापराव, प्रल्हाद निराजी रावजी सोमनाथ अशा मंडळींना सोबतीला घेऊन संभाजीराजांनी घृष्णेश्वराचे दर्शन घेतले. मनी घर करून बसलेली वेरूळच्या पहाड़ी गुंफांतील कोरीव लेणी नजरेखाली घातली.


औरंगाबादेच्या दक्षिण वेशीला लागून मराठी सेनेचा तळ पडला होता. डेरे, शामियाने उठले होते. रोज संभाजीराजे प्रतापरावांनिशी नगराचा फेरफटका करून येत होते. औरंगाबाद ही मुगलशाही दख्खनेतील राजधानीच. तटबंदीतील शहर देखणे होते. राजांनी निघताना सूचना केली होती- “मिळेल तेवढी नगराची वस्ती डोळ्यांखाली घाला! " शंभूराजे शहराचा फेरफटका करून परतले. प्रतापराव संगती होते.


.. तळावर येताच त्यांना निराजीपंतांनी वर्दी दिली- “शहजादे सरकार स्वारीस याद फर्मावतात. भेटीचे कारण समजू येत नाही."


संभाजीराजांनी ती वर्दी ऐकून प्रतापरावांच्याकडे सल्ल्यासाठी म्हणून पाहिले.. प्रतापरावांच्या कपाळी आठ्या उठल्या. तरीही ते म्हणाले, “पाण्यात माशाचा शब्द झेलाय लागतो. धाकल्या राजांनी भेटीला जाऊन यावं.' संभाजीराजांनी प्रतापराव, निराजीपंत, रावजी सोमनाथ अशी मंडळी संगतीला घेतली आणि ते सरंजामाने शहजाद्याच्या भेटीसाठी शाही महालावर आले.


शहजाद्याच्या वजिराने सामोरे येत संभाजीराजांना आदराने बैठक महालात नेले. " आईये !" म्हणत, दातकळ्या खुलवीत, देखण्या शहाआलमने बैठकीवरून उठून पुढे येत हाताला धरून संभाजीराजांना आपल्या बैठकीवर शेजारी बसवून घेतले. त्याचे खासे सरदार बगलेने अदबीत हात बांधून उभे होते.

संभाजीराजांवर सहज नजर ठेवता येईल असे प्रतापराव आणि त्यांचे मराठी सरदार उभे राहिले. इकडच्या - तिकडच्या गप्पा करून शहजाद्याने आपल्या मूळ हेतूला हा "घातला. " कभी शिकार खेलते हो शंभूराजे ?' " नाही.” शांतपणे संभाजीराजांनी उत्तर दिले.


" ताज्जुब है! राजासाबके फर्जद और शिकार का षौक नहीं! " शहजाद्याने आपल्या रेखीव भुवया वर चढविल्या.


“ आम्ही विचारले तर आमचे महाराजसाहेब शिकारीला ना नाही म्हणणार ' " तो फिर आज हमारे साथ चलिए शिकार खेलने. आज हम रामटेक के बनमें जा रहे हैं निशाना लगाने. '"


"नको. आम्हास येणे होणार नाही.” संभाजीराजे सावध झाले. "क्यों डरते हो हमारे साथ चलने ? - "" शहजाद्याने खोचक सवाल केला. संभाजीराजांनी प्रतापरावांच्याकडे बघितले. असा काही मामला या भेटीत पुढे येई याचा प्रतापरावांना अंदाज नव्हता. त्यांना काय सल्ला खुणवावा कळेना. “डरनेकी कुछ बात नहीं। हम आयेंगे शिकार खेलने ! " मान ताठ ठेवित संभाजीराजांनी शहजादा शहाआलमला क्षणात जाब दिला !! " वाहव्वा ! आफरीन - यही उम्मीद थी आपसे आपके सवारीका सब इंतजाम होगा. आपके नेक लोग साथ लेना.” प्रतापरावांच्या बघत शहजादा म्हणाला. दुपार टळतीला लागल्यावर वेशीबाहेर पडण्याचा बेत ठरला. अत्तर- गुलाब झाले. संभाजीराजांनी शहजाद्याचा निरोप घेतला. ते तळावर आले.


आपल्या माणसांतील कसबी पटेकरी, तिरंदाज, भालाईत, रानात घोडा फेकणारे सराईत घोडाईत संभाजीराजांनी प्रतापरावांच्या मदतीने निवडले. आनंदराव, प्रतापराव, निराजी, रावजी ही हत्यारबाज मंडळी निवडक घोड्यांवर जीन कसून तयार झाली. संभाजीराजांनी अंगाला लागून लोखंडी जाळीदार बख्तर चढविले. टोपाखाली शिरस्त्राण घेतले. सिद्ध होऊन ते दिल्या शब्दाप्रमाणे आपल्या शामियान्यात शहजाद्याची वाट बघत बैठकीवर बसले.


वर्दी आली. संभाजीराजे आपल्या निवडक लोकांनिशी तळाबाहेर पडले. शहजादा एका हत्तीवरच्या बंदिस्त हौद्यात बसला होता. तसलाच एक हत्ती, हौदा चढवून त्याने संभाजीराजांच्यासाठी बरोबर आणला होता.


शहजाद्याने हौद्यातूनच शेजारच्या हत्तीच्या माहुताला इशारत केली. माहुताने मोकळ्या हौद्याचा हत्ती अंकुशमार देऊन वळविला आणि संभाजीराजांच्या समोर आणला. पढाऊ हत्तीने सोंडेचे शिंग उठवून सवारीला देखणी सलामी दिली. झुलत झुलत बैठक घेतली. संभाजीराजांनी कमरेच्या शेल्यात खुपसलेली मोहरांची थैली खेचून माहुताच्या रोखाने वर फेकली. ती वरच्यावर झेलून माहुताने त्यांना कुर्निस केला. हत्तीला शिडी लावण्यात आली. शस्त्रसज्ज संभाजीराजे शिडी पार करीत हौद्यात चढले. माहुताने हत्ती उठता करून शहजाद्याच्या हत्तीच्या बगलेला जोडून घेतला. प्रतापराव, रावजी, निराजी, आनंदराव आणि निवडलेल्या खेळ्यांनी संभाजीराजांच्या हत्तीला वळे दिले. शहजाद्याने हात उठवून हसत संभाजीराजांना अदब दिली. संभाजीराजांनी हात उठवून हसत त्याला फेर साद दिला.


शहाजणे कल्लोळून उठली. हत्ती, घोडे, निष्णात शिकारी खेळे, हाका घालणारे असा शिकारी तांडा दक्षिणवेशीबाहेर पडला.


रामटेकचे रान येताच हत्ती थांबले. मागचे घोडाईत आणि हाकारे, खेळे पांगले. संभाजीराजांची माणसे त्यांच्या हत्तीला घेरून उभी राहिली.


आज शहजाद्याला 'शाही शिकार' कशी असते ती संभाजीराजांना दाखवायची होती. हाकारे, खेळे पांगलेले बघून शहजाद्याने इशारत केली. माहुतांनी हत्ती रानात घुसविले. प्रतापराव, आनंदराव ही मंडळी हत्तीमागून कदमबाज चालीने निघाली.


एका उंच टेकाडावर येऊन दोन्ही हत्ती थांबले. ही निशाणी मारा करायची मचाणी जागा होती. इथून समोर एक पठार दिसत होते. रानाच्या चारी बाजूंनी आलेल्या पाणंदीच्या वाटा त्या पठाराला येऊन मिळालेल्या होत्या.


शहजाद्याने हौद्यात बसूनच खांद्याचा उंच तिरकमठा हाती घेतला. त्याला बाक देऊन वाद पारखून घेतला. त्याच्या निवडक सरदारांनी कुणी तिरकमठे तर कुणी भाले सरसावले. मराठी भालाईतांनी ते बघून, आपले भाले पेलले. तिरंदाजांनी तिरकमठे सरसे धरले.


रामटेकचे रान चारी बाजूंनी कुदू लागले. कसलेतरी विचित्र आवाज काढून ते उभे रान क्षणात कण्हू लागले. हाकाऱ्यांनी चारी बाजूंनी हाका घातला होता. रणशिंगाची एक कातरी ललकारी त्या सगळ्या कालव्याला कापीत उठली. सावजे मारगिरीच्या टप्प्यात आल्याची ती खूण होती.


नुसता प्रचंड कल्लोळ ऐकू येतो आहे असे काही क्षण गेले आणि पाठोपाठ पठारावर येऊन मिळालेल्या पाणंदीच्या चौबाजूच्या वाटांनी पांढऱ्या, कबऱ्या, बाळ्या अशा प्राणभयाने हंबरडा फोडत चौखूर उड्या टाकणाऱ्या उभक्त्या शेपट्यांच्या वनगाईंचे कळपच्या कळप पठारात उतरले !! वनगाई ! मराठी खेळे ते बघून चरकले. सामने हंबरत आलेल्या, भेदरलेल्या वनगाई गोंधळून एकमेकींना थडकल्या. शिंगांना शिंगे खटखटली. टेकाडावरून सटासट सुटलेल्या भाले, तीरांनी मिळेल तशी वर्मी फेक केल्याने कितीतरी बनगाई ऊर उठवून जीवजाता हंबरडा फोडत क्षणात पठारावर कोसळल्या. बचलेल्या भेदरून पुन्हा पाणंदीत घुसल्या. पडलेल्या जाया गाई आचके देत खूर झाडून शांत झाल्या.


समोर प्राणांतक हंबरडा फोडणाऱ्या वनगाई बघून आपल्या हौद्यात, संभाजीराजे ताडकन वर उठले होते. त्यांच्या हातीचा तिरकमठा गाई बघताच गळून पडला. खूर झाडत पठारावर पडलेल्या वनगाई बघताना त्यांचा अस्वस्थ हात सरसरत कवड्यांच्या माळेवरून नुसता फिरत राहिला. त्यांनी आपले डोळे क्षणभर गच्च मिटून घेतले. कानात गाईचा हंबरडा कसा दाटून बसला.


“सरलष्कर ऽ” ते प्रतापरावांच्या रोखाने केवढ्यातरी मोठ्याने ओरडले. घोडा टाकीत प्रतापराव हत्तीजवळ आले.

"शहजाद्यांना सांगा. आम्हास हा खेळ पसंत नाही. आम्ही निघतो.” आणि त्यांनी


माहुताला आज्ञा केली. "हाथी घुमाव !" माहुताने हत्तीचा मोहरा लगबगीने वळविला. प्रतापरावांनी शहजाद्याला शंभूराजांचा निरोप सांगितला. संभाजीराजांच्या परतलेल्या हत्तीला घेर टाकून मराठी घोडाईत, तिरंदाज, भालाईत चालले. कुणीच काही बोलत नव्हते.


संभाजीराजांनी हौद्यातूनच आपल्या तिरंदाजांनी खांद्याला टांगलेल्या भात्याभात्यांवर नजर टाकली. भरले भाते तसेच होते! समोर वनगाई बघून एकाही मराठी शिकारखेळ्याने हत्यार चालविले नव्हते!


समाधानाने संभाजीराजांचा चेहरा त्या अवस्थेतही उजळून उठला. त्यांनी बगलेने दौडत्या प्रतापरावांना विचारले, "गुजरकाका, शिकार करायचीच झाली तर कसली करावी आम्ही ?


" जी धनी, रावसावजाची! रानडुकराची!" प्रतापराव हौद्याच्या रोखाने मान उठवीत म्हणाले. हत्ती चालविणाऱ्या बिचाऱ्या शाही माहुताला माहीत नव्हते की - " 'आपल्या हत्तीच्या पाठीवर एक मावळी सिंह बसला आहे! तोही आता शिकारच करणार होता - फक्त रानडुक्करांचीच!