कोणतही शिवकाव्य येथे शोधा

शिवकालीन महाराष्ट्र सन १६५९ भाग १६७


सांभार : मराठा साम्राज्यकोश

अफझलखान वाईत पोहोचतो
मे १६५९ मधे अफजलखानने वाजत-गाजत विजापूर सोडले. त्याने घेतलेली नेमकी वाट साधनांमधे उपलब्ध नाही. पण अज्ञानदासाचा एक पोवाडा सांगतो की त्याने तुळजापूरचे मंदिर पाडले. नकाशावर बघितल्यावर लक्षात येते की तुळजापूर काही विजापूर ते वाई ह्या वाटेवर येत नाही.
त्यामुळे त्याने कोणालातरी तुळजापूरला पाठवून ते मंदिर पाडले अशी शक्यता नाकारता येत नाही. दुसरी शक्यता अशी आहे की ही मोहीम सुरू होण्यापूर्वी कधीतरी त्याने हे मंदिर उध्वस्त केले. पण ह्यात शंका नाही की त्याच्या सांगण्यावरून तुळजापूरच्या मंदिराला इजा झाली होती.
त्यानंतर तो पंढरपूरास आला व विठ्ठल मंदिरावर गदा आणली. सभासद बखरीत, अज्ञानदासाच्या पोवाड्यात व शिवभारतात ह्याचा उल्लेख आहे. २० जानेवारी १६६८ च्या एका महजरातही ह्या घटनेचा उल्लेख मिळतो. अफजलखानने वाईकडे जाताना पंढरपूर मंदिराची नासधूस केली हे उघड आहे.
ही दोन्ही मंदिरे हिंदूंना वंद्य होती. तुळजापूरचे मंदिर तर शिवरायांच्या घराण्याचे आराध्यदैवत होते. शिवरायांना चिथवून मोकळ्या मैदानात आणायचा त्याचा हा डाव असावा. कारण कोणतेही असो, त्या निमित्ते त्याने महाराष्ट्राचा दोन आराध्य दैवतांवर हात उगारला हे खरे.
सन १६४९ पासून वाई परगणा अफजलखानकडे होता. शिवभारतातही अफजलखानने वाईला तळ का ठोकला ते दिले आहे. जेव्हा शिवरायांनी चंद्ररावकडून जावळी घेतली त्यावेळी त्याचा भाऊ प्रतापराव तेथून निसटला व आदिलशाहीत गेला. जावळीची चांगली माहिती असल्याने नंतर त्याला अफजलखानाबरोबर पाठविण्यात आले.
त्याने अफजलखानाला सावध करायच्या ऐवजी असे सांगितले की जर जावळी काबीज झाली तर शिवरायांचे इतर भाग सहज घेता येतील. वाई जावळीच्या जवळच असल्याने व तो भाग त्याच्याकडे असल्याने अफजलखानने तिथे तळ ठोकला. ह्यातून असे दिसते की प्रतापरावाला अफजलखानाच्या मोहीमेपेक्षा जावळी परत मिळविण्यामधे जास्त रस होता.
संदर्भग्रंथ
श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ९०६-९१२
शिवभक्त विनोद जाधव's photo.
शिवभक्त विनोद जाधव's photo.