कोणतही शिवकाव्य येथे शोधा

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग ८०

 राजगडाची सदर मंत्रिगणांनी सजली. पेशवे मोरोपंतांनी आपल्यासमोर दर्पणासारखी, कापडी अस्तरावर चिकटवलेली खलित्याची उलघडती वळी धरली होती. त्यांनी डाव्या हाताच्या मुठीत पकडलेल्या थैलीच्या फासबंदाचा गोंडा लोंबून हिंदोळत होता. सदरबैठकीवर राजे, जिजाऊ आणि संभाजीराजे बसले होते. राणीवशाच्या दालनात .. पडद्याआड पुतळाबाई, सोयराबाई असा राणीवसा बसला होता. पुतळाबाईंच्या शेजारी खालच्या मानेने येसूबाईनी बैठक घेतली. त्यांच्या मनी एका मजेदार विचाराने क्षणात घर केले. " या चिकाच्या पडद्यातून पलीकडच्या बैठकीवरचे टोप कसे दिसतील ? " पण त्या मान वर घेण्याऐवजी अधिकच खाली ठेवून नुसत्या ऐकत होत्या. पिलाजी शृंगारपुरी निघून गेले होते. राजांच्या इच्छेने येसूबाई आता राजगडीच राहणार होत्या. सदरेवरची शांतता चिरीत बोल उठू लागले. मोरोपंत पेशवे हातीचा खलिता, राजांची नजर इशारत मिळताच वाचू लागले. संथ, धिमे बोल येसूबाईंना पडद्यापलीकडून ऐकू येऊ लागले. " मशहुरल अनाम, दाम दौलतहु शाहजादे मुअज्जम, सुभे दख्खन यासी- प्रति सिवाजीराजे दंडवत उपरी विशेस- " प्रस्तुत ल्हेयावयास प्रयोजन की आम्ही आगरियाहून प्राणभयाने आमचे देशी निघोन आलो. आमचे फर्जंद शंभूराजेही जातगतीने देशी पावते जहाले. आला हजरत साहेबाची गाठीभेटी घेवोन निघणे ते काही घडले नाही! ते कोण कारणे हे तुम्ही जाणता.. हर प्राणिमात्रास आपला जीव प्यार !

" हे गोस्टी जरी घडली तरी आम्ही हजरतसाहेबांचे बंदे चाकर! सेवेसी हरभातेने तत्पर आहोत. तुम्ही येविशी हजरतसाहेबांची समजूत पाडली पाहिजे! आमचे फर्जंद संभाजीराजे पादशाही लष्करी चाकरच असत! आमचे गडकोट दौलतबाब पादशहांचे चरणी अर्पणच आहे! हे समजोन फर्जदास चाकरीस समय दिल्हा पाहिजे! मुलूख बनेल तो बनवून आणिला पाहिजे ! बहुत काय ल्याहावे. जाणिजे. "


औरंगजेबाने दक्षिणेची सुभेदारी जसवंतसिंगाकडून काढून आपला मुलगा मुअज्जम याची त्या जागी नामजादी केली होती. मुअज्जमला शिवाजीराजांशी दुष्मनगिरी नको होती. राजकारण म्हणून नव्हे, सुरक्षितता म्हणून! त्याला वाटत होते आपल्या कारस्थानी बापाने दक्षिणेत आपणाला शिवाजीच्या तोंडी घातले आहे. आणि समोर येईल त्या शाही तेगबहाद्दराचे शिवाजी 'तोंडीलावणे' कसे करतो हे तो बरे पारखून, समजून होता. राजांनाही आपला मुलूख उभा राहीपर्यंत मुगलशाहीची हातघाई नको होती. त्यांना दख्खनसुभा मुअज्जमशी तहाची बोलणी लावायची होती.

तो खलिता ऐकून जिजाऊ, मंत्रिगण आणि सदरकरी राजांच्याकडे बघतच राहिले. एवढे आम्यातील प्राणसंकट टळले नाही तोच राजे संभाजीराजांना मध्यस्थी ठेवून दुसरी चाल खेळू चाहत होते. राजे शांत होते. त्यांनी बाळाजी आवजींना नजर दिली. बाळाजी बैठकीसमोर पेश आले. त्यांनी मुजरा रुजू घातला. राजांचे हेजिब म्हणून बाळाजी औरंगाबादला जाणार होते.


मोरोपंतांनी खलित्याची वळी थैलीत सरकविली. झुकून थैली राजांच्या समोर धरली. राजांनी हातस्पर्श दिला. तो देताना त्यांच्या हातातील अंगठीवरचा पुखर खडा झळकून उठला. त्यातून उधळलेले किरण संभाजीराजांच्या चर्येवर लख्खन उतरले.


येसूबाईंनी मोठ्या धीराने पडद्याआड राणीवशात मान उठवली. कुणालाही कळणार नाही अशी. पलीकडच्या बैठकीवरचे झिरझिऱ्या पडद्यातून टोप बघण्यासाठी! पण त्यांना काहीच दिसू फावले नाही! वाकून थैली हाती घेणाच्या बाळाजींच्या आड़ टोप दडले -होते !


"बाळाजी, सारे शांतपणे कार्यों लावा. हा सुलूख बनला पाहिजे.” राजांनी बाळाजींना बोल दिले.


आज्ञा स्वामी." स्वत:चाच हस्तलेख असलेला खलिता बाळाजींनी मोरोपंतांच्या हातून घेतला. औरंगाबादच्या रोखाने जाण्यासाठी बाळाजी झुकते मुजरे घालीत मागच्या पावलाने मागे हटू लागले;


"शंभूराजे, हा सुलूख मान्य झाला तर... तर तुम्हास शहजाद्यांच्या भेटीसाठी जाणे पडेल. औरंगाबादेस एकटे जाल? " राजांनी शांतपणे विचारले.


'हां जरूर जाऊ. उत्तरेहून येताना तो मार्ग पुन्हा धरला नाही. वेरूळची लेणी बगलेस पडली. संधी मिळाली तर ती आणखी एकदा नजरेखाली घालू!” संभाजीराजांनी उत्तर दिले. राजांना त्याचा अंदाज नव्हता. त्यांनी जिजाऊंच्याकडे बघितले. जिजाऊ गंभीर होत्या.


वेरूळच्या आठवणीबरोबर संभाजीराजांना आपली नजर चिकाच्या पडद्याकडे का गेली तेच कळले नाही! पण त्यांनाही पलीकडचे काहीच दिसू फावले नाही. वाऱ्याच्या झोताने त्या पडद्याला फक्त नाजूक वळ्या उठलेल्या त्यांना दिसल्या. मन त्या वळ्यांना धरून वाट चालून गेले. औरंगाबादेवी, वेरूळच्या लेण्यांची !!


" म्हाराज, नाईक आल्यात " महालीच्या खिदमतगाराने आत येत वर्दी दिली. "पेश येऊ देत.” राजांच्या पायफेन्या थांबल्या. शंभूराजेही जवळ येऊन राजांच्या शेजारी थांबले. बहिर्जी नाईक महाली पेश आला. मुजऱ्यासाठी झुकला. रामोशी मुंडाशांच्या दशा झुकताना डुलडुलल्या.


"धनी, मोगलाईत अडकलेलं रघुनाथपंत आनू बकपंत सलामतीनं सुटलं. गड पायथ्यालगट आल्यात. पर पार दशा झाली त्येंची." बहिर्जी खिनभर थांबला.

राजांना आठवले


'आम्ही आम्यातून निसटलो पण रघुनाथपंत आणि त्र्यंबकपंत मागे राहिले आणि औरंगजेबाच्या चौकी पहाऱ्यांच्या जाळ्यात अडकले. फौलादखानानं त्यांना मरणयातना "देऊन त्यांचे हाल हाल केले. कानावर आले. खरे तर ते मरायचेच, पण मुअज्जम मार्फतीने केलेली सुलुखाची बोलणी कामी पडली आणि औरंगजेबाने त्या दोघांना हाडामासांनिशी सोडून दिलं... त्या अर्थी सुलूख होऊन तह होणार हे नक्की झाले.


"धनी, त्येस्नी पांघराय धडुती धाडाव पायजेत. पार रया ग्येलीया त्येंची. आनू.


बहिर्जी अडखळला.


" बोला नाईक आणि काय ? "


डुईचे मुंडासे डावे-उजवे होलपटून टाकणाऱ्या बहिजींचा गळा गच्च झाला - "न्हाई धनी, खबर पायवं घालाय जबान उचलत न्हाई.' " संथ पावले टाकीत राजे बहिर्जीजवळ आले. त्यांचा आवाज बांधील झाला.


"नाईक, आम्ही कैदेत असता आमचे काही बरेवाईट झाले असते तरी ती खबर तुम्हास मासाहेबांच्या कानी घालावी लागलीच असती! खबरगीर आणि ज्योतिषी यांना खडे बोलावे लागते. बोला. कोण खबर ?'


"म्हाराज... दिल्लीच्या जुम्मा मसुदीत नेताजींचा सुंता जाला ! नाव पालटलं. माहमद कुलीखान क्येलाय त्येंचा. नेताजी मुशिनमान जालं. त्येंचं कबिलं निसारखानानं मुलखातनं दस्त करून दिल्लीला धाडलं. त्येंस्नी बाटवून त्येंच्यासंगट मौलानांनी पुन्यान त्येंचं निकं लावलं. "बहिजींचा रामोशी आत्मा नेताजींच्या कर्तबगार आठवणीने ढवळला. डोळ्यांतून इमानी पाण्याचे थेंब टपकले.


• बहिर्जीच्या खांद्यावरचा राजांचा हात थरथरला. डोळे भरून आले. नेताजी! घोड्यांच्या टापांनिशी उसळत फिरणारा एक धगधगत्या आगीचा झंझावात! 'नेता' आज नव्हता' झाला! अंगाराचे कोळसे झाले.


बहिर्जी आणि राजे यांच्याकडे बघताना शंभूराजांची मूठ नकळत परजात जमदाडीवर घट्ट आवळली गेली होती. तापल्या शिशाचा रस ओतल्यागत कानपाळी रसरसून आली होती. डोळ्यांचे पेटते पोत झाले होते. त्यांना दिसत होता तसबीहच्या माळेचा हात ! आणि आणि क्षणाक्षणाला त्यांची परजावरची मूठ घट्ट घट्ट आवळली जात होती नकळत ! 


राजे मुलखाची बंदिस्ती करीत होते. औरंगजेबाने राजांचा सुलूख मान्य केला. दख्खन सुभा मुअज्जम ऊर्फ शहाआलम मार्फत राजांना औरंगजेबाचा हस्बुल हुक्म आला. शंभूराजांच्यासाठी!


तहाप्रमाणे राजांचे प्रतिनिधी म्हणून शंभूराजांना शाही मन्सबदारी देण्यात येणार होती.

चार हजार स्वारांची! वन्हाड, खानदेशीच्या जहागिरीचा पंधरा लक्ष होनांच्या मुलुखाचा मोकासा बहाल करण्यात येणार होता! औरंगजेब धोरणी! त्याने ही हत्तीची दाखवीत उंटाची चाल टाकली होती! शांतपणे वाकडी !


जहागिरीचा मोकासा बन्हाड खानदेशचा म्हणजे संभाजीराजांना मुक्काम औरंगाबादेतच टाकावा लागेल! 'मन्सबदार' म्हणून शिवाजीचा बच्चा पुन्हा आपल्याकडे 'ओलीसच राहील! नाहीतर त्याला संभाजीराजांना, पुरंधरच्या तहात मिळालेल्या मावळमुलुखाचा मोकासा देता आला नसता का ? ते केले तर तो 'औरंगजेब' कसला ? राजांनी, 'मोरपिसाचा जुडगा म्हणून आपल्या तोंडावर 'खाजकुयरीची पाने' फिरवू पाहतो आहे हे हेरले. त्यांनी दिल्ली - दरबारला स्पष्ट कळवून टाकले, “जहागिरीचा मोकासा घेणे तो आमचे फर्जद संभाजीराजे अदबगर्जनि घेतील. कारभार पाहणे तो प्रतापराव गुजर व निराजी रावजी मुतालिक वेशीने पाहतील! फर्जद जहागिरीवरील मुक्कामास असत ते होणे नाही !! "