रम्य तळागड
. रायगड जिल्ह्य़ातील तळा तालुक्यातला तळागड हा अशाच नशीबवान किल्ल्यापैकी एक! अत्यंत सोपी चढाई, भरपूर प्रमाणात असलेले दुर्गावशेष आणि पावसाळ्यात बहरलेलं सृष्टिसौंदर्य यांच्यामुळे तळागडाची ट्रेकर्सकडून मोठय़ा प्रमाणात दखल घेतली जाऊ लागली आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या सान्निध्यात असल्याने तळागडाचा पायथा गाठणेही सहजसाध्य आहे. म्हणूनच एका दिवसाच्या भटकंतीसाठी तळा किल्ला हा झकास पर्याय आहे.
तळा किल्ल्याच्या पायथ्याचं तळा गाव हे तालुक्याचं ठिकाण असल्याने गावाचा पसारा बऱ्यापैकी मोठा आहे. साहजिकच खासगी वाहने व एस.टी. यांची भरपूर प्रमाणात असणारी सोय हा तळागडाच्या सफारीतला ‘बोनस पॉइन्ट’ आहे. तळा गावाला जाण्यासाठी पुणे व मुंबई या दोन्ही बाजूंच्या ट्रेकर्सनी आधी मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर गाव गाठावे. पुण्याहून ताम्हिणी घाट मार्गे व मुंबईच्या बाजूने आल्यास कोलाडनंतर इंदापूर गाव आहे. पुणे व मुंबई दोन्हीकडून तळा गावासाठी थेट बसेस आहेत पण त्या न मिळाल्यास इंदापूरपासून तळा गावासाठी खासगी वाहने व एस.टी. यांची सारखी वाहतूक सुरू असते. इंदापूरपासून तळा किल्ला १५ कि. मी. वर आहे. इंदापूरवरून निघाल्यापासून थोडय़ाच वेळात तळागडाचा चौकोनी आकार नजरेत भरायला लागतो. साधारणपणे तासाभरात आपण तळा गावात पोहोचतो. तळा गावात चहा-नाश्ता, जेवण व निवासाची उत्कृष्ट व्यवस्था आहे. गावातून तळागड बराच उंच दिसत असला, तरी घाबरण्याचं कारण नाही. गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी ठशठशीत मळलेली पायवाट असून १५ मिनिटांत आपण गडाच्या पहिल्या पठारावर दाखल होतो. या ठिकाणी तुरळक तटबंदीचे अवशेष असून इथून तळागडाचे दोन टप्पे आपल्याला दिसतात. या पठारापासून १० मिनिटांच्या अंतरावर गडाचा भग्नावस्थेत असलेला ‘हनुमान दरवाजा’ लागतो. दरवाजाजवळच कातळात कोरलेली हनुमानाची प्रतिमा असून खडकात खोदलेले शरभशिल्पही आपल्याला पाहायला मिळते. या दरवाजाची कमान ढासळलेली असून दोन्ही बाजूंचे फक्त खांब शिल्लक असले, तरी दरवाजात नेणाऱ्या गडाच्या पायऱ्या मात्र सुस्थितीत आहेत. प्रवेशद्वाराजवळच उजवीकडे कातळात खोदलेले पाण्याचे खांबटाके आहे. इथून समोर आपल्याला पहिल्या पठारावरून दिसलेला गडाचा बुरूज लागतो. आता गडाच्या बालेकिल्ल्याकडे नेणारी पायवाट सुरू होते. या वाटेवर डावीकडे उत्तम स्थितीतला व बंदुकांच्या माऱ्यासाठी जंग्यांची सोय असलेला बुरूज आहे. तळागडाच्या बालेकिल्ल्याचा दरवाजाही पूर्णपणे नामशेष झालेला असून गावातून निघाल्यापासून अध्र्या तासात आपण गडाच्या माथ्यावर पोहोचतो. दरवाजाजवळ एक मोठा बुरूज असून इथून दिसणारी तळागडाच्या पठारावरही हिरवळीची चादर म्हणजे अवर्णनीय दृश्य! या बुरुजावरून घोसाळगडाचा घुमटाकृती व सहज लक्ष वेधणारा आकार, सह्य़ाद्रीची मुख्य रांग, मांदाडची खाडी हा देखावा निखालस सुंदर आहे. बुरुजाच्या शेजारी एक जोते असून हे पूर्वीचे रत्नाकर महादेवाचे मंदिर आहे, असे तळा गावातील रहिवासी सांगतात. या जोत्यावर जाण्यासाठी दोनतीन पायऱ्याही आहेत. तळागडाच्या बाबतीत एक गोष्ट प्रकर्षांने जाणवते, ती म्हणजे गडाची उंची मर्यादित असून त्यास कुठेही ताशीव कडय़ाचे संरक्षण नाही. त्यामुळे शत्रूला गडावर प्रवेश करणे सहजसाध्य आहे. ही बाब लक्षात घेऊनच गडाच्या चारही बाजू भक्कम तटबंदीने संरक्षित केल्या आहेत. या सर्व तटांमध्ये जंग्यांची मुबलक प्रमाणात सोय केलेली आहे. म्हणूनच तळागड उंचीने लहान जरी असला, तरी त्याला चारही बाजूंनी पूर्णपणे कडेकोट बंदोबस्त लाभलेला आहे. अशाच प्रकारच्या तटबंदीचे उदाहरण आपल्याला सातारा जिल्यातील कोरोगावजवळील वर्धनगड किंवा क ऱ्हाडजवळील वसंतगडावर पाहायला मिळते. जीवधन, सरसगड, कुलंग, गोरखगड यांसारख्या सह्य़ाद्रीच्या अभेद्य कडय़ांचे वरदान लाभलेल्या किल्ल्यांना परिघावरच्या तटबंदीची आवश्यकता भासलेली नाही.
रत्नाकर महादेवाच्या मंदिरापासून पुढे गडाच्या अवशेषांना सुरुवात होते. मंदिराच्या पुढे प्रथम खडकात खोदलेली पाण्याची टाकी लागतात. या टाक्यांच्या मागेच सदरेचे अवशेष आहेत. सदरेनंतर खोदीव टाक्यांची मालिकाच असून त्यात एक खांबटाकेही आहे. प्रत्येक टाक्याजवळ पाण्यावर आच्छादन करण्यासाठी ‘पोस्ट होल्स’ची व्यवस्था आहे. टाक्यांच्या शेजारी शिवलिंग असलेले पण छत नसलेले छोटेखानी मंदिरही आपल्याला बघायला मिळते. ही टाक्यांची मालिका जिथे संपते, तिथे मुख्य इमारत ढासळलेले पण दोन्ही बाजूंच्या भिंती सुस्थितीत असलेले ‘लक्ष्मी कोठार’ आहे. लक्ष्मी कोठाराच्या मागे तळागडाची तटबंदीने संरक्षित केलेली माची असून शेवटी एक भक्कम बांधणीचा बुरूज आहे. या बुरुजावर भगव्या झेंडय़ाचे निशाण लावलेले आहे. तळागडाच्या या माचीसारखीच माची जवळच्या घोसाळगडावरही आपल्याला बघायला मिळते. किल्ल्याचा विस्तार तसा लहान असल्याने अध्र्या-पाऊण तासात संपूर्ण गड भटकून होतो.
