
महाराष्ट्राला मोठा सागर किनारा लाभला
आहे. सृष्टिसौंदर्याने नटलेल्या या सागर किनाऱ्याजवळ अनेक प्रेक्षणीय आणि
ऐतिहासिक घटनांना उजाळा देणारी अनेक स्थळे आहेत. या किनाऱ्यावर असलेल्या
जलदुर्गांमध्ये रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे.
रायगड जिल्ह्याच्या पश्चिम अंगाला अरबी समुद्र आहे. या समुद्राला लागूनच
मुरुड तालुक्यातील मुरुड नावाचे गाव आहे. मुरुडच्यापुढे दंडा आणि राजपुरी
ही गावे समुद्रकिनारी आहेत. मुरुडपासून राजपुरी चार पाच किलोमीटर अंतरावर
आहे. हे गाव खाडीच्या किनाऱ्यावर आहे. या राजपुरी गावाच्या पश्चिमेला
समुद्रात एका बेटावर मुरुड-जंजिरा आहे. राजपुरीहून या किल्ल्यावर
जाण्यासाठी शिडाच्या होड्यांची सोय आहे.
जंजिरा हा शब्द अरबी भाषेतून आपल्याकडे रुढ
झालेला आहे. अरबी भाषेतील जझीरा या शब्दावरुन तो आलेला आहे. जझीरा म्हणजे
बेट. या बेटावर पूर्वी एक मेढेकोट होता. त्यावेळी राजपुरीला मुख्यत: कोळी
लोकांची वस्ती होती. या कोळ्यांना लुटारू आणि चाचे लोकांचा नेहेमीच उपद्रव
होत असे. तेव्हा या चाच्यांना प्रतिबंध करण्यासाठी या बेटावर मेढेकोट
उभारण्यात आला. मेढेकोट म्हणजे लाकडाचे मोठाले ओंडके एका शेजारी एक रोवून
तयार केलेली तटबंदी. या तटबंदीमध्ये कोळी लोक सुरक्षितपणे रहात असत.
त्यावेळी त्यांचा प्रमुख होता राम पाटील. हा मेढेकोट बांधण्यासाठी त्यावेळी
निजामी ठाणेदाराची परवानगी घ्यावी लागली होती. मेढेकोटाची सुरक्षितता
लाभताच राम पाटील त्या ठाणेदाराला जुमानेसा झाला. त्यामुळे ठाणेदाराने
त्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिरमखानाची नेमणूक केली.
राम पाटील आपल्याला मेढेकोटाच्या जवळही
फिरकू देणार नाही, याची कल्पना पिरमरखानाला होती. तो अतिशय चतुर होता.
त्याने आपण दारूचे व्यापारी आहोत, असे भासवून आपली गलबते खाडीत नांगरली.
राम पाटीलाशी स्नेह राहावा म्हणून दारूचे काही पिंपे त्याने भेट म्हणून
पाठवली. त्यामुळे राम पाटील खूष झाला. पिरमखानाने मेढेकोट पाहण्याची इच्छा
व्यक्त केली. पिरमखान मेढेकोटात गेला. रात्री सर्व कोळी दारू पिऊन झिंगले
असताना पिरमखानाने बाकीच्या गलबतांमधून असलेले सैन्य तेथे उतरवून सर्वांची
कत्तल करून मेढेकोट ताब्यात घेतला.
पुढे पिरमखानाच्या जागी बुऱ्हाखानाची
नेमणूक झाली. त्याने तेथे भक्कम किल्ला बांधण्याची परवानगी निजामाकडून
मिळवली. सध्याचे जे बांधकाम आहे ते या बुऱ्हाणखानाने बांधलेले आहे. पुढे
इ.स.१६१७ मध्ये सिद्दी अंबर याने बादशहाकडून स्वतंत्र सनद मिळवून जहागिरी
प्राप्त केली. जंजिरा संस्थानचा हा मूळ पुरुष समजला जातो.
जंजिऱ्याचे सिद्दी हे मुळचे अबिसीनियामधील
असून, हे दर्यावर्दी शूर, काटक व दणकट होते. त्यांनी प्राणपणाने जंजिरा
लढवला. अनेकांनी जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला. पण तो यशस्वी होऊ शकला
नाही. छत्रपती शिवाजी राजांनाही जंजिऱ्यावर स्वामित्व मिळवता आले नाही.
इ.स.१६१७ ते इ.स.१९४७ अशी ३३० वर्षे जंजिरा अंजिक्य राहिला. जंजिऱ्याचे
प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे. होडीने आपण प्रवेशद्वारापर्यंत पोहोचतो. या
प्रवेशद्वाराच्या आत एक उपदार आहे. प्रवेशद्वाराजवळ एक शिल्प आहे.
बुऱ्हाणखानाची दर्पोक्तीच या चित्रातून दिसून येते. एका वाघाने चारही पायात
चार हत्ती पकडले आहेत व शेपटीत एक हत्ती गुंडाळला आहे, असे ते चित्र आहे.
बुऱ्हाखान इतर सत्ताधीशांना सुचवतो आहे की, “तुम्ही हत्ती असाल, मी पण शेर
आहे. या किल्ल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करू नका.”
जंजिऱ्याची तटबंदी बुलंद आहे. त्याला
सागराकडे ही एक दरवाजा आहे. असे एकोणीस बुलंद बुरूज आहेत. दोन बुरुजांमधील
अंतर ९० फुटांपेक्षा जास्त आहे. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजाग पायऱ्या
ठेवलेल्या आहेत. तटबंदीमध्ये कमानी आहेत. त्या कमानीमध्ये तोंड करून तोफा
ठेवलेल्या आहेत. किल्ल्याच्या मध्यभागी सुरुलखानाचा भव्य वाडा आज पडक्या
अवस्थेत आहे. पाण्याचे दोन मोठे तलाव आहेत. किल्ल्यामध्ये पूर्वी तीन
मोहल्ले होते. यातील दोन मोहल्ले मुसलमानांचे व एक इतरांचा असे होते.
पूर्वी किल्ल्यामध्ये मोठी वस्ती होती. राजाश्रय संपल्यानंतर ती सर्व वस्ती
तेथून उठून गेली.
जंजिऱ्याच्या तटबंदीवरुन विस्तृत प्रदेश
दिसतो. यात सागरातील कासा उर्फ पद्मदुर्ग व किनाऱ्यावरील सामराजगड हेही
येथून दिसतात. ३३० वर्षे अभेद्य आणि अंजिक्य राहिलेल्या जंजिरे मेहरुब
पाहताना इतिहासातील अनेक पर्वांचा आलेख आपल्या नजरेसमोरून तरळून जातो. थोडा
इतिहासाचा अभ्यास करुन जंजिर्याला भेट दिल्यास ती निश्चितच संस्मरणीय
ठरेल.’
जंजिराचा अर्थ समुद्राने वेढलेला किल्ला.
भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र, याशिवाय मुरुड-जंजिराच्या तटावर ५७२
तोफा आहेत. त्यामुळेच हा जंजिरा अभेद्य होता. या तोफांमध्ये विशेष मोठी आणि
लांब पल्ल्याची कलाल बांगडी ही तोफ होती. शिवाजीच्या काळात
महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी हा जंजिरा शेवटपर्यंत अजेय राहिला.