कोणतही शिवकाव्य येथे शोधा

किल्ले अर्नाळा


किल्ल्याचा प्रकार : सागर किना-यावरील किल्ले
डोंगररांगः उत्तर कोकण
जिल्हा : ठाणे
श्रेणी : जास्त सोपी
इतिहास : –
चारही बाजूंनी पाण्याने वेढलेला अर्नाळा हा जलदुर्ग १५१६ मध्ये गुजरातचा सुलतान महमूद बेगडा याने बांधला. पोर्तुंगीजांनी १५३० साली हा किल्ला जिंकला व नंतर यावर अनेक नवीन बांधकामे केली. सुमारे २०० वर्षांच्या पोर्तुंगीज सत्तेनंतर हा किल्ला १७३७ मध्ये मराठांच्या ताब्यात आला. पोर्तुंगीजांप्रमाणेच पहिल्या बाजीरावानेही या किल्ल्याची पुनर्बांधणी केली. शेवटी १८१७ मध्ये इतर किल्ल्यांप्रमाणेच हा किल्ला देखील इंग्रजांच्या
ताब्यात गेला.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :  –
अर्नाळा किल्ला चौकोनी असून दहा मीटर उंचीची अखंड व मजबूत तटबंदी याचे संरक्षण करते. तटबंदीमध्ये असलेले बुरुज आजही ताठपणे उभे आहेत. किल्ल्याला एकूण तीन दरवाजे असले तरी मुख्य प्रवेशद्वार उत्तरेकडे आहे. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दोन बुलंद बुरुज उभे आहेत. या दरवाजाच्या कमानीवर अत्यंत सुंदर नक्षीकाम असून दोन्ही बाजूला हत्ती व वाघाची प्रतिमा कोरलेली आहे. दरवाजावरच एक शिलालेख कोरलेला आहे. या शिलालेखामधील बाजीराव अमात्य मुख्य सुमती आज्ञापिले शंकर! पाश्चात्यासि वधूनि सिंधु उदरी बांधा त्वरे जंजिरा!! या ओळींवरुन या किल्ल्याची पुनर्बांधणी बाजीराव पेशव्याने केली हे लक्षात येते. किल्ल्याच्या आत त्र्यंबकेश्र्वराचे व भवानी मातेचे मंदिर आहे . दरवाजावरच बाजीराव पेशव्यांच्या नावाचा एक शिलालेख आहे.२३ मे १७३७ रोजी या कोटाचे काम पूर्ण झाल्याचा त्यात उल्लेख आहे.
त्र्यंबकेश्र्वर महादेवाच्या मंदिरासमोरच सुबक बांधणीचे एक अष्टकोनी तळ आहे. या शिवाय किल्ल्यात गोडापाण्याच्या विहिरीही आहेत. किल्ल्याच्या सभोवार लोकांची वस्ती असून त्यांची शेतीही आहे. किल्ल्याच्या मुख्य दरवाजाकडे जातांना बाहेरच्या बाजूला कालिकामातेचे मंदिर आहे. समुद्रकिनार्‍यावरुन किल्ल्याकडे पाहिले असता डाव्या बाजूला असणारा किल्ल्यापासून संपूर्ण सुटा असा एक गोल बुरुज आपले लक्ष वेधून घेतो. याच्या आत जाण्यास एक लहानसा दरवाजा आहे. संपूर्ण किल्ला बघण्यास अर्धा ते पाऊण तास लागतो. किल्ल्याच्या मजबूत तटबंदीवरुन किल्ल्याचे समोवार दर्शन घेत गोल फेरी मारता येते. मुख्य प्रवेशद्वाराच्या वर असणार्‍या उंचवटावर बसले असता पूर्ण किल्ल्याचा आवाका नजरेस पडतो.
गडावर जाण्याच्या वाटा : –
पश्चिम रेल्वेवरच्या विरार पासून अर्नाळा अंदाजे १० कि.मी. वर असून तेथे जायला एस्‌. टी. बस व रिक्षा यांची सुविधा आहे. अर्नाळा गावातून समुद्रकिनार्‍यापर्यंत गेल्यावर बोटीनेच किल्ल्यावर जाता येते. ही बोट सकाळी ६.०० ते दुपारी १२.३० व संध्याकाळी ४.०० ते ७.०० या वेळेतच आपल्याला किल्ल्यावर घेऊन जाते. समुद्रकिनार्‍यावरुन समोरच दिसणार्‍या अर्नाळा किल्ल्यावर बोटी जायला ५-१० मिनीटे लागतात.
राहण्याची सोय : – 
गडावर राहण्याची सोय नसली तरी संपूर्ण गड अर्धा-पाऊण तासात बघून बोटीने किनार्‍यावर परतता येत असल्याने राहण्याची गरज नाही.
अर्नाळा नावाच्या लहानशा बेटाच्या वायव्य दिशेस हा जलदुर्ग किल्ला बांधला आहे.उत्तर कोकणातील वैतरणा नदी या किल्ल्याजवळ समुद्राला मिळत असल्यामुळे खाडीच्या स र्वच प्रदेशावर या पाणकोटावरून नजर ठेवता येत असे. वसईच्या किल्ल्याइतकाच महत्त्वाचा अर्नाळ्याचा जलदुर्ग आहे. अर्नाळा येथे जाण्यासाठी वसईतून गाडीमार्ग आहे. वसई-नालासोपारा-निर्मळमार्गे आगाशी-अर्नाळा असे गाडीमार्गाने जाता येते. मुंबई-अहमदाबाद मार्गावरील शिरसाड फाटय़ावरुन विरार-अर्नाळा असेही येता येते. मुंबई-सूरत या पश्चिम रेल्वे मार्गावर विरार स्टेशन आहे. विरारला रेल्वेने पोहोचून तेथून आगाशी अर्नाळा गाठता येईल. विरार ते अर्नाळा हे साधारण पंधरा कि.मी चे अंतर पार करण्यासाठी बसेसची उत्तम सोय आहे.
बस स्टॉप पासून आपण कोळीवाडय़ातून सागर किनार्‍याला दहा मिनिटांमधे पोहोचतो. सागरात विस्तृत पसरलेले आणि झाडीने नटलेले अर्नाळ्याचे बेट आपल्याला उत्साहित करते. मात्र या बेटावर जाण्यासाठी बोटीची आवश्यता आहे. बेट आणि मुख्यभुभाग या मधे येण्याजाण्यासाठी फेरीबोटीची येथे सोय केलेली आहे. या फेरीबोटी ठरलेल्या वेळेनुसारच येजा करीत आसतात. त्यामुळे त्यांच्या वेळा पाहून आपले नियोजन केल्यास वेळ वाया जात नाही.  पंधरा मिनिटांचा जलप्रवास करुन आपण अर्नाळ्याच्या बेटावर पोहोचतो. या बेटावर होडीसाठी धक्का नाही त्यामुळे सागराच्या पाण्यातच उतरुन चालत किनार्‍यावर यावे लागते. अर्नाळ्याच्या बेटावर किल्ल्याव्यतिरीक्त इतर भूभागावर कोळीबांधवांची वस्ती असून काही भागात शेतीही केल्या जाते. या कोळीबांधवांनी किनार्‍यावर कालीका मातेचे मंदीर उभे केलेले आहे.
कालीकामातेला नमन करुन पुढे निघाल्यावर घरांच्या मधून जाणार्‍या वाटेने आपण दहा-पंधरा मिनिटांमध्ये अर्नाळा किल्ल्याच्या भल्याभक्कम दरवाजा समोर येवून थडकतो. दरवाजासमोरच्या वाळूच्या पुळणीवर दोनचार होडकीही विसावलेली असतात. साधारण चौकोनी आकाराच्या अर्नाळ्रयाचा किल्ला आहे. याचा मुख्यदरवाजा उतराभिमुख आहे. या महादरवाजा शिवाय गडाला अजून दोन प्रवेशद्वारेही आहेत. महादारावर वाघ, हत्तींची शिल्पे तसेच फुलांची वेलबुट्टी काढलेली असून दरवाजाच्या माथ्यावर मराठी शिलालेख लावलेला आहे.
हा देवनागरी लिपीतील शिलालेख वाचता येतो. बाजीराव पेशवे यांनी हा किल्ला बांधून पुर्ण केल्याचा उल्लेख यात आहे. प्रवेशव्दाराच्या आत पहारेकर्‍यांच्या देवडय़ा आहेत. वरचा घुमट भव्य असून देखणा आहे. या दरवाजाच्या आत दुसरा दरवाजा असून तेथून तटबंदीवर जाणार्‍या पायर्‍यांचा मार्ग आहे. तटबंदीवरुन गडाला फेरी मारता येते. पस्तिस-चाळीस फुट उंचीची भक्कम तटबंदी असून जागोजाग बुरुजांची गुंफण केलेली आहे. या बुरुजांमधे खोल्याही केलेल्या आहेत. त्यात जाण्यासाठी पायर्‍यांचा मार्गही केलेला आहे. तटबंदीवरुन दूरपर्यंतचा प्रदेश पाहायला मिळतो. मजबूत आणि उंच तटबंदी असल्यामुळेच बहुदा किल्ल्याभोवती खंदक केलेला नसावा. तटबंदीमधे जागोजाग मारगिरीसाठी बग्या केलेल्या आहेत.
अर्नाळ्याच्या तटबंदीच्या आत पाणी मुबलक आहे. त्यामुळे आतमधेही व्यवस्थीत शेती केल्या जाते. त्रंबकेश्वराचे मंदिर आणि हाजीअली आणि शहाअली यांची थडगी मधल्या भागामधे आहेत. किल्ल्यामधील वाडय़ांच्या जोत्यावरही शेती केली जाते हे पाहून आश्चर्य वाटते. पश्चिमेकडील दरवाजा, चोर दरवाजा, भवानी मंदिर पाण्याची विहीर इत्यादी पहाण्यासाठी आणि गडफेरी साठी साधारण तास सव्वातासाचा अवधी पुरेसा होतो.
किल्ल्यापासून कि.मी अंतरावर टेहाळणीसाठी ३६ फूट उंचीचा बुरुज बांधलेला आह. या एकांडय़ा बुरुजावरुन बेटाच्या परिसरावर तसेच सागरावर लक्ष ठेवणे सोयीचे होते. बुरुजावर जाणारा मार्ग झाडीझाडोप्यामुळे बंद झाला आहे. गुजरातच्या सुलतानांनी अर्नाळा बांधला पुढे यावर पोर्तुगिजांचा अंमल राहिला. मराठय़ांनी यावर अधिकार मिळवला त्यावेळी याची पुर्नबांधंणीही करण्यात आली. पुढे इंग्रजांनी हा किल्ला इतर किल्ल्याप्रमाणे जिंकूण घेतला.
अर्नाळा किल्ल्याचा भक्कमपणा आणि निसर्गसानिध्या बरोबरच सुखावणारे सागर दर्शन याचा मोह आवरीतच आपण पुन्हा जलप्रवासासाठी परतीच्या मार्गावर निघतो.