कोणतही शिवकाव्य येथे शोधा

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ३७




हिंदुस्थानचा पाटील
अलिजाबहाद्दर महादजी शिंदे
भाग ४

उत्तरहिंदुस्थानांत महादजीनें कडक अम्मल गाजविला, त्यामुळें बादशाहींतील मुसुलमान सरदार व रजपूत राजे यांनीं त्याच्याविरुद्ध बंडाळी माजविली (१७८६-८७). लालसोटच्या लढाईंत तर बादशहाची सर्व फौजच रजपूत राजांनां मिळाली, त्यामुळें महादजीस हार खावी लागली (१७८७); गुलाम कादरनें दिल्‍ली, अलीगड वगैरे शहरें ताब्यांत घेतल्यानें महादजीला चंबळेअलीकडे यावें लागलें. याप्रमाणें त्याच्या उत्तरेकडील वर्चस्वास धक्का बसला, परंतु त्यानें धीर न सोडतां पुन्हां गेलेले प्रांत परत मिळविण्याचा प्रयत्न चालविला; यावेळीं मात्र महादजीनें आपला ताठा व मत्सर सोडून नाना फडणविसाकडे मनांतील किल्मिष काढून टाकून मदतीची मागणी केली. दिल्‍ली हातची जाते हें पाहून नानानींहि अल्‍लीबाहद्दरास त्याच्या मदतीस धाडलें (१७८८). अल्‍लीबहाद्दर व महादजी यांनीं शीख आणि जाट यांनां मदतीस घेऊन गुलाम कादर वगैरे मुसुलमानमंडळ आणि उदेपूर, जोधपूर, जयपूर येथील राजे वगैरे रजपूतमंडळ यांचा पराभव करून पुन्हां रजपुताना आणि दिल्‍ली हस्तगत केली (१७८९-१७९०). उदेपूरचा राणा तर पाटीलबोवास सामोरा आला होता. हा मान त्या घराण्यानें खुद्द दिल्‍लीच्या बादशहासहि कधींच दिला नव्हता. याच सुमारास गुलाम कादरानें शहाअलमचे डोळे काढून व त्याच्या जनान्याची अब्रू घेऊन दिल्‍लींत प्रळय मांडला होंता; त्यावर महादजीनें गुलामास पकडून त्याला देहांतशासन केलें व पुन्हां शहाअलमास तक्तावर बसवून सर्व पातशाही कारभार आपल्या हातीं घेतला (१७८९).