कोणतही शिवकाव्य येथे शोधा

संभाजी कावजी

संभाजी कावजी

छत्रपती शिवाजी राजेंचा हा अंगरक्षक होता.संभाजी कावजीने प्रतापगडाच्या रणसंग्रामावेळी पळून जाणार्‍या अफजलखानाचे शीर कापले होते.अंगाने धिप्पाड व मजबूत असलेल्या कावजीने घोड्यास चार पायावर उचलले होते.हणमंतराव मोर्‍याच्या मुलीला लग्नासाठी मागणी घालण्याचे निमित्त करून कावजीने त्यास ठार मारिले.अफजलखानाचे भेटीवेळी छत्रपतींनी संभाजी कावजी व जीवा महाला यांना अंगरक्षक म्हणून नेले होते.

सभासद बखरीत प्रतापगडाच्या लढाईचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे,छत्रपतींनी उजवे हातचे बिचवियाचा मारा चालवून खानाची चरबी बाहेर काढली व चौथरियाखालें उडी घालोन निघोन गेले.'खाण याणी गलबला केला की मारीले मारीले,दगा जाहला,जलदीने धावा असे बोलीले मग भोई याणी जलदीने पालखी आणुन खानास पालखीस घालुन उचलोन चालिले तो इतकियात संभाजी कावजी हुद्देकरी याणे भोयाच्या पायाच्या पट्ट्याने ढोण सिरा तोडुन पालखी भुईस पाडली आणी खानाचे डोचके कापुन हाती घेऊन राजियाजवळ आला.'

पुढे शायिस्तेखानाच्या आक्रमणावेळी संभाजी कावजीचा मित्र बाबाजी राम हा खानास मिळाला,त्यामुळे छत्रपतींनी त्याची कानउघाडणी केली.ती सहन न झाल्यामुळे संभाजी कावजी सुध्दा खानास मिळाला.तेथे कावजीने घोड्यास चार पायावर उचलुन आपल्या ताकतीचे प्रदर्शन केले,'जोरावर होता,घोडा चहूं पाई धरून उचलला.'हे त्याचे शौर्य पाहून खानाने त्यास मौजे मलकर या ठाण्यास पाचशे स्वारांसह सलाबतखान दखनी याच्या तैनातीस ठेविले.पुढे प्रतापराव गुजर यांस,छत्रपतींनी त्याजवर पाठवून त्यास इ.स. १६६१ मध्ये ठार मारिले.