
हरिश्चंद्र गड किल्ला पुणे, ठाणे आणि
अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. पुणे, ठाणे आणि अहमदनगर या तीन
जिल्ह्यांच्या सीमा जेथे एकत्र येतात तेथून सह्याद्रीची एक उपरांग
पूर्वेकडे धावते. ही रांग हरिश्चंद्राची रांग म्हणून ओळखली जाते. या
भौगोलिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या असलेल्या रांगेच्या सुरुवातीलाच
हरिश्चंद्रगड हा किल्ला आहे. हरिश्चंद्र, तारामती आणि रोहिदास अशी येथील
शिखरांची नावे असल्यामुळे या किल्ल्याचा संदर्भ थेट राजा हरिश्चंद्रापर्यंत
स्थानिक दंतकथांनी जोडला आहे. हरिश्चंद्रगडावरील लेण्यांत चांगदेवांनी
तपश्चर्या केली होती. सह्याद्रीच्या मुख्य रांगेवर असलेला हरिश्चंद्रगड
समुद्रसपाटीपासून १४२४ मीटर उंच आहे. गडावर जाण्यासाठी तीन चार वाटा सध्या
प्रचलित आहेत.खिरेश्वरकडील वाट सोपी असल्याने तिचा मोठया प्रमाणावर वापर
केला जातो. राष्ट्रीय महामार्ग २२२ असा राजरस्ता माळशेज घाटातून जातो. या
घाटाच्या माथ्यावर खुबीफाटा आहे. या खुबीफाट्यावरुन खिरेश्वरला जाता येते.
तसेच पुण्याकडून खिरेश्वरपर्यंत एस.टी. बसेसचीही सोय आहे. खुबीफाट्यावरून
खिरेश्वरकडे निघाल्यावर वाटेत आश्रमशाळा आहे. अडचणीच्या वेळेस येथे
विनंतीवरून मुक्कामाची सोय होऊ शकते. याच वाटेच्या बाजूला प्राचीन मंदिरही
आहे.
हरिश्चंद्रगडाचा माथा अतिशय विस्तीर्ण
असल्यामुळे तो खालून एकदम भव्य दिसतो. त्याच्या पूर्व बाजूला इंग्रजी यू
आकाराची खिंड आहे. ही खिंड म्हणजे प्रसिद्ध तोलार खिंड होय. ही खिंड पुणे
आणि नगर जिल्ह्यांमधील दुवा आहे. पायथ्यापासून तोलार खिंडीत पोहोचेपर्यंत
तास दीडतास लागतो. वाटेत कोठेही पाणी नाही. त्यामुळे येतानाच पाण्याच्या
बाटल्या सोबत बाळगाव्या लागतात. हा सर्व परिसर जंगलाचा आहे. या भागात
वाघाचा वावरही असतो असे सुचविणारे एक वाघाचे शिल्प असलेला दगड तोलार खिंडीत
उभा केलेला आहे. खिंडीतून पुढे वाट कोथळ्याकडे जाते. खिंडीच्या पश्चिमेकडे
कड्यावर चढणारी वाट आपल्याला हरिश्चंद्रच्या माथ्यावर घेऊन जाते. खिंडीतून
चढणार्या वाटेवर खडकात पायठण्या खोदलेल्या आहेत. येथून अर्ध्या तासातच
आपण तटबंदीच्या आत पोहोचतो. येथून पश्चिमेकडे धोपटमार्गाने ३-४ कि. मी.
चालत जावे लागते. या मार्गावर बर्याच ठिकाणी दिशादर्शक बाणही रंगवलेले
आहेत. या मार्गाने आपण तारामती शिखराच्या पदरात पोहोचतो. येथेच
हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आहे. तारामती शिखराच्या उत्तर पायथ्याला लेणी
कोरलेली आहे. हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दारात एक पुष्करणी आहे. त्यामधील
कोनाड्यांमध्ये पूर्वी मूर्ती होत्या. मंदिराच्या समोर नंदी आहे. साधारण
दहाव्या अकराव्या शतकात झांज राजाने बांधलेल्या १२ मंदिरांमधील हे मंदिर
आहे. मंदिरावर कोरीव गुहा आहे. हरिश्चंद्रगडावरून शिवनेरी, हडसर, चावंड,
निमगिरी, सिंदोळा,जीवधन, गोरखगड, मच्छिंद्र, सिद्धगड,
माहुली,कलाडगड,भैरवगड, (मोरोशी), तसेच भैरवगड, कुंजरगड असे किल्ले दिसतात.
गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे –
कोकणकडा – या किल्ल्याचे
सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे येथील कोकणकडा. ३००० फुटांपेक्षाही उंच असा हा
कडा महाराष्ट्रातील सर्वांत उंच कडा म्हणून ओळखला जातो. हा कडा इंग्रजीतील
यु ‘U’ आकाराचा आहे. हा इतर कड्यांसारखा ९० अंशात नसुन बाह्य गोल आकाराचा
आहे. समोरुन बघितला तर नागाच्या फण्यासारखा हा कडा दिसतो. कड्याच्या
माथ्यावर झोपूनच याचे विराट रूप पहावे लागते. स्वच्छ हवा असली तर येथून
कल्याणपर्यंतचा प्रदेश दिसतो.
महाराष्ट्रातील इतर पारंपरिक किल्ल्यांपासून हा किल्ला वेगळा आहे. इतर किल्ल्यांमध्ये आढळणारी तटबंदी येथे दिसत नाही. या किल्ल्यावर प्राचीन लेणी आहेत, तसेच साधारणपणे १२व्या शतकापेक्षा जुने शालिवाहन काळातील शिवमंदिर आहे. सह्याद्रीतील अंत्यंत दुर्गम किल्ला म्हणून याची ओळख आहे. कोकणकड्यावर १८३५ मध्ये कर्नल साईक्सला इंद्रवज्र दिसले होते.
महाराष्ट्रातील इतर पारंपरिक किल्ल्यांपासून हा किल्ला वेगळा आहे. इतर किल्ल्यांमध्ये आढळणारी तटबंदी येथे दिसत नाही. या किल्ल्यावर प्राचीन लेणी आहेत, तसेच साधारणपणे १२व्या शतकापेक्षा जुने शालिवाहन काळातील शिवमंदिर आहे. सह्याद्रीतील अंत्यंत दुर्गम किल्ला म्हणून याची ओळख आहे. कोकणकड्यावर १८३५ मध्ये कर्नल साईक्सला इंद्रवज्र दिसले होते.
तारामती शिखर – तारामती
शिखर गडावरील सर्वात उंच शिखर आहे. उंची साधारणतः ४८५० फूट्.. शिखराच्या
पोटात एकूण सात लेणी आहेत. त्यापैकी एका गुफेत गणेशाची सुमारे साडेआठ
फुटाची भव्य आणि सुंदर मूर्ती आहे. याच गणेशगुहेच्या आजूबाजूला अनेक गुहा
आहेत. गुहेच्यासमोर उभे राहिल्यावर डावीकडे जाऊन पुढे वर जाणारी वाट
आपल्याला अर्ध्या तासाच्या चढाईनंतर तारामती शिखरावर घेऊन जाते. या
शिखरावरून समोरच दिसणारे जंगल, घाटावरचा आणि कोकणातील प्रदेश न्याहाळता
येतात. शिखरावर जाताना वाटेत अनेक गोमुखे लागतात. माथ्यावर दोनतीन शिवलिंगे
आहेत.