कोणतही शिवकाव्य येथे शोधा

नगरधन(रामटेक) (भुईकोटकिल्ला)



विदर्भातील नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून प्रसिद्ध आहे. या नागपूरच्या ईशान्येला रामटेक तालुका आहे. पेंचच्या अभयारण्यामुळे हा परिसर बराच प्रसिद्धीला आलेला आहे. रामटेक गावामध्ये रामटेकचा गिरीदुर्ग उभा ठाकलेला असला तरी या किल्ल्याची ओळख किल्ला म्हणून कमी आणि धार्मिक स्थळ म्हण्नू जास्त आहे. धार्मिक श्रद्धेमुळे अनेक भाविकांचा किल्ल्याकडे ओढा असतो.
विदर्भातील रामटेक हे धार्मिक स्थळ म्हणून प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील भाविकांबरोबर इतर राज्यांमधूनही अनेक भाविकांचा ओघ रामटेकला असतो. रामटेक पासून सहा-सात किलोमिटर अंतरावर एक बलदंड भुईकोट किल्ला आहे. हा किल्ला म्हणजे नगरधनचा किल्ला होय.रामटेकच्या प्रसिद्ध अशा धार्मिक व पर्यटन स्थळाच्या जवळ असूनही नगरधनचा किल्ला मात्र अनेकांना अपरिचित आहे.रामटेकच्या डोंगरावरुन नगरधनचा किल्ला ओळखू येतो. नगरधनचा किल्ला रामटेक तालुक्यात असून नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. नागपूर ते जबलपूर असा राष्ट्रीय महामार्ग आहे. हा महामार्ग क्र. ७ आहे. या महामार्गावर मनसर हे गाव आहे. या मनसर गावातून पश्चिमेकडे रामटेककडे जाण्यासाठी किंवा तुमसर (जि. भंडारा) कडे जाण्यासाठी रस्ता फुटतो. या रस्त्याने रामटेक गाठल्यावर तेथून सहा-सात किलोमिटर दक्षिणेकडे नगरधन गाव गाहे.नगरधन गावाच्या बाहेर (गाव ओलांडल्यावर) नगरधनचा किल्ला आहे. नागपूरपासून वाहनाने दिडतासात आपण नगरधन पर्यंत पोहोचू शकतो. नगरधन हे पूर्वी ‘नंदीवर्धन’ या नावाने परिचित होते असे काही संशोधकांचे मत आहे.नगरधनचा भुईकोट हा प्रथमदर्शनी आपल्याला मोहवून टाकतो. नगरधन किल्ल्याने कात टाकून नवे रुप धारण केलेले आहे. याची तटबंदी व आतील भाग नव्याने दुरुस्त केलेला आहे. लालसर पण काळ्यारंगाची झाक असलेल्या चिर्‍यांनी किल्ल्याची तटबंदी व दरवाजा बांधून काढल्यामुळे त्याचे सौंदर्य कैकपटींनी वाढलेले आहे.नगरधनच्या भव्य दरवाजावर काही शिल्पे अंलकृत केलेली आहेत. शिरोभागी गणेशाची प्रतिमा आहे. दोन्ही बाजूंना चषक कोरलेले आहेत. दाराच्या बाजूला द्वारपाल कोरलेले असून त्यांच्या खांद्यावर कबुतर दाखवले आहे. पुर्वी निरोपानिरोपी करण्यासाठी कबुतरांचा वापर करीत असत. दाराच्या आत पहारेकर्‍यांच्या देवड्या आहेत. पुर्वी आत येणार्‍यांची चौकशी व झाडाझडती येथेच घेतली जायची.दारातून आत शिरल्यावर तटबंदीवर जाण्यासाठी पायर्‍यांचा मार्ग केलेला आहे. तटबंदीवर चढल्यावर आपण तटबंदीवरुन फेरी मारु शकतो. या रुंद तटबंदीवर निरीक्षणासाठी मनोरे केलेले आहेत. येथून रामटेक किल्ल्याचे दर्शन उत्तम होते. किल्ल्याच्या आत वाड्याचे तसेच इतर निवासस्थानांचे अवशेष आहेत. किल्ल्यामध्ये तीन मजली खोल विहीर आहे. या मजल्यावर कमानीयुक्त खोल्या असून पायर्‍या उतरुन तिथपर्यंत पोहोचता येते. किल्ल्यामध्ये मंदिर, तसेच काही ठिकाणी प्राचीन अवशेषही पहायला मिळतात.नगरधनचा किल्ला हा वाकाटक कालीन असल्याचे मानले जाते.म्हणजे साधारण चवथ्याशतकातील किल्ला असावा. जुन्या आणि नव्याचा संगम असलेला नगरधनचा भुईकोट आटोपशीर आकाराचा असल्यामुळे तो पहाण्यासाठी एखादा तास आपल्याला पुरतो. नगरधनच्या भेटीत आपण रामटेकचा किल्ला व तेथेच नव्याने उभारलेले देखणे असे कालीदासाचे स्मारक ही पाहू शकतो. आपण पूर्व नियोजन व्यवस्थित केल्यास या भेटीतच तोतलाडोहचे अभयारण्यही पाहता येवू शकते.
भारताच्या इतिहासामधे गुप्त काळाचा उल्लेख सुवर्णयुग म्हण्नू केला जातो. या गुप्त राजवटींच्या समकालीन असलेल्या वाकाटक राजवटीची सत्ता विदर्भामधे नांदत होती. इ.स.२७० ते ५०० पर्यंत वाकाटकांची सत्ता या भागात होती. नंदीवर्धन, प्रवरपूर, वत्सगुडम ही राजधानीची ठिकाणे त्याकाळी प्रसिद्ध होती. यातील नगरधन ही राजधानी आद्य राजधानी म्हणून मान्यता पावलेली होती.पुरातत्वीय आधारे इ.स.पूर्व ३ शतकापासून विदर्भात बौध्द धर्माचा प्रसार व प्रचार वाढला हा काळात लेण्या, स्तुप तसेच विहारांची निर्मिती झाली. त्यानंतर बौद्ध धर्माची पिछेहाट सुरु झाली. त्याच दरम्यान वैदिक धर्माची उपासना सुरु झाली. ही कालखंड होता. वाकाटक राजवटीचा.मौर्य, शुंग, सातवाहन, क्षत्रप, मुंड या राजसत्तांनंतर विदर्भावर वाकाटकांचे प्रभुत्व आले. त्यांनी येथे राज्य स्थापन केले. वंध्यशक्ती हा वाकाटकांचा संस्थापक होता. हे घराणे वैदिक धर्माभिमानी असून सहिष्णू वृत्तीचे होते. याच राजवंशामधील रुद्रसेन (व्दितीय) याची पट्टाराणी प्रभावती होती. ही प्रभावती चंद्रगुप्त (व्दितीय) याची कन्या होती.
रामगिरी हे प्राचिन काळापासून धर्मस्थान होते. बौद्ध धर्मगुरु नागार्जुन हे येथे काळ वास्तव्य करुन होते असे काही विद्वानांचे मत आहे. प्रभु रामचंद्रही येथे काही काळ राहीले. अगस्ती ऋषीच्या आश्रमात प्रभु रामचंद्रांनी राक्षसांना मारण्याचा संकल्प घेतला म्हणजे टेक घेतला म्हणून या परिसराला रामटेक असे नाव मिळाले.असा धार्मिक समज जनमानसांमधे रुढ आहे.महाकवी कालीदास यानी मेघदूत हे अजरामर काव्य याच ठिकाणी रचले. राम लक्ष्मणांची मंदिरे यादव काळात उभारली गेली. चक्रधर स्वामीनी याच ठिकाणी धर्मउपदेश केला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी याच गडावर ध्यान धारणा केली.रामटेक किल्ल्याच्या पठारावर कालीदासाचे उत्तम स्मारक केलेले आहे. ते पहाण्यासारखे आहे. अनेक प्रसंगाची चित्रे येथे चितारलेली आहेत.रामटेक किल्ल्याचे दरवाजे उत्तम असून ते पहाण्या योग्य आहेत. आतमधे एका मंडपात वराहाची मुर्ती आहे. तटबंदीने परिवेष्टीत असलेल्या रामटेक किल्ल्याला बालेकिल्ला असून त्याच्या तटबंदीवर फिरता येते. आतील मंदिरेही पहाण्याजोगी आहेत.रामटेक किल्ला, कालीदास स्मारक, अंबाळा तलाव परिसर आणि नगरधन चा किल्ला पहाण्यासाठी दिवसभराचा अवधी हाताशी आवश्यक आहे.