कोणतही शिवकाव्य येथे शोधा

📜⚔🗡अग्निदिव्य भाग - 31 🗡⚔📜



*अग्निदिव्य*

*लेखक : कल्याणीरमण बेन्नूरवार*

*नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜⚔*

*___⚔🚩⚔📜🚩_______*

*कुलीखानाच्या तुकड्या बऱ्हाणपूरच्या छावणीतून कूच करीत असतानाच दाऊदखानाचे खास टपाल घेऊन सांडणीस्वार दिल्लीच्या दिशेने सुटले. त्या खलित्यात कुलीखानाने आखलेली छावणीची व्यवस्था, त्याने ती व्यवस्था राबविण्यासाठी स्वत: घेतलेला पुढाकार आणि औरंगाबादेस जाऊन आगाऊ तजवीज करून ठेवण्याची खटपट वगैरे सारा तपशील तिखटमीठ लावून रसभरित वर्णन करून दिला होता. अनेक गोष्टींचे परस्पर श्रेय लाटण्यात आणि स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात त्याने कसर सोडली नव्हती.*

 *शिरस्त्याप्रमाणे थैली वजीर जाफरखानाकडे आली. दाऊदखानाचा खलिता त्याने हातातली सारी कामे संपवून निवांतपणे उघडला. लोडावर रेलून बसून तो आरामात खलिता वाचायला लागला आणि वाचता-वाचता एकदम ताठ झाला. त्याच्या मस्तकात झिणझिण्या उठू लागल्या. दिवसाउजेडी डोळ्यांसमोर काजवे चमकू लागले. दाऊदखानासारख्या अनुभवी दरबाऱ्याने, अत्यंत जबाबदार, म्हणजेच सर्वसामान्य लोक ज्यास पाताळयंत्रीपणा म्हणतात त्यात नावाजलेल्या मुत्सद्द्याने, बादशहाच्या अत्यंत भरवशाच्या माणसाने, असे वागावे याचे कोडे जाफरखानाला उलगडेनासे झाले. अफू मिसळलेल्या मोहाच्या दारूचे दोन-तीन पेले पोटात गेले, तेव्हा कुठे त्याचे डोके थोडे ताळ्यावर आले. तो आपल्या धन्याला पुरता ओळखून होता. दाऊदखानाच्या या खलित्यावर बादशहाची प्रतिक्रिया काय होणार याचे चित्र त्याला डोळ्यांसमोर अगदी स्पष्ट दिसू लागले. कुलीखानाला एकट्याला स्वतंत्रपणे फौज घेऊन महाराष्ट्रात जाऊ देणे हा मोठा भयंकरच प्रकार होता. शेवटी त्याने बादशहाचा सर्वांत विश्वासू सल्लागार दानिशमंदखान याचाच सल्ला घेण्याचे ठरविले. त्याला बोलावून घेण्यात वेळ न दवडता तो स्वत:च पालखीत बसून दानिशमंदखानाच्या हवेलीवर पोहोचला. साम्राज्याचा मुख्य वजीर असा अकस्मात आणि वर्दी न देता घरी आलेला पाहून दानिशमंदखानाची मोठी तारांबळ उडाली. भेटीचे नेहमीचे दरबारी सोपस्कार बाजूला सारून जाफरखानाने दाऊदखानाच्या खलित्यातली हकिकत भडाभडा सांगून टाकली.*


दानिशमंदखान तुम्हाला तर माहीत आहेच, आलाहजरत कुलीखानाच्या संबंधाने किती सावध असतात ते. तो अगदी हिंदुस्थानापासून दूर अफगाणिस्तानात असतानासुद्धा आलाहजरतांनी किती कडक निगराणी ठेवली होती. त्याला या दख्खन मोहिमेवर रवाना करण्याच्या आदल्या दिवशीसुद्धा त्यांनी आपल्या मनातला शक माझ्यासमोर जाहीर केला होता. आणि आता या मूर्ख दाऊदखानाने त्याला एकट्याला त्याच्या स्वत:च्या मुलखात रवाना केले आहे. आता त्याच्या फौजेत हिंदूसुद्धा आहेत. त्यांना फितवून कुलीखानाने काही फितवा केला तर आलाहजरत माझीसुद्धा खैर करणार नाहीत.


हे तर खरेच, पण ही गोष्ट आलाहजरतांपासून लपवून ठेवणे शक्यच नाही. त्यांचे स्वत:चे खबऱ्यांचे स्वतंत्र जाळे आहे. कित्येकदा असे घडते की, खबर त्यांना आधीच मिळालेली असते, पण ते आपल्याकडून बातमी सांगितली जाण्याची वाट बघतात; त्यामुळे ही खबर दडपण्याची कोशिश झाल्याचे उद्या उघड झाले तर? आणि ते लपून राहणे शक्यच नाही. मग तर त्याचा नतीजा अधिकच खतरनाक असेल. या सर्व पेचिद्या प्रसंगात जनाब वजीरेआझम साहेबांची माझ्यासारख्या एका नाचीज खोजाकडून काय अपेक्षा आहे?


अत्यंत नावडती गोष्टसुद्धा आलाहजरतांच्या गळी कशी उतरवायची याचे नेमके कसब तुमच्याकडे आहे. हा खलिता मी आलाहजरतांना पेश करीन तेव्हा तुम्ही माझ्यासोबत असावे आणि त्यांचा गुस्सा ठंडा करावा अशी माझी इंतजा आहे.


जहे किस्मत. मुघलिया सलतनतीचे मुख्य वजीरेआझम, उमदेतुल मुल्क, जनाबे आली हजरत जाफरखान हुजूर या प्राणाशी गाठ पडू शकणाऱ्या जोखमीच्या कामासाठी आपण या नाचीज खोजाला लायक समजलात हा गुलामाचा मोठा गौरव आहे. अलहमदुल इलल्लाह। पण वजीरेआझम हा सियासी मामला आहे. माझ्यासारख्या गुलामाने आपल्याला हे सांगणे ठीक नाही की, जेव्हा आलाहजरत सियासी बाबींची चर्चा करतात तेव्हा ते विषयाशी संबंध नसलेल्या व्यक्तीची दखलअंदाजी बरदाश्त करीत नाहीत. कित्येकदा त्यांनी जहाँआरा बेगमनासुद्धा खरीखोटी सुनावली आहे. मामला पेचिदा आहे यात दो राय नाही. बाब आपल्याच अखत्यारितील असल्यामुळे तिचा मुकाबला आपल्यालाच करावा लागणार. कोई चारा नहीं. गुलाम फक्त एकच मशवरा देऊ शकतो, तो म्हणजे दाऊदखानावर जे कोसळेल ते कोसळू दे. आपण त्याची तरफदारी करण्याची वा बचाव करण्याची कोशिश करू नये. बाकी हुजुरांचा अनुभव गुलामापेक्षा मोठा आहे.


दानिशमंदखानाने सोबत राहावे म्हणून जाफरखानाने बराच आग्रह करून पाहिला, पण तो काही बधला नाही. अखेर जाफरखान एकटाच बादशहाच्या भेटीसाठी निघाला. अजून कोणाचा सल्ला घेऊन वेळ वाया दवडण्याची आणि गोष्ट षटकर्णी करण्यापेक्षा त्याने दानिशमंदखानाच्या हवेलीतून तडक लाल किल्ला गाठणे पसंत केले.

जाफरखान लाल किल्ल्यात पोहोचला तेव्हा जुम्म्याच्या नमाजानंतर चालणारी बादशहाची मोती मशिदीबाहेरची मजलिस आटोपून तो शुक्रवारच्या धार्मिक चर्चेसाठी खास राखून ठेवलेल्या महालात मुल्ला-मौलवींशी धार्मिक चर्चा करीत बसला होता. विशेष म्हणजे जाफरखानासारख्या वयोवृद्ध सर्वोच्च दरबारी मानकऱ्यालासुद्धा बादशहासमोर बसण्याची परवानगी नव्हती, मात्र हे मुल्ला-मौलवी बादशहासमोर खुशाल बसत असत. एवढेच नव्हे तर बादशहा त्यांना खाऊ-पिऊ घालून त्यांची सरबराईसुद्धा करीत असे; त्यामुळे ही मुल्ला-मौलवी मंडळी मोठ्या गुर्मीत राहत असत.
जाफरखानाने बादशहाकडे वर्दी पाठवून भेटीची इजाजत मागितली. बादशहाने साफ नकार कळविला. पण जाफरखानाने चिकाटी सोडली नाही. त्याने देवडीवरच्या दरोग्यालाच खुद्द वर्दी घेऊन पाठविले. धर्मगुरूंच्या मजलिसमध्ये कोणी व्यत्यय आणलेला बादशहास खपत नाही हे माहीत असल्याने दरोगा टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करीत होता, पण अखेर साम्राज्याच्या मुख्य वजिराचा हुकूम डावलणे त्याला शक्य झाले नाही. भीतभीत तो बादशहासमोर उभा राहिला. अंगार बरसणारी हिरवी नजर टाळीत त्याने कशीबशी वर्दी दिली–


गुस्ताखी माफ आलमपन्हा, लेकिन गुलाम मजबूर है। जनाबे आली वजीरेआझम हुजूर दख्खन मुहीम के मुतालिक तनहाई में खबरे अहमियत कहना चाहते है।
अत्यंत नाखुशीने बादशहाने जाफरखानाला भेटीची इजाजत फरमावली. कुर्निसात करून जाफरखान खालमानेने समोर उभा राहिला. उष्ट्या-खरकट्या तश्तरींच्या कोंडाळ्यात बसलेल्या धर्मगुरूंवरून त्याने नापसंतीची नजर फिरविली. बादशहाची थंड प्रश्नार्थक हिरवी नजर त्याला जाळत होती. कपाळावरच्या आठ्यांचे जाळे सख्त नाराजी जाहीर करीत होते. पण तिकडे दुर्लक्ष करणे भाग होते. जाफरखान हलकेच पुटपुटला–
तनहाई में.
बादशहाचा अखेर नाइलाज झाला.
तखलिया.
धर्मचर्चा आणि त्याहीपेक्षा शाही मिष्टान्न अर्धवट सोडून जावे लागल्याने गुर्मीत असणारे मुल्ला-मौलवी वजिरावर डोळे वटारत, पण मुकाट्याने महालाच्या बाहेर पडले.
जाफरखान तुला माहीत आहे, आज जुम्म्याच्या पवित्र दिवशी माबदौलतांना दीन आणि इबादत याशिवाय सारे वर्ज्य असते.


जी आलमपन्हा. आलाहजरतांच्या दीनी मजलिसमध्ये व्यत्यय आणल्याबद्दल गुलामाला सख्त अफसोस आहे. पण मामला बडा पेचिदा आहे. दख्खनमधून दाऊदखानाचा खास खलिता आला आहे, महम्मद कुलीखानाच्या संबंधाने. तो आलाहजरतांपर्यंत तातडीने पोहोचवणे गुलामाला गरजेचे वाटते.
शब्द न बोलता बादशहा तसाच रोखून पाहत राहिला. मग एकदम उठून दोन्ही हात पाठीशी बांधून तो महालाबाहेर चालत निघाला. बावचळलेला जाफरखान असहायपणे पाहत राहिला. दारापर्यंत गेलेल्या बादशहाने मागे वळून त्याला मागोमाग येण्याची खूण केली. जाफरखान लगबगीने मागोमाग निघाला. आपल्या खासगी दिवाणखान्यात येऊन बादशहा मसनदीवर बसला. जुम्म्याच्या दिवशी बादशहा दिवाणखान्याकडे फिरकत नसल्याने खोजा आणि खिदमतगारांची मोठीच तारांबळ उडाली.
तो महाल सिर्फ दीनी कारोबार करण्यासाठी आहे. दुनियाई मामल्यांची चर्चा तिथे नको. आता बोल.
आलमपन्हा, दख्खनमधून दाऊदखानाची खास डाक आली आहे. त्याने कुलीखान संबंधाने बरेच लिहिले आहे. ते तातडीने हुजुरांच्या पायाशी पेश व्हावे म्हणून ही बेवक्तची जहमत देण्याची गुस्ताखी करणे भाग पडले.
काय? काय झाले? क्या कुलीखान भाग गया? या फिर त्या बेमुरवत जलील शिवाने त्याला खतम केले? मला टपाल मुळातून वाचून दाखव.


जसजसे पत्र वाचले जात होते, तसतसे बादशहाच्या चेहऱ्यावरचे रंग बदलत गेले. त्याच्या अंगाचा नुसता तिळपापड उडाला. दाऊदखानाच्या नावाने शिव्यांची लाखोली वाहणे सुरू झाले. शाही तालमीत वाढलेला बादशहा अशा नामांकित शिव्या देताना पाहून जाफरखान स्तंभित झाला. एरवी कुठल्याही प्रसंगी शांत आणि निर्विकार राहणारा बादशहा दरवाजात शेपटी अडकलेल्या मांजरासारखा थयथयाट करू लागला. संतापाने दिवाणखान्यातील वस्तूंची फेकाफेक करू लागला. त्या वेळी दाऊदखान समोर येता, तर आपला मूल्यवान गालिचा बरबाद होईल याची चिंता न करता त्याने त्याचे मुंडके जागच्या जागी, स्वत:च्या हाताने उडविले असते. या धिंगाण्यातच पत्राचे वाचन संपले. काही क्षणांत बादशहाने स्वत:वर ताबा मिळविला. काही वेळ तो पिंजऱ्यातल्या वाघासारखा येरझारा घालीत राहिला. मग काहीसा शांत होऊन पुन्हा मसनदीवर बसला. डोळे अजून आग ओकत होते. जहरी नागासारखे फूत्कार सोडत त्याने बोलण्यास सुरुवात केली.


लाहौलवलाकूव्वत. जाफरखान दाऊदने फार मोठी गफलत केली आहे. या क्षणी तो समोर मौजूद असता, तर माबदौलतांनी आपले हात त्याच्या नापाक रक्ताने खराब करून घेतले असते. त्या मूर्खाच्या एका नादान चुकीमुळे एवढी मोठी आणि महत्त्वाकांक्षी शाही मोहीम पाण्यात जाण्याचा धोका उभा झाला आहे. या मोहिमेत माबदौलतांच्या मोठ्या आशा-आकांक्षा गुंतल्या आहेत, हे त्या बेवकूफला जाहीर आहे. ही काही एखादी सर्वसामान्य मोहीम नव्हे, माबदौलतांनी शाही तख्तावरून पुकारलेला हा जिहाद आहे, हे तो सुअर की औलाद कसे काय विसरू शकतो? त्या मूर्खाने कुलीखानाला एकट्याला स्वतंत्रपणे तापीपार त्याच्या स्वत:च्या मराठी मुलखात पाठवायला मान्यता दिलीच कशी? कुलीखान एकटा, स्वतंत्रपणे, काफिरांचा भरणा असलेली मोठी मातब्बर फौज, तोफखाना, पीलखाना; या अल्ला, ही कल्पना केवढी भयानक आहे. जाफरखान, जेमतेम तीस-पस्तीस हजार फौज घेऊन तो सहा महिन्यांत अफगाणिस्तानसारखा जालीम देश जिंकण्याचा वादा करण्याची हिंमत दाखवतो. आता इथे तर चाळीस हजारांची कडवी ताज्या दमाची फौज, अवघा तोफखाना आणि सारा मुलूख त्याच्या पायाखालचा, त्याने सोबत भरपूर खजिनासुद्धा उचलला असेल, शंकाच नको, मग तर तो कयामत आणू शकतो. या अल्ला, काय म्हणावे दाऊदखानाच्या या बेवकूफीला? थेट खैबरपार अगदी अफगाणसारख्या अति दूरच्या प्रदेशातसुद्धा ज्याच्यावर सतत दहा वर्षे माबदौलतांची कडक नजर होती, इतकी वर्षे ज्याला मराठ्यांचा तर सोडाच, काफिरांचासुद्धा वारा लागू दिला नव्हता, तो कुलीखान स्वतंत्रपणे मराठी मुलखात! 


लाहौलवलाकूव्वत!! जाफरखान, काय म्हणावे या नादानपणाला? अय्याशीला चटावून आपले दरबारी इतके नादान झाले आहेत की, केवळ यांच्या भरवशावर राहून राज्य चालवायचे म्हटले तर शिवासारखा एखादा जालीम दुश्मन चार-पाच वर्षांत सरजमीने हिंदमधून इस्लामचे नामोनिशान नष्ट करून टाकील. हे मूर्ख राजपूत, बुंदेले, जाट, मराठे वगैरे हिंदू आपल्या फौजांमधून रक्त सांडत आहेत म्हणून माबदौलत मुघलिया तख्तावर बसून या काफिरांच्या देशातसुद्धा अल्लाच्या नावाने इस्लामी हुकुमत चालवू शकत आहेत. या अल्ला, हा बदतमीज, नादान बेअक्कल दाऊदखान, माबदौलतांची दहा वर्षांची अथक मेहनत मातीमोल करणार. हे मराठे मोठे धूर्त आणि बिलंदर असतात. कदाचित हा पाजी कुलीखान ही सारी फौज आणि सरंजाम घेऊन थेट शिवाला सामील होईल किंवा कदाचित ही आयती चालून आलेली संधी साधून हा बेवफा, बेइमान कुलीखान एकटा तरी शिवाकडे पळून जाईल. त्याला शिवानेच बुढ्ढ्या जयसिंहाकडे पाठवले हा माबदौलतांचा शक खरा असेल, तर तो हमखास असे केल्याशिवाय राहणार नाही. तो शिवासुद्धा मोठा बिलंदर आहे. पूर्वी त्याने आपल्या मेहुण्याला हिंदू करून घेतले होते. आता तो कुलीखानाला पण हिंदू करून घ्यायला कमी करणार नाही. आता तर तो स्वत:ला काफिरांचा सर्वसत्ताधीश सुलतान म्हणवून घेतो. पंडितांना मोठी लालूच दाखवून वा जबरदस्ती करून आपली मनमानी करायला तो भाग पाडू शकतो. खुदा ना खास्ता असे झाले तर तो नामुराद शेकडो-हजारो मुसलमानांना पुन्हा हिंदू करून घेण्याचा नवा खटाटोप उत्पन्न करून इस्लामसाठी खतरा पैदा केल्याशिवाय राहणार नाही. या अल्ला, काय करावे आता? या नामुराद हरामखोर दाऊदखानाचे आता काय करावे?


बादशहा पुन्हा उठून येरझारा घालू लागला. अशा परिस्थितीत नेमके काय बोलावे हे न सुचून जाफरखान मुकाट उभा राहिला. काही वेळाने बादशहाचे मन स्थिर झाले. त्याने लिखाणाचे सामान घेऊन मुन्शीला बोलावून घेतले. दाऊदखानाच्या नावाने धाडायचे फर्मान तो स्वत:च सांगू लागला. त्याचा अवघा संताप, चीड आणि मनस्ताप शब्दाशब्दांतून व्यक्त होत होता. एकेक शब्द म्हणजे जळता निखारा होता. जाळून भस्म करणारा. फर्मानात दाऊदखानाला जशा भरपूर शिव्या होत्या तशाच धमक्यासुद्धा होत्या. बादशहाच्या धमक्या पोकळ नसतात हे अवघी सलतनत जाणून होती. कुलीखानाला जसा असेल तसा, जरूर पडली तर मुसक्या आवळून तळावर परत आणण्याचा हुकूम बादशहाने दिला. हुकमाची तामील करण्यासाठी दोन-तीन नामांकित सरदारांसोबत आठ-दहा हजार फौज देऊन फर्मान मिळताक्षणी रवाना करण्याचासुद्धा हुकूम दिला. पत्रातला विखार आणि अंगार बघून पत्र लिहून घेणारा मुन्शी थराथरा कापू लागला. डाव्या हाताने कपाळावरचा घाम पुसता पुसता त्याची पुरेवाट झाली.



हातोहात बादशहाने दिलेरखानाच्या नावे दुसरे फर्मान सांगण्यास सुरुवात केली. त्यात कुलीखान संबंधाने विशेष काही न लिहिता औरंगाबादवरून शिवाच्या दौलतीत जाणाऱ्या सर्व वाटा रोखून धरण्याचा आणि पुढील हुकूम मिळेपर्यंत कोणाही मोगली अंमलदारास मुघली सीमा ओलांडण्याची सख्त मनाई करण्याचा हुकूम जारी केला. कुणी शिवाच्या दौलतीवर हल्ला करण्याचा बहाणा केला तरी त्यास रोखण्याचा इशारा दिला. इतकेच नव्हे तर व्यापारी काफिले आणि लमाणांचे तांडेसुद्धा या हुकमास अपवाद न करण्याची सख्त ताकीद दिली.


जाफरखान, ही दोन्ही फर्माने आजच्या आज अष्टौप्रहर दौडणाऱ्या जासूदांच्या हातून दख्खनमध्ये रवाना कर. दाऊदच्या या पत्राची खबर बाहेर फुटू देऊ नकोस. माबदौलत या संबंधाने नवी फर्माने लवकरच जारी करतील.
जो हुकूम आलमपन्हा.
मुन्शीला पुढे घालून जाफरखान बाहेर पडला तेव्हासुद्धा त्याच्या पायांची थरथर थांबली नव्हती. या प्रकरणाची झळ त्याला लागू न दिल्याबद्दल तो अल्लाचे मनोमन आभार मानीत होता.
बादशहाचे फर्मान वाचताच दाऊदखानाची धुंदी क्षणात उतरली. त्याच्या डोळ्यांसमोर काजवे चमकू लागले. बादशहाच्या खफा मर्जीचा नतीजा काय काय असू शकतो त्याने डोळ्यांनी पाहिले होते. वेळ न गमावता त्याने इखलासखान आणि मीर अल्तमशखान यांना आपल्या डेऱ्यात बोलावून घेतले. शाही फर्मानातील ‘बराचसा’ भाग गाळून फक्त कुलीखानासंबंधीचा भागच त्यांच्या कानावर घातला आणि त्याला परत घेऊन येण्याच्या बादशहाच्या हुकमाची तामील करण्याची कामगिरी त्यांच्यावर सोपविली. त्यांच्यासोबत दहा हजारांची फौज तैनात करून दिली. पण कितीही घाई करायचे म्हटले तरी मोगली कारभारात एवढ्या फौजेचा बारदाना हलवायचा म्हणजे चार-पाच दिवस लागणारच. त्याने कितीही जपायचे आणि लपवायचे म्हटले तरी शाही फर्मानाच्या गोष्टी फौजेत पसरल्याच; त्यामुळे त्याला तातडीने काही करणे भाग होते. त्याने त्याच्या अत्यंत विश्वासातील चार नजरबाज कुलीखानाची खबर काढण्यासाठी लगोलग रवाना केले. तापी पार झाल्यावर लगेचच नजरबाजांना खबर मिळाली की, कुलीखान साल्हेर गडाजवळ जंगलात मुक्काम करून आहे. नजरबाजांच्या तुकडीने झपाट्याने दौड मारून कुलीखानाचा पडाव गाठला. त्या वेळी दुपारच्या जेवणाची तयारी सुरू होती. नर्दुल्लाखानाने नजरबाजांच्या जुमलेदारास कुलीखानासमोर पेश केले. त्याची गुर्मी आणि तोरा पाहून काहीतरी बिनसले असल्याचे कुलीखानाच्या लगेच लक्षात आले.



असलाम आलेकुम जनाबे आली. हजरत सरलष्कर हुजूर साहब का पैगाम पेश करने की इजाजत हो.
इर्शाद.
हजरत सरलष्कर हुजूर आपल्या दिरंगाईमुळे सख्त नाराज आहेत आणि त्यांनी आपल्याला असाल तसे ताबडतोब हुजूर दाखल होण्याचा हुकूम बजावला आहे. तेव्हा हुजुरांनी आमच्यासोबत आजच बऱ्हाणपूरकडेच कूच करावे.
गोड गोड बोलण्यात गुंतवून कुलीखानाने त्याच्याकडून अवघी वित्तंबातमी काढून घेतली. फौज औरंगाबादेस हलविल्याने आलाहजरत कसे खफा झाले आहेत आणि त्यांनी अष्टौप्रहर दौडवत दाऊदखानास कसे कडक फर्मान पाठविले आहे. इतकेच नव्हे तर अशा प्रकारचेच फर्मान दिलेरखानाकडे पण पाठविले आहे वगैरे सारे त्याने सांगून टाकले. हे ऐकून कुलीखान मनातून हादरला. मनात अशुभाची पाल त्याच्या चुकचुकली. आपली छावणीची योजना आणि आत्ता आपण करीत असलेली कारवाई यामधून बादशहाने नेमके तर्क काढले असणार हे अनुभवाने लगेच त्याच्या लक्षात आले. मात्र वरकरणी काहीच न दाखविता त्याने नजरबाजांचा चांगला पाहुणचार केला. त्यांना थोडा अहेरसुद्धा केला. मोठ्या इतमामाने त्यांना निरोप देताना त्याने दाऊदखानाला संदेश दिला. कोणतीही काळजी करू नये, औरंगाबादेत सर्व व्यवस्था पूर्ण झाल्या आहेत, तीन-चार दिवसांत इथला मुक्काम हलवून सर्व तपशीलवार पडताळा देण्यासाठी बऱ्हाणपुरास दाखल होत असल्याचा हा संदेश होता. त्याशिवाय जिहादसाठी आपण कसे कटिबद्ध आणि बादशहाशी कसे वचनबद्ध आहोत याचासुद्धा वळसा दिला. मोहोरबंद न केलेला, वजिराच्या नावे लिहिलेला एक खलितासुद्धा त्याने जुमलेदाराच्या हवाली केला. त्या खलित्यात त्याने बादशहा, मुघल तख्त आणि इस्लाम यांवरच्या आपल्या निष्ठांचे मोठे जोरकस चित्र रंगविले. शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब शिल्लक असेपर्यंत आपण जिहाद लढत राहू अशी फुशारकीसुद्धा मारली. बादशहाच्या मनातील संशय आणि गैरसमज दूर करावा अशी विनंती मोठ्या आर्जवी भाषेत वजिराला केली होती. नजरबाज माघारी रवाना झाले.


दरम्यान, बऱ्हाणपुराहून फौजबंद होऊन निघालेल्या इखलासखान आणि मीर अल्तमशखान यांची आणि नजरबाजांची तापीपासून दोन मजलांवर गाठभेट झाली. कुलीखानाशी झालेल्या भेटीचा रसभरित तपशील जुमलेदाराने दोन्ही खानांस सांगितला. एवढेच नव्हे तर मोहोरबंद नसलेले पत्रसुद्धा वाचायला दिले. सारा वृत्तान्त ऐकून आणि ते पत्र वाचून दोन्ही खान कुलीखानाबाबत अगदी निश्चिंत झाले. आलाहजरत विनाकारण प्रत्येकाचा संशय घेत असतात; त्यातलाच हा प्रकार. कुलीखान चार-पाच दिवसांत परत येतोय तर उगीच भरउन्हाळ्यात या निपाण्या देशात रखडपट्टी करण्यापेक्षा इथेच त्याची वाट पाहावी आणि त्याला सोबत घेऊन बऱ्हाणपूर गाठावे. म्हणजे कोणतीही दगदग न करता शाही हुकमाची तामील केल्याचे श्रेय अनायासे पदरात पडेल. नजरबाज बऱ्हाणपुराकडे रवाना झाले, खानांनी छावणी टाकली. फौज सुस्तावली.


नजरबाज बऱ्हाणपुरास पोहोचले. कुलीखानाच्या भेटीचे वृत्त दाऊदखानास रुजू झाले. मिळालेल्या अहेरास जागून जुमलेदाराने कुलीखानाच्या बाजूने त्यात थोडे मीठ-तिखटसुद्धा घातले. कुलीखान बऱ्हाणपुरास येण्यासाठी निघाल्याचे ऐकून त्याच्या जिवात जीव आला. वजिराला लिहिलेले पत्र वाचून तर त्याला अधिकच हायसे वाटले. मीर अल्तमश आणि इखलासखान यांची वाटेत भेट झाल्याचे आणि ते दोघे कुलीखानास सोबत घेऊन येणार असल्याचे जुमलेदाराने सांगताच दाऊदखानाला शाही हुकमाची आपण ताबडतोब पूर्ण तामिली केल्याबद्दल अगदी कृतकृत्य वाटले. त्याने लगोलग वजिरासाठी खलिता लिहिण्यास घेतला.


कुलीखानासंबंधाने काळजीचे कोणतेच कारण नसून तो बऱ्हाणपूरच्या वाटेवर आहे. आलाहजरतांच्या वतीने त्याने जिहाद पुकारला असून जोपर्यंत सारी दख्खन दार-उल-इस्लाममध्ये तबदील करीत नाही तोपर्यंत तलवार म्यान न करण्याची त्याने शपथ घेतलेली आहे. वगैरे तर लिहिलेच त्याशिवाय आपण कुलीखानाबाबत किती आणि कसे सावध आहोत, त्याच्यावर सख्त नजर राहील याची कशी तजवीज केली आहे, त्याच्यासोबत पाठविलेल्या फौजेत काफिर अधिकारी आणि सैनिक असणार नाहीत याची आपण कशी काळजी घेतली आहे; त्याशिवाय त्याच्यासोबत खान-इ-सामान इफ्तीखारखानास रवाना केले असून, तो औरंगाबादेतच कसा तळ ठोकून राहणार आहे वगैरे फुशारकी मारण्यास तो विसरला नाही. त्याशिवाय इखलासखान आणि मीर अल्तमश त्याला बंदोबस्ताने कसे आणत आहेत वगैरे तपशिलाने कळविले. हा खलिता आणि कुलीखानाने वजिरास लिहिलेले पत्र एकाच लखोट्यात मोहोरबंद करून त्याने अष्टौप्रहर दौडणाऱ्या जासूदांच्या हाती दिल्लीस रवाना केले.



दाऊदखानाचे ताजे टपाल हाती येताच वजीर जाफरखानाने हातातली सारी कामे एका बाजूला सारून दोन्ही पत्रे वाचून काढली. पत्रे वाचून त्याचा जीव भांड्यात पडला. दख्खनमधून काय खबर येते आणि बादशहाची वीज कोणाकोणावर कसकशी कोसळते या काळजीपायी गेले कित्येक दिवस त्याचा जीव थाऱ्यावर नव्हता. काही वेळ तो डोळे मिटून स्वस्थ बसून राहिला. समाधान साजरे करण्यासाठी त्याने दारूचे दोन पेले झपाट्याने रिचविले. तोंडाचा वास लपविण्यासाठी सुगंधी किवाम आणि केशर-कस्तूरी घातलेले पान तोंडात कोंबले आणि तो तडक बादशहाच्या मुलाखतीसाठी निघाला.


बादशहा जनानखान्यातल्या आपल्या महालात बसून काही कौटुंबिक तंटे सोडविण्यात मश्गूल होता. जाफरखानाने वर्दी पाठविली–
कुलीखान के मुतालिक हालात-ए-हाजरा बयान करना है.
बादशहाने तातडीने समोरचे कामकाज बंद केले आणि सर्व बेगमांना महालातून बाहेर जाण्याचा हुकूम दिला. कुर्निसात करीत वजीर आत आला.
क्यों जाफरखान, चेहरा खिलाखिलासा दिसतो आहे.
जी आलमपन्हा, खबर तशीच समाधान देणारी आहे. 
प्रथम त्याने दोन्ही पत्रांचा गोषवारा तोंडी सांगितला आणि नंतर पत्रे मुळातून वाचून दाखविली. पत्रे ऐकून बादशहाचा राग थोडा निवळला. पण फुणफुण शिल्लक राहिलीच.
कुछ भी कहो जाफरखान, पण काहीतरी गडबड होणार असल्याची शंका अजून मनातून जात नाही. माबदौलतांना अजून असे वाटते की, कुलीखानाला दिल्लीत वापस आणावे आणि माबदौलत जातीनिशी दख्खनमध्ये उतरतील तेव्हाच त्याला सोबत न्यावे आणि इस्लामची सेवा डोळ्यांदेखत करवून घ्यावी.
आलमपन्हा, आमच्यासारख्या पापी माणसांना जे दिसत नाही, जाणवत नाही ते आलाहजरतांना स्पष्ट दिसते म्हणून तर अवघी आवाम हजरतांना जिंदा पीर म्हणून पुकारते. मगर गुस्ताखी माफ हुजूर, कुलीखानाने पवित्र कुराणावर हात ठेवून कसम घेतली आहे. धर्मांध मराठे आता दहा वर्षांचा अरसा गुजरल्यानंतर त्याला जवळ करतील असे गुलामाला वाटत नाही. सियासतच्या नजरियाने विचार केला तरी शिवाला त्याची आता काही गरज वाटत असेल असे जाणवत नाही, कारण कुलीखानाच्या गैरहाजरीत शिवाने चांगलेच हातपाय पसरले आहेत. नेताजी माने दुसरा शिवा यह अब तारीख बन चुकी है, हकिकत नहीं. लिहाजा गुलामाला असे वाटते की, इतक्यात घाई करू नये. वाटल्यास एखादा भरवशाचा माणूस त्याच्यावर खास नजर ठेवण्यासाठी म्हणून पाठवावा. माझा माणूस त्याच्यावर नजर ठेवून आहेच. शिवाय जनाब महाबतखानांचा माणूस त्याचा अंगरक्षक म्हणून आजसुद्धा त्याच्या मागे सावलीसारखा आहेच. त्या दोघांकडूनही काही संशयास्पद वाटावे अशा खबरा नाहीत. तरीसुद्धा दाऊदखानाला सख्त सावधगिरीच्या गुप्त सूचना पाठवाव्यात. दिलेरखान लवकरच दख्खन मोहिमेच्या या फौजेत शरीक होणार आहे. त्याला तातडीने औरंगाबादेस डेरेदाखल होण्याचा हुकूम करावा आणि कुलीखानाच्या नकळत पण तो सतत त्याच्या नजरेसमोर असेल असे पाहावे, असा हुकूम करावा. तो कुलीखानाला फार पूर्वीपासून नीट ओळखून असल्याने हे काम करण्यास त्याच्याइतका लायक माणूस माझ्या नजरेत नाही. बोलताना जीभ अडखळते. पण गुलाम आलाहजरतांचे मीठ खातो; त्यामुळे तख्ताच्या आणि आलमपन्हांच्या जे हिताचे, ते कोणताही पर्दा न ठेवता आलाहजरतांपर्यंत पोहोचवणे गुलामाचे फर्ज आहे. जान की अमान पाऊँ तो कुछ बयान करने की इंतजा है.


हुं कहो, तुझे म्हणणे माबदौलतांच्या मर्जीस येत आहे. बेहिचक बोल.
गुस्ताखी माफ आलमपन्हा, पण शहजादा अकबरांची लक्षणे ठीक दिसत नाहीत. दुर्गादास राठोडच्या मार्फत तो राजपुतांशी लगट वाढवीत आहे. सगळ्यात चिंतेची बाब म्हणजे त्याला जनानखान्यातून फूस आहे. हातात पुख्ता सबूत नसल्याने गुलाम या क्षणी नाव घेणे मुनासिब समजत नाही, पण लवकरच सबूत मिळतील याची खात्री आहे. त्याशिवाय शहजादा मुअज्जम आणि त्यांच्यातली अनबन वाढते आहे. कधी खबरा येतात की, दोघे हातमिळवणी करून काही गडबड करू पाहत आहेत. या सर्व मामल्यात गुलामाने चौकशी सुरू केलीच आहे. लवकरच पुराव्यानिशी मुस्तकीम हकिकत गुलामाच्या हातात येईल. त्या वेळी सारा तपशील आलाहजरतांच्या पायाशी रुजू होईलच. गुलामाला असे वाटते की, काही गडबड होण्याची आलाहजरतांना जी जाणीव होत आहे ती कदाचित या संबंधानेसुद्धा असण्याची शक्यता आहे; त्यामुळे गुलामाला असा मशवरा द्यावा वाटतो की, खबरदारी म्हणून नजीकच्या भविष्यात आलाहजरतांनी दिल्ली सोडून दूर जाऊ नये.


बराच वेळ माळ नुसतीच फिरत राहिली. ओठ कलमा पुटपुटत राहिले. बऱ्याच वेळाने बादशहाच्या ओठातून हलकेच शब्द उमटले–
ठीक आहे. तुझ्या बोलण्यातसुद्धा काही दम दिसतो आहे. कुलीखानाला आखरी मौका देऊन पाहू. त्याच्या मनामध्ये बगावत करण्याचा खयाल येतो आहे अशी हलकीशी खबर जरी आली तरी माबदौलत त्याचा पुरता सत्यनाश करून टाकतील. त्यासाठीच तर त्याचा सारा जनानखाना शाही निगराणीत ठेवला आहे. तू सुचवलेस तसे फर्मान आजच दिलेरखानाकडे रवाना कर. त्याला सरहद्दी मोकळ्या करण्याचा हुकूमसुद्धा रवाना होऊ दे. कुलीखानाच्या खास निगराणीसाठी माबदौलत माणूस रवाना करतील. त्यामध्ये तू दखल देऊ नकोस. माबदौलतांचा जुम्मा खराब केल्याचा दंड म्हणून पन्नास अश्रफींची खैरात फकिरांमध्ये वाटून टाक.
जो हुकूम आलमपन्हा.
पाठ न दाखविता जाफरखान बाहेर पडला.

दाऊदखानाचे नजरबाज मुकाट्याने रवाना झाले खरे, पण कुलीखानाच्या डोक्यात चिंतेचा भुंगा मागे ठेवून गेले. बादशहाचे फर्मान त्याच्या स्थानाला धोका पोहोचविणारे जसे होते तसेच भयाण भविष्याला कारण ठरणारेसुद्धा होते. त्याला बऱ्हाणपुरास नेण्यासाठी निघालेली दहा हजारांची फौज एकदा येऊन थडकली की, सारेच अवघड होऊन बसणार होते. मोठ्या मिनतवारीने जमून आलेला हा मौका हातून निसटला तर पुन्हा कधीच काही हालचाल करता येणार नव्हती. किंबहुना अधिकच सजग झालेला बादशहा अशी संधी कधी उत्पन्नच होऊ देणार नव्हता. ही संधी साधतानासुद्धा जरा गफलत झाली तरी मस्तक धडावर राहणार नाही याची त्याला कल्पना आली. एक वेळ मस्तक उडविले तरी परवडले निदान एका झटक्यात सारे प्रश्न निकालात निघतील. पण क्रूर पाताळयंत्री बादशहा इतक्या सहजासहजी त्याची सुटका होऊ देणार नाही हेसुद्धा तो जाणून होता. सर्वप्रथम बादशहा ओलीस ठेवलेला त्याचा कुटुंबकबिला नष्ट करून टाकणार आणि त्याला पुन्हा एकदा दख्खनमधून उचलून दूर हिमालयपार तिबेटमध्ये किंवा आसामच्या नागा भूमीतील बिकट डोंगरी जंगलांमध्ये मरेपर्यंत कुजवत ठेवणार याचे भय त्याला सतावू लागले. तिबेट जिंकून घेण्याचे वेड कोणा एका मलंगाने बादशहाच्या डोक्यात भरविले होते आणि त्या स्वारीसाठी त्याला नेमका माणूस सापडत नव्हता. कुलीखानाला तिकडे पाठविण्यासाठी त्याला मग आयतेच निमित्त मिळणार होते.


रात्री जेवणानंतर संधी मिळताच त्याने आफताबखानास परिस्थितीची पूर्ण कल्पना दिली आणि लवकरात लवकर महाराजांकडून कौल मिळविण्याची खटपट करण्याचा त्याला हुकूम दिला. कुलीखानाचे नशीब त्या सुमारास चांगलेच जोरावर होते म्हणायचे. कारण दुसऱ्याच दिवशी त्याला वद्य चतुर्दशीचा निरोप समजला. त्याला एकदम हायसे वाटले. दुपारी तळ निवांत असताना त्याने आफताबखान आणि नुर्दल्लाखान यांना एकत्र बोलावून योजनेचा सारा तपशील पुन्हा एकदा नीट समजावून घेतला. योजनेत त्यांनी जे करायचे आणि करवून घ्यायचे होते त्या संबंधाने तपशीलवार सूचना दिल्या. कुठेही कच्चा दुवा किंवा संभ्रम राहून गफलत होणार नाही याची खात्री करून घेतली.


नर्दुल्लाखान, आता या विषयावर आपली परत चर्चा होणार नाही; आता फक्त कृती. आपल्याला हीच एकमात्र संधी आहे हे नीट लक्षात ठेव. ही हुकली की सर्वनाश; त्यामुळे केसाइतकी चूक होता कामा नये. आफताब…
जी सरकार…
छापा पडताच तू सगळ्यात प्रथम हाताशी लागेल त्या आपल्या गोटातील माणसाला ठार करून त्याचा मुडदा आमच्या पलंगावर टाकायचास आणि पेटवून द्यायचा. पलंगावर जास्तीच्या चार-दोन गाद्या टाकून ठेव, वरती तेल ओत; म्हणजे मुडदा पुरता जळून राख होईल. गनिमाने आमचा काटा काढला असेच सर्वांना वाटेल.
जी सरकार.
नर्दुल्लाखान, शिकारीनंतर तळावर जेवणाची धांदल सुरू असतानाच सोबतचा सारा खजिना तू आणि तुझी माणसे आपल्या अंगावर लपवून ठेवून सज्ज होतील. पुरेशा पिवळ्या पगड्यांचा किंवा पागोट्यांचा बंदोबस्त लगेचच झाला पाहिजे. गोटातील कोणाला आपल्या बेताचा सुगावा लागतो आहे असा संशय आला तरी काही ना काही निमित्त काढून साफ कापून काढा.
हुकूम सरकार. चिंता करू नका, सारे ठीक होईल. आपणसुद्धा सदासर्वदा सावध राहावे.
वद्य चतुर्दशीचा दिवस उजाडला. तळावर सकाळपासून शिकारीच्या खेळाची धांदल-गडबड उडाली. तळावर पहाऱ्यासाठी फक्त नर्दुल्लाखानाचीच माणसे ठेवून बाकी साऱ्यांना बाहेर काढण्यात आले. अगदी शागिर्द-खिदमतगारालासुद्धा मागे राहू दिले गेले नाही. दिवसभर हाके घालून जंगल पार दणाणून सोडले. एकही जनावर जागेवर राहिले नाही. झाडावर पाखरू बसणे दुरापास्त झाले. सर्वत्र नुसता एकच कल्लोळ भरून राहिला. ओरडून ओरडून घसे सुकले, ढोल-ताशे बडवून हातातले बळ संपले तरी दुपारच्या जेवणासाठीसुद्धा कोणाला उसंत घेऊ दिली गेली नाही. उन्हे कलती होईतो जवळपास आठ-दहा हरणांची शिकार झाली. दोन चांगले भले दांडगे एकुलगेसुद्धा उठले होते, पण डुकराचे मांस मुसलमानांसाठी निषिद्ध म्हणून त्यांना सोडून देण्यात आले. एक बिबट्या थोडक्यात बचावला.



थकूनभागून शिकार बांधून घेऊन मंडळी तळावर परत आली तेव्हा सूर्य साल्हेर गडाच्या आड गेला होता. कुलीखानाने उदार होऊन सारी शिकार शिपायांमध्ये वाटून टाकली. शिपाई एकदम खूश होऊन गेले. त्यांचा जल्लोष थोपवीत त्याने अजून एक घोषणा करून त्यांना सुखद धक्का दिला. त्या रात्रीचा पहारा फक्त नर्दुल्लाखानाचा दस्ता, जो सारा दिवस तळावरच थांबून होता, सांभाळणार आणि बाकीच्यांना पूर्ण आराम करण्यास मोकळीक राहणार. मात्र बऱ्हाणपुरावरून तातडीचे बोलावणे आल्या कारणाने उद्या उन्हे चढण्यापूर्वी तळ उठवून कूच करायचे होते; त्यामुळे रात्री गाणे-बजावणे वगैरे करत जागरण करण्यास सख्त बंदी घालण्यात आली. एका बुजुर्ग जमादाराने चाचरत विचारले–
हुजुरांच्या दर्यादिलीसाठी आणि जर्रा नवाजीसाठी आम्ही सारे एहसानमंद आहोत. लेकिन हुजूर जान की अमान पाऊँ तो कुछ अर्ज करू.
कहो.
हुजूर, उद्या अमावास्या आहे. तळ परवा सकाळी हलवला तर चालणार नाही का?
कुलीखान एकदम संतापला. डोळे काढत तारस्वरात तो ओरडला–
खानदानी मुसलमान म्हणवणाऱ्यांमध्येसुद्धा आजकाल कुफ्र शिरलेला दिसतोय. तुम्हाला माहीत नाही का, सगळे दिवस अल्लानेच निर्माण केले असल्याने सारखेच पाक असतात. पुन्हा कोणी अशी काफिरानी हरकत केली तर खपवून घेतली जाणार नाही. अशी नापाक हरकत इस्लामची नाफर्मानी समजली जाईल आणि शरियतमध्ये त्याची सजा फक्त मौत आहे हे पक्के ध्यानात ठेवा.


नर्दुल्लाखानाची माणसे दिवसभर नुसतीच माश्या मारत रिकामी बसली नव्हती. तर दिवसभरात त्यांनी भरपूर जळण गोळा करून आणले होते. जंगलातल्या भिल्लांकडून मोहाची दारू मिळवून ठेवली होती. कुलीखानाच्या लक्षात येणार नाही अशा पद्धतीने त्यांनी ती ‘गुपचूप’ शिपायांमध्ये वाटून दिली. दिवसभर दमणूक झालेल्या शिपायांना असा श्रमपरिहार हवाच होता. बऱ्हाणपूर सोडल्यापासून ते या सुखाला आचवले होते; त्यामुळे हरणांच्या चमचमीत सागुतीवर आडवा हात मारताना त्यांनी मोहाच्या दारूचीसुद्धा मनसोक्त मजा लुटली. खाऊन-पिऊन तट्ट होऊन सारा तळ लवकरच गपगार झोपी गेला. जंगली श्वापदांना दूर ठेवण्यासाठी तळाच्या मध्यभागी एक भली मोठी शेकोटी पेटवून ठेवली होती. पहारेकऱ्यांच्या ‘हुश्शार’च्या हाकाऱ्यांशिवाय सारे काही शांत शांत होते. कुलीखानाला मात्र झोप नव्हती. आपल्या पलंगावर तो टक्क जागा होता.


रात्रीचा दुसरा प्रहर चढत होता. नर्दुल्लाखान आणि आफताबखान कुलीखानाच्या डेऱ्यात आले. अगदी हलक्या आवाजात कुलीखानाने हुकूम दिला–
हरएक घोडं जीन कसून तयार ठेवा. आमच्या तंबूच्या पिछाडीला सारी घोडी एकत्र करून ठेवा. जनावरांची तोंडे बंद राहतील याची काळजी घ्या. झोपलेल्यांना चाहूल लागता उपयोगाची नाही. आपण जसे ही घोडी वापरणार आहोत तशीच गडावरून येणारी आणि आपल्यासोबत असणारी शिबंदीसुद्धा हीच घोडी वापरणार आहेत. कारण गडावरून येणारी फौज चालत येणार आहे. तळावर एक जरी घोडा मागे राहिला तर याद राखा. दोनशेच्या दोनशे घोडी आपल्यासोबत आली पाहिजेत. कोणी पळून जाऊ म्हणेल तर एकही जनावर हाताशी असता कामा नये.


अगदी गुपचूप सारी घोडी जीन आणि पडशा कसून एका बाजूला अगदी जय्यत तयार ठेवण्यात आली. नर्दुल्लाखान आणि आफताबखान यांच्यासह प्रत्येकाने अंगरख्याच्या आत ‘खजिन्याच्या बंड्यांमधून’ सारा खजिना अंगावर बांधून घेतलेला होता. त्यात मूल्यवान रत्ने आणि सोन्याच्या लगडींचा मोठा वाटा होता. थोडी म्हणजे काही लाखांची रक्कम अश्रफी आणि रुपयांमध्ये होती. आता फक्त इशारतीची वाट पाहायची होती. मंडळी डोईला पिवळी पागोटी बांधून, लग्नाच्या वऱ्हाडासारखी सजली होती किंवा जणू दंडांना पिवळी फडकी बांधून भामरागडावर शंभू महादेवाच्या यात्रेला निघावीत अशी शोभत होती. सगळा आसमंत नीरव शांततेने भरून गेला होता. दिवसभरात चाळवली गेलेली रानातील जनावरेसुद्धा बहुधा शांत झोपली असावीत. रातकिडे मात्र ठरावीक लयीत किरकिरत वेळ मोजत होते.

साल्हेरच्या बुरुजावरून सरनोबत हंबीरराव मोहिते दूरवर खिंडीच्या पलीकडे मोगलाई हद्दीत असणाऱ्या जंगलात चाललेली धावपळ निरखीत होते. शेजारी डाव्या हाताला बहिर्जी नाईक, तर उजव्या हाताला गडाचा किल्लेदार असे उभे होते. घनदाट झाडोऱ्यामुळे स्पष्ट काही दिसत नसले तरी ढोल-ताशांचे आवाज बऱ्यापैकी ऐकू येत होते. रानश्वापदांची धावपळ आणि भयभीत पक्ष्यांच्या हालचाली जाणवत होत्या. त्यावरून शिकारीचा खेळ पूर्ण जोशात सुरू असल्याचे लक्षात येत होते. हंबीरराव गालातल्या गालात हसत होते. त्यांना रायगडावर झालेली चर्चा आठवत होती. नेताजीरावांबद्दल महाराज एवढे हळवे व्हावेत याचे त्यांच्या मनात पडलेले कोडे सुटतेय अशी अंधूक शंका त्याच्या मनात बहुधा डोकावू लागली असावी.


खिंडीपल्याडच्या मोगली तळावर छापा मारण्याची तयारी जय्यत होती. कडुसे पडण्याच्या बेतासच जेवणे उरकून जय्यत तयार राहण्याची ताकीद शिबंदीला दिली गेली होती. आभाळात अद्याप संधिप्रकाश रेंगाळत होता. एखाद-दुसरी चांदणी अंधारल्या आकाशात झळकू लागली होती. गडावरचे चारशे मावळे आणि रायगडावरून आलेले दोनशे मावळे हत्यारेपात्यारे बांधून महादरवाजाशी जय्यत तयार होऊन बसले होते. रायगडावरून आलेली अर्धी शिबंदी आपल्या पडशा पाठीशी बांधून आली होती.
सहाशे घोड्यांच्या टापांचा नाद घुमून गनीम सावध होण्याची शक्यता होती म्हणून फौज चालत जाणार होती. कुणी काय करायचे याच्या अगदी स्पष्ट आणि सख्त सूचना प्रत्येक मावळ्याला आगाऊच दिलेल्या होत्या; त्यामुळे आयत्या वेळी सांगण्यासारखे काही उरले नव्हते. आयत्या वेळी सूचना देण्याचा मुळी शिरस्ताच नव्हता. तळावरचा पिवळा फेटा नसलेला एकही गनीम कोणत्याही स्थितीत जिवंत ठेवायचा नाही अशी कडक ताकीद होती. रायगडावरच्या बहिर्जीच्या तुकडीला सूचना होती, त्यांनी कापाकापी किंवा अन्य गोष्टींमध्ये लक्ष न घालता, दंगल सुरू होताच कुलीखान आणि पिवळी पागोटी बांधलेल्या त्याच्या अंगरक्षकांना घेरायचे. तळावरची आधीच फोडून ठेवलेली मंडळी घोडी तयार ठेवणार होती. त्यांच्या तळावर असलेली त्यांचीच घोडी वापरून, कैद्यांना पक्के घेऱ्यात घेऊन, तळापासून दूर बहिर्जी दाखवील त्या वाटेने पळत सुटायचे. नेहमीप्रमाणे आखणी अगदी चोख होती.



हंबीरराव व बहिर्जीने बुरुजावरून एकदा नजर टाकली. तळावरची भली मोठी शेकोटी टेंभ्यागत दिसत होती. पण तिच्यामुळे तळाची जागा स्पष्ट लक्षात येत होती. करकर आवाज करीत महादरवाजा उघडला. सहाशे दोन सावल्या हलकेच गडाबाहेरच्या गच्च अंधारात मिसळून गेल्या. झपाट्याने चालत पाऊण-एक घटकेत फौज खिंड ओलांडून मोगली तळाच्या जवळ बाणाच्या टप्प्यावर पोहोचली. हंबीररावांची इशारत झाली. सावल्या तिथेच थांबल्या. तळावरच्या पहारेकऱ्यांच्या हलत्या मशाली वगळता हालचाल दिसत नव्हती. त्यांच्या ‘हुश्शार’च्या हाकांशिवाय आवाज नव्हता. तळ गाढ झोपला असावा. थोडे पुढे जाऊन बहिर्जीने कानोसा घेतला. पाडाचा आंबा पडावा तसा धप्प आवाज झाला. सावल्या सावधपणे पुढे सरकू लागल्या. पायतळीच्या पाचोळ्याचा आवाज होणार नाही याची काळजी घेत पण शक्य त्या झपाट्याने त्या शेकोटीच्या दिशेने सरकत होत्या.


सावल्या तळाच्या अगदी जवळ पोहोचल्या. सापाचा फूत्कार झाला. सावल्या थांबल्या. जेमतेम काही क्षणांची उसंत गेली असेल नसेल, घुबडाचा भयाण धूत्कार वातावरणात घुमला. पलीकडे दूर असलेल्या दुसऱ्या घुबडाने दिलेला प्रतिसाद पुन्हा एकदा घुमला. हलके हलके सावल्या पांगू लागल्या. त्यांनी तळाला चारही बाजूंनी घेरा टाकला. आश्चर्य म्हणजे मघाशी दिसलेली पहारेकऱ्यांची हालचाल आता दिसत नव्हती. किंबहुना तळाभोवती कोणी पहारेकरीच दिसत नव्हता. तळाभोवती एवढी सहाशे माणसे हलत होती, चालत होती; पण तळावर कोणालाच त्याची चाहूल जाणवली असावी असे वाटत नव्हते. हालचालींमध्ये सफाईच मुळी तशी होती. या बाबतीत मांजरांनीपण मराठ्यांकडून धडे घ्यावेत.
वेढा पुरता आवळला गेला. अचानक मोराच्या ओरडण्याने अवघे रान दुमदुमले. त्यासरशी तळावर एकदम धावपळ सुरू झाली. शेकोटीमधील जळती लाकडे उपसली गेली आणि धडाधडा राहुट्या-तंबूंवर भिरकावली जाऊ लागली. दिवसभराच्या रखरखीत उन्हात तापलेल्या कनाती कापरासारख्या पेटून उठल्या. शेकाने ढारढूर झोपलेले मोगली शिपाई दचकून जागे झाले. राहुट्या पेटलेल्या पाहताच घाईने उठून राहुटीबाहेर पडण्यासाठी धडपडू लागले. पण तणावाचे दोर खडाखडा कापले गेले आणि धडाडून पेटलेल्या राहुट्या त्यांच्यावर कोसळल्या. बिचाऱ्यांचे दुर्दैवच उभे ठाकले होते. मागोमाग त्यांच्यावर सपासप तलवारीचे वार कोसळू लागले. किंकाळ्या आणि ओरडण्याने इतका वेळ नीरव शांत असलेले रान गर्जून उठले. क्वचित कोणाला हत्यार हाती घ्यायला अवधी मिळाला. पण बहुतेक सारे अर्धवट झोपेतच सरसहा कापले गेले.


त्या रात्री आफताबखानाने काहीतरी बहाणा करून एका खिदमतगाराला कुलीखानाच्या डेऱ्यात एका कोपऱ्यात झोपायला लावले होते. हरणाची सागुती आणि मोहाच्या अस्सल दारूने आपले काम केले, गडी अगदी गपगार झोपून गेला होता. बिचाऱ्याची काळझोपच ठरली. मोराची आरोळी हवेत विरण्यापूर्वीच आफताबखान डेऱ्यात घुसला. पहारेकऱ्याच्या हातातला भाला घेऊन त्याने, जमिनीत पहार मारावी त्याप्रमाणे सारा जोर एकवटून भाला त्या खिदमतगाराच्या छातीत मारला. बिचारा तोंडातून आवाज न काढता मुकाट्याने मरून गेला. तोपर्यंत कुलीखान उठून चढाव चढवून आणि कंबरेला तलवार बांधून डेऱ्याच्या बाहेर पडला. दोन पहारेकऱ्यांनी मुडदा उचलून पलंगावर टाकला. डेऱ्यात आधीच आणून ठेवलेले तेल त्याच्यावर ओतले. हाती लागतील तेवढ्या उश्या आणि तकिये वर टाकले आणि मशालीने पलंग पेटवून दिला. काही क्षणांमध्ये सारा कारभार आटोपून सारे डेऱ्याच्या पिछाडीस आले आणि त्याच वेळी मराठ्यांचा घाला तळावर कोसळला.


दंगल सुरू होताच कुलीखान आणि त्याच्या माणसांनी घोड्यांवर झेपा घेतल्या. पण बहिर्जीची तुकडी सावध होती. त्यांनी चटाचटा उरलेल्या घोड्यांचा ताबा घेतला आणि त्या पन्नास-पंचावन्न लोकांनी काही हालचाल करण्यापूर्वीच त्यांना कसून गराडा टाकला. गराडा असा सख्त होता की, तो फोडून बाहेर पडण्याची कोणाची बिशाद नव्हती. एक कर्णकर्कश शीळ वातावरणात घुमली आणि स्वार दौडू लागले. वेढा असा चोख आवळलेला होता की, मोगली स्वारांना त्यांच्याबरोबर दौडण्याविना पर्यायच नव्हता. पाहता पाहता घोडी तळापासून दूर गेली आणि काही पळांतच खिंडीपार होत नजरेआड झाली.
मराठ्यांच्या बाकी शिबंदीला त्याची काहीच दखल नव्हती. त्यांनी प्रचंड कत्तल सुरू केली. जणू अवसेच्या तोंडावर रानातली पिशाचेच तळावर हैदोस घालत होती. जळू शकणारी प्रत्येक चीज पेटविली जात होती. हत्याराचा प्रत्येक घाव जीव वसूल करीत होता. घाव पडताना त्याला शिवीची जोड हमखास मिळत होती.
तिच्या आयला तुझ्या, भाड्या सोराज्य बुडवाया येतुस व्हय. ह्यो बघ सोराज्याचा हिसका.
दया, माया, करुणा, माणुसकी कशाला इथे स्थान नव्हते. महाराजांच्या हुकमाने या साऱ्या भावना मराठे गडावर मागे ठेवून आले होते. एकही मोगल कुठल्याही स्थितीत जिवंत राहता कामा नये, हेच एकमेव उद्दिष्ट. घटका-दीड घटकेत सारा खेळ आटोपला. तळावर उरली विखुरलेली प्रेते आणि जळत्या राहुट्या. मराठ्यांनी कैद करून नेलेल्यांशिवाय तळावर एकही हशम जिवंत नाही याची खात्री करून घेऊन हंबीरराव झपाट्याने गडाकडे परत निघाले. छापा इतका चोख कारगर झाला होता की, कुणा मावळ्यावर साधा ओरखडासुद्धा उठला नव्हता. खिंड ओलांडून हंबीररावांनी वर नजर टाकली तेव्हा आकाशातले म्हातारीचे बाजले माथ्यावरून मावळतीकडे उतरले होते. पाखरांची झोप चाळवत होती.



रात्रीचा किर्रर अंधार कापीत घोडी दौडत होती. कुणी कुणाशी बोलत नव्हते. किंबहुना कुणी बोलण्याच्या मन:स्थितीतच नव्हते. मूकपणे दौड सुरू होती. कुलीखानाचा ऊर भरून आला होता. वरचेवर डोळे पाण्याने भरून येत होते.
‘माझी माती, माझा देश, माझी माणसे, माझी भाषा, माझे मावळे; पण सध्यातरी मी माझ्याच फौजेचा एक बंदिवान म्हणून चालविला जातो आहे. यालाच म्हणायचे दैवगती!’
तांबडे फुटू पाहत असताना दल एका ठाण्यावर पोहोचले. शीळ घुमली. दौड थांबली. बहिर्जीने आरोळी दिली–


येक घटका. फकस्त येक घटका थांबनार. तेवढ्यात प्रातर्विधी उरकून घ्या. साधंल तेवडी विश्रांती घ्या. मिळतील त्ये चार घास पोटात घाला. शिदोरी मिळंल ती बांधून घ्या. आनलेली जनावरं तळावरच सोडा. ताज्या दमाची घोडी जीन कसून तयार मिळतील. घोडी मिळताच दौड पुढं सुरू. म्हाराजांचा सख्त हुकूम हाये, लवकरात लवकर रायगड गाठायचा.
कुलीखानाच्या मदतीला ठाण्यावर असलेले दोन-चार सेवक धावले. प्रातर्विधी आटोपून तो ठाण्याच्या चौकीच्या इमारतीत आला तेव्हा एका बाजेवर स्वच्छ बिछाना घालून तयार होता. शेजारी बहिर्जी उभा होता. कुलीखान येताच त्याने लवून मुजरा घातला.
तू बहिर्जी नाईक, होय ना? अरे! मुजरा कसला घालतोस, आता आम्ही सरनोबत नाही. आज आम्ही स्वराज्याचे कैदी आहोत.
बारा गावचे पाणी प्यायलेल्या बहिर्जीसारख्या रांगड्या गड्याच्या डोळ्यांत टचकन पाणी आले–
आसं कसं म्हन्ता सरकार? येळवखत बदलला तरी आपली मानसं आपलीच ऱ्हात्यात. ती काय अशी बदलू म्हनलं तर बदलत्यात व्हय? आन कोन म्हनलं तुमाला कैदी? उगी कायबाय समजून घ्याचं न काय. पार काडून टाका मनातून त्ये. तुमी तर घरची मानसं. वाईच विसंबला दुरावला व्हतात. तुमासाटी मूळ घेऊन आलोया पुन्यांदा घराकडं निंगालासा. जरा इसावा घ्या, न्ह्यारी ईल. दोन घास खावा. तवर घोडी तयार व्हतील की, फुडं सुटायचं. हुकूम आसंल तर म्या तेवड्यात माझं बी उरकतो.
का? एवढी घाई का? आता तर आपण आपल्याच मुलखात आहोत. गनीम पाठलागावर येण्याची तर कोणतीच भीती नाही.



छ्या, गनिमाची काय बिशाद आपल्या मुलखात घुसून पाठलाग करन्याची. पर म्हाराज तुमाला भेटाया लई उतावीळ झाल्याती. कंदी येकदा भेटतो तुमाला आसं झालंया. आन हां अंगावर हाय त्या सरंजामातच हजर करन्याचा हुकूम हाये.
आडवा झाला. मनामध्ये भावनांचा एवढा कल्लोळ उठला होता की, डोळा लागणे शक्य नव्हते. मावळ्यांची लगबग, थट्टामस्करी, उडालेली धांदल पडल्या पडल्या तो आसूसून पाहत होता. थोड्या वेळाने एका पळसाच्या पत्रावळीवर वाढलेली बाजरीची गरमागरम भाकरी, कांद्याचा झुणका, हिरव्या मिरचीचा ठेचा आणि बुक्की मारून फोडलेला कांदा अशी न्याहारी घेऊन एक मावळा सामोरा आला. त्याच्या मागोमाग स्वत:ची वाढलेली पत्रावळ हातावर घेऊन बहिर्जी समोर आला.
सरकार, घाईगर्दीत जे साधलं त्येच गड्यांनी रांधलंया. ग्वॉड मानून घेवाजी. येळ निभावायची दुसरं काय? जरा त्रास व्हईल पन इलाज न्हाई. मापी असावी.
बहिर्जी, अरे किती वर्षांनी असे हे मराठमोळे, घरचे अन्न खातो आहे. माझ्यासाठी हे पक्वान्नापेक्षा जास्त मोलाचे आहे. आपला नेहमीचा रिवाज सोडून काही भलतेसलते समोर आणले असतेस तर वाईट वाटले असते.


घ्या धनी, सुरू करा.
पहिला घास तोंडात टाकला आणि कुलीखानाचे डोळे ओसंडून वाहू लागले. घळघळा वाहणारे अश्रू दाढीच्या जंजाळात झिरपत राहिले. हुंदक्यांनी शरीर गदगद हलू लागले. एक पाऊल पुढे टाकून बहिर्जी कानाशी वाकला.
सबूर. सरकार सबूर. समदी बघत्याती सबूर.
पालथ्या मुठीने कुलीखानाने डोळे कोरडे केले आणि समोरचे अन्नब्रह्म संपविले. थोड्याच वेळात कुचाची आरोळी उठली आणि दौड पुढे सुरू झाली.
ठाण्याठाण्यावर जनावरे बदलली जात होती. फार तर दीडएक घटकेची विश्रांती घेतली की, दौड पुढे सुरू. असा सिलसिला सतत सुरू होता. रात्रीची झोपसुद्धा जेमतेम आणि शिरस्त्याप्रमाणे उघड्या माळावर. लिंगाण्याला वळसा घालत दौड जेव्हा कोकणातून सुरू झाली तेव्हा कुलीखानाने अचंब्याने बहिर्जीला विचारले–


*बहिर्जी, अरे एवढ्या लांबचा वळसा घालून जाणारा रस्ता का धरलास?*
*सरकार इतकी वर्सं दूर ऱ्हायलासा पर वाटांचे बारकावे अजून पक्के ध्यानात हायती तुमच्या. पर आपुन अगदी जवळच्या वाटंनं निगालो हाय. म्हाराज आता राजगडावर वस्तीला न्हाईत. आता तख्ताची जागा रायगड झालिया. म्हाराजांचे पाय आपल्याला रायगडीच भेटतीला.*
*_क्रमश:_*

*________⚔📜🚩

📜⚔🗡अग्निदिव्य भाग - 30 🗡⚔📜



*अग्निदिव्य*

*लेखक : कल्याणीरमण बेन्नूरवार*

*नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜⚔*

*___⚔🚩⚔📜🚩_______*

*मोहीम झपाट्याने आकार घेऊ लागली. मोहिमेच्या तयारीत बादशहा जातीनिशी लक्ष घालत होता. निरनिराळ्या ठिकाणचे सरदार आणि मानकरी-मनसबदारांना फौजेत सामील होण्याची फर्माने रोजच्या रोज रवाना होत होती. दिल्लीतून निघताना फौज पाऊण लाखाची असली, तरी वाटेत येऊन मिळणाऱ्या तुकड्यांमुळे बऱ्हाणपुरास पोहोचेपर्यंत ती दोन लाखांचा आकडा गाठणार होती. त्याशिवाय शागिर्दपेशा, बाजारबुणगे आणि जनानखान्यांचा पसारा अलग. चार-चार हत्ती जुंपून ओढाव्या लागणाऱ्या सहा अक्राळविक्राळ तोफा सोबत जाणार होत्या. शिवाय इतर तोफखाना होताच. मिर्झाराजांनी औरंगाबादेत सोडून दिलेल्या तोफा आणि तोफखाना फौजेला मिळणार होता. दिलेरखान आणि बहादूरखानाच्या दिमतीला असलेली फौज आणि तोफा दाऊदखानाच्या हुकमतीत राहणार होत्या. त्या फौजेवर मात्र कुलीखानाची थेट हुकुमत चालणार नव्हती.*


छावणीच्या उभारणीची गडबड सुरू असतानाच एक दिवस बादशहाने जाफरखानाला एकांतात बोलावून घेतले. आपल्या खासगी दिवाणखान्यात खिडकीतून येणाऱ्या उजेडाचा कोन साधून बादशहा खूरमांडी घालून गालिच्यावर बसला होता. समोरच्या बैठ्या मेजावर लिखाणाचे साहित्य आणि कागदाचे ताव मांडून ठेवले होते. मेजाशेजारी कुराणाचे पुस्तक उघडे करून ठेवले होते. त्यात पाहून बादशहा समोरच्या कागदावर कुराण उतरवून काढत होता. त्या कागदावर सुंदर रंगसंगतीत वेलबुट्टीची चौकट काढली होती. ती चौकट बादशहाची लाडकी लेक झिनतउन्निसा बेगमने आपल्या हातांनी काढली होती. जाफरखान कुर्निसात करून समोर उभा राहिला. लिहिली जात असलेली आयात पूर्ण करून बादशहाने लेखणी खाली ठेवली आणि तो उठून मसनदीवर लोडाला रेलून बसला. बसता बसता सवयीप्रमाणे जपमाळ हातात आली.
जाफरखान, ही दख्खन मोहीम बरीच लांबणार आहे. कारण या वेळेस काय वाट्टेल ते झाले तरी दख्खन पूर्ण काबीज केल्याशिवाय फौजा माघारी येऊ दिल्या जाणार नाहीत. माबदौलतांच्या अंदाजाप्रमाणे मोहीम दहा वर्षे तरी चालेल.
जी आलमपन्हा.


त्यामुळे सारे लहान-मोठे अंमलदार, मनसबदार, दरबारी, आपापले जनानखाने सोबत ठेवणार.
जी हुजूर. रिवाज तसाच आहे.
का कुणास ठाऊक, पण माबदौलतांना अजून कुलीखानाचा पुरता भरवसा वाटत नाही.
गुस्ताखी माफ, पण आलमपन्हा, आता तो काही गडबड करू शकेल असे वाटत नाही. या मुबारक कदमांशिवाय त्याला दुसरा थारा नाही.


तरीसुद्धा मन शंकित आहे. तो त्याच्या स्वत:च्या मुलखात जाणार. माबदौलतांची जवानी दख्खनमध्ये गेली आहे. हे मराठे मोठे कावेबाज असतात. राजपूत आणि बुंदेले शौर्यात त्यांच्या बरोबरीने असले, तरी त्यांना छक्के-पंजे आणि राजकारण समजत नाही. म्हणूनच ते इमानी कुत्र्यांसारखे आमच्या साखळीला मुकाट बांधलेले राहतात. पण या मराठ्यांचा भरवसा देता येत नाही… जाफरखान, कुलीखानाला तोंडी हुकूम दे. म्हणावे, त्याचा जनानखाना त्याच्या शिकारपूरच्या हवेलीतच माबदौलतांच्या निगराणीत मेहफूज असेल. माबदौलत जेव्हा दख्खनसाठी निघतील तेव्हा त्याचा जनानखाना शाही जनानखान्यासोबत हिफाजत के साथ दख्खनमध्ये पोहोचता होईल.


हुकूम सरआखोंपर आलमपन्हा, पण छावणीतला प्रत्येक लहान-मोठा अंमलदार स्वत:चा जनानखाना सोबत बाळगणार आणि खुद्द नायब सरलष्कराचा जनानखाना आलाहजरतांच्या निगराणीत राजधानीत याचा अर्थ नायब सरलष्करावर आलाहजरतांची मर्जी बहाल नाही असा काढला जाईल. कुलीखान बिथरल्याशिवाय राहणार नाही. तो नजरकैदेत असतानासुद्धा त्याचा जनानखाना त्याच्यासोबत ठेवण्याची मेहेरबानी आलाहजरतांनी केली होती. एका क्षुल्लक कारणापायी एवढी मोठी मोहीम नासून जायची.
तुझ्या बोलण्यात तथ्य आहे. ठीक आहे. त्याला माबदौलतांनी दिलेली ती लौंडिया, काय नाव तिचे? हाँ नूर बानू, ती त्याला त्याच्या सोबत छावणीत ठेवता येईल. बाकी फौजेत असा समज पसरवा की, हिंदोस्तानात परत यायला मिळावे म्हणून त्याने स्वत:च आपला जनानखाना मागे ठेवला आहे. कुलीखानाला कसे समजवायचे, तो तुझा जिम्मा.
जो हुकूम.


त्या नामुराद बहादूरखानाने पेडगावात स्वत:च्या नावाने किल्ला बांधला आणि त्यात मेहफूज राहून तो ऐश करतो. दाऊदखान आणि कुलीखान दोघांनाही किंवा फौजेतील कोणालाही स्वतंत्र, पक्का, कोटबंद वाडा बांधता येणार नाही. सख्त मनाईचा हुकूम जारी कर. कोणतीही परिस्थिती असो, प्रत्येकाने छावणीतच राहिले पाहिजे. मग मुक्काम बऱ्हाणपुरास असो वा शहरात.
जो हुकूम.
याचा अर्थ स्पष्ट होता, बादशहाने कुलीखानाचे अवघे कुटुंबच स्वत:कडे ओलीस ठेवले होते; त्यामुळे त्याला पायबंद घालता येईल असा हा कावा होता. तसेच एखाद्या किल्ल्यात आश्रय घेऊन कुलीखानाने बंड करू नये असासुद्धा बंदोबस्त बादशहाने परस्पर करून टाकला.
यमुनेच्या काठाने छावणी उभी राहू लागली. एक शुभ दिवस पाहून दाऊदखान आणि कुलीखान मोहीमनशीन झाले. दोन दिवसांनंतर बिनीची पथके, नौबत, निशाण आणि मुख्य अंमलदारांसह कूच करून निघाली. एका उंच मचाणावर उभा राहून बादशहा त्यांना निरोप देत होता. क्वचितच कोणा सेनापतीस असा बहुमान मिळत असे. महम्मद कुलीखान - नेताजी पालकरची दख्खन मोहीम सुरू झाली.


बादशहाला पक्का विश्वास होता की, मराठे कुलीखानाचा असा काही अपमान करतील की, तळमळून तो चिडून उठेल. झाल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी म्हणून तो अवघ्या महाराष्ट्रात भयंकर कत्तलींचे आणि बाटवाबाटवीचे थैमान मांडील. आजवरचा इतिहास तेच सांगत होता. खऱ्यापेक्षा बाटगा जास्त कडवा असतो. अगदी निजाम आणि कुतुबशहा यांसारखे बहमनी सुलतानसुद्धा मूळ बाटगेच की. यवनांनी एक हजार वर्षे राज्य केले ते अशा बाटग्यांच्या आणि अंकित झालेल्या स्वकीयांच्या जिवावरच. हिंदूंच्या समोर भरदरबारात मंदिरे उद्ध्वस्त करण्याचे हुकूम सुटत होते आणि राजपूत, जाट, बुंदेले ‘राजे’, ‘महाराजे’ तख्तासाठी रक्त सांडत होते. म्हणून तर आता आलमगीर बादशहा कुलीखानाबाबत काहीसा निश्चिंत होता. त्याला खात्री होती, आपण एका नेताजीला बाटवले, आता त्याला बाटवाबाटवी करायला लावण्याचे उरलेले काम मराठेच करतील. अपमान करून, प्रकट तिरस्कार करून ते कुलीखानाला चेतवतील आणि तो धर्मप्रसाराचे आपले काम व्रत म्हणून अनायासेच पूर्णत्वास नेईल. अलहमदुलइलल्लाह.

बहिर्जी आणि महाराजांची एकांत भेट सुरू होती. मोरोपंत पंतप्रधानांनासुद्धा आत प्रवेश मना करण्यात आला होता.
म्हाराज, हप्त्याभरात मोगली फौजा नर्मदा वलांडून दख्खनमध्ये उतरतील आन बऱ्हानपुरास दाकल व्हतील. फौजेची उरलेली जुळवाजुळव करन्याखातर महिनाभरासाठी छावणीचा तळ बऱ्हानपुरास पडंल. पावसाच्या तोंडावर फौज औरंगाबादेत दाकल व्हईल. पाऊस संपला की, भली दांडगी फौज सोराज्यावर कोसळनार. स्वारीची तयारी मिर्जाराजांच्या स्वारीपरीस जोरदार हाये…
हा अवघा तपशील खलबतखान्याच्या मसलतीत सांगा. आता एवढेच सांगा की, नेताजीकाकांची खबर काय? त्यांनी काही योजना ठरवली आहे का?
जी म्हाराज. फौजा खानदेश-बागलाणात उतरल्या की, एक दिवस साल्हेरजवळच्या जंगलात हरनांची शिकार करन्याच्या मिशानं सरनोबत ऐन फौजेपासून दोन-तीन मजला आपल्या हिसाबानं, मोगली नव्हं; वायले होतील. आन ऐन जंगलात पडाव करून ऱ्हातील. नर्दुल्लाखानाचा दस्ता संगत आसंल. त्या येगळी मूठभर हशम आन मोजके खिदमतगार ऱ्हातील. पडाव आपल्या हद्दीला खेटून पर मोगली हद्दीतच आसंल. मातुर साल्हेर गडाच्या ऐन टप्प्यावर. एखाद्या राती नर्दुल्लाचा दस्ता उठाव करून साधेल तेवडी कापाकाप करील. या दंगलीचा फायदा उठवत सोता सरनोबत चार-सहा हशम संगती घेऊन नाशिककडं धावतील अन् येकादी जवळची वाट काढून सोराज्यात घुसतील. कमीतकमी मुक्काम आन जास्तीतजास्त दौड मारत रायगड गाठतील. असा येकून ढोबळमानानं मनसुबा हाये.


उत्तम! मनसुबा तर नामी आहे, मात्र त्यात थोड्या गफलती आहेत. नाईक, त्या तुमच्या नजरेत यायला हव्या होत्या.
न्हाई, काई ध्यानात ईना म्हाराज.
साल्हेरपासून रायगडापर्यंत नेताजीकाका मोगली पेहराव आणि सरंजामात दौड मारणार. वाटेत आपल्या चौक्या, नाकी, गस्ती, कोणी हटकणार नाही? अटकाव करणार नाही?
व्हय जी म्हाराज, मोटीच गफलत ऱ्हायली. त्येंच्या संगत आपला कुनी जबाबदार गडी-असामी व्हया.
ठीक. मनसुब्यात आणखी दुरुस्त्या हव्या.
जी. हुकूम.
नर्दुल्लाखानाचा दस्ता उठाव करणार नाही.
मंग म्हाराज?
साल्हेरच्या किल्ल्यावरची शिबंदी ‘अचानक’ छापा घालील. छाप्याची वेळ, स्थळ आणि रात्र नेताजीकाकांना आगाऊ कळू देत. छाप्याच्या वेळी त्यांच्या दिमतीची आपली माणसं पिवळी मुंडाशी आणि दोन्ही दंडांना पिवळी कापडे बांधून असावीत. तीच आपली खूण. बाकी शिबंदी गाफील, नशेत असेल तर उत्तमच. नर्दुल्लाचा दस्ताच केवळ पहारा ठेवील. नेताजीकाकांच्या पडावावर असलेल्या शिबंदीच्या तिप्पट मावळे छाप्यात असणे गरजेचे आहे. छाप्याची पहिली धडक पडताच खुद्द नेताजीकाका आणि नुर्दल्लाचा दस्ता आपल्या एका तुकडीचा पाठलाग करीत असल्याचे नाटक करीत पळत सुटेल. सात-आठ मावळ्यांची ती तुकडी वाटाड्याचे काम करील. नेताजीकाका आणि त्यांची माणसे मोगली पेहरावात असल्याने वाटेत कुठे दगाफटका व्हायला नको. एखाद्या ठाण्यावर अटकाव झाला तर, आणि तसा तो झाल्याशिवाय राहणार नाही, न रेंगाळता पुढे सरकण्यासाठी वाटाड्यांकडे आवश्यक त्या परवलीच्या खुणा आणि दस्तावेज असू देत. ठरावीक अंतरावर सर्वांसाठी ताज्या दमाची जनावरे तयार ठेवा. त्यासाठी नेमके कोणत्या मार्गाने जायचे ते तुम्हाला आधीच योजून ठेवावे लागेल. रात्रीचा मुक्काम काही घटकांचा आणि शिरस्त्याप्रमाणे उघड्यावर असेल. शक्य तितक्या लवकर त्यांना हुजूर दाखल करा. छापा असा कारगर झाला पाहिजे की, गनिमाचा एकही हशम जिवंत सुटता कामा नये. दयामाया नाही. जखमी म्हणून, शरणागत म्हणून जीवदान नाही. खबर द्यायला जाण्यासाठी कोणी जिवंत राहताच कामा नये. आकाशात भिरभिरणाऱ्या घारी आणि गिधाडेच शोधकर्त्यांना खबर देतील. बऱ्हाणपुरास खबर जाऊन शोधासाठी माणसे रवाना होईपर्यंत नेताजीकाकांनी रायगड गाठायला हवा. सर्वांत महत्त्वाचे, वाटाड्या तुकडीत नाईक तुम्ही असलेच पाहिजे. रायगडी पोहोचण्यास रात्र झाली तर परवलीच्या शब्दावर गडाचे दरवाजे उघडण्याचा हुकूम देऊन ठेवलेला असेल.


जी, म्हाराज. जसं सांगितलंसा तसंच हुईल. शबुद दर शबुद. त्यात रत्तीभर हेरफेर हुयाचा न्हाई. येक जरी गनीम जित्ता सुटला तरी छापा घालनाऱ्या नायकाची खैर न्हाई असा मुळात दमच तुमच्या नावानं दिऊन ठिवतो. पर म्हाराज येक शक हाये.
महाराजांच्या भुवया वर चढल्या.
न्हाई म्हंजे मनसुब्यात खोट काडाया जागा न्हाई, पर छापा घालनाऱ्यानं इतका कडक छापा कशापाई आन कोनावर घालायचा ह्येची कल्पना त्यांना द्येयाची का न्हाई.
हुं. शंका रास्त आहे. त्यांना एवढेच सांगायचे की, मोगलांचा एक मातब्बर सरदार आमच्या खास हुकमावरून जिवंत पकडून हुजूर दाखल करायचा आहे. त्यासाठी त्याच्या गोटातली माणसं आपण आधीच फोडून ठेवली आहेत. ती गिरफ्तारीत मदत करणार आहेत.


जी, म्हाराज.
निघा, रात्री स्वारीचा तपशील खलबतखान्यात प्रधानमंडळादेखत द्या.
मुजरा करून बहिर्जी दालनाबाहेर पडला, तर मोरोपंत कपाळास आठ्या घालून दाराबाहेर येरझारा घालीत होते. त्यांची नजर चुकवीत खालमानेनेच मुजरा करीत बहिर्जी तिथून सटकला.

अजगराच्या सुस्त चालीने मोगली फौजेचा लोंढा स्वराज्य गिळण्यासाठी दख्खनच्या दिशेने सरकत होता. कुलीखानाचे मन मात्र वाऱ्याच्या वेगाने स्वराज्याकडे धाव घेत होते. यापूर्वी अफगाण मोहिमेतसुद्धा तो नायब सरलष्कर होता. पण तेव्हा त्याच्यावर नजरकैद जारी होती. आता तो काच राहिला नव्हता. आता त्याला मोकळा श्वास घेता येत होता. बऱ्यापैकी मोकळेपणाने वावरता येत होते. गेल्या जवळपास एका तपात त्याचा हिंदू संस्कृतीशी, हिंदू माणसांशी कुठल्याही प्रकारे संपर्क येणार नाही याची बादशहाने कसून काळजी घेतली होती. या मोहिमेत मात्र मोठ्या प्रमाणावर राजपूत, जाट, बुंदेले आणि इतर अनेक जातींचे हिंदू सरदार-मनसबदार सहभागी होते. फौजा औरंगाबादेत दाखल झाल्यानंतर अनेक मराठा सरदारसुद्धा फौजेस येऊन मिळणार होते. नायब सरलष्कर म्हणून त्याचा संपर्क त्या साऱ्यांशी येत होता. त्यांचे बोलणे-चालणे, त्यांचा व्यवहार वगैरे तो मोठ्या अपूर्वाईने पाहत राही. मात्र त्याच वेळी त्यांच्या नजरेतला मूक तिरस्कार त्याला जाणवत राही. बादशहाच्या धाकाने म्हणा किंवा एकूणच उत्तरेतील हिंदूंच्या मनात राज्यकर्त्यांची जमात म्हणून मुसलमानांविषयीचा धाक म्हणा किंवा तो नायब सरलष्कर असल्याने त्याच्या पुढे मान तुकविणे, त्याचा आदर करणे, त्याचा हुकूम मानणे वगैरे दरबारी शिस्तीचा आणि लष्करी शिस्तीचा भाग म्हणूनसुद्धा सर्व हिंदू सरदार-दरबाऱ्यांना भाग होते. असे असले तरी त्यांच्या मनातील तुच्छतेची भावना लपत नव्हती. किंबहुना ती लपविण्याचा कोणी विशेष प्रयत्नसुद्धा करीत नसे. कुलीखानाच्या मानी मराठी मनाला हे शल्य इंगळीच्या डंखासारखे वेदना देत असे. क्वचित एखादा असा प्रसंग घडे की, त्याला अपमान अगदी असह्य होऊन जाई. मग रात्र-रात्र तळमळत काढली जाई. मनामध्ये आत्यंतिक चीड उत्पन्न होई. साऱ्या जगाची जाळूनपोळून पार राखरांगोळी करून टाकावी अशी विचित्र सूडभावना मनात जन्म घेऊ पाही.


हेच. बादशहाला हवे होते ते नेमके हेच. म्हणूनच तो आता कुलीखानाचा हिंदूंशी संपर्क येऊ देण्यास राजी होता. त्याला तो हिंदूंकडून असाच अपमानित व्हायला हवा होता. तो असाच चिडून उठायला हवा होता. म्हणून मग आपल्या हस्तकांकरवी तो हिंदूंच्या अशा वागण्याला प्रोत्साहन मिळेल अशा कारवाया करवीत असे. अपमान जेवढा जास्त, निर्भर्त्सना जेवढी जास्त कडवट, तितकीच चीड आणि संतापाची धार तेज, असे साधे गणित होते. संतापाची ही तेज धारच त्याच्या मनामध्ये अपमानाचा बदला घेण्याची, सूडाची आग चेतविणार होती. पेटती ठेवणार होती. आणि हा अंगार अखेर मराठ्यांवर, मराठ्यांच्या हिंदवी स्वराज्यावर कोसळावा यासाठीच तर बादशहा आलमगीर गेले एक तप हा खटाटोप मांडून बसला होता. त्याच्या या तपश्चर्येला फळ मिळण्याची तो मोठ्या उत्सुकतेने, उत्कंठेने वाट पाहत होता.


विवेकाची वेसण घालून कुलीखान आपल्या उधळणाऱ्या मनाला आवर घाली. कारण ज्या क्षणी मुसलमान होण्याचा निर्णय घेतला, त्याच क्षणी त्याला आपले हे भवितव्य माहीत झाले होते. त्याला तोंड देण्याची मानसिक सिद्धतासुद्धा झाली होती. त्या क्षणापासूनच बादशहाच्या या कुटिल अपेक्षा उघड झाल्या होत्या. संधी मिळेल तेव्हा त्याने त्या उघडपणे बोलून दाखविल्या होत्या. किंबहुना त्या व्यक्त करण्याची एकही संधी तो कधी सोडत नव्हता. नेताजीचा धर्म हिरावून घेऊन त्याला कुलीखान बनविण्यात जरी तो यशस्वी झाला असला, तरी साध्य साधल्याचे समाधान त्याला मिळू न देण्याचा कुलीखानाचा निर्धार होता. कुलीखान बादशहाच्या छळामुळे झुकला नव्हता, तर एक मोठे राजकारण गनिमी काव्याने साधण्यासाठी महाराजांच्या आज्ञेने झुकला होता आणि आता महाराजांच्या वरदहस्ताची खातरजमा झाल्यामुळे तर आलमगिराचा पराभव करण्याचा त्याचा निश्चय अधिकाधिक दृढ होत होता. हे अपमान, ही मानखंडना, निर्भर्त्सना पचविण्याची अधिकाधिक शक्ती त्याला मिळत होती. अपमान होत असतानासुद्धा हिंदू सरदार, मानकऱ्यांमध्ये मिसळण्याचा तो जास्तीतजास्त प्रयत्न करीत होता.

प्रचंड मुघल फौज बऱ्हाणपुरास येऊन विसावली. शहराबाहेर कित्येक कोसपर्यंत छावणी पसरली होती. एकेक सरदार फौज घेऊन छावणीत दाखल होत होता. छावणी विस्तारत होती. पाऊस सुरू होण्यापूर्वी तापी आणि पूर्णा उतरून औरंगाबाद गाठणे गरजेचे होते. शाही हुकूमसुद्धा तसाच होता. एक दिवस सरलष्कराच्या दरबारात कोठावळ्याने अहवाल दिला की, छावणीचा विस्तार बराच वाढल्यामुळे शिधासामग्रीच्या वाटपावरचा ताणही वाढू लागला आहे. दर-एक गोटाची स्वत:ची कोठीघराची व्यवस्था झाली पाहिजे. फौजेचा खान-ए-सामान इफ्तीखारखानाने तक्रार गुदरली की, वाढत्या फौजेमुळे छावणीच्या परिसरात मानवी आणि जनावरांच्या विष्ठेची दुर्गंधी भरून राहिली आहे. पाणवठे खराब होत आहेत. वेळीच जर काही उपाय योजले नाही तर लवकरच सैन्यामध्ये साथीचे रोग फैलावतील. मेंदीने रंगविलेली आपली दाढी कुरवाळीत सरलष्कर दाऊदखान कुरेशी मोठा गंभीर आव आणून म्हणाला–
अर्थ साफ आहे. सैन्याच्या तुकड्यांची हलवाहलव झाली पाहिजे. मला वाटते, येत्या हप्त्यात आघाडीची काही पथके खानदेशात उतरवावीत. हा जिम्मा आमच्या नायबसाहेबांचा आहे. क्यों जनाब कुलीखान?
त्याच्या बोलण्यास दुजोरा देत कुलीखान तत्परतेने म्हणाला–


बेशक बिलकुल दुरुस्त फरमाया; त्यामुळे इथला ताण तर कमी होईलच, पण औरंगाबादच्या परिसरात सबंध पावसाळ्याचे तीन-चार महिने फौजेची छावणी राहणार आहे, त्या दृष्टीनेसुद्धा आखणी करून ठेवता येईल. जर हुजुरांना मंजूर असेल तर परवा मी स्वत: आघाडीची पथके घेऊन तापीपार होतो आणि औरंगाबादेस पोहोचतो.


बहोत खूब जनाब कुलीखान, आपल्याला दख्खनमध्ये पोहोचण्याची बरीच घाई झालेली दिसते.
दाऊदखानाच्या स्वरातील विखारी उपहास लपविण्याचा त्याने लवमात्र यत्न केला नाही. त्याची दखल घेत तोडीस तोड तीव्र स्वरात कुलीखानाने जवाब दिला.
दख्खनमध्ये जाण्याच्या माझ्या घाईची चर्चा जेव्हा आलाहजरतांनी केली तेव्हा माझ्या आठवणीप्रमाणे जनाब सरलष्कर तिथे मौजूद होते. सवाल माझ्या घाईचा नाही. सवाल आहे आलाहजरतांचा मकसद पुरा करण्याचा. आपण एक प्रचंड मोठी, अवघड आणि महत्त्वाकांक्षी मोहीम शिरावर घेऊन निघालो आहोत आणि गेले तीन हप्ते नुसते बसून काढण्यात गेले आहेत. लाखोंची फौज अशी नुसती बसून खात राहिली तर समुद्राएवढा खजिनासुद्धा पुरा पडायचा नाही. तुमच्यासाठी ही केवळ एक मोहीम आहे पण माझ्यावर सर्वशक्तिमान अल्लाने आणि जिल्हेसुभानी आलाहजरतांनी जे काम सोपविले आहे ते नुसते जंग खेळून मुलूख काबीज करण्याचे नाही. माझ्या खांद्यावर एका पवित्र कार्याचा भार आहे. आलाहजरतांच्या वतीने जिहाद करण्याची माझ्यावर जिम्मेदारी आहे. जिहादसाठी निघालेला हरएक सच्चा मोमिन डोक्याला कफन बांधून निघत असतो. जोपर्यंत जिहाद पूर्ण होत नाही, विजय मिळत नाही, कुफ्र नष्ट होत नाही तोपर्यंत सच्चा जिहादी आराम करीत नाही, आपली तलवार म्यान करीत नाही.
कुलीखानाचा आवेश आणि जोश बघून सगळे थक्क होऊन गेले.
सुभानअल्ला. सुभानअल्ला. अल्ला हो अकबर।


जशी मोहीम पुढे सरकेल तशा फौजा विखुरतील. एवढ्या मोठ्या फौजेची रसद थेट दिल्लीमधून येईल, असे म्हणाल तर ती कधीच पुरी पडणार नाही. चारा-वैरण, दाणागोटा आपला आपणच उभा केला पाहिजे. मुघल रयतेतून उभा करायचा तर रोख दाम मोजावा लागेल. त्यासाठी खर्च होणाऱ्या खजिन्याचा अंदाज येथवर पोहोचेपर्यंत झालेल्या खर्चावरून सहज येईल. जाहीरच आहे, हा खर्च आपल्याला गनिमाला लुटून गोळा करावा लागेल; त्यामुळे गरज पडेल तशी फौज पावसाळ्यातसुद्धा हलती राहील. मिर्झाराजांनी हे आणि असेच डावपेच वापरून शिवाजीराजांना जेरीस आणले होते आणि अखेरीस गुडघे टेकण्यास भाग पाडले होते. महामारीचा जो सैतान आज इथे खौफ पैदा करीत आहे, तो त्याहीपेक्षा भयानक स्वरूपात औरंगाबादेत छळणार आहे; त्यामुळे फार मोठी छावणी फार काळ एका जागी ठेवणे योग्य होणार नाही. दख्खनमध्ये पाऊस सैतानासारखा बरसतो; त्यामुळे छावणी वारंवार हलविणे तर शक्य नाही. त्यावर उपाय म्हणजे छावणीमधील गोट एकमेकांना खेटून न ठेवता ते एकमेकांपासून दूर विखरून/विखरून ठेवावे लागतील.


परवा आम्ही रवाना होऊ तेव्हा प्रत्येक महत्त्वाच्या गोटातले हजार-बाराशे हशम अशी जवळपास पस्तीस हजारांची सडी फौज माझ्यासोबत राहील. दोन-तीन आठवड्यांतच या भागात वळवाचा पाऊस सुरू होईल; त्यामुळे लहान-मोठे ओढे-नाले अचानक पूर भरून वाहू लागतील. आपल्या डोक्यावर स्वच्छ ऊन असेल पण कोसोदूर पहाडांमध्ये पडून गेलेल्या पावसाचे ते पाणी असू शकेल. आता दगडासारखी टणक वाटणारी जमीन ओली आणि भुसभुशीत होऊन जाईल. वाटा चिखलाने भरतील. अशा वेळी मोठ्या अवजड तोफा ओढणे हत्तींनासुद्धा जिकिरीचे जाते. अचानक आलेल्या लोंढ्यामुळे बारूद बरबाद होण्याचा मोठा धोका असतो. जनाब दिलेरखानसाहेबांनी याचा चांगला अनुभव घेतला आहे; त्यामुळे अवजड तोफखाना आणि बारूदखाना मी सोबत पुढे नेतो. छावणीची जागा तयार करण्यासाठी हत्ती वापरावे लागणार; त्यामुळे अर्धा पीलखाना माझ्यासोबत रवाना होईल. जमेल तेवढे जड सामान आम्ही आत्ताच पुढे घेऊन जाऊ. एवढे महत्त्वाचे सामान पुढे जाणार तर त्याची देखभाल आणि व्यवस्था करण्यासाठी कोणी भरवशाचा, काबील आणि जबाबदार अधिकारी हवाच. खान-ए-सामान इफ्तीखारखानसाहेब आमच्या सोबत असतील. येथील छावणीची व्यवस्था त्यांचे नायब पाहतील. त्यांना काही अडचण आली, तर खुद्द सरलष्करसाहेब छावणीत मौजूद आहेतच.


पुढे गेलेली फौज पाणवठा आणि जनावरांना सोईस्कर जागा हेरून, तयार करून ठेवील. निरनिराळ्या सरदार-मनसबदारांचे गोट कुठे असावेत याच्या जागा निश्चित करून आमच्यासोबतच्या फौजेच्या तुकड्या मुक्रर केलेल्या जागी थांबून राहून छावणीची आखणी करून ठेवतील. छावणी शहरापासून अडीच कोस दूर असेल; त्यामुळे शहराला छावणीचा उपद्रव होणार नाही. सर्वांना नीट ठाऊक आहेच की, फौजेतला कोणताही अधिकारी वा अंमलदार शहरात मुक्काम करणार नाही. तो फौजेसोबत छावणीतच राहील. एकूण छावणी दहा-बारा कोसांच्या घेरामध्ये विस्तारलेली असेल; त्यामुळे कूडाकचरा आणि विष्ठेमुळे होणारा उपद्रव टाळता येईल. परिणामी, रोगांची भीती उरणार नाही. तुम्हाला आठवत असेल, दिलेरखान आणि मिर्झाराजांची छावणी पुरंदरापासून सासवडपर्यंत पसरलेली होती.


सुभानअल्ला! बहोत खूब. वहाव्वा! वहाव्वा!! जनाब महम्मद कुलीखान। आलमपन्हा तुमची एवढी वाखाणणी का करतात, ते नेहमी तुमचा बहुमान का करतात ते आज आम्हाला पुरते कळून चुकले. वहाव्वा! आमचे नायब असून तुम्हाला एवढा अधिकार बहाल केला तो सार्थच आहे. आमच्या शिरावरचा भार तुम्ही एकदम कमी करून टाकलात. शाही हुकमाने तुम्हाला सारी मोकळीक आहेच, आमच्यातर्फेसुद्धा तुमच्या प्रत्येक निर्णयाला संपूर्ण मान्यता आहे. तुमच्यासोबत कोणी जायचे त्याची यादी आज मगरीबच्या आधी पेश करा.


तीन दिवसांनंतर मुघल फौजेचा एक मोठा हिस्सा अवजड तोफखाना, बारूदखाना आणि पीलखाना घेऊन तापीपार झाला आणि खानदेशाची तप्त भूमी तुडवत औरंगाबादच्या दिशेने निघाला. ही फौज औरंगाबादेस पोहोचवून कुलीखान बऱ्हाणपुरास परत येणार होता. त्यानंतर मुख्य फौज हलणार होती.

सदरेवर बसून महाराज फौजेचा ताळेबंद आणि स्वराज्याच्या वसुलीचा लेखाजोखा तपासत होते. त्यांनी बाळाजी आवजींना बोलावून घेतले होते. बाळाजी येऊन तिष्ठत होते. हातातल्या कामातून मोकळीक होताच महाराजांनी त्यांच्याकडे पाहिले.
या बाळाजी, जरा तिष्ठावे लागले. पण जमा-खर्चाची कामे एकदा लांबणीवर पडली की, त्यातला गुंता अधिकच गुंतत जातो. मग सोडविताना दुरापास्त होते.
जी महाराज.
बाळाजी, काही पत्रे अगदी तातडीने लिहायची आहेत. नाशिक, त्र्यंबकेश्वर, पैठण, कोल्हापूर, महाबळेश्वर आणि वाई येथील प्रमुख शास्त्रीमंडळींना तातडीने गडावर बोलावणी धाडा. पत्र घेऊन जाणाऱ्या हेजिबाला सूचना करणे की, शास्त्रीबोवांना सोबत घेऊनच येणे. शास्त्रीबुवांस लिहिणे की, येताना सोबत धर्मशास्त्राच्या पोथ्या आणि स्मृतिग्रंथ घेऊन येणे. म्हणावे, गडावर महत्त्वाच्या धर्मकृत्यासाठी शास्त्रार्थ करणे आहे. त्या कारणे त्यांचा सल्ला आणि सहभाग आम्हास अगत्य आहे. पत्रे आत्ताच तयार करण्यास घ्या आणि उदईक पहाटे गडाचे दरवाजे उघडताक्षणी हेजीब रवाना होतील असे पाहणे.
जी, महाराज. ज्यांना पत्रे पाठवायची आहेत त्यांची यादी आणि मसुदा घेऊन घंटाभरात दाखल होतो.
फक्त यादी दाखवा. मसुदा दाखवण्याची गरज नाही. हे काही कोणा बांक्या राजकारणाचे खलिते नव्हेत. तेवढे लिखाण आपण स्वतंत्रपणे करू शकता. कसे?


बाळाजी निघून जाताच महाराजांनी देवडीवरच्या हवालदारास बोलावून घेतले.
हंबीरराव सरनोबतांना सांगावा धाडा. आज दुपारी ते आमच्या पंगतीला भोजन घेतील म्हणावे. भोजनोत्तर महत्त्वाची बोलणी करायची आहेत. पुरेशी सवड काढून यावे म्हणून सांगावा देणे. हाच सांगावा मोरोपंत पेशवे, निळो सोनदेव, अनाजी दत्तो यांनासुद्धा देणे. ही मंडळी पंगतीस असतील याची सूचना महाराणी सरकारांना देऊन मगच पुढे व्हा.
महाराजांच्या खासगी दिवाणखान्यात भोजनोत्तर मसलत बसली. बहिर्जी नाईक आधीच तेथे येऊन तिष्ठत होता. जड भोजनामुळे मंडळी जरा सैलावली होती.
काय अनाजी, आज दुपारची वामकुक्षी हुकली म्हणायची.
चालायचेच. महाराजांच्या पंगतीलाभापुढे वामकुक्षीची काय मातब्बरी. ज्या अर्थी इतक्या तातडीने बोलावणे आले आणि बहिर्जी इथे येऊन तयार आहे त्या अर्थी तशीच महत्त्वाची आणि निकडीची मसलत असावी.


काय हंबीरराव, गंभीरसे?
हं. बरे झाले महाराजांनी स्वत:च बोलावले. अन्यथा आज तीन प्रहरी महाराजांची मुलाखत मागायचीच होती.
काही विशेष?
पेशव्यांना खबर असणारच. दाऊदखान कुरेशीच्या फौजा तापी उतरून पुढे सरकल्या आहेत. अर्ध्यापेक्षा जास्त फौज अजून बऱ्हाणपुरातच आहे. नवनवीन तुकड्या त्याला येऊन मिळतच आहेत. खबर अशी की, पुढे सरकलेल्या फौजेची अगवानी महम्मद कुलीखान करीत आहे.
कुलीखानाचे नाव उच्चारताना हंबीररावांच्या स्वरातील कडवट तिरस्कार लपून राहिला नाही. ते नाव कानी पडताच बहिर्जी वगळता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तिरस्कार उमटला. दातांच्या फटींमधून तिरस्कार व्यक्त करीत मोरोपंत उद्गारले–
अखेर उंट टेकडीखाली आलाच तर. खऱ्यापेक्षा बाटगा अधिक कडवा असतो त्याचे आता पुन्हा एकदा प्रत्यंतर येणार म्हणायचे.


सर्पास वेळीच ठेचले तर बरे. अन्यथा सारे घर त्याच्या पायाखालचे. प्रत्येक सांदी-कोपरा त्याला ठावकी.
अनाजी म्हणाले ते रास्तच आहे. त्याचसाठी आता आपण बसलो आहोत. नाईक, सांगा तुमची खबर.
महालात शिरताशिरता महाराज एकदम बोलले. ताजीम न देता महाराज आल्यामुळे मंडळींची बरीच धांदल उडाली. धडपडत उठून साऱ्यांनी मुजरे घातले. मंद हसत, हातानेच महाराजांनी बसण्याची खूण केली. स्वत: मसनदीवर लोडाला टेकून बसले. बहिर्जी बसणे शक्यच नव्हते. त्याने बोलायला सुरुवात केली–


नेता… जी, चुकलो. महम्मद कुलीखान चाळीस हजार फौज, अवजड तोफखाना, बारूदखाना आणि पीलखाना अंदाजे पंचवीस ते तीस हत्ती, असा सरंजाम घेऊनशान औरंगाबादेस पोहोचला हाये. मागून येनारी फौज अदमासानं पावनेदोन लाखाची आसंल. सोराज्यावर ह्यो अखेरचा निर्नायक दनका हानन्याची आलमगिराची म्होईम हाये. येवडा तोंडावरचा पाऊसकाळ सरला का बादूरखान आन दिलेरखान बी या फौजला कुमक करनार हायती. पुढं-मागं सोता आलमगीर बाच्छा दख्खनमधी उतरनार अशी बी बोलवा हाये. कुलीखान त्याच्या संगत असलेली फौज अन् अवघ्या फौजच्या छावनीची विगतवार तयारी करून ठिवनार हाये. ही म्होईम म्हनं लई लांबनारी असनार हाय म्हनून मग समदी आखनी कुलीखान सोता बैजावार करून घेनार हाय. छावनी शहराच्या अल्याड अंगाला अडीच कोसांवर आसंल. समदा पसारा पंधरा-वीस कोसांत फैलावनार हाय. दर दोन गोटामधी किमान दीड-दोन कोसांचं अंतर राखलं जाणार हाय. घानीचा तरास आन बीमारी टाळन्याचा ह्यो उपाय हाय म्हनं. ही समदी आखनी बी कुलीखानाचीच. त्यानं ती मिर्जाराजांच्या आखनीवर बेतलिया म्हनं.


कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ.
निळोपंत, व्यक्तिगत मतमतांतरे ऐकण्यासाठी का आपण जमलो आहोत?
क्षमा महाराज. मात्र इतके होऊनसुद्धा महाराजांना अजून कुलीखानास बोल लावलेला खपत नाही. हे नवलच म्हणायचे.
हे माहीत असून आमच्या देखता असे वावगे बोलवतेच कसे? त्यांनी आखलेला छावणीचा आराखडा आपल्यासाठी कसा फायदेशीर ठरवता येईल हा विचार मनात का येत नाही? असो. मुद्दा तो नाही. मसलत वेगळीच आहे.


नाईक पुढे बोला.
नेता… आपलं कुलीखान छावनीची अशी येवस्ता लावून दोन-तीन दिवसांत बऱ्हानपुराकडं माघारा निघंल. ज्या ज्या ठिकानी छावनीचे गोट ऱ्हानार हायती त्या त्या ठिकानावर आखनी आन दाना-वैरनीची तयारी करून ठिवन्यासाठी कुलीखानानं संगत न्येलेली फौज कुटं हजार तर कुटं बाराशे अशी ऱ्हानार हाय. समद्या मोटमोट्या तोफा देवगिरीच्या अंगाला तळ करून हायती. त्याच्या वरल्या अंगाला बारूदखाना आसंल आन शहराच्या जवळ पान्याची सोय पाहून पीलखाना आसंल. चाळीस हजारांची ही फौज अशी जवळजवळ ईस कोसांच्या घेरात मस्त फैलावून ठेवलिया.


दुसरी खबर अशी हाय की, कुलीखान बऱ्हानपुरास्न लगोलग परत फिरनार हाय आन इस-पंचवीस हजारांची दुसरी फौज घेऊनशान पावसाळ्याची बेगमी करन्यासाटी सोराज्यातून धान्य, वैरन आन जनावरांची लूट करनार हाय. जमेल तितकी जाळपोळ आन साधेल तेवढा धुमाकूळ घालनार हाय. कुलीखान या कारवाईची जातीनिशी अगवानी करनार हाय म्हनं.
बघा बघा, महाराज बघा. आणि तरीसुद्धा आपण म्हणता…


सबूर, सबूर. बहिर्जीचे बोलणे पुरे होऊ देत.
जी क्षमा.
तिसरी खबर अशी हाय की, आता बऱ्हानपुरास परत निगालेल्या कुलीखानासंगत लई मोटी शिबंदी न्हाय. लई म्हनाल तर दोन-अडीचशे सडे हशम. वाटत साल्हेर-मुल्हेरच्या जंगलात आठ-धा दिस मुक्काम ठोकून तो सांबरांची अन् हरनांची शिकार खेळनार हाय. खबर अगदी पक्की हाय.
अरे व्वा! मियाँ मोगली शौकात अगदी तरबेज झालेले दिसतात.
हूंऽऽऽऽ
क्षमा महाराज.
तर बोला मंडळी. आता कोणाचं काय म्हणणं आहे ते सविस्तर सांगा. गनिमाचा सरदार कोण, हे दुय्यम महत्त्वाचं आहे. त्याने जी तजवीज करून ठेवली आहे तिचा फायदा कसा उठवता येईल याचा विचार करायचा आहे. गनिमाला चाप लावणे हे प्रमुख उद्दिष्ट. इतर सारे गौण. राजकारणात व्यक्तिगत हेवेदावे, राग-लोभ, प्रतिष्ठा, मान-अपमान यांना स्थान नाही. काय हंबीरराव खरे ना?
ते तर खरेच महाराज, पण खंडोजी खोपड्याला एक न्याय आणि नेताजीला दुसरा असे होऊ नये. खंडोजी परका आणि नेताजी भोसल्यांचा पाव्हणा म्हणून त्याला झुकते माप. असे झाले तर फौज बिथरल्याशिवाय राहणार नाही.


हाच का आमच्या फौजेचा आमच्यावर भरवसा? फौजेला समजावणे, सांभाळणे किंवा फितवणे कोणाच्या हाती?
तसे नाही महाराज, आपल्या प्रत्येक कृतीवर आणि शब्दावर फौजेतला प्रत्येक बारगीर, शिपाई आणि शिलेदार प्राणापलीकडे विश्वास ठेवतो. माझे म्हणणे एवढेच की, साप जर तावडीत घावतो आहे, तर… तर पुरता चेचूनच का काढू नये?


फौजेचा आम्हावर दृढ विश्वास आहे ना? मग या खेपेलासुद्धा आम्ही जे करू ते स्वराज्याच्या हिताचेच करू हा भरवसा मनी धरावा. फौजेचे मन कसे सांभाळायचे याचे धडे सरनोबतांस आम्ही देणे उचित नव्हे. आम्ही जे करतो किंवा करू त्याचा मतलब येरांच्या ध्यानी येणार नाही कदाचित, पण आमच्या सरदार आणि मुत्सद्द्यांना आकळावा ही अपेक्षा अनाठायी नव्हे. खंडोजी म्हणजे नेताजी नव्हे हे जितके खरे तितकेच दोन परिस्थितीत संदर्भ भिन्न आहेत. विचार करणाऱ्यांनी तरी दोन बाबींची गल्लत करू नये. कोणी गल्लत करू पाहील तर त्यास प्रोत्साहित करू नये. प्रश्न साप चेचण्याचा. आम्हास नेताजी जिवंत हवेत. कितीही किंमत मोजावी लागली तरी ते जिवंतच परत आले पाहिजेत. ते आमच्या शब्दाने दुखावून गेले आहेत. आपण नेमके काय करतो आहोत याचे भान येईपर्यंत ते पुरते आलमगिराच्या सापळ्यात अडकले गेले. आम्ही आग्र्यास न जातो, तर चित्र कदाचित वेगळे असते. आमच्यावर सूड उगवण्यासाठी आता आलमगिराने त्यांना गुंतवले आहे, हे तर जगजाहीर आहे. जेव्हा कधी सवड सापडेल तेव्हा आलमगिराने त्यांचा केलेला शारीरिक आणि मानसिक छळ बहिर्जीकडून ऐकून ठेवा; त्यामुळे त्यांची रीतसर रुजवात झाल्याशिवाय फैसला होणार नाही.


एवढा वेळ साऱ्यांचे बोलणे शांतपणे ऐकत बसलेले त्र्यंबक सोनदेव किंचित खाकरत म्हणाले–
महाराजांचे म्हणणे रास्त आहे. जुन्या इमानाचे स्मरण देऊन मोहरा आपल्याकडे वळवता आला तर ते नक्कीच स्वराज्याच्या हिताचे ठरेल. एवढा मोठा मातब्बर आणि अनेक भेद जाणणारा गडी गनिमाहाती असण्यापरीस, कसाही असो, आपल्या छत्राखाली परत आला तर भविष्यातले नुकसान टाळणे शक्य होईल. खंडोजीच्या काळची परिस्थिती आणि आजची यात किमान जाणकारांनी तरी गल्लत करू नये. याशिवाय राज्याचा गाडा सुरळीत चालवायचा असेल तर व्यक्तिसापेक्षतेचा विचार राजाला करायास हवा असे राजधर्म सांगतो.


नासलेल्या दुधाची बासुंदी आटवायला निघालात.
मोरोपंत…! तुम्हीसुद्धा?
राहिले.
बरे पुढे? मोरोपंत राजकारणाचे बोला.
महाराज, मोगली रीतीला अनुसरून आणि मिर्झाराजांसारख्या रणधुरंधर मुत्सद्द्याची नक्कल करण्याच्या नादात कुलीखान मोठीच गफलत करून बसला आहे. एवढी चाळीस हजारांची फौज आणि तोफखाना वगैरे त्याने वीस कोसांत विखरून ठेवले आहे. त्यांच्यासोबत बरा खजिना आणि गल्ला असणारच. विखुरलेल्या सर्व गोटांवर एकाच वेळी छापा टाकला तर चाळीस हजारांचा खुर्दा उडण्यास कितीसा वेळ लागणार? कुलीखानास जिवंत धरून आणायचे असेल तर तो बऱ्हाणपुराच्या वाटेवर साल्लेर-मुल्हेरच्या रानात शिकार खेळण्यात गुंतला असतानाच छापा घातला पाहिजे. स्वराज्याच्या सीमेवर खेटून राहून शिकारीचा खेळ खेळण्याचे तो योजतो आहे. यात माझ्या दृष्टीला तरी त्याचा गाफील अतिआत्मविश्वास किंवा अहंगंड कारण असावा असे वाटत नाही. आपल्यावर धरणे यावे अशी कदाचित तो अपेक्षा करीत असावा अशी शंका आमच्या मनी डोकावू पाहत आहे. ही फौज विखरून ठेवण्याची गफलतसुद्धा त्याने याच कारणाने केली असेल का, अशी आम्हास शंका वाटते. असो. तो हे जाणीवपूर्वक करीत आहे की अनवधानाने, गाफीलपणे करीत आहे की खिजवण्यासाठी अहंगंडाने यात स्वारस्य दाखवण्याचे कारण नाही. उघड्यावर लोण्याचा गोळा पडला आहे आणि घरधनीण जागेवर नाही. मग बोक्याचे जे कर्तव्य तेच आपले. ज्या वेळी कुलीखानाच्या मुक्कामावर हल्ला होईल, त्याच सुमारास या विखुरलेल्या फौजेवर घाला घालून तिला परास्त करून टाकू. पहिल्याच फटक्यात एवढा जबरदस्त दणका बसला तर मागाहून येणाऱ्या फौजेचे नीतिधैर्य पार गळून गेल्याशिवाय राहणार नाही. भ्यायलेली, हबकून गेलेली फौज हजारांची की लाखांची याला काहीच महत्त्व उरत नाही.


व्वा! भले शाबास! याला म्हणतात पेशव्यांचा मनसुबा. एकदा मनाची कवाडे उघडली की, मनातली जाळी-जळमटे आपसूक उडून जातात. डोळ्यांवरची ढापणे काढली की, स्वच्छ दिसू लागते. मग स्वराज्यहितापुढे अन्य सारे गौण ठरते. ही मसलत ऐकून आम्हास मनस्वी आनंद झाला. अनाजी, तुमची काय राय आहे?


मोरोपंतांचा मनसुबा अगदी बिनतोड आहे. छापा असा अकस्मात आणि जोरदार असावा की, एका गोटाला दुसऱ्याची मदत करायला जायचे म्हटले तरी उसंतच मिळू नये. असा कारगर असावा की, खबर सांगायला माणूसच शिल्लक राहू नये. छाप्याची खबर नेताजीरावांस मिळेल ती ते आपल्या ताब्यात असताना आपल्याकडूनच.


अनाजी, नेताजीकाकांचा उल्लेख कुलीखान न करता नेताजीराव असा केलात, मनाला फार संतोष झाला. कारण नेताजीचा कुलीखान झाला यास आमचा बोल कारण आहे ही टोचणी आमच्या काळजात अहोरात्र सलत असते.


आम्ही जाणतो महाराज. धन्याच्या मनातली बोच जाणून घेणे हाच सेवक धर्म आहे. स्वराज्याच्या कारभारात महाराजांनी ज्या स्थानी ठेवले आहे त्या स्थानी बसून मन आणि डोळे उघडे ठेवून कारभार करताना अनेक गोष्टींचे अंदाज बांधता येतात. साऱ्याच गोष्टी उघड न बोलण्याचे अवधान मात्र सांभाळले पाहिजे. आईसाहेबसुद्धा हाच सल उरात ठेवून गेल्या हेही आम्ही जाणतो. स्वराज्याची पहिली मोठी झुंज पुरंदरावर झाली. त्यात नेताजीरावांनी केलेल्या कामगिरीस तोड नाही. त्याच पुरंदराच्या लढाईनंतर पन्हाळ्याच्या मोहिमेत हे असले विपरीत घडले या योगायोगाचे खुद्द आईसाहेबांनाही कायम वैषम्य वाटत राहिले. ते असो, पण महाराज नेताजीरावांवर छापा घालायचा आणि त्यांना जिवंत धरायचे म्हणजे काही पोरखेळ नव्हे. मोरोपंतांचा होरा सत्यात उतरला तर प्रश्नच नाही पण आपण तयारी ठेवताना तो सत्य असेल असे मानून चालणे व्यवहारास धरून नाही; त्यामुळे त्या कामी त्याच तोलामोलाचा मोहरा योजावा लागेल.


अगदी रास्त. आमच्या मते खुद्द हंबीररावांनीच ही जोखीम सांभाळावी. बरखास्त असले तरी सरनोबतच ते. तेव्हा सरनोबतांचे धरणे सरनोबतांनी सांभाळले तर ते रीतीला शोभून दिसेल.
आज्ञा महाराज.
बहिर्जी…
जी. नेताजी सरकारांसंगतच्या तुकडीत फितवा करन्यात यश आलंया. त्यांच्या अंगरक्षक दस्त्याचा रिसालदार नर्दुल्लाखान म्हनून कोनी पठान हाय. म्हाबतखानाचा खास मानूस. बाच्छावाच्या मर्जीनं त्येनं त्येला सरकारांवर ध्यान ठिवन्यासाठी पार अफगानिस्तानापासून ठिवलंया. आता त्यो सरकारांच्या बी मायत हाय. थ्येट त्यालाच फोडन्यात यश घावलंया. त्यो पठान पूर्वी सोराज्याच्या चाकरीत व्हता. पुरंदरानंतर जी थोडकी पडझड झाली त्यात घरटं सोडून उडून ग्येलेल्या पाखरांपैकी त्यो बी येक हाय. त्याला पूर्वीच्या इमानाची याद दिली, काळजाला काळजातून साद घातली. म्हाराजांचा कौल मिळवून देन्याचा वायदा क्येला आन फोडला गडी. छाप्याच्या राती त्योच पहाऱ्यावर ऱ्हाईल अशी तजवीज त्यो करनार हाय. त्याची समदी मानसं दोन्ही दंडांना पिवळी कापडं बांधून आन् डोईला पिवळी मुंडाशी बांधून ऱ्हातील.


नेताजी साल्हेर-मुल्हेरच्या जंगलात कधी येणार आहेत; काही अंदाज?
आता हंबीररावांनीसुद्धा मसलतीत अगदी मनापासून भाग घेण्यास सुरुवात केली.
जी सरकार. परवा ते शहरातून कूच करून निघतील. चार-सा रोजात त्ये ठरल्या ठिकानी पडाव करतील. येकाद दिवस अलीकडं-पलीकडं. मात्र येकदा मुक्काम केल्यानंतर आठ-धा दिस मनसोक्त शिकार खेळल्याबिगर त्ये काही हलायचे न्हाईत. ही खबर अगदी पक्की.


आज वद्य तृतीया आहे. म्हणजे नेताजी वद्य दशमीपर्यंत साल्हेर-मुल्हेरजवळ पोहोचतील म्हणायचे. साहजिकच त्यांचा मुक्काम मोगली सरहद्दीत खिंडीच्या पलीकडे पडलेला असणार.
जी सरकार.


हंबीरराव, उद्या दुपारनंतर तुम्ही गडावरून कूच करा आणि जल्दीने साल्हेरी गड गाठा. नेताजीकाकांसोबत किती हशम असतील म्हणालात, नाईक?
दोन-अडीचशे असत्याल. त्यात पन्नास नर्दुल्लाखानाच्या दस्त्यातले. मंजे आता आपल्या तर्फेने वळवलेले.
तर हंबीरराव निघताना तुम्ही सोबत दोनशे स्वार घ्या. तीनशे हशम साल्हेरीच्या शिबंदीमधून उचला. वाटल्यास पन्नास अधिक घ्या, पण हशम कमी पडता उपयागाचे नाही.
जी महाराज.
तुमच्यासोबत खुद्द बहिर्जी असतील. नाईक तुमच्या नर्दुल्लाखानास सूचना पोहोचत्या करा; वद्य चतुर्दशीच्या रात्री त्याच्या तळावर छापा पडेल. गड सोडताना तुम्ही सरनोबतांसोबत नसाल. वाटेतील कामे उरकत छाप्याच्या दोन दिवस आधी साल्हेरी गाठा. नर्दुल्लाने पक्क्या तयारीत राहावे. गफलत होता उपयोगाची नाही.


जी महाराज.
हंबीरराव, रायगडावरून नेलेले शंभर स्वार त्या रात्री बहिर्जीच्या हुकमतीखाली राहतील. बहिर्जी, नर्दुल्लास कळवणे दंगलीचा फायदा घेऊन नेताजीकाकांना घेऊन गर्दीच्या बाहेर काढणे. तो स्वत:च अंगरक्षकांचा रिसालदार असल्याने संशय न येता विना रोकटोक त्यास हे सहज साधावे. गर्दीतून बाहेर येताच बहिर्जीच्या तुकडीने नेताजीकाकांस व नर्दुल्लाच्या तुकडीस घेरावे. नेताजीकाका प्रतिकार करू पाहतील तर त्यांस जेरबंद करून चालवणे मात्र समजुतीने संगे येतील तर सन्मानाने वागवावे. अजिबात वेळ न दवडता स्वराज्यात दौड मारावी ती थेट रायगड जवळ करण्यासाठी. तुम्ही मागे वळून पाहण्याचे काम नाही. छाप्याचे बाकी सोपस्कार हंबीरराव सांभाळतील. रायगडाच्या वाटेवर कुठे थांबायचे, कुठे ताज्या दमाची जनावरे घ्यायची या साऱ्याचा चोख बंदोबस्त तुम्ही साल्हेरीस पोहोचण्याआधी झाला पाहिजे. बाकी तपशील सांगणे गरजेचे नाही.


जी महाराज, चिंता नसावी. शक्यतो लवकर कैदी हुजूर दाखल केला जाईल.
हंबीरराव, छापा असा कारगीर झाला पाहिजे की, एकही शिपाई प्यादा, खिदमतगार वा खोजा जिवंत निसटता कामा नये. बऱ्हाणपूर किंवा औरंगाबाद कुठेही खबर पोहोचण्यासाठी कुणी जिवंत उरता कामा नये. नेताजीकाका रायगडी पोहोचल्याची आणि तळावर छापा पडल्याची अशा दोन्ही खबरी दाऊदखानास एकदमच समजू देत. तपास करण्यास येतील दहा-पंधरा दिवसांनी, तेव्हा त्यांना सापडू देत उद्ध्वस्त झालेला तळ आणि घारी-गिधाडांनी फाडलेली, कोल्ह्या-कुत्र्यांनी खाल्लेली त्यांच्या हशमांची प्रेते.
जी महाराज, तसेच होईल. पण प्रेतांना गती द्यायची नाही?


नाही. प्रेते तशीच सडत पडू देत. स्वराज्य बुडवण्यास निघाला आहे दाऊदखान, जाणवू देत त्याला स्वराज्याची दहशत. आमच्या सुसंस्कृतपणाला हे म्लेंच्छ दुबळेपणा समजतात. तेव्हा त्यांना त्यांच्याच भाषेत समजावलेले बरे. आमच्या अंदाजाप्रमाणे तळावर स्त्रिया नसतील. पण जर दुर्दैवाने असल्याच तरी त्यांचा अपवाद करू नये कारण हा प्रसंगच तसा बाका आहे. जखमी, शरणागत म्हणून अभय देणे नाही. सद्गुण विकृती ठरू पाहतील तर त्यांस मुरड घालून वास्तवाचे भान आणणे हीच राजनीती. ही राजनीती आम्ही सोडली आणि फक्त सद्गुणांचे डांगोरे पिटले. नतीजा? आज आमच्याच देशात आम्ही म्लेंच्छांचे गुलाम. हंबीरराव, एक जरी इसम वाचून पळाला तरी तुम्हाला किंमत मोजावी लागेल, हे पुरते ध्यानात असू द्या. सरनोबतीचा शिरपेच मस्तकी राहणार नाही.
आज्ञा. केसाइतकी कसूर होणार नाही खात्री असो देत.
रक्ताचे पाणी करून आम्ही स्वराज्य उभे करायचे. आमच्या माणसांचे रक्त सांडायचे, आमच्या आया-बहिणींनी विधवा व्हायचे तेव्हा कुठे स्वराज्य जीव धरू पाहते आहे आणि या तुर्कांनी लाखालाखांच्या फौजा आणून त्यावरून वरवंटा फिरवायचा. यापुढे स्वराज्याच्या हद्दीत घुसताना प्रत्येक मुघल सैनिकाच्या मनात दहशत निर्माण झाली पाहिजे. स्वराज्याविरुद्ध तलवारीस हात घालताना, मनाचा थरकाप झाला पाहिजे. लढाईस उभा ठाकण्यापूर्वीच तो मनातून खचलेला, पराजित झालेला असला पाहिजे. मग खुद्द आलमगीर चालून आला तर त्याचे थडगे इथेच बांधणे अवघड होणार नाही.


म्हणजे महाराज नेताजीरावांना गिरफ्तार करून आणणे हे काम आणि त्याचे निमित्त करून गनिमाच्या मनात दहशत बसवणे हे मुख्य काम असेच ना?
अगदी बरोबर. मोरोपंत, विखुरलेल्या छावणीवर अचानक छापे मारून तीच दहशत तुम्ही सर्वांनी निर्माण करणे आहे. ज्या रात्री हंबीरराव छापा घालतील त्याच रात्री म्हणजे वद्य चतुर्दशीच्या रात्री औरंगाबादच्या विखुरलेल्या छावणीवर छापे पडतील. त्यात कसूर वा दिरंगाई होता उपयोगाची नाही. ढिलाईचा मुलाहिजा राखला जाणार नाही. छाप्यात लुटीस महत्त्व नाही. किंबहुना या छाप्यांचे ते उद्दिष्टच नव्हे. या छाप्याचा हेतू आहे विनाश. दहशत. धाक. सर्व तोफा बहिऱ्या करून सोडा. दिसेल तेवढी बारूद जाळून टाका. भस्म करून टाका. सहजी हाती लागेल तेवढाच रोकड खजिना उचला. दारूच्या कोठारावर पेटते बाण टाका. हत्ती-घोडे मात्र हाकून घेऊन या. बाकी सारे अग्नेय स्वाहा। जेवढी म्हणून कत्तल उडवता येईल तेवढी उडवा. आपल्या तलवारींना गनिमांचे रक्त मनसोक्त पाजा. जर चुकून कोणी जिवंत राहिलाच तर त्याची अवस्था अशी व्हावी की, या परते मरण परवडले. मात्र आपली माणसे गमावणार नाहीत याची पण पुरती काळजी घ्या. कोणी वेडे साहस करता कामा नये. आपल्या माणसाचा जीव जाता कामा नये.


*यानंतर बहिर्जीने छावणीचे गोट कोठे पडले आहेत, तिथल्या शिबंदीचा आणि हत्यारांचा नेमका अंदाज वगैरे तपशील सांगितला. त्यावरून कोणी कुठे आणि कसे छापे मारावे, कोणी कोणत्या ठाण्यावरून वा गडावरून शिबंदी उचलावी याचा नीट तपशील ठरला. सर्व तपशील पक्के होईतो दिवेलागण व्हायला आली. मंडळींना निरोप देताना महाराजांनी प्रत्येकास निक्षून सांगितले–*



*कामगिरी उरकताच कोठे रेंगाळणे नाही. तडक रायगड गाठणे. अनेक महत्त्वाची कामे तुम्हासाठी खोळंबली असतील. नेताजीकाकांचा फैसला तुम्हा देखताच झाला पाहिजे.*
*मुजरे घालून मंडळी बाहेर पडताच समया उजळण्यासाठी कुळंबिणी महालात आल्या.*
*_क्रमश:_*

*________⚔📜🚩

📜⚔🗡अग्निदिव्य भाग - 29 🗡⚔📜



*अग्निदिव्य*

*लेखक : कल्याणीरमण बेन्नूरवार*

*नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜⚔*

*___⚔🚩⚔📜🚩_______*

*हजच्या मार्गाने घियासुद्दीन गेला त्याला बराच काळ उलटून गेला. त्याचे ‘आजारी’ मुरीद आता चांगलेच ‘तंदुरुस्त’ झाले होते. कोणताच उद्योग नसल्याने ते छावणीत उनाडक्या करीत फिरत राहत. अखेर नर्दुल्लाखानाने दटावून त्यांना आळा घातला. छावणीतल्या छावणीत निरोपांची ने-आण करणाऱ्या हरकाऱ्यांच्या कामावर त्यांना नेमले; त्यामुळे छावणीतल्या अंतर्गत बातम्या मिळणे सुलभ झाले.*

* कुलीखानाने संपूर्ण प्रांतात केलेला दौरा चांगलाच लाभदायक ठरला. संपूर्ण अफगाण प्रदेशात त्याचा धाक आणि दबदबा निर्माण झाला. मोगली अधिकाऱ्यांना जसा त्याचा वचक बसला तसेच अफगाण कबिलेवालेसुद्धा वचकून राहू लागले. अर्थातच या वार्ता दिल्लीत पोहोचत होत्याच. तो काबूलला परतला त्यालासुद्धा काही आठवडे लोटले. पण बादशहाकडून ना कुमक आली ना वापसीचे फर्मान. मोगली हिशेबाने आणि अफगाणी प्रदेशाच्या विस्ताराच्या तुलनेत फौज एवढी तोकडी होती की, एकही सेनानी नवे आक्रमण हाती घेण्याची हिंमत करीत नव्हता. आजवर जेवढे मिळविले होते ते राखण्यातच बहुतेक सगळे मनुष्यबळ गुंतून पडले होते. काही ना काही उद्योग काढून कुलीखान फौजेत हालचाल ठेवत असला तरी प्रत्यक्ष लढाईची मोहीम नसल्याने शिपाई कंटाळले होते. लढाईनंतरच्या लूटमारीला मोगली सैनिक चटावला होता. किंबहुना त्याला एक धार्मिक अधिष्ठान असल्याने लूटमार हा त्यांच्या उत्पन्नाचा एक स्रोत होता. तो आटला होता. रयतेला लुबाडण्यावर कुलीखानाने कडक पायबंद घातल्याने त्यांची कुचंबणा होत होती; त्यामुळे फौजेत अस्वस्थता दाटू लागली होती. घरापासून, बायका-मुलांपासून दूर राहावे लागत असल्याने फौज वैतागली होती.*


सरलष्कराच्या दरबारात एके दिवशी कुलीखानाने या विषयाला तोंड फोडले. कुलीखानाने जोशपूर्ण भाषण केले–
ईमानवालो, जनाब महाबतखान सरकारांच्या सोबत मोठी फौज निघून गेली आणि आपण जणू पोरके झालो; त्याला साल उलटून गेले. मध्यंतरी आपण सर्वांनी आम्हाला साथ दिल्यामुळे आपण जे उपाय केले त्यामुळे फौज हालती राहिली. राजधानीतून खजिना कमी आला तरी आपण पैसा उभा केला. फौजेच्या गरजा पुऱ्या केल्या. यामुळे फौज नाराज असली, तरी कुठे बंडाळी झाली नाही. पण मोहीम थंडावल्याने शिपाई जवळपास रिकामाच आहे. रिकामे मन सैतानाचे घर. आलाहजरत आलमपन्हांना आपल्याकडे लक्ष द्यायला फुरसत नाही याचा अर्थ ते दुसऱ्या कोणत्यातरी अतिमहत्त्वाच्या कामात व्यग्र असले पाहिजेत. आपण काहीतरी चमकदार कामगिरी केल्याशिवाय त्यांचे आपल्याकडे लक्ष जाणार नाही. आता असे काहीतरी करून दाखवायचे जे आजपर्यंत सलतनतीत घडले नसेल. आपण अफगाणिस्तानचा बराच मोठा हिस्सा जिंकला हे खरे, पण अजून बरेच जिंकायचे आहे. ते आपण जिंकून घ्यायचे. आता स्वस्थ बसायचे नाही.


एक बुजुर्ग दरबारी मनसबदार कुत्सित स्वरात पण नाटकी विनयाने म्हणाला–
जनाब सरलष्कर म्हणतात ते अगदी बरोबर आहे. काहीतरी केलेच पाहिजे. पण सवाल असा आहे की, कशाच्या भरवशावर? मोहीम करायची तर फौज हवी, तोफा-दारूगोळा हवा, खजिना हवा. मोगली मोहीम म्हणजे काही मरगट्टे चालवतात तशी दरवडेखोरी नव्हे.


अगदी बरोबर. मराठ्यांनी जशा प्रकारे लढाया केल्या आणि प्रदेश मिळवला तसेच लढून आपण प्रदेश मिळवायचा. तशा लढाया कशा लढतात, मी शिकवतो तुम्हाला. त्यासाठी आपल्याकडे असलेली फौज पुरेशी आहे. थोडीबहुत इथल्या पठाणांची भरती करू. मनगटात ताकद आणि हौसला बुलंद असला तर तोफांची आणि बंदुकांची काहीच गरज नसते. रही बात खजाने की। जनानखान्यांचा आणि बाजारबुणग्यांचा छावणीवर पडणारा बोजा दूर झाल्याने आपले खर्च आटोक्यात आले आहेत. शिपायांना तनख्वाह सुरूच आहे. वेगळा तनख्वाह देण्याची गरज नाही; तसेच ते गनीमतमधून कमावतील ते वेगळेच. त्याशिवाय आपण व्यापाऱ्यांकडून भरपूर कमावतो आहोत. त्यातून बरीच शिल्लक जमली आहे. शिवाय इथली रयत आता सलतनतीची रयत आहे. तिच्याकडून थोडा कर आणि सारा वसूल करू. हिंमत, बुद्धी, युक्ती आणि ताकद यांचा आत्मविश्वासाने योग्य उपयोग केला की काहीच अशक्य होत नाही. सुलताने आली मरहूम हजरत बाबर सरजमीन-ए-हिंदमध्ये लाखांची फौज आणि पेटारे भरून सोने घेऊन आले नव्हते.


नवीन तडफदार तरुण सरदारांमध्ये कुलीखानाचे वक्तव्य ऐकून मोठा उत्साह संचारला. एकामागोमाग एक तरुण सरदार तडफदार बोलून सरलष्करांचे म्हणणे उचलून धरू लागला. मात्र चैनबाजीची चटक लागलेले काही खुशालचेंडू बुजुर्ग सरदार कुरकुर करू लागले. त्यांनी अनेक खुसपटे काढली. पण तरुण सरदारांनी त्यांना परस्परच उत्तरे दिली. अखेर कुलीखानाची योजना यशस्वी करून दाखवायची आणि आलाहजरतांना चकित करायचे, असा सर्वांनी उत्साहाने निर्णय घेतला. इतका वेळ शांतपणे उभा राहून सर्व चर्चा ऐकत असलेला गुलाम हैदर गंभीरपणे म्हणाला–
जनाबे आली, जान की अमान पाऊं तो कुछ अर्ज करूं…
अजी आपल्यासारख्या तजुर्बेकार बुजुर्गांच्या मशवऱ्यांची आम्हाला नेहमीच गरज असते. बोला. फक्त एक सूचना की, तरुणांना नाउमेद करू नका.


अजिबात नाही. जनाबे आली जे करू म्हणत आहेत ते सलतनतीच्या भल्याचेच आहे. फौजेच्या कल्याणाचे आहे यात संशय नाही. मात्र माझा इतक्या पिढ्यांचा तजुर्बा सांगतो आहे की, जल्दबाजी नको. दरबारातील काही मोजक्या लोकांचे ऐकून संशयाचे भूत दरबारात थैमान घालताना मी पाहिले आहे. केवळ गैरसमजामुळे वफादारांचे रक्त सांडलेले मी बघितले आहे. अनेक इमानदारांचे संसार बरबाद झाले आहेत. माझी जनाबे आलींना विनंती आहे, त्यांनी या मोहिमेसाठी आलमपन्हांची रजामंदी घ्यावी. अन्यथा जनाबे आलींचे दुश्मन ही बंडखोरी, बगावत आहे म्हणून आलाहजरतांचे कान भरतील आणि अनर्थ ओढवेल. आलाहजरतांनी सख्ख्या भावांची गुस्ताखी बख्शली नाही. आपण तर अखेर गुलाम. बस्स एवढेच. याउपर जनाबे आलींचा हर हुक्म सर आँखोंपर.


तो सबुरीचा सल्ला मात्र सर्वांना पटला. कुलीखानाने पत्र लिहिण्यासाठी आवर्जून गुलाम हैदरची मदत घेतली आणि अत्यंत काळजीपूर्वक, तोलूनमापून शब्द वापरून पत्र तयार केले आणि सरलष्कराच्या सही-शिक्क्याने खुद्द बादशहाच्याच नावे पत्र रवाना झाले. पत्राचे उत्तर येण्यासाठी साडेतीन-चार महिन्यांचा काळ लागणार होता. पण तेवढा वेळ नुसतेच बसून न राहता कुलीखानाने नव्या मोहिमेची जंगी तयारी सुरू केली.
-
-
महाराजांना जाग आली तेव्हा पूर्वा नुकतीच उजळत होती. करदर्शन करून त्यांनी उजळत्या पूर्वेला नमस्कार केला आणि ते पलंगावरून खाली उतरले. त्यांची चाहूल लागून दारावरचा हुजऱ्या लगबगीने आत आला. मुजरा घालून खालमानेने म्हणाला–
रामराम मायबाप. म्हाराज रामपारी तकलीप देतुया मापी असावी. पर भल्या पाटंच सरदरवाजास्नं माणूस आल्ता. कोनी बामन सासवडच्या अंजिराची परडी आत्ताच आपल्या सुपुर्द करायची हाय म्हनून रातभर तटाभाईर ताटकळत बसलाया. लईच जिद करतुया, ऐकना झालाय. त्येचं काय करावं म्हनून हवालदार इचारतुया.
का? थेट आमचा सल्ला का घ्यावा वाटला? किल्लेदाराच्या कानी ही गोष्ट का घातली नाही?
किल्लेदार सरकारास्नी रातीलाच कळवलया पर ते म्हनलं रातच्याला गडाचे दरवाजे आपल्या हुकमाबिगर उगडत न्हाईत. दरवाजावरून राऊत आल्ता तवा मध्यान रात झाल्ती. आपला डोळा लागला व्हता म्हनून नींद खराब क्येली न्हाई.


उत्तम! छान! चांगली अक्कल चालवलीत. आत्ता या क्षणी असेच सुटा आणि किल्लेदार सूर्याजी पिसाळांना हुजूर दाखल होण्यास हुकूम झाला म्हणून सांगावा द्या. म्हणावे, असाल तसे दाखल व्हा. पोशाख करण्यात वेळ दवडू नका. दातवण करीत असाल तर चूळ वाड्यावर येऊन भरा. आमचे दातवणादी विधी आटोपण्याच्या आत किल्लेदार या इथे आमच्या महालात दाखल झाले पाहिजेत. समजले? हवालदारास हुकूम द्या, त्या ब्राह्मणास सन्मानाने पाचाडच्या वाड्यात न्या. त्यांस म्हणावे, आन्हिके उरकून आमच्या खासगीच्या दालनात बसावे. घटकाभरात आम्ही पोहोचतो आहोत. वाड्यावर कारभाऱ्यांस वर्दी द्या; आम्ही स्नान-पूजा तेथेच करू. आता निघा. तोंडाकडे काय पाहत बसलात?
जी, महाराज…


गडबडीने मुजरा घालून हुजऱ्या पळतच बाहेर पडला. महाराजांचे शौच-मुखमार्जन आटोपण्याच्या आत किल्लेदार सूर्याजी पिसाळ हुजूर दाखल झाले. खरोखरच ते फक्त धोतर आणि पैरणीवर होते. महाराजांसमोर बोडक्याने उभे राहणे शक्य नव्हते म्हणून एक पंचा मुंडाशासारखा डोक्याला गुंडाळला होता. अशा प्रकारे बोलावणे म्हणजे कंबख्तीच, हे माहीत असल्याने त्याचे पाय लटपटत होते, मुजरा घालणारे हात थरथरत होते. महाराजांच्या क्रुद्ध चेहऱ्याकडे नजर टाकण्याची हिंमत नव्हती तिथे नजर भिडविणे कुठले जमायला?


या किल्लेदार. खास तख्ताच्या गडाची किल्लेदारी आम्ही तुम्हावर सोपवली ती या विचाराने की, तुम्हापाशी काही विशेष योग्यता आहे. पण तुम्ही तर हुजऱ्यापेक्षा सांगकामे निघालात. तुम्हास खास हिदायत देऊन ठेवलेली आहे की, सासवडचे अंजीर घेऊन येणारास दिवसाच्या कोणत्याही क्षणी, आम्ही जेथे असू तेथे आम्हासमोर दाखल करावे. याचा अर्थ आणि महत्त्व तुमच्यासारख्या विश्वासू म्हणवणाऱ्या अनुभवी मानकऱ्यांस उमगू नये? आश्चर्य!!


क्षमा महाराज. पण काल महाराजांना ज्वर होता असे कळले. म्हणून मध्यान रात्री तकलीफ दिली नाही.
अस्सं? स्वराज्याच्या काजापुढे आमच्या निद्रेची मातब्बरी कधीपासून धरू लागलात?
क्षमा महाराज, पण रात्री-अपरात्री आपणांस त्रास देऊ नये असा महाराणी सरकारांचा हुकूम आहे.
त्यापायी त्या गरीब ब्राह्मणास भरथंडीत रात्रभर तटाबाहेर ताटकळवलेत? त्या ब्राह्मणाने दिलेल्या निरोपाचा मथितार्थ तुम्हाला कळला नाही असे आता वर सांगू नका. मुलाहिजा राखला जाणार नाही. निरोप मिळताच सरदरवाजावर का गेला नाहीत? ठीक आहे, या गफलतीचा फैसला आम्ही सवडीने करू. आत्ता असेच त्या ब्राह्मणास घेऊन पाचाडास जा. हवालदार आमचा हुकूम तुम्हाला कळवेलच. पाचाडास आमची वाट पाहा. अनुमतीशिवाय वाडा सोडू नका. जसे आहात तसेच आत्ता इथूनच निघा. आमची मुलाकात होईल तोपर्यंत तुम्ही चाकर कोणाचे, स्वराज्याचे की महाराणी सरकारांचे हे मनाशी आठवून ठेवा. या.


आज्ञा.
थरथरत्या पावलांनी सूर्याजी महालाबाहेर पडला. महाराजांनी तातडीने आपल्या विश्वासू हुजऱ्यांच्या हस्ते मोरोपंत, अनाजी दत्तो वगैरे कारभारी मंडळींना सकाळच्या दरबारातील कामासंदर्भात सूचना धाडल्या. दुपारचा खाना पाचाडास घेणार असल्याची वर्दी दारुणी महालात रवाना केली. त्यानंतर जुजबी पोशाख करून ते लगबगीने वाड्याबाहेर पडले. पाचाडाच्या वाड्यावर पोहोचताच मुजऱ्यांकडे दुर्लक्ष करीत ते तडक आपल्या दालनाकडे निघाले. देवडीवर तिष्ठत बसलेल्या सूर्याजीकडे त्यांनी फक्त एक कटाक्ष टाकला. दालनात एक शुचिर्भूत ब्राह्मण हातात फळांची करंडी सांभाळीत तोंडाने देवाचे पुटपुटत तिष्ठत होता. महाराजांचे पाऊल दालनात पडताच मुजरा करून तो सस्मित मुद्रेने महाराजांकडे पाहत उभा राहिला. खिडकीतून येणारे कोवळे ऊन त्याच्या चेहऱ्याच्या प्रसन्नतेत अधिकच भर घालत होते. बैठकीवर बसत महाराज म्हणाले–


या मथुरे गुरुजी. बरीच लांबची मजल मारून आलात. आपली प्रसन्न, आनंदी मुद्रा पाहिली आणि आमचा जीव भांड्यात पडला. म्हटले आपण एवढी रात्र करून गडावर आलात, कोणती तातडीची खबर घेऊन आलात न कळे. सांगा, कोणती वार्ता आणलीत?


महाराज, वर्तमान शुभ आहे. हे तर आपण ताडलेच आहे. तितकेच ते तातडीचेसुद्धा आहे. नाईकांनी अगदी बजावून सांगितले आहे की, फळांची करंडी अतिशय मूल्यवान फळांनी भरलेली आहे. कितीही रात्र झाली तरी आपल्या सुपुर्द केल्याशिवाय उसंत घेऊ नये. अंजीर फळ मोठे नाजूक. एकदा पिकले की फार लवकर नासून जाते. म्हणून तातडी करणे निकडीचे होते.


सूचक हसत मथुरे गुरुजींनी परडी महाराजांसमोर तिवईवर ठेवली. परडीत हात घालून पाचोळ्याखाली दडविलेला कागद त्यांनी काढून हातात घेतला! अधीर नजरेने झरझर ते कागद वाचू लागले. त्यांच्या मुखावरची प्रसन्नता क्षणोक्षणी वाढू लागली. मान संतोषाने डोलू लागली. पत्र वाचून संपताच त्यांनी मथुरे गुरुजींकडे प्रसन्न कटाक्ष टाकला. काही क्षण नजर खिडकीबाहेर वळविली. मग पुन्हा एकदा सावकाशपणे सारे पत्र वाचून काढले. मग पत्राचा कागद काळजीपूर्वक उशीखाली ठेवून दिला.
सांगा मथुरे गुरुजी, काय खबर आमच्या नाईकांची?


महाराज, पत्रात सारे सविस्तर लिहिलेले आहेच. इतक्या वर्षांनंतर का होईना नेताजीरावांना संपर्क साधण्याचा मार्ग गवसला. आता नियमितपणे खबरा येण्यास सुरुवात व्हावी अशी आशा ईश्वरकृपेने उत्पन्न झाली आहे. नाईकांनी खास कळवण्यास सांगितले आहे की, आपला नजरबाज आफताबखान यानेच मोठ्या हिकमतीने हा मार्ग शोधून काढला आहे.
अरे व्वा! छान! आणखी काही?


त्यानंतर मथुरे गुरुजींनी नेताजीरावांनी अवलंबिलेले कडक धोरण, पैसा उभा करण्यासाठी योजलेले अनेक मार्ग, ठाण्यांना दिलेल्या भेटी, फौजेत मिळविलेली लोकप्रियता, सर्वसामान्य शिपाई, तरुण सरदार इत्यादींमध्ये मिळविलेले प्रेम, बुजुर्गांमध्ये उत्पन्न केलेला धाक आणि स्थानिक जमीनदार-रयतेत निर्माण केलेला दबदबा या साऱ्यांचे तपशीलवार आणि रसभरित पण वास्तव वर्णन महाराजांना ऐकवले. महाराज अत्यंत समाधान पावले. ऐकत असताना सारा वेळ महाराज डोळे मिटून बसून होते. त्यांनी मध्ये एकही शब्द विचारला नाही. जिरेटोपातील मोत्यांचा घोस मंदपणे डुलत होता.


जगदंब! जगदंब!! गुरुजी भल्या सकाळी आपली भेट झाली, सुवार्ता घेऊन आलात; ही सारी आई जगदंबेची कृपा. तुम्ही आमच्या मनावरचा फार मोठा भार हलका केला आहे. फार लांबची मजल मारून आला आहात. आता चार दिवस विश्राम करा. आम्ही सूर्याजींना सूचना देतो, ते आपली व्यवस्था करतील. आम्ही नाईकांसाठी पत्र तयार करतो, ते घेऊनच गड उतरावा. या आता. रात्रभर आपल्याला थंडीत कुडकुडत ताटकळावे लागले, यासाठी आम्ही दिलगीर आहोत.


स्वामी, त्यासाठी आपण कष्टी होऊ नये. चाकराने असे कष्ट सहन करणे हे त्यांचे कर्तव्यच असते. निष्ठांचे पीळ त्यातूनच घट्ट होतात. कल्याणमस्तु।
तोंडभर आशीर्वाद देऊन मथुरे गुरुजी बाहेर पडले आणि महाराजांनी सूर्याजी पिसाळांना बोलावून घेतले. पारोशा तोंडाने, उघड्याबोडक्याने धावपळ करून आणि बराच वेळ देवडीवर बसून, वाट पाहून सूर्याजी अगदी कानकोंडा होऊन गेला होता. पण महाराजांची प्रसन्न, हसरी मुद्रा पाहून थोडा त्याच्या जिवात जीव आला.


या किल्लेदार. नशीब जोरावर आहे तुमचे, वार्ता शुभंकर - आनंदाची होती म्हणून बचावलात; आता आम्हास आमचे तोंड विटाळायचे नाही. पण ध्यानात ठेवा, थेट आमच्याशी बांधलेले नजरबाज कोणाही कारणाने खोळंबता कामा नयेत. राजकारणाचे अनेक नाजूक गुंते त्यांच्या बातम्यांमध्ये गुंतलेले असतात. थोडा उशीरसुद्धा कोणाच्या प्राणावर बेतू शकतो किंवा स्वराज्याचा घात करू शकतो. नेताजीकाकांना उशीर झाला त्याचे काय परिणाम स्वराज्य भोगतेय ते बघताय ना? या खेपेला आम्ही आनंदात आहोत म्हणून माफी देत आहोत, पण पुन्हा अशी गफलत झाली तर किल्लेदारीचा मुलाहिजा राखला जाणार नाही. असो. मथुरे गुरुजी काही दिवस गडावर मुक्कामास राहतील. त्यांची उत्तम बडदास्त राखली गेली पाहिजे. रोज मिष्टान्न व्यवस्था करा.


आज्ञा.
मुजरा घालीत, पाठ न दाखविता सूर्याजी दारापर्यंत गेला तेवढ्यात महाराजांनी त्याला हाकारून पुन्हा बोलावले.
हं, ऐका. आणखी एक महत्त्वाचे. एक गोष्ट नीट गाठी बांधून ठेवा. दारुणी महालातील असे हुकूम महालाच्या उंबरठ्याच्या आतच ठेवायचे. त्यांची ढवळाढवळ सदरेपर्यंत पोहोचू द्यायची नाही. अशा हुकमांची लुडबुड जर स्वराज्याच्या कारभारात होऊ लागली तर फार मोठी दुरवस्था ओढवेल. सुज्ञ आहात, अधिक उघड करून सांगणे नको. बरे, असेच उघडेबोडके गडावर परतू नका. दिवस वर आला आहे. राबता सुरू झाला असेल. निष्कारण बभ्रा नको. वाड्यावरच स्नान उरका. आमच्या कपडेपटातून पोशाख देण्याची सूचना आम्ही कोठावळ्यांस देतो. तयार होऊन निघा. मथुरे गुरुजी थांबतील थोडा वेळ.
महाराजांचे मनमोकळे मिस्कील बोलणे ऐकून सूर्याजीचा धीर चेपला आणि त्याच्या मुद्रेवर हास्य उमटले. हसत हसत मुजरा करून तो बाहेर पडला.

महाबतखान दिल्लीत परतला आणि मागोमाग तक्रारींच्या पत्रांचा महापूर उसळला. महाबतखानास नर्दुल्लाखानाकडून येणारी ‘अधिकृत’ / ‘गुप्त’ वार्तापत्रे आणि वजीर जाफरखानास सिद्दी फुलादखानामार्फत मिळणारे सिद्दी आफताबखानाचे खलिते यांची भर वेगळीच! एकच बातमी. वेगवेगळ्या मनोवृत्तीतून आणि हितसंबंधांतून वेगवेगळे आकार-विकार घेऊन येत होती. कुलीखानाने छावणीतून जनानखान्याचे केलेले उच्चाटन, त्यांची पेशावरला केलेली रवानगी, जनानखान्याचा खर्च ज्याचा त्याने करण्याची सक्ती, त्यावर पूर्वी सरकारातून झालेल्या खर्चाची सक्तीने केलेली वसुली, फौजेची प्रत्यक्ष शिरगणती, शिपायांना सुविधा पुरवून त्यांचे चालविलेले लाड, सामान्य शिपायांशी त्याचा थेट संपर्क, सैन्यात त्याला मिळणारी लोकप्रियता, सैन्याच्या तुकड्यांच्या सततच्या बदल्या, निर्माण केलेली नवनवी उत्पन्नाची साधने, टपाल व्यवस्थेतल्या सुधारणा अशा एकापेक्षा एक अचंबित करणाऱ्या बातम्या राजधानीत पोहोचत होत्या. अनेक शतकांच्या मुघलशाहीत असे अक्रीतघडलेले ना कोणी पाहिले, ना ऐकले.


उमराव आणि दरबाऱ्यांमध्ये अस्वस्थ चर्चा सुरू झाली होती. महाबतखानाचा जामीन अडकला असल्याने त्याचा जीव टांगणीला लागला. तो आणि जाफरखान त्यांच्या परीने प्रत्येक लहान-मोठी खबर बादशहाच्या कानावर घालीत होते. बादशहा ऐकून घेत होता पण त्याच्याकडून कोणतीच प्रतिक्रिया येत नव्हती. दोन्ही खान पुरते परेशान होऊन गेले. हे सारे कमी पडले म्हणून की काय, कुलीखानाने संपूर्ण अफगाणिस्तानात काढलेल्या झंझावाती दौऱ्याच्या, त्याने नैर्ऋत्य सीमेवरच्या अफगाण-इराण सीमाभागातील रानटी लोकांची वस्ती असलेल्या विराण प्रदेशाला दिलेल्या भेटीच्या आणि त्याने स्थानिक जमीनदार आणि कबिल्याच्या सरदारांबरोबर सुरू केलेल्या संवादाच्या बातम्या धडाधड येऊन कोसळल्या. महाबतखानाच्या पायाखालची वाळूच सरकली. तो उठला आणि थेट वजीर जाफरखानाच्या समोर दाखल झाला. त्याच खबरींनी भरलेल्या खलित्यांचा ढीग समोर घेऊन तो सचिंत बसून होता. त्याची तर मतीच गुंग झाली होती. अत्यंत चिंताक्रांत होऊन दोघांनी प्रदीर्घ चर्चा केली. एकच मुद्दा दोघे एकमेकांना वेगवेगळ्या शब्दांत पटवून देत राहिले. दोन-अडीच घटकांचा काथ्याकूट झाल्यानंतर मात्र दोघांचे एकमत झाले. दोघांनाही मनोमन पटले की, ही बाब अत्यंत गंभीर असल्याने बादशहाच्या कानी घातलीच पाहिजे. ताबडतोब आत्ताच्या आत्ता.


दोघेही उठले आणि पालख्यांमध्ये बसून बादशहाकडे निघाले. बादशहा आपल्या जनानखान्याच्या महालात बसला होता. वर्दी पाठवून दोघे सदर महालात बसले. वास्तविक बादशहा जनानखान्याच्या आणि कौटुंबिक बाबींमध्ये फारसा गुंतत नसे. जनानखान्याची पूर्ण अखत्यारी त्याने रोशनआरा बेगमेवर सोपवली होती. मात्र धाकटा शहजादा अकबर, बादशहाच्या चिंतेचा विषय होऊन बसला होता. आईवेगळे पोर म्हणून तो जरा जास्तच लाडावला होता. त्याला वळण लावण्यासाठी म्हणून झेबुन्निसा बेगमेच्या देखरेखीखाली ठेवले होते. त्याच्याच विषयी काही खल चालू होता. आधी तर, बादशहाने वर्दीकडे दुर्लक्ष करून आपले काम तसेच सुरू ठेवले. जसजसा भेटीस उशीर होऊ लागला तसतसे दोन्ही उमराव अस्वस्थ होऊ लागले. अखेर त्यांनी देवडीवरच्या खोजांच्या दरोग्यालाच तातडीची वर्दी देऊन पाठविले. खुद्द दरोगा वर्दी घेऊन आला म्हटल्यावर बादशहाला दखल घेणे भाग पडले. त्यातच महाबतखानासारखा मातब्बर उमराव खुद्द वजीर जाफरखानाला सोबत घेऊन काबूलच्या मसलतीसंबंधाने भेट मागतो म्हणजे निश्चितच काही तातडीची बाब असली पाहिजे हे ओळखून त्याने आपले काम आवरते घेतले आणि बेगमांना निरोप दिला. त्याने दोन्ही उमरावांस जनानखान्यातच भेटीस बोलावले. दोघे आधीच तणावात होते. शाही जनानखान्याच्या अंतर्भागात जायचे म्हणून त्यांना अधिकच दडपण आले. ताणलेल्या चेहऱ्याने कुर्निसात करत महालात शिरणाऱ्या त्या दुकलीवर बादशहाची प्रश्नार्थक गहिरी हिरवी नजर खिळली होती. दरबारी रिवाजाला अनुसरून बोलण्याची सुरुवात अर्थातच जाफरखानाने केली.


आलमपन्हांच्या विश्रांतीमध्ये खलल आणल्याबद्दल गुलाम माफी चाहतो. पण आलमपन्हा, महम्मद कुलीखानाचे कारनामे दिवसेंदिवस नवनवीन काळज्या उत्पन्न करीत आहेत.
जी आलाहजरत, हम भी वजीरेआझम की बातों से इत्तफाक रखते हैं.
प्रश्नार्थक नजर जास्तच गहिरी झाली. आपला खास माणूस नर्दुल्लाखानाच्या खलित्यामधील वेचक भाग महाबतखानाने बादशहास वाचून दाखविला आणि महम्मद कुलीखानासंबंधीचा सारा तपशील अगदी तिखटमीठ लावून सांगितला. मध्ये मध्ये वजीर जाफरखान आपल्या ‘विश्वासू’ सूत्रांचा हवाला देत मसाला पेरत गेला. अत्यंत निर्विकार चेहऱ्याने बादशहा ऐकत होता. दोघांचे बोलणे संपले तरी बादशहाच्या चेहऱ्यावर कोणतीच प्रतिक्रिया उमटली नाही. तो निर्विकार दगडी चेहरा पाहून दोघेही मुत्सद्दी गांगरून गेले. न राहवून जाफरखान म्हणाला–


आलमपन्हा, कुलीखानाला आळा घालण्याची वेळ आली आहे. गुलामाला असे साफ दिसते आहे की, पाणी डोक्यावरून जाण्याची वेळ येण्याच्या आधीच बांध घालणे जरुरीचे आहे. महम्मद कुलीखानावर जरब बसवू शकेल असा कोणी काबील आणि विश्वासू दरबारी तातडीने अफगाणिस्तानात पाठवला पाहिजे.
वजिराचे शब्द ऐकताच कपाळाला आठ्या घालीत महाबतखानाने चमकून त्याच्याकडे तिरक्या नजरेने पाहिले. ही बारीकशी हरकतसुद्धा हिरव्या नजरेने टिपली. दातांच्या फटीतून तीव्र पण थंड शब्द बाहेर आले–
अस्सं? असा कोण आहे तुझ्या नजरेत? तू स्वत:च सिफारिश करून महाबतखानास माघारी बोलावून घेतलेस. त्याने माबदौलतांना जामीनकी लिहून दिली आहे. कुलीखानाची खातरजमा दिली आहे. क्यों महाबतखान?
महाबतखानाच्या पायाखालची जमीनच खचली. आता लोढणे उलट फिरून त्याच्याच गळ्यात येऊन पडू पाहत होते. प्रकरण फार ताणले तर त्याचा जीव आणि दौलत दोन्ही धोक्यात आले असते. लाचार हसत तो गडबडीने म्हणाला–


अलबत. आलमपन्हा, बंद्याचे वचन आलाहजरतांच्या पायाशी गुंतले आहे. मी परत निघालो तेव्हा मला खात्री पटली होती की, त्याच्या मनात बगावत-बंडखोरी करण्याचा वा पळून जाण्याचा विचार उरलेला नाही. आतासुद्धा ज्या खबरी येत आहेत त्या पाहता तो असला काही अविचार करीत असल्याचे दिसत नाही. तख्ताशी बेइमानी करण्याच्या वा पळून जाण्याच्या तो योजना आखत असावा अशी कोणतीही खबर अद्याप नाही. हां तो जरा नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने, मोगली रिवाजास नव्या असलेल्या पद्धतीने, जरा स्वतंत्र वृत्तीने वागतो आहे एवढे खरे; त्याला फक्त नकल घालणे जरूर आहे इतकेच.


महाबतखानाने परतवार करीत मारलेली कोलांटी उडी पाहून जाफरखान चाट पडला. डोळे फाडून तो त्याच्याकडे पाहत राहिला. काय बोलावे त्याला सुचेना. त्याच्याऐवजी बादशहाच म्हणाला–
जर एवढेच आहे तर मग एवढा बेताब होऊन का धावत आलास; तेसुद्धा थेट शाही जनानखान्यात?
गुस्ताखी माफ आलमपन्हा, पण गुलामाच्या दिलोदिमागमध्ये दौलतीच्या आणि तख्ताच्या कल्याणाशिवाय कोणताच खयाल नसतो. नोकर त्यातून फौजबंद सिपाहसालार वाजवीपेक्षा जास्त स्वातंत्र्य घेण्याचा प्रयत्न करू लागला, तर त्याला वेळीच अटकाव करवावा यासाठी आम्ही हजरतांच्या कदमांशी आलो आहोत.


मग? माबदौलतांनी काय करावे असा तुमचा मशवरा आहे?
आलमपन्हा कुलमुखत्यार आहेत. सर्वज्ञ आहेत. गुलामाच्या मर्यादित बुद्धीला जे जाणवते ते पायाशी रुजू आहे. गुलामाला असे प्रामाणिकपणे वाटते की, आलाहजरतांनी ज्या मकसदसाठी कुलीखानाला जिवंत ठेवले, इस्लामच्या नेक राहवर आणले तो मकसद त्याला इतक्या दूरवर एकटे ठेवण्याने पुरा होणार नाही. आता योग्य वेळ पाहून आलमपन्हांनी कुलीखानाला आपल्या पायाशी बोलावून घ्यावे आणि नजरेखाली ठेवावे.


आपला पायगुंता सोडवून घेण्याची महाबतखानाची धडपड पाहून जाफरखान चकित झाला. बादशहाच्या गंभीर दगडी चेहऱ्यावर किंचित स्मित उमटून गेले असावे अशीसुद्धा त्याला शंका आली.
वजीरेआझम, तुमचा मशवरा काय आहे?
एक डोळा महाबतखानावर ठेवत तो हळूच पुटपुटला-
गुलाम जनाब महाबतखान साहब की राय से इत्तफाक रखता है.
महाबतखानाची डोलती नय्या सावरणे भाग होते. तो त्याचा जवळचा रिश्तेदार होता. इराणी दरबाऱ्यांत त्याचे मोठे वजन होते.
बेहतर है। मामले की पूरी तफतीश हो। कुलीखान के इस बर्ताव का मकसद मालूम किया जाय। अन्यथा महाबतखानास अफगाणिस्तानात वापस जाणे भाग आहे. ते रवाना झाले तर त्यांचा जनानखाना माबदौलत आपल्या पनाहमध्ये ठेवतील.


आंबलेल्या दातांनी दोघे शाही जनानखान्यातून बाहेर पडले आणि आपापल्या मुक्कामावर रवाना झाले. त्याच दिवशी दोघांचे सांडणीस्वार आपापल्या माणसांसाठी कडक खलिते घेऊन काबूलकडे दौडत निघाले. महाबतखानाचे नशीब जोरावर होते. या प्रसंगाला जेमतेम पंधरवडा झाला असेल-नसेल आणि महम्मद कुलीखानाचे दस्तूरखुद्द आलमपन्हा जिल्हेसुभानी बादशहा सलामतांच्या नावे लिहिलेले पत्र राजधानीत येऊन दाखल झाले.

महम्मद कुलीखानाचे थेट बादशहाला लिहिलेले पत्र म्हटल्यावर बादशहाने दरबारात पत्र वाचण्यास मना केले. याचा अर्थ ते पत्र खासगीत - बादशहाच्या महालात निवडक मुत्सद्दी दरबाऱ्यांच्या समोर वाचले जाणार होते. रात्री बादशहाच्या खासगी महालात मुख्य वजीर जाफरखान, मीर बक्षी, सरलष्कर महाबतखान, दाऊदखान कुरेशी, दानिशमंद खान आणि काही महत्त्वाची मोजकी मंडळी हजर झाली. दरबारी पोशाख उतरवून बादशहाने साहेबी लिबास, म्हणजे साधी सुती लुंगी, सैलसर अंगरखा आणि स्वत:च्या हाताने विणलेली गोल टोपी असा साधा पोशाख परिधान केला होता. तो एका साध्या मसनदीवर पालथी मांडी घालून बसला होता. हात टोपी विणण्यात व्यग्र होते. पण गहिरी हिरवी नजर समोरच्या प्रत्येकाचा वेध घेत होती. सलाम-दुव्याचे प्राथमिक उपचार आटोपून मानकरी हात बांधून समोर उभे राहिले.


खैर. वजीरेआझम, सुनाईये, क्या कहता है तुम्हारा महम्मद कुलीखान.
कुर्निसात करून जाफरखानाने समोरच्या तिवईवर ठेवलेली किनखापाची हिरवी मखमली थैली उचलली. सरफास ओढून त्यातून अतिशय सुंदर कोरीवकाम केलेले व त्यात अधूनमधून किमती खडे जडवलेले अक्रोडाच्या लाकडाचे पत्राचे नळकांडे बाहेर काढले. त्यातून तशाच प्रकारचे कोरीवकाम केलेल्या लाकडी दांडीवर गुंडाळलेले पत्र काढून उलगडले. अस्सल रेशमी कापडावर सुंदर रंगीबेरंगी नक्षीदार वेलबुट्टीच्या चौकटीत घोटीव फारसी अक्षरांत पत्र लिहिले होते. ते पत्र उलगडताच कस्तूरी आणि हीनाचा वास महालभर दरवळला. पत्राच्या शिरोभागी फौजेच्या सरलष्कराचा पाचबुर्जी शिक्का झळकत होता. पत्र भले लांबलचक होते. वजिराने पत्र उलगडताच खोजाने दिव्याची ठाणवई पत्रावर नीट उजेड पडेल अशा पद्धतीने आणून ठेवली आणि तो पावले न वाजविता निघून गेला. वजिराने बादशहाकडे एक कटाक्ष टाकला. नजरेचा इशारा मिळाल्यावर त्याने धीरगंभीर आवाजात पत्र वाचण्यास सुरुवात केली.


आलमपन्हा, जिल्हेसुभानी, शहनशाहे आलम बादशाहे हिंदोस्तान, हुजुरे आली आलमगीर गाझी यांच्या मुबारक कदमांशी नाचीज बंदा गुलाम महम्मद कुलीखान पेशावरी फौजबंद सरलष्कर सरजमीने अफगाण हाली डेरा काबूल याचा सलाम अलेकुम बरकत्तुल्ला-ए-आलई.
हुजुरेपाक खाविंदांनी कृपावंत होऊन गुलामाला अज्ञानाच्या अंधारातून स्वत:च्या मुबारक हातांनी इस्लामच्या नेक राहवर तर आणलेच, शिवाय दयावंत होऊन माझ्यासारख्या नाचीज माणसाची नेमणूक सरजमीने अफगाणच्या मोहिमेवर करून इस्लामची आणि मुघलिया तख्ताची सेवा खिदमत करण्याचा नायाब मौका दिला. त्यानंतर अत्यंत कृपावंत होऊन त्याच मोहिमेच्या सरलष्करीचा सरताज शिरावर चढवून गुलामाचा बहुमान केला. या नाचीज बंद्या गुलामावर मोठाच विश्वास व्यक्त केला.


युसुफजाही पठाणांसारख्या अत्यंत जालीम गनिमांशी झुंजून त्यांना परास्त करणाऱ्या शाही फौजेला शीण आला असेल असे अलीजांना वाटले असावे; त्यामुळे आलाहजरतांनी अत्यंत दयावंत होऊन जनाब-ए-आली महाबतखान साहेबांना मोठ्या शाही फौजेसह आपल्या चरणांपाशी वापस बोलावून घेतले. त्या जागी नवी कुमक येण्याची गुलाम अत्यंत आतुरतेने, चातकासारखी वाट पाहत आहे. रानटी पठाणांशी झुंजून त्यांना नामोहरम करण्यासाठी आणि मुघलिया तख्ताची शानोशोहरत बुलंद करण्यासाठी शाही फौज बेताब असली तरी नवी ताज्या दमाची कुमक आणि पुरेसा खजिना याअभावी गुलाम पूर्ण ताकदीनिशी मोहीम पुढे चालविण्यास असमर्थ ठरला आहे. यासंबंधीचे अनेक अखबार व खलिते गुलामाकडून यापूर्वीच दरबारात पेश झालेले आहेत. परिणामत: मुघलिया साम्राज्याचा विस्तार खैबरपार करण्याच्या आणि इस्लामचा झेंडा बुलंद करण्याच्या कामास मोठीच खीळ बसली आहे. हशम आणि इसम बेकाम, बसून आहेत. सरदार आणि शिपायांचा जोम आणि उत्साह ओसरू लागला आहे; त्यामुळे त्यांना अय्याशीची चटक लागण्याची शक्यता आहे. असेच चालू राहिले, तर ज्यांच्यावर विजय मिळवून ही दौलत कमावली आहे ते रानटी गंवार अफगाणी पठाण त्यांची भूमी मुघलिया तख्ताच्या छायेखालून पुन्हा हिसकावून घेतील; त्यामुळे आलाहजरतांच्या अल्लाच्या पाक साम्राज्याला मोठा धोका उत्पन्न होईल, अशी गुलामाला भीती वाटू लागली आहे. या कारणे त्वरित हालचाली करून हर प्रयत्ने मोहीम नेटाने पुन्हा चालू करणे निकडीचे होऊन बसले आहे; त्यामुळे गनिमावर दाब राहून कमावलेल्या दौलतीचे उत्तम संरक्षण तर होईलच शिवाय साम्राज्याचा विस्तारसुद्धा होईल. तसेच अफगाणांच्या मनात मुघल सत्तेचा धाक जसा पैदा होईल तसाच अधूनमधून गुस्ताख कारवाया करून रानटी अफगाणांना फूस लावणाऱ्या आणि मुघलिया सलतनतीवर आक्रमण करण्याची धमकी देणाऱ्या इराणच्या शहावरसुद्धा वचक निर्माण होईल.



अल्लाच्या मेहेरबानीने खाविंदांचे गुलामावर पुत्रवत प्रेम आहे आणि नजरे इनायत बरकरार आहे, असे असूनसुद्धा गेल्या काही दिवसांत खाविंदांना गुलामाकडे ताजी कुमक व खजिना पाठविणे जमू शकले नाही, याचा गुलामाच्या क्षुद्र मर्यादित बुद्धीला असा अर्थ दिसतो की, मुघल फौजा दुसऱ्या कोणा अत्यंत निकडीच्या कामी गुंतून पडल्या आहेत. या बिकट समस्येतून मार्ग काढण्यासाठी गुलामाने आपल्या अधिकारात सर्व बुजुर्ग, अनुभवी तसेच नव्या दमाच्या सरदारांचा विचार घेतला. सर्वांना एकमताने असाच उपाय सुचतो की, असे निष्क्रिय बसून मुघलिया पौरुष बरबाद करण्यापेक्षा, जर जिल्हेसुभानी आलाहजरतांनी कृपावंत होऊन रजामंदी फरमावली तर आहे त्या सामर्थ्यानिशी मोहीम नव्या जोमाने पुन्हा सुरू करावी.


आलाहजरतांच्या पायाशी विदित आहेच की, रसद आणि खजिन्याची भयंकर कमतरता असताना गुलामाने अनेक धाडसी निर्णय घेऊन, नेहमीच्या मुघलिया रिवाजात न बसणाऱ्या उपाययोजना करून खर्चात मोठी बचत तर केलीच, शिवाय प्यादे, शिपाई, अंमलदारांना चांगली शस्त्रे आणि सुविधा मुहैया करविल्या. एवढेच नव्हे तर खजिन्यात भर टाकण्याचेसुद्धा उपाय केले. आज गुलाम फक्र के साथ अत्यंत लीनपणे हुजेरे आलांच्या मुबारक कदमांशी असे पेश करण्यात धन्यता मानतो की, छावणीच्या खजिन्यात आता बऱ्यापैकी शिल्लक जमा झालेली आहे; त्यामुळे मोहीम पुन्हा सुरू केली तरी शाही खजिन्यावर भार पडणार नाही याचा नाचीज गुलामाप्रमाणेच छावणीतील प्रत्येकाला विश्वास वाटतो.


आलमपन्हांच्या पायाशी हे जाहीर आहे की, आज छावणीतल्या प्रत्येक शिपाई, प्यादा, शागिर्दपेशा तसेच सरदार मानकऱ्यांचा तनख्वाह आणि भत्ते हा खर्च चालूच आहे. आलाहजरतांच्या हुकमाने मोहीम पुन्हा सुरू केली तरी त्यासाठी वेगळा खर्च येणार नाही. बाकी जो काही वाढीव खर्च येणार आहे त्यासाठीसुद्धा शाही खजिन्यावर कोणताही बोजा पडू नये अशी गुलामाची इच्छा आहे. त्यासाठी स्वत:च इथल्या इथे खजिना उत्पन्न करण्याची योजना दयावंत आलाहजरतांच्या मुबारक कदमाशी पेश करण्याची इजाजत मिळावी असा गुलामाचा अर्ज आहे.


महापराक्रमी मुघलिया फौजेने सरजमीन-ए-अफगाणचा मोठा हिस्सा जिंकून घेतला आहे; त्यामुळे ही जमीन आता मुघलिया सलतनतीचा अविभाज्य भाग बनलेली असून, येथील वासिंदे मुघलिया सलतनतीची रयत झालेले आहेत. जीत प्रदेशातील या वासिंद्यांना रयतेचा दर्जा जाहीर करून मुघल रयतेला मिळणारे हक्क आणि संरक्षण त्यांना बहाल करण्याची शाही कृपा झाली तर त्या बदल्यात त्यांच्याकडून शेतसारा आणि अन्य कर वसूल करता येतील. तो अधिकार गुलामाला बहाल झाला तर येथील सुभ्याच्या शाही खजिन्यात मोठीच भर पडेल. तसेच पूर्वी जिंकलेल्या आणि नव्याने जिंकल्या जाणाऱ्या प्रदेशातून चौथाई - सरदेशमुखीच्या वसुलीचे अधिकार बंद्याला इनायत झाले तर शाही खजिन्यावर फुटक्या कवडीचा बोजा न टाकता मोहीम कामयाब करण्याची ग्वाही नम्रपणे देण्याची गुस्ताखी करण्यात गुलामाला आनंद वाटेल. राजधानीतून दारूगोळ्याच्या अखंड पुरवठ्याशिवाय अन्य कोणतीच अपेक्षा हा नाचीज ठेवत नाही.


जान की अमान मिळाली तर अत्यंत नम्रतेने हा नाचीज गुलाम आलाहजरतांच्या मुबारक कदमांपाशी असे पेश करण्याची दरखास्त करतो की, मुघली फौज ज्या पद्धतीने जंग चालविते, त्यामध्ये फार मोठी मनुष्यशक्ती तर गुंतून पडतेच शिवाय अमाप खजिना आणि बेहिसाब गोळाबारूद जाया जाते. आलमपन्हांनी कृपावंत होऊन माझ्या पूर्वायुष्यातील तजुर्बा वापरून जंग चालविण्याची इजाजत फरमावली तर गुलामाच्या हाताखाली उपलब्ध असलेली फौज वापरूनच, इन्शाल्लाह, सहा महिन्यांत मुघल सलतनतीच्या सरहदी इराण आणि तुर्कस्तानपर्यंत नेऊन भिडविण्याचे वचन देण्यास गुलाम बेताब आहे.
आलाहजरतांच्या कृपाछत्राखाली राहून आखरी दम तक मुघलिया तख्ताची आणि इस्लामची सेवा करते रहना एवढेच आता गुलामाचे जीवनकार्य होऊन राहिलेले असल्याने अन्नदात्याचा पैसा खात चैनीत काळ वाया घालविणे गुलामाला जड जात असल्याने दरखास्त जल्द अज् जल्द मंजूर करावी अशी गुलामाची इंतजा आहे.


आलमपन्हांचा बंदा गुलाम, महम्मद कुलीखान
पत्राचे वाचन संपले. दालनात सन्नाटा पसरला. टोपी विणणारे बादशहाचे हात पत्राचे वाचन सुरू असताना कधी थांबले त्यालादेखील कळले नाही. कपाळावरील काळा डाग पूर्ण आक्रसून गेला होता. डोळे बंद झाले होते. वाचन संपून बराच काळ झाल्यानंतर डोळे उघडले गेले. कपाळावरील जाळी साफ झाली. विणकाम खाली ठेवून समोरच्या तबकात असलेली जपमाळ हातात आली. ओठ पुटपुटू लागले. हिरव्या नजरेची धार समोरच्या प्रत्येकाला तोलत आणि जोखत होती. प्रतिक्रिया विचारली तर काय जवाब द्यावा याचा प्रत्येकजण विचार करीत होता. एवढी धाडसी योजना एवढ्या स्पष्ट शब्दांत थेट बादशहासमोर बेधडकपणे मांडण्याचे धाडस मोगली दरबारात आजपर्यंत कुणाला झाले नव्हते. सलतनतीचे कट्टर दुश्मन असलेल्या मराठ्यांच्या पद्धतीने युद्ध करून मुघल साम्राज्य वाढविण्याची मोठी अजब तरकीब हा वेडापीर थेट बादशहालाच सुनावत होता. बादशहाच्या एका दीर्घ नि:श्वासाने शांततेचा भंग झाला.
बोला मीर बक्षी, तुम्हाला काय वाटते पत्र ऐकून. तुमचा मशवरा काय आहे?


आलमपन्हा, कुलीखान स्वाऱ्या-शिकाऱ्यात उभी हयात घालवलेला गडी आहे. असे काही न करता स्वस्थ बसावे लागले तर तो बेचैन होणारच. काही काबील सरदारांबरोबर त्याची कुमक करावी आणि शाही रिवाज अन् तरीक्याप्रमाणे मोहीम दोबारा सुरू करावी.
हिरवी नजर महाबतखानावर स्थिर झाली. इकडे आड तिकडे विहीर अशी त्याची गत झाली. कालपरवाच बादशहाकडून मिळालेली दरडावणी अजून कानात घुमत होती. सर सलामत तो पगडी पचास या न्यायाला अनुसरून थरथरत्या आवाजात तो कसाबसा पुटपुटला–


बंदा जनाब मीर बक्षी साहब की राय से इत्तफाक रखता है. थोडी बहुत फौज त्याच्या दिमतीला पाठवून त्याला गुंतवून ठेवावे. एकदा जंग करण्याचा जुनून त्याच्यावर सवार झाला, म्हणजे असे विचित्र खयाल त्याच्या जहनमध्ये येणे आपोआप बंद होईल. मी त्याला चांगला ओळखतो. रिकामपणामुळे त्याला भलभलते खयाल येतात.


वजीरेआझम, आपकी राय क्या है?
जाफरखानाची नजर क्षणभरासाठी महाबतखानाच्या नजरेला भिडली. निरुपाय होत असल्याचे भाव नजरेत तरळून गेले. महाबतखानानेसुद्धा नजरेनेच असहायता व्यक्त करून मूकसंमती दर्शविली.
हुजुरे आला कुलीखानाला फार काळ एकटा ठेवणे धोक्याचे ठरेल. कोणीतरी जबरदस्त सिपाहसालार ताबडतोब अफगाण मोहिमेवर पाठवणे निकडीचे झालेले दिसते. कुलीखानाला कामात गुंतवून ठेवले पाहिजे.
जाफरखान रात्र झाली की, तुझे डोके जनानखान्याकडे ओढ घ्यायला लागते. नेमका धोका तुझ्या लक्षात आला आहे पण तुझे डोके योग्य विचार करीत नाही. कारण तुझे चित्त भलतीकडे गुंतले आहे.
माफी आलमपन्हा…


काही क्षण हिरवी नजर शून्यात गेल्यासारखी झाली. स्वत:शीच बोलावे तसा बादशहा बोलू लागला–
माबदौलतांच्या नजरेपासून दूर, एकटे आणि रिकामे बसून राहून कुलीखानाच्या मनात बंडखोरी आणि महत्त्वाकांक्षा जागी व्हायला लागलेली दिसते. या आधी त्याने सर्वसामान्य शिपाई-प्याद्यांच्या दिलात आपली इज्जत वाढवून आणि नौजवान तडफदार अधिकारी आणि सरदारांना आपलेसे करून स्वत:चे स्थान पक्के करण्याची कोशिश केलेली आहे. उत्पन्नाचे नवनवे जरिया आणि मार्ग तयार करून तो स्वत:चा खजिना वाढवीत आहे. तो स्वावलंबी होण्याची कोशिश करीत असावा असे वाटते. काबूलपासून दिल्लीपर्यंत पसरलेल्या नजरबाजांना तो अंकित करण्याचा प्रयत्न करीत असावा. माबदौलतांना असा पक्का शक वाटतो, त्या शकला मजबुती देणारे काही पुरावे माबदौलतांकडे मौजूद आहेत. महाबतखान आणि जाफरखानाने आपली खास विश्वासाची जी माणसे त्याच्या निगराणीसाठी ठेवलेली आहेत, त्यांना त्याने फोडले आहे. आपल्या कह्यात आणले आहे. ती बेवकूफ माणसे त्याच्या तारीफेचे पूल बांधताना थकताना दिसत नाहीत. काही मजबूरींमुळे माबदौलत त्याच्याकडे पुरेसे ध्यान देऊ शकले नाहीत; त्यामुळे त्याचा हौसला वाढलेला दिसतो. आता तो मुघली फौजा आपल्या हिशेबाने नाचवण्याचा विचार करू लागला आहे. त्याला दौलतीच्या सरहद्दी इराण, तुर्कस्तानला भिडवायच्या आहेत. तेवढी काबिलीयत त्याच्या दिलात, मस्तकात आणि मनगटात नक्कीच आहे. माबदौलतांना यात दोन धोके दिसतात, एक म्हणजे इराणच्या शहाच्या मदतीच्या आश्रयाने आमच्या शिकंजातून सुटका करून घेणे किंवा दुसरे, इराणचा शहा किंवा तुर्की खलिफाच्या आशीर्वादाने स्वत:ला अफगाणिस्तानचा स्वतंत्र सुलतान घोषित करणे. काही असो, माबदौलतांना त्याचा इरादा साफ असावा असा भरवसा वाटत नाही.


खुद्द बादशहाच्या मुखातूनच कुलीखानावर ताशेरे उडाले. मग काय! बादशहाच्या संशयाला पुष्टी देण्यात सर्वांची अहमहमिकाच लागली. एकटा महाबतखानच भिजल्या मांजराप्रमाणे थरथर कापत अल्लाची करुणा भाकत खालमानेने स्वस्थ उभा होता. बादशहाची कुलीखानावर खास मर्जी; त्यामुळे आधीच त्याच्यावर मेहेरबानी आणि सवलतीची खैरात सुरू असल्याने जुन्या मानकऱ्यांचा जळफळाट होतच होता. मग त्याच्याविरुद्ध कान भरण्याची आयती चालून आलेली सुवर्णसंधी कोण गमावणार? खरे-खोटे किस्से मीठ-मसाला लावून रंगवून रंगवून सांगितले जाऊ लागले. कुणीतर हातासरशी शिवालासुद्धा चार शिव्या देऊन आपली रसना धन्य केली. अर्ध-मिटल्या डोळ्यांनी बादशहा एकेकाला जोखत होता. त्याच्या दगडी निर्विकार चर्येवरून नक्की कोणताच अर्थबोध होत नव्हता. बराच वेळ ती काव काव ऐकून घेतल्यानंतर माळेचा हात वर झाला. एकदम शांतता पसरली.


माबदौलतांनी तुमच्या वाह्यात कहाण्या ऐकण्यासाठी तुम्हाला गोळा केलेले नाही. कुलीखान तुम्हाला कितीही निकम्मा वाटला तरी त्याला जर योग्य पद्धतीने वागवले आणि वापरले तर तो तुम्हा कोणाहीपेक्षा दसपट जास्त लायक आहे. त्याच्या मनातली बंडखोर भावना तेवढी निपटून काढली गेली पाहिजे. शिवापासून दूर होऊन त्याला आता दहा वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. नऊ वर्षे तो अफगाणिस्तानात कर्तब गाजवतो आहे. या काळात दख्खनचा वारासुद्धा लागलेला नाही. त्यात त्याने साहेबे इमान स्वीकारले आहे. आता शिवाला आपली गरज उरलेली नाही, अशा परिस्थितीत तो आपल्याला जवळ करणार नाही याची त्याला निश्चितच जाणीव झालेली आहे. पण त्याच्या जहनमध्ये खोलवर रुतून बसलेला आझादीचा जुनून संधी मिळाली की फणा काढतो; त्यामुळे तो शिवाकडे परत जाणे शक्य नाही याची त्याला खात्री पटली असली तरी हा खयाल, हा जुनून त्याला सतत बेताब करीत असतो. जाफरखान…
हुकूम आलमपन्हा.


उद्याच्या उद्या फर्मान रवाना करा आणि अफगाण मोहीम बंद करा. जल्द अज् जल्द महम्मद कुलीखानाला मुस्तकीर उल खिलाफत दिल्लीमध्ये बोलावून घेऊन दरबारात बाइज्जत हाजिर होण्याचा हुक्म द्या.
जो हुक्म आलमपन्हा. पण जान की अमान पाऊँ तो कुछ पेश करूं.
इर्शाद.


गुस्ताखी माफ हुजुरे आला, पण इतकी वर्षे झुंजून जी अफगाणी पठाणांची जमीन मुघलिया फौजेने जिंकली आहे ती अशी वाऱ्यावर सोडून देणे कसे शक्य आहे? त्याची काहीतरी सोय लावावीच लागेल. तीसुद्धा शाही फौजांनी काबूल सोडण्याच्या आत. दोन्ही फर्माने एकदमच निघायला हवीत.
जाफरखानाने महाबतखानाची जळजळीत तिखट नजर चुकविण्याचा निष्फळ प्रयत्न केला. नजरांचे हे द्वंद्व हिरव्या नजरेतून सुटणे शक्यच नव्हते.


बहोत खूब जाफरखान! या अशा मशवऱ्यांमुळेच तुझी रात्रीची बेताबी माबदौलतांना माफ करणे भाग पडते. महाबतखान…
महाबतखान नखशिखान्त हादरला. जाफरखानाकडे जळजळीत कटाक्ष टाकत, खालमानेने कुर्निसात करीत तो एक पाऊल पुढे झाला. दीन स्वरात त्याचे शब्द उमटले–
अन्नदाता…


महाबतखान, तू कुलीखानाला जामीन आहेस. तुझ्या शब्दाखातीर त्याला एकट्याला सोडून तुला परत बोलावले.
जी अन्नदाता.
काही वेळ शांतता राहिली. दिल्लीच्या थंडीत महाबतखानाच्या कपाळावर घाम जमा झाला. अंग थरथरा कापू लागले. तावडीत सापडलेल्या उंदराकडे मांजराने पाहावे त्याच नजरेने बादशहा त्याला न्याहाळत होता. महाबतखानावर काय वीज कोसळते या भयाने वातावरणात तणाव भरून राहिला.
महाबतखान, कुलीखान दिल्लीत परत आला की, तू त्याला सतत संपर्कात ठेव. त्याच्यावर आता नजरकैद नसली, तरी त्याच्या मनात बंडखोरी पैदा होऊ न देण्याची खबरदारी घेतलीच पाहिजे. तो जिम्मा आता तुझा.
वातावरणातला ताण सैलावला. महाबतखानाचा जीव भांड्यात पडला. सुटकेचा नि:श्वास टाकत, जमिनीपर्यंत झुकून कुर्निसात करत तो आपल्या जागी गेला.
जी अन्नदाता. गुलाम पूर्ण कोशिश करील.


बेहतर है। रही बात अफगाण की। जाफरखान, राजा रामसिंहाचा निम्मा सरंजाम त्याला परत करण्याचा आणि मिर्झाराजाची जहागिरी त्याच्या नावे पुढे चालवण्याचा हुकूम उद्याच जारी कर. त्याचबरोबर त्याच्यासोबत पंचवीस हजारांची राजपूत फौज देऊन अफगाणिस्तानात नामजद करण्याचा हुकूम जारी कर. उद्या ईशाच्या नमाजानंतर त्याच्यासोबत नामजद होणाऱ्या राजपूत सरदारांची यादी माबदौलतांच्या मंजुरीसाठी पेश झाली पाहिजे. एका हप्त्यात रामसिंहाचे काबूलकडे कूच झाले पाहिजे. त्यासाठी मुहूर्त बघण्याची त्याला गरज नाही. त्याचे निरोपाचे विडे आणि मानाचा पोशाख मीर बक्षी त्याच्या मुक्कामी जाऊन देतील, त्यासाठी त्याला दरबारात येण्याची गरज नाही. हा हुकूम त्याच्यावर तोंडी बजावावा. कुलीखानाच्या फर्मानात स्पष्ट लिही की, रामसिंह ज्या दिवशी काबूल मुक्कामी पोहोचेल त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याच्या हाती सारा मामला सोपवून कुलीखानाने दिल्लीकडे कूच करावे. वाटेत पेशावरमध्ये मुक्काम करून वेळ वाया घालवू नये. सर्वांचे जनानखाने फौजेस वाटेतच भेटतील. तीन महिन्यांच्या आत तो दरबारात पेश झाला पाहिजे.
जो हुक्म आलमपन्हा.
और एक बात. जाफरखान, मीर बक्षी आणि दानिशमंद खान तुम्ही तिघांनी कुलीखानाच्या पत्रावर नीट विचार करून त्याने सुचवल्याप्रमाणे कारवाई कशी करता येईल याविषयी माबदौलतांना आपापला मशवरा द्या. म्हणजे रामसिंह रवाना होण्यापूर्वी तसे फर्मान जारी करता येईल.
जो हुक्म.
तखलिया.
क्षणही न दवडता सारे मानकरी कुर्निसात करत दालनातून बाहेर पडले.


सकाळचा दरबार आटोपून महाराज महालात परत आले. मागोमाग भोजनाची वर्दी घेऊन हुजऱ्याही आला. दरबारी पोशाख उतरवून साध्या पोशाखात महाराज भोजनगृहाकडे निघणार एवढ्यात बहिर्जी नाईक देवडीवर आल्याची वर्दी आली. महाराज लगेच थबकले. त्यांनी बहिर्जीला लगेचच बोलावून घेतले. काही क्षणांतच बहिर्जी दाखल झाला. बहिर्जीचा चेहरा आनंदाने फुलला होता, म्हणजे खबर नक्कीच चांगली असावी, असा सहजच अंदाज येत होता. दारातून मुजरा घालता घालताच बहिर्जीने बोलायला सुरुवात केली.


म्हाराज, खंडेरायाची, आई भवानीची, समद्यांचीच मोटी किरपा जाली. खबर लय आनंदाची हाय. आलमगिरानं नेताजीराव सरकारास्नी दिल्लीत माघारी बोलावलया. त्येंच्या जागी कुंवर रामसिंहांना नामजद केलया. त्येंची अर्धी मनसब आन जागिरी परत दिलिया बाच्छावानं. नेताजी सरकारांसंगत समदी फौज मुसलमानच व्हती, आन आता सारी राजपूत. म्या दिल्ली सोडली तवा कुंवर रामसिंह कूच करून हप्ता जाला व्हता. अडीच-तीन म्हयन्यात नेताजी सरकार दिल्लीत दाखल व्हतील. त्येंची नजरकैद कवाचीच उटलिया पर म्हाबतखानास त्येंच्या निगरानीचा हुकूम झालाया. दुसरी मुस्तकीम खबर हाय की बाच्छा नेताजी सरकारास्नी लवकरच सोराज्यावर सोडनार. म्हंजी सरकारांचा घरी परतन्याचा मार्ग खुला व्हनार.


जगदंब! जगदंब! जवळपास एक तप होऊ घातले तेव्हा कुठे आज नेताजी काकांसंबंधी बरी खबर कानावर आली. आज आम्ही समाधानाने भोजन करू.


भोजनाचा उल्लेख म्हणजे जाण्याची सूचना समजून बहिर्जी मुजऱ्यासाठी खाली वाकला.
थांबा नाईक. तुम्ही निरोप घ्यावा म्हणून आम्ही भोजनाचा उल्लेख केला नाही. कवाड… आणि भोजनगृहात वर्दी द्या. म्हणावे, थोडा वेळ लागेल आम्हाला, आम्ही तुमच्यासोबत आहोत.
बहिर्जीने दारावरच्या हुजऱ्याला भोजनगृहात वर्दी देऊन रवाना केले आणि परतल्यावर दारापासून दूर उभे राहण्याची सख्त सूचना दिली. नंतर मग कवाड लावून घेऊन पुन्हा महाराजांसमोर येऊन उभा राहिला.
आता सारे नीट सविस्तर आणि खुलासेवार सांगा.


त्यानंतर नेताजीरावांनी उपलब्ध फौजेनिशी, मराठा पद्धत वापरून मोगली फौजेने पठाणांशी लढण्याची योजना, शेतसारा, कर वसूल करण्याचे तसेच चौथाई-सरदेशमुखीचे हक्क वगैरे मागण्या करणारे थेट बादशहाला लिहिलेले पत्र, त्यावर बादशहाची प्रतिक्रिया वगैरे सारे तपशीलवार सांगितले. महाराजांनी मध्ये एकही शब्द न बोलता त्याचे सारे बोलणे एकाग्रतेने ऐकून घेतले. बोलणे संपल्यावर संतोषाने मान डोलावीत पण गंभीरपणे बोलले–


नाईक, आता जबाबदारी वाढणार. आफताब आणि नर्दुल्ला दोघांनाही जास्त चौकस आणि सावध राहावे लागणार. नर्दुल्लास सख्त सूचना रवाना करा, त्याने सदैव जागरूक राहून नेताजीकाकांना जपायचे आहे. सावलीसारखा तो त्यांच्यासोबत हवा. पलायनाची योजना ठरवताना संपूर्ण विचार करूनच आखणी करा, तुम्ही त्यात जातीनिशी लक्ष घाला. मात्र आमचा शब्द-कौल मिळाल्याशिवाय कृती करू नका. आलमगिरास दहा कोसांवर असलेल्या माशीचे गुणगुणणे स्पष्ट ऐकू येते, याचे नीट भान ठेवा. आईच्या पोटात असलेल्या बाळाच्या मनात काय आहे हे तो ओळखू शकतो, याचे ध्यान ठेवा. कुत्र्यापेक्षा सावध, चित्त्यापेक्षा चपळ, कोल्ह्यापेक्षा कपटी, सर्पांपेक्षा घातकी आणि इंगळीपेक्षा जहरी आहे तो. त्याची नजर गिधाडासारखी तीक्ष्ण आहे. घारीच्या अचूकतेने त्याची भक्ष्यावर झडप पडते, हे कधीही विसरू नका. पण हे फर्मान अचानक निघाले कसे?


म्हाबतखान परतल्यापासून अफगान म्होईम थंडच व्हती. घियासुद्दीनकडून आपला कौल सरकारास्नी भ्येटला. मंग त्येंनी पाहनी करन्यासाठी इरानी सरहद्दीकडं धडक मारली. त्यो मुलुक लई वंगाळ आन तितली रानटी मानसं लई धोकादायक. त्या मुलकात त्येस्नी योक अवलिया भ्येटला. त्येनं भाकीत सांगितलं, या रस्त्यानं जाऊ नगंस. आल्या वाटंनंच तू परत जाशील म्हनून. त्याच दिशेनं खटपट कर, यश ईल म्हनला. मंग सरकारांनी समद्या मोगली सरदारास्नी उटवलं. हाती व्हती तेवड्याच फौजेनिशी म्होईम चालू करन्यास राजी क्येलं. थ्येट बाच्छावालाच पत्र लिवून इजाजत मागितली. म्होईमेचा खर्च भागवन्यासाठी चौथाई-सरदेशमुखीच्या अधिकाराची मागनी क्येली. मंग काय? आलमगीरच त्यो, त्याला बंडखोरीचा वास आला. नेताजी सरकार नदरंसमोर ठेवल्याबिगर खरं न्हाई म्हनला आन… आन टाकोटाक फर्मानं निगाली. सरकारांची मात्रा बराब्बर लागू पडली.


बहिर्जी, आलमगीर किती सावध आणि सतर्क आहे हे ध्यानात घ्या. आपण त्याला संशयी म्हणून हिणवतो, पण प्रत्येक बारीकातल्या बारीक गोष्टीतला ठिणगीएवढा धोकासुद्धा तो बरोब्बर ओळखतो. गनिमाच्या चालीचा अंदाज तो फार आधीच बांधतो आणि त्याप्रमाणे प्रतिचाल आखतो. पूर्वीच्या बादशहांसारखा तो नुसता खुशालचेंडू अय्याश नाही. तो खराखुरा राज्यकर्ता आहे. (आपले आणि स्वराज्याचे सुदैव की, त्याची दृष्टी, तडफ आणि कर्तबगारी असणारा कुणीच त्याच्या पदरी नाही. म्हणूनच तो नेताजीकाकांची किंमत ओळखून आहे. आपले मनसुबे त्यांच्या हातून करवण्याची स्वप्ने तो पाहतो आहे. आलमगिराऐवजी दारा किंवा शुजा गादीवर येता, तर स्वराज्याचे काम अधिक सोपे होते. आपण आपल्या सरहद्दी आतापावेतो नर्मदापार सरकवल्या असत्या. आलमगिराने मोठ्या हिकमतीने दिलेर आणि बहादूरखानास दख्खनमध्ये ठेवले आहे. ते दोघेही भले फार काही कर्तब दाखवू शकले नसले तरी त्या दोघांनी स्वराज्य विस्तारास बराच पायबंद घातला आहे ही वस्तुस्थिती आहे. नजीकच्या काळातच तो नेताजीकाकांना स्वराज्यावर सोडणार यात संशय नाही. खऱ्यापेक्षा बाटगा जास्त कडवा असतो, अनुभवाने सिद्ध झालेले त्याने पाहिले आहे. मागोमाग तो स्वत: कधी ना कधी तरी स्वराज्यावर घसरणार. त्या वेळी तो नुसते स्वराज्य बुडवण्याचीच कोशिश करणार नाही तर आदिलशाही आणि कुतुबशाहीसुद्धा बुडवल्याशिवाय राहणार नाही. आमची ही भविष्यवाणी नीट ध्यानात ठेवा.)
व्हय जी म्हाराज, अक्षी खरं हाय ह्ये म्हननं.


आम्हास नेताजीकाकांच्या संबंधाने नियमित खबरी मिळतील याची तजवीज करा. सर्वसाधारण खबरी सदरेमार्फत आल्या तरी विशेष घडामोडी थेट कळवण्याची वहिवाट अशीच चालू राहिली पाहिजे.
जी म्हाराज.


कुंवर छत्रसालना कळवा. म्हणावे, नजर तेज करा. नेताजीकाकांना कधीही कुमक करण्यासाठी वा गुप्त आश्रय देण्यासाठी सज्ज असा. दुसरे महत्त्वाचे, नेताजीकाका दिल्लीतून निसटू म्हणतील तर द्वारका वेरावळमार्गे गलबतातून आणा. नाहीतरी मकरानला गलबते रवाना करण्याची योजना पुरी होत आलीच होती. आता गलबते दूरदेशी परदेशात धाडण्याचे कारण उरलेले नाही. बाब टप्प्यात आली आहे. त्या भागातली आपली माणसे सतर्क करा.
जी म्हाराज.
शुचिर्भूत होऊन लवकर भोजनगृहात दाखल व्हा. तुमच्या पंगतीसाठी आम्ही खोळंबलो आहोत. या आता.


ज्या स्वरात आणि ढंगात महाराजांनी बाकी हुकूम दिले, त्याच स्वरात आणि ढंगात हा हुकूमसुद्धा दिला. क्षणभर बहिर्जीच्या काही ध्यानातच आले नाही आणि जेव्हा आले तेव्हा त्याच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. प्रत्यक्ष महाराजांच्या पंगतीचा बहुमान. त्याच्या आनंदाला अस्मान ठेंगणे झाले. गडबडीने मुजरा करून, कवाड उघडून तो झपाट्याने बाहेर पडला. त्याची उडालेली धांदल पाहून महाराजांच्या मुखावर स्मित उमटले.


चोळणा-डगला काढून ठेवून, धोतरबितर नेसून बामणासाराखा खांद्यावर पंचा घेऊन, वारकऱ्यासारखा कपाळी टिळा आणि बुक्का लावून बहिर्जी महाराज पानावर बसण्याच्या आत भोजनगृहात पोहोचला. महाराजांनी त्याचे पान आपल्या नीट समोर घ्यायला लावले होते. शंभूराजे महाराजांच्या उजव्या हाताला, तर रामराजे डाव्या हाताला बसले होते. पंगतीला महाराजांची एक-दोन सोयरी-पाहुणी मंडळी अशी मोजकी घरचीच मंडळी होती. सोयराबाई राणी सरकार वाढपावर देखरेख करण्यासाठी पाट घेऊन जातीनिशी बसल्या होत्या. महाराजांच्या आणि दोन्ही राजकुमारांच्या जेवणाच्या थाळ्या सोन्याच्या होत्या. प्रत्येकासमोर गुडघाभर उंचीच्या दोन-दोन समया पूर्ण दीपकळ्यांनी उजळल्या होत्या.


बहिर्जीचा थाळा चांदीचा होता. समोर समई उजळली होती. विशेष म्हणजे थाळ्याभोवती सुंदर रंगीत रांगोळी घातलेली होती. समोर चंदनाची धूपबत्ती जळत होती. महाराजांच्या बरोबरीने केलेला थाटमाट पाहून बहिर्जी पानावर बसण्यास संकोच करू लागला. महाराज हसून म्हणाले–


लाजू नका बहिर्जी. अगदी मोकळ्या मनाने बसा. पोटभर जेवा. आज तुम्ही आम्हाला इतके आनंदी केले आहे की, स्वहस्ते तुमच्या मुखात मोत्याचा घास भरवला तरी कमी पडावा.
महाराणी सरकारसुद्धा हसून आग्रह करत म्हणाल्या–
हे मात्र अगदी खरे नाईक. कित्येक वर्षांनंतर आज स्वारींनी सांजोऱ्या करण्यास सांगितले. जेवणात काही विशेष करायला सांगण्याचा योग आज तुमच्यामुळे आला. स्वस्थ निवांत बसा. संकोचाचे काही कारण नाही.


महाराज स्वत: अगदी मोजके जेवले. मात्र आग्रह करकरून त्यांनी बहिर्जीला जेवू घातले. जेवताना अगदी अघळपघळ गप्पा सुरू होत्या. शंभूराजेसुद्धा त्याला अनेक प्रश्न विचारीत होते; त्यामुळे सुरुवातीला संकोचून जेवणारा बहिर्जी अगदी गळ्यापर्यंत जेवला. भोजन असे हसत बोलत आटोपले. महाराजांनी अतिथी म्हणून प्रथम बहिर्जीचे हात धुवायला लावले. नंतर स्वत: हात धुतले. त्यानंतर बसल्या पाटावरच कारभाऱ्याच्या हातून त्याला साग्रसंगीत पूर्ण अहेर करविला. महाराज भोजनगृहातून बाहेर पडण्यास वळणार तोच बहिर्जी झटकन पुढे झाला. त्याने महाराजांच्या पायावर डोके ठेवले.
अरे अरे नाईक हे काय? उठा उठा.


आरं माज्या सर्जा, सेवकाची येवडी बूज राखणारा, कदर करनारा येवडा थोर राजा परमेसरानं आमाला दिला हाय. न जानो किती जल्मांचं पुन्य फळाला आलं आनि या राजाची सेवा करन्याचं भाग्य गावलं. परतेक्ष राजाच्या पंगतीला, बसवून आग्रेव करकरून राजानं जेवाया घातलं, यापरीस मोटा सन्मान कोन्ता वं? सेवकाला समदं भरून पावलं. राजारं तुज्या याच कदरदानीपाई, जिव्हाळ्यापाई हजारो हजार जीव तुझ्यावर कुरवंडी व्हतात.


बहिर्जीचा तो उमाळा, तो आवेग आणि गदगदलेला स्वर पाहून दोन्ही राजकुमार आणि राणी सरकारांसह सारेच गहिवरले. दोन्ही खांद्यांना धरून महाराजांनी त्याला वर उठविले. पाठीवर थाप देत आश्वासक सुरात म्हणाले–


ठीक! ठीक!! राहू देत. सायंकाळी आम्ही जगदीश्वराच्या दर्शनास जाऊ, तेव्हा मंदिरात भेटा. त्या आधी मोरोपंतांना आणि अनाजीपंतांच्या कानी खबर जाऊ देत. मात्र तेवढीच. गडावर फार रेंगाळू नका. उद्याच गड सोडा. बायको-पोरांची खबरबात घेऊन चार-दोन दिवसांतच हिंदुस्थानात रवाना व्हा. आता पळ-पळ, क्षण-क्षण मोलाचा आहे. संधी निसटता कामा नये. या आता.


राणी सरकारांच्या समोर भुईवर माथा टेकवून बहिर्जीने नमस्कार केला आणि खांद्यावरच्या पंचाने डोळे पुसत भरल्या मनाने आणि नव्या हुरुपाने तो बाहेर पडला.
-
-
दिल्लीत पोहोचून कुलीखानाला जवळपास सहा महिने होत आले होते. खैबर ओलांडल्यानंतर बाकी फौज मोगली गतीने दिल्लीकडे कूच करीत असतानाच तो मोजके अंगरक्षक घेऊन पेशावरला पोहोचला. त्याचा जनानखाना बाकी जनानखान्यांसोबत दिल्लीकडे रवाना झाला होता. पेशावरला पोहोचून त्याने जहागिरीचा शिल्लक खजिना सोबत घेतला आणि झपाट्याने मराठी मजला मारीत जनानखाने मुख्य फौजेला मिळण्यापूर्वी तो फौजेत दाखल झाला. अटकेच्या किल्ल्यामध्ये जनानखान्यासह फौजेचा आठ दिवस मुक्काम पडला होता. त्यानंतर वेळ न गमावता फौज दिल्ली जवळ करू लागली. प्रत्येकालाच घरी परत जाण्याची ओढ लागली होती. शिकारपूरची कुलीखानाची हवेली त्याच्या स्वागतासाठी सजवून सुसज्ज ठेवली होती. त्याच्या जनानखान्याचा मुक्काम त्या हवेलीत होता, मात्र त्याचा स्वत:चा मुक्काम दिल्लीत होता. त्यासाठी वजीर जाफरखानाने स्वत: खटपट करून एक ऐसपैस हवेली मिळवून दिली होती. त्याची नागा बेगम नूरबानू त्याच्यासोबत दिल्लीत राहत होती. रोज सकाळ-संध्याकाळ दरबारात हजेरी लावण्याशिवाय काहीच काम नव्हते. वेळ घालविण्याचे कोणतेही मोगली शौक त्याने स्वत:ला लावून घेतले नव्हते. दिवस कंटाळवाणे जात होते. काहीच घडत नव्हते.


कुलीखानाच्या जिवाची नुसती तगमग सुरू होती. बादशहाच्या पकडीतून निसटण्याची संधी मिळण्याची कोणतीच चिन्हे नजरेत येत नव्हती. त्याला रोज कोणातरी बड्या अमीर उमरावाकडे दावत असे, नाहीतर कोणीतरी आपणहोऊन आमंत्रण ओढवून घेऊन त्याच्याकडे मेजवानी झोडण्यासाठी येत असे. महाबतखान, इफ्तखारखान वा मीर बक्षी असदखान किंवा दानिशमंदखान यांसारखा बादशहाचा जवळचा उमराव काही ना काही निमित्त शोधून दररोज त्याच्या मुक्कामावर एखादी खेप टाकत असे. हा सारा आपल्यावर लक्ष ठेवण्याचा एक प्रकार आहे एवढे न समजण्याइतका तो दूधखुळा निश्चितच नव्हता; त्यामुळे तो निश्चिंतपणे कुठलीही योजना ठरवू शकत नव्हता. आफताबखानाच्या मार्फतसुद्धा त्याला अद्याप कोणतेही संकेत मिळत नव्हते. दिल्ली-आग्र्यापासून थोडे दूर गेल्याशिवाय पळून जाण्याची हालचाल न करण्याच्या महाराजांच्या सख्त सूचना होत्या. परिणामी, एक विचित्र कोंडी होऊन बसली होती. या स्वस्थतेत एक मात्र फायदा होता, हस्ते-परहस्ते स्वराज्यातल्या बातम्या समजत होत्या. त्या बातम्या अर्थातच शिव्याशापांच्या सोबत असत हा भाग अलाहिदा.


महाराजांचा राज्याभिषेक झाला. महाराज स्वतंत्र राजे झाले. सिंहासनाधीश्वर छत्रपती झाले हे त्याला दिल्लीत आल्यानंतरच समजले. बातमी ऐकून त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. पण व्यक्त करण्याची चोरी होती. स्वत:च्या बेगमेसमोरसुद्धा काही बोलण्याची किंवा मनातल्या भावना व्यक्त करण्याची त्याला मोकळीक नव्हती. न जाणो कोणता खोजा वा बटकी बादशहाची हेर असेल. राज्याभिषेकाच्या शुभप्रसंगी सरनोबत म्हणून मुजरा करण्याचा बहुमान हुकल्याची खंत त्याच्या मनात येऊन गेल्याशिवाय राहिली नाही. नेसरीच्या खिंडीत अब्दुल करीम बहलोलखानावर चालून जाऊन त्याच्या जागी सरनोबत झालेले कुडतोजी गुजर खस्त झाल्याचे आणि त्यांच्या जागी आता महाराणी सरकार सोयराबाईंचे बंधू हंबीरराव मोहिते सरनोबत झाल्याचे वृत्तसुद्धा त्याला समजले. राज्याभिषेकानंतर लगेचच आईसाहेबांचा काळ झाल्याची बातमी आगीच्या लोळासारखी त्याच्या जखमी हृदयावर कोसळली. दु:खाला पारावार नव्हता. पण डोळ्यांतून पाणी काढण्याचीसुद्धा सोय नव्हती. तोंड दाबून बुक्क्यांचा मार याची शब्दश: प्रचिती तो घेत होता. त्याचे मन पित्या वासरासारखे स्वराज्याकडे ओढ घेत होते.
मध्येच कधीतरी त्याच्या मनात कुशंका येत असत. मन सैरभैर, उदास होऊन जाई. आपण स्वराज्य का सोडले, ते एक स्वत:ला माहीत आणि दुसरे महाराजांना. प्रधानमंडळ, सरदार, फौज आणि रयतेला एवढेच माहीत होते की, नेताजी पालकर महाराजांवर रुसला आणि मोगलांना मिळाला. वतनाच्या लोभापायी स्वार्थीपणे मुसलमान झाला. ते त्याचे स्वागत कसे करतील ही चिंता कधीतरी त्याचे काळीज कुरतडू लागे. स्वराज्य सोडले एवढा एक अपराध ते सारे महाराजांच्या शब्दाखातर नजरेआड करतील, पण धर्मभ्रष्टतेचा अपराध? त्याला कोण क्षमा करणार?


‘नाही, पण महाराजांनीच शब्द दिला, त्यांनी आज्ञा केली म्हणूनच देह राखण्यासाठी धर्म सोडला. अन्यथा धर्मासाठी आपण काय सोसले, कसे बलिदान केले असते हे ते पुरते जाणून आहेत. ते आपल्याला असे वाऱ्यावर सोडून द्यायचे नाहीत. जसा बजाजी नाईक निंबाळकराला शुद्ध करून घेतला, तसे ते मलासुद्धा शुद्ध करून घेतीलच. ते आलमगिरालासुद्धा पुरते ओळखून आहेत. येथे होत असलेल्या आपल्या कुचंबणेची त्यांना जाणीव असल्याशिवाय कशी राहील?’
‘पण बजाजी त्यांचा सख्खा आप्त. मेहुणाच. मी पाहुणा असलो तरी तसा दूरचाच.’
लगेच पहिले मन पुन्हा समजूत काढी–


‘छे! छे!! महाराजांकडे असा आपला-परका, सख्खा-सावत्र भेद नाही. महाराज आपल्याला दूर लोटायचे नाहीत. तसे असते तर त्यांनी आफताबखानास आपल्या खिदमतीत आणि नर्दुल्लाखानास चक्क पन्नास हशमांसह अंगरक्षक म्हणून आपल्याकडे इतक्या दूर अफगाणिस्तानासारख्या परमुलखात, हजार हिकमती लढवून आणि अनंत धोके पत्करून धाडले नसते. आग्र्यात असताना किंवा दिल्लीत असताना आपल्यासाठी पन्नास-साठ मावळे नजरबाज कुर्बान केले नसते. घियासुद्दीन मुद्दाम लांबचा वळसा घालून खुश्कीच्या रस्त्याने हजला गेला, तो केवळ आपली गाठ घेण्यासाठी महाराजांनी धाडले म्हणूनच ना? नाही, नाही महाराजांचे माझ्यावर पूर्णपणे लक्ष आहे.’
क्वचित कधी त्याच्या मनात फारच निराशा दाटून येई– ‘कपटी, धूर्त आणि अष्टौप्रहर सावध आलमगिराने सारे राजकारण नासवले. धर्म सोडण्यास भाग पाडले. जनसंपर्क तोडला. दूर, पार तिकडे परदेशात अफगाणिस्तानात दहा वर्षे कुजवत ठेवले. स्वराज्यच काय पण हिंदुस्थानचीसुद्धा हवा जाणवू दिली नाही. हा एवढा प्रदीर्घ काळ महाराज आणि स्वराज्य काही स्वस्थ बसून आपली वाट पाहत राहिले नाही. बहादूरखान आणि दिलेरखानासारख्या मातब्बर मुरब्बी आणि घातक सेनानायकांना यशस्वी टक्कर देत स्वराज्य वाढतच राहिले आहे. दूर गेलेल्या या हतभागी सरनोबताची उणीव कोणालाच जाणवली नसणार. एक पडताच दुसरा तितकाच, किंबहुना कांकणभर सरसच, समर्थ गडी उभा राहतो. हेच तर स्वराज्याचे बळ आहे. हीच तर महाराजांची शिकवण आहे. मग आता महाराजांना आपली गरज उरली आहे का? काय स्थान असेल माझे स्वराज्यात, परत गेल्यानंतर? फौजेत, रयतेत मी कोण असेन?’
मग तोच स्वत:ला समजावीत असे–


‘स्वराज्यात स्थान कोणते? स्वराज्याचा इमानदार, प्रामाणिक, निष्ठावान पाईक असण्याचे तुझे स्थान कोण हिरावून घेणार? प्रधानमंडळाला विचारतो कोण? महाराजांच्या हृदयात तुझे जे स्थान आहे, त्याला कोण धक्का लावणार? महाराजांचे राजकारण साधण्यासाठी जेव्हा स्वराज्य सोडण्याचा निर्णय घेतला, तेव्हाच हे सगळे धोके स्पष्ट दिसत नव्हते काय? अपमान, अपकीर्ती, अवहेलना आणि तिरस्कार होणार हे तेव्हाच कळले नव्हते काय? तथाकथित गद्दारीच्या पापाचा भार त्याच वेळी महाराजांनी स्वत:च्या माथी घेतला नव्हता काय? मग जर जाणूनबुजून, समजूनउमजून या आगीत उडी घातली आहे, जर महाराजांच्या आज्ञेने आणि त्यांच्या शब्दावर विसंबून हे सतीचे वाण हाती घेतले आहे तर मग आता शंका का? ते काही नाही, आता एकच ध्यान, एकच ध्यास, एकच ध्येय; जेवढे लवकर होईल तेवढे लवकर महाराजांचे चरण जवळ करायचे. आता यात कणभर बदल नाही. पुढे महाराज ठरवतील तसे. त्यांच्या चरणी निष्ठा वाहिल्या आहेत, त्यांच्या हाती जीव सोपवला आहे; आता त्यांच्या पायावेगळा विचार कशाला?’


स्वत:च स्वत:ची समजूत काढली की, कुलीखानाला नवा हुरूप येत असे. संधी मिळताच तो आफताबखानाबरोबर नव्या नव्या योजना तयार करण्याचा प्रयत्न करीत राही.
-
दख्खनमध्ये मराठ्यांनी नुसता उच्छाद मांडला होता. बहादूरखान आणि दिलेरखानासारख्या मातब्बर सरदारांनासुद्धा ते आटोपत नव्हते. दोन्ही खान आणि शहजादा मुअज्जम यांच्या आपसातल्या बेबनावाचा ते नेमका फायदा उठवीत होते; त्यामुळे त्यांना पायबंद घालण्याशिवाय बादशहासमोर दुसरा विषय नव्हता. दिल्लीत दख्खनच्या नव्या मोहिमेचे वारे सुरू होते. मराठ्यांवर मोहीम म्हणजे हमखास अपयश असे समीकरण प्रत्येक दरबाऱ्यांच्या मनात अगदी पक्के ठसले होते. नव्या मोहिमेत आपली वर्णी लागू नये यासाठी प्रत्येकजण आपापल्या अल्ला आणि देवाकडे प्रार्थना करीत होता.


गेल्या दहा वर्षांत कुलीखानाला बादशहाच्या स्वभावाची मेख नेमकी कळली होती. शिवाय अफगाणिस्तानात नव्या पद्धतीने मोहीम चालविण्यासाठी इजाजत मागितली होती त्याचा ताजा अनुभव गाठीला होताच की. म्हणूनच कुलीखान हे पक्के जाणून होता की, त्याला दख्खनमध्ये जाण्यात तीळमात्र जरी रस आहे असा बादशहाला नुसता संशय येण्याची खोटी की त्याची रवानगी बंगाल-आसामच्या किंवा पार हिमालय ओलांडून तिबेटच्या स्वारीवर झाल्याशिवाय राहणार नाही; त्यामुळे त्याने मोठी नामी, थेट मराठी गनिमी काव्याची युक्ती वापरण्यास सुरुवात केली. दख्खनचा आता आपल्याला कसा तिरस्कार वाटतो, त्या अडाणी अश्रद्ध लोकांमध्ये आपण इतके दिवस कसे काढले हे नुसते आठवले तरी अंगावर कसा काटा येतो, दख्खनमध्ये गेल्यानंतर आपला सूड घेण्याचा शिवाजी हर प्रकारे कसा प्रयत्न करील वगैरे वगैरे तो भेटेल त्या दरबारी मानकऱ्याशी बोलत राही. त्याउपरही कडी म्हणजे बादशहा सलामतांना आपल्याला दख्खनपासून दूर ठेवण्याची बुद्धी व्हावी अशी आपण अल्लाची कशी सतत प्रार्थना करतो याचे मोठे रसभरित वर्णन करीत राही.


या खटाटोपाचा अपेक्षित तो परिणाम झाला. दख्खन मोहिमेचा विचार करण्यासाठी बादशहाच्या खासगी महालात रात्री भरणाऱ्या मसलतीचे त्याला बोलावणे आले. नेहमीप्रमाणे साहेबी लिबासात साध्या बैठकीवर बादशहा टोपी विणत बसलेला आणि जाफरखानासह सारे पुरेसे अंतर राखून माना खाली घालून उभे.


वजीरेआझम जाफरखान, दख्खन का हाल बयान हो.
वजीर जाफरखानाने मराठ्यांना भरपूर शिव्याशाप देत मोगली फौजांची आणि अंमलदारांची दख्खनमध्ये उडत असलेली दाणादाण आणि मराठ्यांनी मांडलेला उच्छाद याचे रसभरित वर्णन केले. हे ऐकत असताना कुलीखानाला मनातल्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत असल्या तरी त्या आनंदाची अस्फुटशी लहरसुद्धा चर्येवर उमटणार नाही याची तो कटाक्षाने खबरदारी घेत होता. हिरवी नजर त्याला नेमके टिपत होती या वास्तवाची त्याला पूर्ण जाणीव होती. त्याने मान जास्तीतजास्त खाली झुकविली होती; बादशहाला त्याच्या चेहऱ्याचा कमीतकमी भाग दिसावा असा त्याचा प्रयत्न होता. वजिराच्या तोंडून एखाद्या दारुण पराभवाचे किंवा बहादूरखानाच्या एखाद्या नव्या फजितीचे वृत्त सांगितले जाऊ लागले की, तो चेहरा अधिकच सुतकी करून विषादाने मान हलवी. वजीर बोलायचा थांबला. दालनात नेहमीप्रमाणे शांतता पसरली. बादशहाने विचारल्यास काय जवाब द्यायचा या विवंचनेत जो तो बुडाला. अपेक्षेप्रमाणे हिरवी नजर कुलीखानावर स्थिरावली.


तर, महम्मद कुलीखान, दख्खनमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत तुझे काय म्हणणे आहे?
जमिनीपर्यंत लवून कुर्निसात करीत कुलीखान एक पाऊल पुढे सरकला.


अन्नदाता, जेव्हापासून आपण या गुलामाला इस्लामचा खरा मार्ग दाखवला आहे, तिथपासून मला त्या रासवट अडाणी मराठ्यांचा आणि खोट्या धर्माच्या नावाखाली त्यांनी चालवलेल्या व्यर्थ खटाटोपाचा अत्यंत तिरस्कार वाटू लागला आहे. त्या काळातले माझे दिवस जेव्हा मला आठवतात, तेव्हा माझी मलाच शरम वाटू लागते. हुजूर जिल्हेसुभानी, शिवाजीराजा किती कपटी आणि दीर्घ द्वेष्टा आहे हे माझ्यासारख्या नाचीज गुलामाने आलाहजरतांना काय सांगावे? हुजुरे आला ते पूर्णपणे जाणतात; अगदी स्वानुभवाने जाणतात. मी नर्मदेच्या आसपास पोहोचल्याचे जरी त्याला समजले तरी तो माझा खून पाडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या गरीब गुलामाला दख्खनपासून चार पावले दूरच ठेव अशी मी रोज अल्लाची करुणा भाकतो.


हिरव्या नजरेत क्षणभर संशयाची झाक तरळून गेली. दातांच्या फटीतून तीक्ष्ण स्वरात शब्द उमटले–
लाहौलवलाकूव्वत. हे कोण, महम्मद कुलीखान बोलला? सिंहाच्या छातीचा, चित्त्याच्या चालीचा, वाघाच्या शौर्याचा, गरुडाच्या नजरेचा आणि हत्तीच्या बुद्धीचा कुलीखान हे बोलला? माबदौलत आपल्या कानांवर विश्वास ठेवू शकत नाहीत. कुलीखान, आज तू कुलीखान आहेस ते एका खास मकसदसाठी. तुला संपवायचे असते तर दिलेरखानाच्या गोटातच तुझी विल्हेवाट लागली असती. सर्वशक्तिमान अल्लाने तुझी निवड सरजमीने हिंद दार-उल-इस्लाममध्ये तबदील करण्यासाठी असून, तुझ्याकडून इस्लामची सेवा करून घेण्याची आज्ञा माबदौलतांना दिली आहे. बंगालात काळापहाडने जे काम केले, तेच काम दख्खनमध्ये अल्लाने तुझ्यावर सोपवले आहे, अशी माबदौलतांची संपूर्ण खात्री पटलेली आहे. तुझ्या मनामध्ये इस्लाम पूर्णपणे रुजवण्यासाठीच तुला माबदौलतांनी अफगाणवर पाठवले होते. त्या नामुराद कमअस्सल काफिर कोहस्तानी चूह्याच्या भीतीपोटी नव्हे. त्याला नेस्तनाबूद करण्याची ताकद अलम मुघलिया फौजेत कोणात असेल तर ती केवळ एकट्या महम्मद कुलीखानामध्येच आहे. माबदौलतांच्या जहनमध्ये असे आहे की, त्या नामुराद शिवाचा आणि आदिलखानाचा जो मुलूख कुलीखान आपल्या समशेरीच्या जोरावर जिंकून घेईल त्याचा अलग सुभा करून त्याची सुभेदारी कुलीखानाला दिली जावी.
करामात. करामात.
कुलीखान तुला मरगट्ट्यांबद्दल जी चीड आणि नफरत वाटते, त्याची भडास आपल्या समशेरीने पूर्ण काढून घे. एक तर त्यांना अल्लाच्या झेंड्याखाली आण नाहीतर दोजखच्या आगीत रवाना कर. रही बात तुझ्या मनातल्या अंदेशाची, तर मुघलिया फौजेच्या अजगरी विळख्यात तुझा डेरा थेट मधोमध असेल. नवाब शाहिस्ताखान जसे गाफील राहिले तसा तू गाफील राहणार नाहीस हे माबदौलत पूर्णपणे जाणतात. त्या काफिर दखनी चूह्याची प्रत्येक चाल आणि त्याचा प्रत्येक माणूस तू नीट ओळखतोस. दगा होईलच कसा?


पुढे होऊन कुलीखान झटकन गुडघ्यांवर बसला आणि बादशहाच्या बैठकीच्या चादरीचे टोक हातात घेऊन त्याचे चुंबन घेऊन पुन्हा जागेवर गेला.


रहम, आलमपन्हा रहम। कसूर माफ असावी जिल्हेसुभानी. तिरस्काराच्या ऊर्मीत आणि भावनेच्या लाटेत वाहत जाऊन गुलाम भलतेच बोलून गेला. हुजुरेपाकच्या दिले मुबारकला ठेस पोहोचवण्याचा गुलामाचा कोणताही इरादा नव्हता. गुलाम रहमतची भीक मागतो. या मातीच्या शरीरावर आणि प्राणांवर अलीजा शहनशाहे आलम आलमगीर बादशहा सलामत यांचीच एकमेव सत्ता आहे. कुराण आणि हदीसच्या खालोखाल आलमपन्हा हुजुरांचा शब्द गुलामासाठी सुन्नत आहे. आलमपन्हांची प्रत्येक कृती गुलामासाठी नवी हदीस आहे. जिल्हेसुभानींची इच्छा म्हणजेच फर्मान, नजरेची फडफड हाच हुकूम. आलाहजरतांसाठी आणि इस्लामसाठी या शरीरातला प्रत्येक श्वास आणि रक्ताचा प्रत्येक कतरा कुर्बान आहे याची आलमपन्हांनी खात्री बाळगावी.


शाबास! ये हुई कुलीखान जैसी बात. जसा हजरत अबू बकरसाठी खालीद तसा शहेनशाहे आलमगिरांसाठी महम्मद कुलीखान अशी इस्लामची तारीख लिहिली जाईल यात आता माबदौलतांना संशय वाटत नाही.
इन्शाल्लाह! इन्शाल्लाह!!
सर्व उपस्थित दरबारींच्या मुखातून सुटकेचा नि:श्वास आणि दुवा एकदमच बाहेर पडला. दख्खनमध्ये जायला मिळणार याचा आनंद कुलीखानाच्या चेहऱ्यावर बादशाही कृपालाभाच्या कृतज्ञतेचा लोचट बुरखा घेऊन अवतरला.
दाऊदखान कुरेशी…
हुकूम आलमपन्हा…
दख्खनची ही नवीन मोहीम माबदौलत तुझ्यावर सोपवीत आहेत. महम्मद कुलीखान तुझा नायब असेल. मोहिमेत कुलमुखत्यारी तुझीच असेल पण फौजेच्या हालचाली, हल्ल्याच्या योजना आणि डावपेच तसेच लढण्याची पद्धत ठरवण्याचे सारे अधिकार कुलीखानाला असतील. त्याच्या मागणीप्रमाणे आणि विचाराने तुझे हुकूम जारी होतील. तातडीची गरज असेल तर तुझ्या हुकमाशिवाय फौज हलवण्याचा अधिकार कुलीखानाला बहाल असेल. तू त्याला जाब विचारणार नाहीस. मात्र तुला वाटल्यास, तुझी काही तक्रार असल्यास तू थेट माबदौलतांसमोर पेश करू शकतोस. एक गोष्ट नीट ध्यानात ठेव, या मोहिमेत माबदौलतांच्या साऱ्या आशा-आकांक्षा गुंतल्या आहेत. कोणतीही किंमत चुकवावी लागली तरी बेहत्तर, पण फते हासिल झालीच पाहिजे. ही मोहीम फक्त एकट्या नामुराद शिवाला बुडवण्यासाठी नाही तर, ज्याच्या नालायक आणि गलथान कारभारामुळे शिवाला बगावत करण्याची संधी मिळाली आणि मुघलिया तख्ताला आव्हान देण्याइतका त्याचा हौसला वाढला, त्या नामुराद आदिलखानालासुद्धा सबक मिळाली पाहिजे. त्याची दौलतसुद्धा साफ बुडवून टाक. मुघली झेंडे दक्षिण समुद्रात भिजले पाहिजेत. कोणत्याही सबबीवर सुलूक किंवा तह मंजूर केला जाणार नाही. शर्त केवळ एकच. मुलूख खालसा आणि संपूर्ण शरणागती.


जो हुक्म आलमपन्हा. महम्मद कुलीखानासारखा काबील आणि गनिमाचा मुलूख स्वत:च्या तळहाताप्रमाणे माहीत असलेला नायब, आलाहजरतांची मेहेरनजर आणि कुमक, त्याचप्रमाणे परमदयाळू अल्लाची पाठराखण या बंद्याला मिळाली तर कुठलेही काम गुलामासाठी सहज मुमकिन आहे.
अलहमदुलइलल्लाह.
जाफरखान…
हुकूम…
उद्या दरबारात दख्खनच्या नव्या मोहिमेचे ऐलान कर. सरलष्कर म्हणून दाऊदखान कुरेशी आणि त्याचा नायब म्हणून महम्मद कुलीखान नामजद केल्याचे जाहीर कर. तशी फर्माने लगोलग जारी कर. मोहिमेत कोणकोण शरीक होणार याचा फैसला लवकरच केला जाईल. पण इफ्तखारखानाला मोहिमेचा खान इ सामान नामजद करण्यात आले आहे. त्याला हर एक चीज मुहैया झाली पाहिजे. तोफखाना, बारूदखाना आणि खजाना यांचा इंतजाम ताबडतोब सुरू झाला पाहिजे. एक गोष्ट नीट समजून असा, छावणीत कलालांची दुकाने आणि तवायफांचा राबता असल्याचे कानावर आले तर माबदौलत खान-इ-सामानला त्यासाठी कसूरवार ठरवून कारवाई करतील. त्याव्यतिरिक्त आरामके हर सामान की तजवीज हो. विजयी फौजेला आराम करण्याचा आणि लूट मिळवण्याचा पूर्ण हक्क आहे.


जो हुकूम आलमपन्हा. हुकमाची शब्दश: तामील होईल.
याद रहे, काफिर बुढ्ढ्या जयसिंहापेक्षा ही मोहीम जास्त मोठी आणि ताकदवर झाली पाहिजे. कुठल्याही वस्तूची कमतरता पडता कामा नये. फौजा कोठेही असोत, रसद बे रोकटोक शेवटच्या शिपायापर्यंत चोख पोहोचली पाहिजे. मोहीम रंगात आली की, कुलीखानाची कर्तब आणि नामुराद शिवाची बरबादी स्वत:च्या डोळ्यांनी पाहण्यासाठी माबदौलत जातीनिशी दख्खनमध्ये उतरतील. त्या दृष्टीने दिल्लीमध्ये तजवीज सुरू करा.
बादशहाच्या महालातून मंडळी बाहेर पडली तेव्हा देवडीवर मध्यरात्रीचे टोल पडत होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी तोंड धुण्याचे तस्त घेऊन आफताबखान दालनात आला. तोंड धुण्यापूर्वीच कुलीखानाने आदल्या रात्री बादशहाच्या मसलतीत घडलेले सारे त्याला सांगितले. त्याच्या शब्दांतून आनंद आणि उत्साह ओसंडत होता.


आफताब, ही खबर विनाविलंब महाराजांकडे पोहोचती झाली पाहिजे. महाराजांना कळव. म्हणावे, शाही फौजा तापी उतरून बागलाणात शिरतील तेव्हा संधी साधून, काय वाट्टेल ते करून आम्ही स्वराज्य जवळ करू. मोहिमेचा तपशील पक्का झाला की, योजना पूर्ण तयार करून महाराजांचा कौल घेण्यासाठी पेश करू. ही संधी जणू शेवटचीच. तीही साधणे शक्य झाले नाही तर हा सेवक स्वर्गाच्या दाराशी महाराजांची वाट पाहत तिष्ठत बसलेला असेल.


सरकार, चिंता करू नका. सारे नीट जमून येईल आणि आपण लवकरच महाराजांच्या पायाशी असू. आजच नव्हे आत्ता घटकाभरात खबर घेऊन माणूस रवाना होईल. तो दोन-तीन हप्त्यांत थेट स्वराज्यात पोहोचेल.
इतक्या तातडीने? कसे शक्य होईल?
सरकार, घियासुद्दीनचे आजारी चेले अजून आपल्याच आश्रयाला आहेत. ती बहिर्जी नाईकांची खास माणसे आहेत. अशा प्रकारचे काम आज ना उद्या उद्भवणार ही अटकळ असल्यानेच त्या दोघांना आपल्यासोबत ठेवले होते. घटकाभरातच त्यातला एक स्वराज्याकडे रवाना होईल. चिंतेचे कारण नाही.
एकटाच? इतका दूरचा पल्ला आणि तो एकटा…?


सरकार, एकटा माणूस न रेंगाळता भरभरा जातो. आम्हा लोकांना अशा प्रवासाची सवय असते. जोडीला कोणी नसल्यामुळे गप्पा छाटण्याचा प्रश्न नसतो आणि त्यामुळे खबर फुटण्याचाही धोका उरत नाही. त्या माणसाकडे ना कुठली चिठ्ठी ना चिठोरा. सारा तोंडी व्यवहार. पंधरा-वीस दिवसांत खबर महाराजांच्या पायाशी जाते बघा.
पण खबर पोहोचल्याची खातरजमा?
वाटभर आपले अड्डे आहेत. रोज रात्रीचा त्याचा मुक्काम त्या अड्ड्यावरच असणार. तो तिथून पुढे सरकल्याची खबर लगोलग आदल्या मुक्कामाला पोहोचवली जाते. दुसऱ्या दिवशी त्या अड्ड्यावर खबर पोहोचली नाही तर लगेच शोधाशोध सुरू होते आणि मूळ ठिकाणी तसा संदेश येतो.
हरएक खबर अशीच जाते?


नाही सरकार. थेट महाराजांकडे ‘सासवडचे अंजीर’ पोहोचवायचे असतील आणि अगदी गुप्त खबर घेऊन एकटा हशम जात असेल तरच ही व्यवस्था असते. इतर बाबतींत वेगळी तजवीज असते.
वा छान! लगेच माणूस रवाना कर.


*कुलीखानाच्या आन्हिकांचे दुसऱ्या विश्वासू खिदमतगारावर सोपवून आफताबखान निघून गेला. घियासुद्दीनच्या चेल्याला गाठून त्याने सारी मसलत नीट पढवली. अर्ध्या घटकेतच एक फकीर अलख गाजवीत आणि चिमट्याचा खुळखुळाट करीत झपाट्याने दख्खनच्या वाटेने निघाला. आफताबखानाने दिल्लीतल्या बहिर्जीच्या डेऱ्यात असा माणूस रवाना झाल्याची खबर दिली आणि तो पुढच्या तजविजीला लागला.*
*_क्रमश:_*

*________🌱🌳🍂🍁______*