कोणतही शिवकाव्य येथे शोधा

अवचितगड


अवचितगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. कोकणात कुंडलिका नदीच्या तीरावर रोहा गावाच्या आजूबाजूला पसरलेल्या डोंगररांगांमध्ये गर्द रानाने वेढलेला किल्ला म्हणजे अवचितगड. महाराष्ट्रातील मोजक्या पण श्रीमंत गडांमध्ये या गडाची गणना होते. रोह्यापासून ५ कि.मी. वर असलेल्या या गडाची उंची तळापासून ३०५ मीटर किंवा १००० फ़ूट आहे. घनदाट जंगलामुळे जाण्याचा मार्ग दुर्गम झाला आहे. सर्व बाजूंनी तटांनी आणि बुरुजांनी वेढलेला असल्याने हा किल्ला संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. उपरांगेच्या उत्तरेकडे श्रीबाग व पेण आहे तर दक्षिणेकडे रोहा व मुरुड तालुका आहे. रोह्यावरुन कुंडलिकेवरचा एक पुल आपल्याला पिंगळसाई गावी नेतो. तिथून तासाभराच्या चालीनंतर आपण गडावर पोहोचू शकतो.
अवचितगडाचा किल्ला हा शिलाहारांच्या काळात लष्करी ठाणे म्हणून बांधला गेला असावा असे दिसते. पुढे निजामशाहीच्या राजवटीमध्ये हे सुभ्याचे ठिकाण म्हणून वापरले गेले. छत्रपती शिवाजी महाराजांनी अवचितपणे येवून हा किल्ला ताब्यात घेतला. म्हणून याला अवचितगड असे नाव मिळाले असे म्हणतात. पण याचे पूर्वीचे नाव काय होते ते मात्र कळत नाही. मोसे खोर्‍यातील बाजी पासलकर यांचा संबंध या किल्ल्याशी होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला ताब्यात आल्यावर याची लष्करीदृष्ट्या पुर्नबांधणी केली. इंग्रजांबरोबर झालेल्या मराठ्यांच्या युद्धामध्ये कर्नल प्रॉथर याने याने हा किल्ला इ. स. १८१८ मध्ये जिंकून घेतला.
लांबुळक्या आकाराचा अवचितगड तटबंदी आणि बुरुजांनी परिवेष्टीत आहे. या भक्कम तटबंदीच्या आत पाण्याच्या टाक्यांचा समुह असून, एक उत्तम बांधणीचा तलाव आहे. गडावर पासलकरांची घुमटी आहे. गडावर महादेव मंदिर, दिपमाळ, गणपती, पार्वती, विष्णू यांच्या स्थानांबरोबर दक्षिणेकडील बुरुजावर शिलालेख ही पहायला मिळतो.
गडाच्या माथ्यावरुन कुंडलिका खोर्‍याचे तसेच कोकण रेल्वेचे दृष्य उत्तम दिसते. सूरगडाचेही दर्शन होते. अवचितगडावरुन पिंगळसईच्या मार्गाने उतरुन गावातील गणेश मंदिर पाहून रोहेकडे जाता येते. गडाची वाट सोपी आहे. गडावर जाण्यास तीन मार्ग आहेत. सर्वप्रथम मुंबईहून कोकण रेल्वेने रोह्याला पोचावे आणि तिथून पिंगळसई गावापर्यंत २० रुपये दराने शेअर रिक्षा मिळते. गावात शिरताच एक गणपतीचे सुंदर मंदिर आहे, पण आम्ही गेलो तेव्हा तिथे प्रचंड गर्दी होती. काही उत्सव किंवा पूजा असावी. जर गाडी घेऊन जात असाल तर पिंगळसई पर्यंत जाण्याची गरज नाही, रोह्याच्या आधी ६-७ किलोमीटर अंतरावर मेढा नावाचे गाव आहे. गावाची तंटामुक्ती गाव म्हणून मोठी कमान डाव्या बाजूला दिसते. तिथून शंकराच्या मंदिराकडे जावे. वाटेत एक मोठी पुष्करणीदेखील आहे. मंदिरासमोरून एक छोटं रेल्वेचे फाटक ओलांडून पुढे निघालो की थोड्या अंतरावर एक भलीमोठी विहीर आहे आणि तिथून उजव्या बाजूने जंगलातून वाट आहे. तिसरा मार्ग नागोठणे पासून पुढे रोह्याच्या दिशेने निघाल्यावर आहे. तिथे एक बंद कागद कारखाना आहे. कारखान्याच्या मागून गडावर जाण्यास मार्ग आहे. तिसऱ्या मार्गाबद्दल जास्त माहिती नव्हती. पिंगळसई मार्गाने गड माथ्यावर पोचायला किमान एक-दीड तास लागतो.
साक्षात रायगड भोवतालच्या परिसराच्या सुरक्षेची जबाबदारी ह्या किल्ल्यावर होती. किल्ला जास्त मोठा नाही, पण तिथे प्रचंड महसूल ठेवला जात असे. राजधानी जवळ असल्याने ही व्यवस्था केली होती. त्यामुळे महाराजांच्या श्रीमंत किल्ल्यांमध्ये अवचितगडाचेसुद्धा नाव येते. गडाचे स्थान हे त्याच्या जमेची बाजू आहे. गर्द रानात एका उंच डोंगरावर किल्ला आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरावर नजर ठेवणे सहज सोप्पे जाते.
गडावरील ठिकाणे: –
किल्ले अवचितगडाच्या मुख्य प्रवेश दरवाजातून डाव्या हातास “शरभ” हे शिल्प दिसेल. हे शिल्प सातवाहन किंवा शिलाहारांच्या काळातले, म्हणजे इसवी सनापूर्वीच्या ८०० ते १००० वर्षे इतके जुने असू शकते. यावरून या “किल्ले अवचितगड”चा भूतपूर्व इतिहास किती जुना आहे हे समजते. गडाच्या दोन्ही टोकास गोपुराप्रमाणे दिसणारे दोन बुरूज आहेत. गडाच्या दक्षिण बुरुजाकडील दरवाजा ढासळलेल्या अवस्थेत आहे. त्या बुरुजाच्या भिंतीत एक शिलालेख आहे. त्यांतील मजकूर असा : “श्री गणेशाय नमः श्री जयदेव शके १७१८ नलनाम संवत्सरे चैत्र शुद्ध प्रतिपदा.” दुसऱ्या दरवाज्यात पाण्याने भरलेले कुंड आहे. त्या कुंडातील पाणी पिण्यायोग्य आहे. जवळच खंडोबाची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. उत्तरेकडील बुरुजावर एक उध्वस्त वाडा आहे. वाड्याच्या ईशान्येस आणखी एक बुरूज असून दक्षिणेकडील भिंतीत एक दरवाजा आहे. किल्ल्यात काही तोफा पडलेल्या आहेत.
दक्षिण दिशेस एक बालेकिल्ला आहे. त्याची लांबी-रुंदी अनुक्रमे ९०० फूट आणि ३०० फूट आहे. बालेकिल्ल्याच्या उत्तरेस दोन्ही टोकांना दोन दरवाजे आहेत. आत पाण्याचा एक द्वादशकोनी हौद आहे. पश्चिमेच्या अंगास खडकात कोरलेली पाण्याची सात टाकी आहेत. टाक्यांच्या मध्यभागी एक समाधी असून तिच्यापुढे एक दीपमाळ आहे.
पावसाळ्यानंतरचे येथील निसर्गसौंदर्य पाहण्यासारखे असते. इथल्या रानात रानडुकरे, माकड, बिबळ्या, कोल्हे, इ. प्राणी आढळतात. गडावरून समोरच तैलबैलाच्या दोन प्रस्तरभिंती, सुधागड, सरसगड, धनगड, रायगड, सवाष्णीचा घाट इ. परिसर न्याहळता येतो.
गडावर जाण्याच्या तीन वाटा : –
  • पिंगळसई मार्गः  अवचितगडावर जाण्यासाठी मुंबईकरांनी / पुणेकरांनी प्रथम रोह्याला यावे. येथून दीड तासाची पायी रपेट केल्यावर गडाच्या पायथ्याशी पिंगळसई गावात आपण पोहोचतो. हे अंतर अंदाजे ५ कि.मी. आहे. येथून गडावर जाणारी वाट सरळ आणि मळलेली असल्याने तासाभरात गडावर पोहोचता येते. या वाटेवर एक युद्धशिळा(वीरगळ) आहे.
  • मेढे मार्गे:  मुंबई – रोहा मार्गावर रोह्याच्या अगोदर ७.५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मेढे या गावी उतरावे. गावातून विठोबा मंदिराच्या मागूनच गडावर जाण्यासाठी वाट आहे. या वाटेने आपण एका तासात गडावर पोहोचतो. ही वाट दाट झाडीमधून जात असल्याने वाट चुकण्याची शक्यता आहे. या वाटेने आपण पडक्या बुरुजावरून गडावर पोहोचतो. बुरुजावरून डाव्या बाजूला कुंडलिका नदीच्या खोऱ्यायातील मेढे व पिंगळसई ही गावे दिसतात.
  • पडम मार्गे:  गडावर जाण्याचा तिसरा मार्ग पडम गावातून येतो. रोहा मार्गे पिंगळसई गावाला येतांना, रोहा-नागोठणे मार्गावर एक बंद पडलेला कागद कारखाना आहे. या कारखान्याच्या मागून जाणारी वाट गडाच्या दक्षिण प्रवेशद्वारापाशी घेऊन जाते. या वाटेने गडावर जाण्यास दोन तास पुरतात.