कोणतही शिवकाव्य येथे शोधा

लोहगड


लोहगड हा महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. लोणावळ्यानजीकच्या मळवली स्टेशन नजीकच दुर्गांची एक जोडगोळी उभी आहे.त्यातील मुख्य दुर्ग आहे लोहगड आणि त्याला बळकट आणि संरक्षित करण्यासाठी शेजारीच बांधला आहे विसापूर अथवा संबळगड. हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. पुणे जिल्ह्यातील लोणावळा डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो.
इतिहास :
लोहगड किल्ला हा अति मजबूत, बुलंद आहे. किल्ल्याची निर्मिती जवळ असणारी भाजे आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली, त्याही पूर्वी म्हणजेच सत्तावीशसे (२७००) वर्षांपूर्वी झालेली असावी असे अनुमान आहे .लोहगड हा एक इ.स. १५६४ मध्ये अहमदनगरचा सातवा राजा दुसरा बुऱ्हाण निजाम या किल्ल्यावर कैदेत होता.इ.स. १६३० मध्ये किल्ला आदिलशाहीत आला त्याचवेळेस १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतले आणि लोहगड-विसापूर हा सर्व परिसर सुद्धा स्वराज्यात सामील करून घेतले
इ.स. १६६५ मध्ये झालेल्या पुरंदरच्या विरोधात हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला गेला. पुढे १३ मे १६७० मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकला.इ.स. १७१३ मध्ये शाहूमहाराजांनी कृपावंत होऊन लोहगड किल्ला कान्होजी आंग्रे यांस सोपविले.१७२० मध्ये आगऱ्यांकडून तो पेशव्यांकडे आला.१७७० मध्ये नाना फडणवीसांचा सरदार जावजी बोंबले याने तो आपल्या ताब्यात घेतला. आणि किल्ल्याचा कारभार नानांनी पुढे धोंडोपंत नित्सुरे यांच्याकडे सोपविले . किल्ल्यात नानांनी सोळा कान असलेली एक बाव बांधली व तिच्या बाजूस एक शिलालेख कोरला.
शके १७११ मध्ये बाळाजी जनार्दन भानू – नाना फडणवीस यांनी ही बाव धोंडो बल्लाळ नित्सुरे यांच्या देखरेखीखाली बाजीचट यांच्याकडून बांधिवली गेली.१८०० मध्ये नित्सुऱ्यांचा स्वर्गवास झाला .१८०२ मध्ये त्यांच्या पत्नी किल्ल्यावर येऊन राहिल्या.१८०३ मध्ये किल्ला इंग्रजांनी मिळविला पण नंतर दुसऱ्या बाजीरावाने तो पुन्हा जिंकला.४ मार्च १८१८ ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसऱ्याच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
  • हनुमान दरवाजा : हा सर्वात प्राचीन दरवाजा आहे.Lohagad
  • महादरवाजा : हा गडाचा मुख्य दरवाजा आहे. यावर हनुमानाची मूर्ती कोरली आहे. ह्या दरवाज्यांचे काम नाना फडणीसांनी १ नोव्हेंबर १७९० ते ११ जून १७९४ या कालावधीत केले. गडावर चढतांना आपल्याला सलग चार प्रवेशद्वारांमधून आणि सर्पाकार मार्गावरून जावे लागते.
  • गणेश दरवाजा : ह्याच्याच डाव्या – उजव्या बुरुजाखाली सावळे कुटुंबाचा नरबळी देण्यात आला होता आणि त्याच्या बदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगडवाडीची पाटीलकी देण्यात आली होती येथे आतील बाजूस शिलालेख आहेत.
  • नारायण दरवाजा : हा दरवाजा नाना फडणीसांनी बांधला. येथे एक भुयार आहे, जिथे भात व नाचणी साठवून ठेवण्यात येई.
    महादरवाज्यातून आत शिरताच एक दर्गा लागतो. दर्ग्याच्या शेजारी सदर व लोहारखानाचे भग्न अवशेष आढळतात. उजवीकडे ध्वजस्तंभ आहे. याच्या जवळच एक तोफ काही हौशी दुर्गप्रेमींनी सिंमेटच्या चौथऱ्यात बसवलेली आहे. अशीच एक तोफ तुटलेल्या अवस्थेत लक्ष्मीकोठीच्या समोर पडलेली आहे. ध्वजस्तंभ उजवीकडे चालत गेल्यास लक्ष्मी कोठी आढळते. या कोठीत अनेक खोल्या आढळतात. दर्ग्याच्या पुढे थोडे उजवीकडे गेल्यास थोडा उंचवट्याचा भाग आहे. जिथे एक सुंदर शिवमंदिर आढळते. पुढे सरळ चालत गेल्यावर एक छोटेसे तळे आहे. ते तळे अष्टकोनी आहे. त्याच्याच बाजूला पिण्याच्या पाण्याचे टाके देखील आहे. ही गडावरील पिण्याच्या पाण्याची एकमेव सोय आहे. तिथून पुढे पंधरा ते वीस मिनिटे चालत गेल्यास एक मोठे तळे आढळते. नाना फडणवीसांनी या तळ्याची बांधणी केली आहे. हे तळं सोळाकोनी आहे.
Sulka,_Lohagad_fortलक्ष्मी कोठीच्या पश्चिमेस विंचूकाटा आहे. गडावरून पाहिले असता हा भाग विंचवाच्या नांगीसारखा दिसतो, म्हणून यांस विंचूकाटा म्हणतात. या विंचूकाट्यास बघून आपल्याला आठवण येते ती म्हणजे राजगडाच्या संजीवनी माचीची. पंधराशे मीटर लांब आणि तीस मीटर रुंद अशी ही डोंगराची सोंड आहे. विंचुकाट्यावर जाण्यासाठी एक टप्पा उतरून पलीकडे जावे लागते. या भागात पाण्याची उत्तम सोय आढळते. गडाच्या आजुबाजुच्या परिसर न्याहाळण्यासाठी या विंचूकाट्याचा उपयोग होत असावा. या गडावरून येतांना भाजे गावातील भाजे लेण्या आवर्जून पाहव्यात. पावसाळ्यातील लोहगडाचे रुप पाहिले की मनोमनी गुणगुणतं..
ओल्या पानातल्या रेषा वाचतात ओले पक्षी ।
आणि पोपटी रंगाची रान दाखविते नक्षी ॥
लोहगडाचा उपदुर्ग असलेल्या विसापूरवर मोठी सपाटी आहे तशीच मोठी दगडी तटबंदी आहे. प्राचीन शिलालेखही आहेत.डोंगराच्या पोटात भाज्याची लेणी आहेत. ती दोन हजार वर्षापूर्वी कोरलेली आहेत.लोहगडाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कड्याच्या टोकावर बांधलेली चिरेबंदी वाट. अशी रेखीव वाट फार कमी दुर्गांवर पहावयास मिळते.
लोहगडवाडी पार केली की ही सर्पाकार वाट सुरू होते. एकदा का कोणी या वाटेवर पाय टाकला की मग तो माणूस वर येईपर्यंत पहारेकऱ्यांच्या नजरेत असतो. तो व्यवस्थित हेरला जातो.लोहगडाचा हा द्वारसमूह आगळावेगळा आहे आणि विचारान्ती बांधलेला आहे. गडावर गेल्यावर वरच्या बुरजावरून हा सर्व मार्ग न्याहाळता येतो. कड्याच्या टोकावरचे हे बांधकाम खूप सुंदर आहे.
गडावर जाण्याच्या वाटा :
लोहगडावर जाण्यासाठी तीन वाटा आहेत.
1)लोणावळ्याहून दुचाकी अथवा चारचाकी वाहनाने थेट लोहगडवाडी पर्यंत जाता येते. पवना धरणाकडे जाणाऱ्या रस्त्याने थोडे पुढे गेल्यावर डावीकडे एक रस्ता लागतो. तेथून ३ ते ४ कि.मी अंतरावर लोहगडवाडी आहे. उभा चढ आणि अतिशय धोकादायक वळणे आहेत. साधारण अर्धा तासाचा प्रवास आहे. मात्र येथे एसटी महामंडळाची सोय नाही. स्वतःचे वाहन असल्यास उत्तम अथवा लोणवळ्यातून ट्रॅक्सीने जाता येते.
2)काळे कॉलनी ही पवना धरणाजवळ वसलेली आहे. तेथून लोहगड आणि विसापूर मधील गायमुख खिंड परिसर व्यवस्थित दिसतो. पवना धरणाच्या खालून एक रस्ता गायमुख खिंडीच्या डावीकडील टेकडीवर जातो. या वाटेने किल्ल्यावर जाण्यास २ तास लागतात.
3) पुण्यावरून अथवा मुंबईवरून येतांना लोणावळ्याच्या पुढे असणाऱ्या मळवली रेल्वे स्थानकावर उतरावे. तेथून एक्स्प्रेस हायवे पार करून भाजे गावातून थेट लोहगडला जाणारी वाट पकडावी. वाट मोठी आणि प्रशस्त आहे. तिथून दीड तासांच्या चालीनंतर ‘गायमुख’ खिंडीत येऊन पोहचतो. खिंडीच्या अलिकडेच एक गाव आहे. त्याचे नाव लोहगडवाडी. खिंडीतून उजवीकडे वळले म्हणजे लोहगडास पोहचतो आणि डावीकडे वळले म्हणजे विसापूर किल्ल्यावर पोहचतो. या मार्गे लोहगडावर प्रवेश करतांना चार दरवाजे लागतात.