कोणतही शिवकाव्य येथे शोधा

शिवकालीन महाराष्ट्र सन १६५९ भाग १७४


सांभार : मराठा साम्राज्यकोश

अफझलखानच्या मोहिमेचे सार
सैनिकी धोरण व युद्ध ह्याचे एक उत्तम उदाहरण म्हणून शिवाजी राजा व अफजलखान मधल्या लढाईकडे पाहता येईल. शिवरायांनी त्याला अनुरुप अशा भागात अफजलखानाला कसे ओढले हे त्यातून दिसून येते. शिवरायांना स्वतःच्या कमतरतांची जाणीव होतीच पण त्याबरोबर त्याच्या प्रतिस्पर्धीच्या उणीवांचीही चांगली माहिती होती. आदिलशाही फौजेला जावळीसारख्या धनदाट जंगलात घेऊन जाणे हा निव्वळ वेडेपणा होता.
अफजलखानने मे १६५९ मधे विजापूर सोडले व तो १० नोव्हेंबर १६५९ ला मारला गेला. म्हणजे तो पूर्ण पावसाळ्यात प्रवास करत वाईला पोहोचला आणि पावसाळ्यानंतर शिवरायांना भेटायला प्रतापगडाशी गेला. आजही महाबळेश्वरच्या भागातून वाईहून निघून प्रतापगड किंवा जावळी गाठणे महाकठीण जाते. इथले अरण्य इतके दाट आहे की वाट चुकणे किंवा जंगली श्वापदांचा उपद्रव होणे अगदी सहज शक्य आहे. त्यामुळे अफजलखानाला भुलविण्यात शिवाजी राजा किती सफल झाला होता हेच दिसते.
शिवरायांनी घाबरण्याचा आव आणून अफजलखानाला पूर्णपणे गाफिल ठेवले. ज्यावेळी अफजलखानाने प्रतापगडास जायचे ठरविले तेव्हाच ह्या युद्धाचे पारडे शिवरायांच्या बाजूने पूरते झुकले. आदिलशाही सैन्यालातर हे सगळ्या पळवाटा संपल्यासमानच होते.
जगातील इतर युद्धांप्रमाणेच ह्या युद्धात सैनिकांच्या मनोधैर्याने कलाटणी घडविली. मराठ्यांकडे अफजलखानापेक्षा कित्येक कमी लोक व दारूगोळा होता. पण त्यांच्याकडे अफजलखानाशी भिडायला तयार असलेला एक शूर व निर्धारी सेनापती होता. ह्या एका माणसाच्या उपस्थितीने मराठी सैन्याचे मनोधैर्य जणू प्रचंड उंचावले असावे. ह्यानंतर शिवरायांनी अफजलखानाला मारले ही बातमी वणव्यासारखी सगळ्या सैन्यात पसरली असावी. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता त्यांनी विखुरलेल्या व बेसावध अशा आदिलशाही सैन्याची वाताहत केली.
संदर्भग्रंथ
श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ८८३-८८५
शिवभक्त विनोद जाधव's photo.