कोणतही शिवकाव्य येथे शोधा

बाजी पासलकर

बाजी पासलकर

बाजी पासलकर हे मोस मावळखोर्‍याचे वतनदार.निगडे मोसे गावापासून ते सांगरून-डावजेपासून,धामन-ओव्होळपर्यंतची ८४ खेडी त्यांच्या वतनदारीत होती.अत्यंत शूर असलेले बाजी न्यायदानातही उत्तम होते.तंटे सोडविण्यात ते हुशार होते.इतिहासात बाजी पासलकर नावाच्या दोन व्यक्ती होत्या.पहिले बाजी बेलसरच्या युध्दात मरण पावले तर दुसरे सवाई बाजी काय सावंताबरोबरच्या युध्दात मारले गेले.

छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेस सुरूवात केली होती.शहाजीराजेंना पुणे जहागीर मिळाली होती.जिजाऊ आईसाहेब व शहाजीराजेंच्या मार्गदर्शनाखाली शिवबांनी मावळातील एक-एक किल्ला काबीज करावयास सुरूवात केली.तोरणा, सुभानमंगळ,रोहिडा असे किल्ले त्यांनी काबीज केले.विजापुरच्या अदिलशाही दरबारात शिवबांच्या स्वराज्य स्थापनेच्या खबरी येऊ लागल्या.शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी अदिलशाहने सन १६४८ साली फत्तेखानास धाडले.

फत्तेखानाने जेजूरीजवळील बेलसर येथे आपला तळ ठोकला होता.खानाच्या सैन्याने शिरवळजवळील सुभानमंगळ किल्ल्यावर हल्ला करून किल्ला काबीज केला.मराठ्यांचा हा पहिलाच पराभव होता.छत्रपतींनी कावजी मल्हार यास सुभानमंगळ भूईकोटावर चालून जाण्यास सांगितले.त्यांनी एका रात्रीत गड सर केला.तर फत्तेखानावर हल्ला करण्यासाठी बाजी पासलकर,कान्होजी जेधे,बाजी जेधे,गोदाजी जगताप बेलसरच्या छावणीवर गेले,अचानक हल्ला करून त्यांनी खानाच्या सैन्याची कत्तल केली व पुरंदरचा पायथा गाठला.
फत्तेखानचा सरदार मुसेखानाने पुरंदरावर हल्ला केला,पुरंदराला खानाच्या सैन्याचा वेढा पडला.गडाजवळ फत्तेखानाच्या सैन्याचे व मराठ्यांचे तुंबळ युध्द झाले.बाजी पासलकर,कान्होजी जेधे,गोदाजी जगताप यांनी गनिमांची कत्तल केली.फत्तेखानचा सरदार मुसेखान व गोदाजी जगताप एकमेकाला भिडले.दोघात तुंबळ युध्द झाले.अखेरीस गोदाजीच्या वाराने मुसेखानाच्या छाताडाचा वेध घेतला व खान कोसळला.मराठ्यांनी स्वराज्याचा पहिला रणसंग्राम जिंकला पण बाजी पासलकर सारखा वीर रणी पडला.

यदूनाथ सरकारांच्या मते काय सावंताच्या युध्दात बाजी मरण पावले(हे सवाई बाजी असावेत).सभासदाच्या बखरीत या युध्दाचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे.राजपुरीहून काय सावंत म्हणोन पांच हजार फौजेनिशी युध्दास आला.युध्द मोठे होतां बहूत रणखंदल जाले.काय सावंत खासा व बाजी पासलकर महायोध्दा,याच्या मिशा दंडायेवढ्या,यांस पीळ घालून वरि केशांच्या आधारें निंबे दोहींकडे दोन ठेवीत होता,असा शूरमर्द ठेविला,याशी व त्याशी खासाखाशी गांठ पडली.एकास एकांनी पंचवीस जखमा करून ठार पडले.मग उभयतांकडील दळ आपले जागियास गेले.

बाजी पासलकरांच्या बलिदानामुळे स्वराज्यातील मावळ्यांत सर्वस्वाचा त्याग करण्याचा आदर्श निर्माण झाला.पुण्याजवळील वरसगाव धरणातील जलाशयाला बाजी पासलकर यांचे नाव देण्यात आले आहे.पण दुर्दैव असे की याच धरणाच्या जलाशयात त्यांचा चिरेबंदी वाडा तसेच त्यांच्या वंशजांची शेकडो एकर जमीन बुडाली आहे,याचा मोबदला त्यांना शासनाकडून अजूनही मिळाला नाही.त्यांचे वंशज आजही त्यांच्या स्मृती जतन करण्याचे काम करत आहेत.